-
Kunachya Khandyavar (कुणाच्या खांद्यावर)
रवींद्र, ज्यांच्या नावातच रवी आणि इंद्र आहेत, त्यांच्या कर्तृत्वाबद्दल काय वर्णावे! सूर्यपुत्र कर्णाला जशी जन्मजात कवचकुंडले लाभली होती तद्वत या गायकाला खर्जातील आवाज जन्मतःच मिळाला आहे. इंद्रपुत्र अर्जुनाच्या लक्ष्यभेदी बाणासारखे या गायकाचे शब्दोच्चार मर्मभेदी आहेत. या गुणांच्या जोरावरच रवींद्र साठे यांनी अनेक थीम साँग्स अजरामर केली आहेत. ध्वनिमुद्रण, रंगमंच आणि पार्श्वगायन या तीन ही लोकांत मुक्त संचार करणारा हा गानयक्ष आहे ; यक्ष अशासाठी की खुद्द रवींद्र यांचेच असे म्हणणे आहे की कोणत्यातरी यक्षाचा वरदहस्त असल्यानेच एका 'क्ष' चे (साधारण माणसाचे) यक्षात रूपांतर झाले. रवींद्रजींच्या आवाजाची भुरळ भल्याभल्यांना पडली होती; म्हणूनच साक्षात गानसरस्वती किशोरी अमोणकरांना त्यांना आपला शिष्य करून घेण्याची मनीषा होती.. रवींद्रजींच्या आवाजातील 'घाशीराम कोतवाल' मधील ठुमरी ऐकण्यासाठी निळू फुलेसारख्या दिग्गजांचे कान आसुसलेले असायचे. रवींद्र साठेंच्या आवाजातील संस्कृत श्लोक रांगड्या नाना पाटेकरांना इतके भावतात की त्यांच्यामते रवींद्र लोकप्रिय गायक नाही तर श्लोकप्रिय गायक आहे.. अशा गुणी गायकाचा मित्रपरिवारही मोठा आहे व याच मित्रपरिवाराने त्यांना ‘बुवा' सारखे खास उपनाम बहाल केले आहे. या आत्मचरित्रामध्ये अनेक गोष्टींचा उलगडा वाचकांना होणार आहे जसे की या भारदस्त आवाजाच्या गायकाचा सद्दाम हुसेन किंवा म्युझिक थेरपी या दोन भिन्न गोष्टींशी काय संबंध होता; पुरुष असूनदेखील जावा- जावांच्या भांडणात हा अजातशत्रू गायक कसा ओढला गेला. वयाचा अमृतमहोत्सव साजरा करणाऱ्या रवींद्रजींचे आत्मचरित्र शब्दबद्ध करत असताना मला कळलेली गुपिते आता तुम्हीसुध्दा जाणून घ्या. -- डॉ. प्रशांत दांडेकर