-
Savat Adnyatache ( सावट अज्ञाताचे)
प्रत्येक कथा वाचताना तुम्हाला जाणवेल की कथेतील पात्रांवर कुठल्या तरी एका अज्ञात शक्तीचे सावट पडले आहे आणि त्यातूनच ती कथा पुढे सरकायला मदतच झाली आहे. जरी ह्या कथा गूढ, अमानवी विषय धरून लिहिल्या असल्या तरी त्यात अंधश्रद्धेला मुळीच वाव नाही. मला स्वतःला ठाऊक नाही की, कथा लिहिताना मी हा गूढ, अमानवी कथांचा बाज का निवडला ? खरे तर सर्वजण अशा कथा वाचतील की नाही, हा ही विचार मी केला नव्हता. पण लिहायला बसले की, बाप्पांच्या कृपेने आणि सरस्वती देवीच्या आशीर्वादाने मी कित्येक कथा ह्या एकटाकी लिहिल्या. म्हणजे मला सुचत जायचे आणि मी लिहित जायचे. अर्थात मी हे माझे कौतुक म्हणून सांगत नाही आहे. सतत लिहित बसल्यामुळे कंबरेचा काटा कुठे असतो ते चांगलेच कळले मला त्या दिवसात. कथा लिहून झाल्यावर ती मी माझ्या मोठ्या बहिणीला- ज्योतीला, आणि माझ्या शाळेतील दोन मैत्रिणी-तेजस्विनी कोटियन आणि अनामिका थिटे ह्यांना वाचायला द्यायचे. त्यांनी हिरवा बावटा दाखविला की, मी दुसऱ्या कथेकडे वळायचे. ह्या तिघींचे किती आभार मानू? की आभार मानून त्यांना परके का करू ? तिघीही माझ्या हक्काच्याच पण त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याशिवाय मला राहवत नाही. माझ्या 'घुमर' कथेसाठी राजपूती लहेजाची ओळख करून घेताना, माझ्या माहेरच्या दोन राजपूती शेजारणींनी- किर्ती व बेन म्हणजेच ज्योतीबाला ह्यांनी मला बरेच मार्गदशन केले, त्यामुळे त्यांचेही मनःपूर्वक आभार!