Ek Shunya Mi
श्री. पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेल्या निवडक विचारप्रधान लेखांचा हा संग्रह आहे. त्यांच्या चतुरंग वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाचे तुलनेने सहज लक्षात न येणारे पण महत्त्वाचे अंग त्यात व्यक्त झाले आहे. कोणत्याही पोथीनिष्ठ राजकीय, सामाजिक वा आर्थिक विचारव्यूहात त्यांची बुद्धी अडकली नाही की पारिभाषिक संज्ञांच्या विद्वज्जड जंजाळात त्यांची शैली फसली नाही. तो त्यांचा पिंडच नव्हता. समाजजीवनाचा व त्याच्या निरोगी, लावण्यपूर्ण विकासाचा विचार त्यांच्या मनात सतत असे आणि त्यासाठी त्यागपूर्वक झटणार्या कार्यकर्त्यांविषयी व नेत्यांविषयी, त्यांच्या वैचारिक भूमिकांची अटक न मानता, त्यांच्या मनात नितांत आदरभाव असे. त्यातून घोळणारे विचार व भावना त्यांनी वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्तांनी लिहिलेल्या लेखांत व भाषणांत आपल्या स्वाभाविक, सहज व अतिशय बोलक्या भाषेत व्यक्त केले.