-
Survantache Phulpakharu (सुरवंटाचे फोल्पाखरू)
कायद्याची, न्याय करण्याची सारी प्रक्रिया मुळात वांझोटी आहे. त्यातून हक्क शाबीत होतात, जय- पराजय नक्की होतो, मी बरोबर की तो बरोबर हे जाहीर होते, पण काहीतरी उत्पादन, काहीतरी मूल्यवर्धन (व्हॅल्यू अॅडिशन) हा जो कुठल्याही कारखान्याचा किंवा कंपनीचा मूळ उद्देश तो मात्र साध्य होत नाही. काहीही घडवायचे असेल तर त्याला या प्रक्रियेचा उपयोग होत नाही. यात मुळात निर्मितीक्षमतेची बीजेच नाहीत. उत्पादकतेला वाढ, उत्पादनातली वाढ ही त्यांतून प्राप्त होत नाही, कारण मुळात हे समाजवादी कायदे ज्या वर्गकलहाच्या, आहेरे-नाहीरे या वर्गगटांच्या कल्पनांवर आधारलेले आहेत, तो आधार मुळात लुटीची वाटणी अशा प्रकारचा आहे. केकची वाटणी कशी करायची असा तो विचार आहे. खायचे हिस्से ठरवण्याचा भाग आहे. केक कसा तयार करायचा, त्याचा आकार कसा वाढवायचा याचा त्यात विचार नाही, केकचा आकार सामूहिक श्रमाने वाढत असतो किंवा निदान वाढायला हवा हे त्यात बसत नाही.