-
Tawaifnama (तवायफनामा)
म्हटलं तर त्या मनस्वी कलाकार. साधनेचा सोस बाळगून कलेवर हुकूमत गाजवणाऱ्या रागरागिणी. पण काळओघात त्यांचं अवमूल्यन होत गेलं. एका समृद्ध परंपरेला नैतिकानैतिकतेच्या संकोची चौकटीत बसवलं गेलं. आणि अभिजात संगीत आणि नृत्यातल्या या सम्राज्ञी काळाच्या उदरात नामशेष होत गेल्या. हा प्रदीर्घ आणि जीवाला चटका लावणारा प्रवास सबा दिवाण लिखित ‘तवायफनामा’ पुस्तकातून वाचकांच्या भेटीस येतो. ज्यात बनारस आणि भभुआतल्या तवायफ कुटुंबाचा तब्बल शतकाहून अधिक काळाचा पट समोर येतो. १८५७च्या उठावात प्राणांची बाजी लावणाऱ्या धरमनबीबीपासून सदाबहार, गुलशन, उमराव, तीमा ते अलीकडच्या काळातील हिंदू-मुस्लिम तिढ्यात हकनाक वेदना सहन करणाऱ्या तवायफांच्या जगण्याचा आलेख पहायला मिळतो. शमादानच्या मंद उजेडासारख्याच यांच्या कथा अस्वस्थ करत राहतात आणि यातल्या पानागणिक ठुमरीचे आर्त स्वर खोल जखम करत राहतात.
-
Hirabai Badodekar (हिराबाई बडोदेकर)
ही कथा आहे एका सावळ्याशा कृश मुलीची.. शंभर वर्षांपूर्वी, विसाव्या शतकाच्या आरंभी आपल्या गायनकलेच्या जोरावर पुरुषसत्ताक कलाविश्वात स्त्रियांसाठी एक सन्माननीय राजमार्ग निर्माण करणाऱ्या एका दीपकळीची… ‘गानहिरा’ हिराबाई बडोदेकर यांची. सभ्य घरांतील स्त्रिया जेव्हा जाहीरपणे गात नव्हत्या त्या काळात तिकीट लावून आपला जाहीर जलसा करणारी ही पहिली धाडसी गायिका ! आपल्या गाण्याच्या हिमतीवर २० जणांच्या चमूला घेऊन पहिला ‘फॉरेनचा दौरा करणारी, भारताबाहेर पाऊल टाकणारी ही पहिलीच गायिका. ख्याल, ठुमरी, नाट्यसंगीत, भावगीत या सर्व क्षेत्रांत आपली मोहर उमटवून ‘सात्त्विक, सोज्वळ गायिकेचा’ आदर्श घालून देऊन ‘स्त्रियांचे घराणे’ निर्माण करणाऱ्या हिराबाई बडोदेकर. डॉ. शुभदा कुलकर्णी यांनी हिराबाई बडोदेकर यांच्या आयुष्यावर हे ललित चरित्र लिहिताना केवळ एका कलाकार स्त्रीचे वैयक्तिक आयुष्य नव्हे, तर ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्योत्तर काळापर्यंतच्या हिंदुस्थानी संगीतजगताचा एक आलेख मांडला आहे. सत्य आणि कल्पित यांचा हा ‘ख्याल’ आहे… हिराबाईंच्या गाण्यासारखाच सुरेल ! – डॉ. चैतन्य कुंटे