-
Ajunahi (अजूनही)
तरल प्रेमभावना आणि शिक्षणसम्राटाच्या क्रौर्याच्या पेचात शिक्षण आणि संस्कृतीचा गळा घोटला जात आहे. अनाथ पूनम आणि शोषित अजयची ही प्रेमकथा...! वास्तवातील कुरूपतेची साक्ष देताना विजयाताई मारोतकर यांनी त्यात विविध रंगानुभूतींची उधळण केली आहे. अस्सल प्रेमाचा बळी देऊन तासिका प्राध्यापक असलेल्या अजयला नाइलाजाने संस्थाचालकाच्या साधारण कन्येशी विवाहबद्ध होणे भाग पडते. ज्यामुळे पूनमच्या प्रेमाचा बळी घेतला जातो. विचित्र कोंडी निर्माण होते, ज्यातून बाहेर पडणे अशक्य होऊन एक भयाण शोकांतिका पेलत वैफल्यग्रस्त जगणे अजयच्या वाट्याला येते. संस्कृतीच्या पूर्ततेतच शिक्षणाचे सार्थक असते. तीच शिक्षण व्यवस्था विकृतीने आणि क्रौर्याने बरबटलेली असल्याचे भीषण सत्य आहे. तासिका प्राध्यापकांच्या वाट्याला आलेल्या जीवघेण्या व्यथांचा नेमका वेध घेणारी फार महत्त्वाची ही कादंबरी आहे. काळ पुढे जातो... गुंजन आणि परिमलच्या सफल प्रेमकथेत पूनम आणि अजयच्या शोकात्मक प्रेमाचे अश्रू दडलेत. विजयाताईंनी हळुवारपणे व्यक्ती व प्रवृत्तीच्या विसंगतीसह समाजाचे वास्तव चित्र व चरित्र 'अजूनही...' मध्ये उलगडले आहे. 'अजूनही...' या प्रक्रियेला पूर्णविराम मिळेल की 'अजूनही...' न संपणाऱ्या वास्तवाची करुण कहाणी राहील... ? या प्रश्नाला उत्तर नाही... विजयाताईंच्या वास्तववादी कादंबरी लेखनाला मनःपूर्वक शुभेच्छा...! --डॉ. श्रीपाल सबनीस (अध्यक्ष, ८९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, पुणे)