-
Mansavi (मनस्वी)
बाबुराव चंदावर यांचे आत्मकथन भारताच्या राजकीय इतिहासातील अत्यंत रोमहर्षक कालखंड आहे. आचार्य विनोबा भावे आणि जयप्रकाश नारायण तसेच जेपी आणि इंदिरा गांधी यांच्यातील व्यक्तीसंबंधांवर अधिकारवाणीने लिहिणारे बाबूराव हे एकमेव म्हणावे लागतील. बालवयात रागावून घर सोडले आणि बाबूराव सार्वजनिक कार्यात खेचले गेले. या प्रवासात उत्तुंग उंचीचे अनेक मार्गदर्शक भेटले आणि त्यांच्या छायेत बाबुरावांची प्रगती होत गेली. कधी आपल्या तत्वाबरोबर तडजोड करण्यास नकार देणारे बाबूराव, विनोबा आणि जेपी यांना सारखेच प्रिय होते. आपले अंतकरण दोघेही बाबूरावांसमोर खुले करत असत. 'आनंदवन' चे प्रेणेते बाबा आमटे यांच्याकडून स्थानिक गावकरयांनवर अन्याय झाला तेव्हा त्यांच्या बाजूने बाबुराव ठामपणे उभे राहिले. शासकीय यंत्रणा आणि सर्वोदयातील ज्येष्ठ मंडळींचा दबाव त्यांनी झुगारून दिला. अखेर बाबांनी तडजोडीला मान्यता दिली आणि गावकरयांना न्याय मिळाला. आणीबाणीच्या काळात विनोबा भावे यांचे एक-दोन निर्णय आवडले नाहीत म्हणून त्यांच्यावरही आक्षेप घेताना बाबूराव कचरले नाहीत. जेपी अमृतकोषाच्या संदर्भातही त्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले. गुरुजनांनी सांगितलेल्या तत्वानुसारच बाबुरावांनी मार्गक्रमणा केली. प्रसंगी त्यांनी तत्वाचा आग्रह धरताना गुरुजनांचेही ऐकले नाही. म्हणून 'मनस्वी' हा शब्दात त्यांच्या जीवनपटाचे सार सामवलेले आहेत. बाबुरावांचे आत्मकथन हा भारताच्या राष्ट्रीय इतिहासातील एक अमोल दस्तऐवज आहे.