Mahapratapi Subhedar Malharrao Holkar (महाप्रतापी सुभेदार मल्हारराव होळकर)
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचा विस्तार हिंदुस्थान आणि हिंदुस्थानाबाहेर करणारे आणि मराठेशाहीचा इतिहास घडवणारे काही शूरवीर होते. त्यामध्ये अग्रस्थानी असणारे सुभेदार मल्हारराव होळकर हे अत्यंत पराक्रमी, शूर, बुद्धिमान आणि धाडसी असे सुभेदार होते. धर्म, आचार, विद्या, व्यापार आणि युद्धकला या सर्वात ते पारंगत होते. सामर्थ्य, न्याय, नीतिमत्ता, महत्वकांक्षीपणा आणि स्वतःच्या मनगटाच्या बळावर या सामान्य मेंढपाळ व्यक्तीने दिल्लीचा बादशाह कोण व्हावा हे ठरवण्यापर्यंत स्वतःचे कर्तृत्व सिद्ध केले. त्यामुळे एखाद्या स्वतंत्र राज्याच्या राजासारखे ते आयुष्यभर वागले. पण छत्रपती शाहू महाराज आणि श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्यावरील निष्ठा त्यांनी अखंड जपली. एकूण ७४ परगणे मल्हाररावांच्या ताब्यात होते. प्रत्येक युद्धात मल्हाररावांनी भीम पराक्रम केला. आपल्या कारकिर्दीत ते एकूण ५२ लढाया लढले आणि त्या सर्वांमध्ये त्यांनी यश मिळवले. मराठेशाहीच्या उत्कर्षात मल्हारराव होळकर यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. मराठेशाहीचा भगवा झेंडा अटकेपार फडकवण्यात मल्हाररावांचा सिंहाचा वाटा होता. उत्तर हिंदुस्थानात मराठेशाहीचा पाया मल्हाररावांनी बळकट केला. आपल्या राज्यात प्रशासन, शेती, जलव्यवस्था, न्याय, धार्मिक बाबी, स्थैर्य, शांतता राबवून त्यांनी शिवरायांचा लोककल्याणकारी राज्याचा वारसा समर्थपणे पुढे चालवला. रघुराज मेटकरी हे प्रतिभावंत साहित्यिक आहेत. त्यांनी अनेक पुस्तके, दुमिर्ल कागदपत्रे धुंडाळून मल्हारराव होळकर यांचे हे चरित्र लिहिलेले आहे. मल्हाररावांचे हे चरित्र प्रेरणादायी आहे. मराठी वाचकांना ते नक्कीच आवडेल, असा विश्वास आहे. डॉ. देवीदास पोटे (ज्येष्ठ साहित्यिक आणि इतिहास संशोधक, मुंबई)