-
Kajava (काजवा)
अपवादाच्या जगण्याची, लढण्याची, जखमी होण्याची, जखमांना फुलांचं रूप देण्याची एक चित्तरकथा म्हणजे हे आत्मकथन आहे. ते वास्तवाशी बेइमानी करत नाही, वास्तव सजवण्यासाठी ब्युटी पार्लरमध्ये जात नाही, दु:खाची सजावट करत नाही, विनाकारण आपल्या दुःखांना याचकाचं स्वरूपही देत नाही; तर जीवन एक संघर्ष आहे, अंधार भेदता येतो. उजेडाचं आभाळ तयार करता येतं, स्वयंप्रकाशित बनता येतं, व्यवस्थेनं तयार केलेली वादळं पचवता येतात, हे मोठ्या आत्मविश्वासानं आणि निखळ स्वानुभवातून ते सांगत राहतात. आपल्या वाट्याला येणाऱ्या व्यथा-वेदनांचं ते नुसतंच वर्णन करत राहत नाहीत किंवा दुःखाच्या नावानं काही मागत राहत नाहीत, तर वास्तव बदलता येतं, त्यासाठी लढता येतं, लढायांमध्ये विजयी होता येतं आणि अंधार भेदता येतो हेही या आत्मकथनातून सांगण्याचा ते प्रयत्न करतात. वयाच्या साठीजवळ पोहोचताना त्यांचं आयुष्य आटपाट नगरातील एका सुफल कहाणीप्रमाणं झालं असलं तरी, या बिंदूवर ते कसे पोहोचले, हे सर्वांत अधिक महत्त्वाचं आहे.