-
Devi Rakshati Rakshita (देवी रक्षति रक्षितः)
''ऐं ह्रीं क्लीं चामुंडा विच्चै...'' जोरजोरात मंत्रोच्चारण सुरु होते. समोरच कालीमातेची एक मोठी मूर्ती उभी होती. त्या मूर्तीकडे बघूनच भल्या भल्यांच्या हृदयाचा ठोका चुकत असेल. मूर्तीच्या गळ्यात वेगवेगळ्या माळा दिसत होत्या. त्यातल्या फुलांच्या माळा तिला ओळखू आल्या. पण बाकीच्या माळा एवढ्या दुरून तिला ओळखू येत नव्हत्या. त्या ओळखू याव्यात अशी तिची इच्छाही नव्हती. त्या विचारानेच जणू तिला अचानक थंडी वाजू लागली. तिने ओढणीने अंग झाकून घ्यावे म्हणून हात हलवले. ओढणी शोधतानाच तिला अचानक आपल्या अंगावर एकही वस्त्र नसल्याचे जाणवले. फुलांचा येत असलेला मंद सुवास आणि अंगाला होणारा थंडगार स्पर्श फक्त फुलांच्या माळा आपल्या शरीरावर असल्याची जाणीव करून देत होत्या. भितीने, शरमेने तिच्या अंगावर शहारा आणि डोळ्यात पाणी आले. तिला इथून निघून जायचे होते. पण पायात जणू मणाच्या बेड्या होत्या. तिचे पूर्ण अंग कशालातरी जखडले होते. इथून सुटका होणे अशक्य होतेच पण अंगावर वस्त्रही नसल्याने सुटकेची छोटीशी आशा जी मनात होती ती ही मावळली होती. समोर होमकुंड धगधगत होते. एकजण देवीची जोरजोरात प्रार्थना करत होता. त्याचा चेहरा मात्र तिला दिसत नव्हता. समोर एक रेडा बांधलेला होता. तिथे एक बलीवेदी दिसत होती. त्या रेड्याचे भवितव्य तिला क्षणार्धात कळले. त्या रेड्याला समोर आणले गेले. ते खड्ग उचलले गेले. न राहवून ती जोरात किंचाळली.. "थांबा...". देवी रक्षति रक्षित: कादंबरीचे कथानक स्वप्नातील कालीमातेच्या मूर्तीसमोर घडणाऱ्या एका प्रसंगापासून सुरु होते. 'आता काय होणार?', असे वाटत असतानाच कळते की हे एक स्वप्न होते. इथेच कथेच्या नायिकेची भेट होते, ती म्हणजे शांभवी! संवादादरम्यान तिचा भाऊ अष्टमीचा उल्लेख करतो आणि खऱ्या अर्थाने कथेतील गूढ निर्माण व्हायला सुरुवात होते. पुरातत्व विभागात काम करणारी शांभवी, तिचे आईबाबा, भाऊ पार्थ, मैत्रीण जयंती, अपघातामुळे ओळख झालेला कपिल आणि शांभवीचा बॉस असलेला रूद्र या निवडक पात्रांभोवती फिरणारे हे कथानक आहे. नेमकीच पात्रे अधूनमधून भेटीला येतात आणि कादंबरीत सुटसुटीतपणा जाणवतो. अधूनमधून झलक दिसणारा 'तो' म्हणजे नक्की कोण? ,स्वप्नात दिसणारे पुसट चेहरे कोणाचे? हे प्रश्न कादंबरीच्या शेवटापर्यंत विचार करायला पुरतात. शांभवीच्या वडिलांनी केलेला खुलासा, कपिलकडून झालेला शक्तीपीठाचा उल्लेख, शांभवीच्या मनातील विचारमंथन अन् प्रश्न आणि एका अघटितातून सुरू झालेला प्रवास कथेला रंजक वळणावर घेऊन जातो. परिस्थितीने आणलेल्या एका वळणाची सुरुवात पुन्हा एकदा शक्तीपीठापासूनच होते. आईबाबांचा मृत्यू, शांभवीचे अटक वॉरंट, नाशिकला जाणे, हे सगळे पूर्वनियोजित होते की खरोखरच वेळेनुसार घडत होते? प्रवास आणि त्यात डोक्यात विचारांचे काहूर माजलेली शांभवी पाहून नकळत मनातील हळवा कोपरा जागा होतो. हळूहळू उलगडणारी शक्तीपीठे, शिव-सतीची कहाणी, इतरही पौराणिक कथा, संदर्भ, काही ज्ञात तर काही अज्ञात गोष्टी, जरी आधी ऐकले वाचले असतील किंवा नसतीलही, तरी वाचकाला खिळवून ठेवतात.मठपतींच्या मंत्रातून मिळालेला मार्ग आणि दशमहाविद्यांच्या दिशेने नव्याने सुरू झालेला प्रवास वाचकाला या प्रवासासोबत जोडून ठेवण्यात यशस्वी ठरतो. नाशिक, पाथर्डी, तुळजापूर, कोलकाता, आसाम, उमानंद द्वीप, पुरी,... अशी ठिकाणे असोत किंवा मग नवनाथ, दीन महाराज मठ, कालीमाता, भैरव, कालिका, बामाखेपा, कामाख्या, उमानंद, दशावतार, पंचायतन, दशमहाविद्या, विमला, जगन्नाथ, तारातारिणी,.. इ. असोत, प्रत्येक वेळी काहीतरी नवा उलगडा होतो. मधूनच जयंतीची शंका घ्यायला लावणारी झलक, तर मधेच शंका वाढवणारा कपिल जाणवत राहतात. रूद्र नावाचा रहस्य दडवणारा खडूस बॉस नक्की रक्षक की भक्षक? हे सर्व तर कादंबरी वाचल्यावरच समजते. शेवटाकडे आल्यावर पुन्हा एकदा तोच मंत्र पडद्यासमोर येतो आणि या रहस्यमय वातावरणावरचा पडदा दूर होतो. शेवटी फायद्याशिवाय कोणासाठी काही करणारे दुर्मीळच! त्यामुळे 'आपल्या' चेहऱ्यांमागचे कपटी चेहरे आणि रहस्यमय वागण्यामागचे 'आपले' चेहरे याचा अंदाज बांधणे कठीणच... शिवशक्तीचे मिलन आणि 'देवी रक्षति रक्षितः' शीर्षकाला साजेसा असा कादंबरीचा शेवट मनाला भिडतो. सोबतच शेवटी मात्र लेखिकेने एका नव्या अध्यायाचे धागेदोरे सोडले आहेत.