-
Valay
कथा म्हणजे गोष्ट- घटनेतून फुलत जाणारं नाटय. या नाटयातून मानवी स्वभावाचे विविध नमुने दृीस पडतात.वपुंच्या कथांमधून माणसांच दु:ख आनंद,धुंदी यांचं तरल दर्शन घडतं. वेगवेगळ्या व्यक्तींची वेगवेगळी ओळख असते. 'वलय’ मधील प्रत्येक कथेतून एक वेगळीच ओळख असलेली माणसे भेटतात. 'अर्थ’मधील अप्पा. व्यवहारी जगात पैशाने फसवले जाण्याचं कोणतंच दु:ख न बाळगणारे. तर मिळणार्या अपार आनंदापुढे कामातून मिळणार्या आनंदाच्या धुंदीतच जगणारे- त्यांच जगण्याचं तत्वज्ञान और. 'स्वप्नवेडी' मधली मृणालिनी-एका स्वप्नात जगणारी. त्या स्वप्नामागचं करुण सत्य वाचकाला हलवून सोडतं. 'विश्वास’ मधील विश्वास पंडितची कैफियत मनाला सुन्न करते. या आणि अशा मनात दीर्घकाळ रेंगाळणार्या कथांचा हा संग्रह.
-
Navara Mhanava Aapla
या तुमच्या आमच्या कथा. दैनंदिन जीवनातील हे कवडसे. यात मोठे संघर्ष नाहीत हीच त्यांची व्यथा. मोठ्या आघातांसाठी माणसाच्या मनाची तयारी झालेली असते आणि तशा प्रसंगी सावरणारेही अनेक भेटतात. छोटे-छोटे आघात असंख्य असतात. ते एकट्याला गाठून हतप्रभ करतात. त्यात वाटेकरी नसतात. ते एकट्याने सोसायचे ! माणूस थांबतो, शिणून जातो, खचतो; पण पुन्हा सावरतो. तो शीणवटा कुणाला कळत नाही, सावरणंही समजत नाही ! नव्या उमेदीनं, मागं पाहत-पाहत प्रवास चालू असतो; ठेवावा लागतो. त्या वाटेवरच्या व्यथा ! त्यांच्या या कथा. तुमच्या आणि माझ्याही!
-
Samvadini
रात्री अकरा वाजता घरी जातो. उर्मिला जागी असली तर म्हणते, "किती दमता तुम्ही !" - बस्स ! सगळा दिवस सार्थकी लागतो. ह्या एका वाक्याची माणसाला केवढी भूक असते, हे सांगता येणार नाही. दहा माणसांचा स्वयंपाक करून दमलेल्या बायकोलाही एवढं एकच वाक्य हवं असतं आणि कामावरून परतलेल्या नवर्याला पण !" समस्या आपली आणि त्याचं उत्तर मात्र इतरत्र, असं घडत नाही. उत्तराची मागची बाजू म्हणजेच समस्या. आपण फक्त बघण्याची दिशा बदलायची. लोकप्रिय कथाकार व. पु. काळे यांची प्रत्येक कथा म्हणजे एक आगळाच अनुभव असतो. याचं कारण, मध्यमवर्गीय सर्वसामान्य माणसांची सुखदु:खं, हर्ष, खेद, आनंद, धावपळीच्या जीवनातला त्यांचा संघर्ष, नोकरदारांच्या नानाविध समस्या, कुचंबणा, लैंगिक जीवनातले ताणतणाव, मान-अपमान - जे एरवी कुणाच्या लक्षातही येत नाही, ते सगळं वपुंच्या मनाला भिडतं. वपु ते अलगद टिपतात आणि आपल्या सहज मिस्कील शैलीत वाचकांच्या मनात उतरवतात ! त्यांची जीवनदृष्टीच इतकी आशावादी, प्रसन्न आणि मिस्कील आहे, की त्या रंगांत रंगूनच त्यांच्या अनुभवाचा प्रत्येक क्षण चैतन्यानं खुलतो ! 'संवादिनी’मध्ये तर संवादांतून कथा फुलवणारी त्यांची शैली वाचकाला थक्क करते !
-
Mayabazar
वपुंच्या कथाविश्वात मध्यमवर्गीय जीवन केंद्रवर्ती असले, तरीही मध्यमवर्गीय जीवनाच्या ठरावीक चाकोरीची ही कथा नाही. सामान्य माणसाच्या सामान्य जीवनातल्या 'असामान्य' सुखदु:खांना उद्गार देणारी ही कथा आहे. हलक्याफुलक्या, मिस्किल विनोदी शैलीचे अधिष्ठान 'वपुं'च्या कथांना असले तरीही त्यांची कथा कधी 'आचरट' होत नाही. त्यांच्या कथानिवेदनात एकप्रकारचा संयतपणा आहे. वाचकांना खुलवणा-या, हसवणा-या रंजकतेचे अधिष्ठान त्यांच्या कथेला असले तरीही हव्यास म्हणून त्यांची कथा 'स्वस्त रंजकते'ला थारा देत नाही. लेखक बहुश्रुत असल्यामुळे या कथाविश्वात विविधता व विपुलता आहे. अनुभवाचा तोचतोचपणा आढळत नाही. सामान्यत: पाच-पन्नास कथा लिहून झाल्या की मराठी लेखकांची 'कथा' थकते आणि लेखनाचा आपद्धर्म म्हणून अनुभवाचे तेच दळण आणि वळण गिरविले जाते आणि वाचकांच्या दृष्टीने त्यांची कथा रूक्ष, कंटाळवाणी होऊ लागते. 'वपुं'ची प्रत्येक कथा अजूनही ताजी व टवटीत घडते. त्यांची कथा या ना त्या प्रकारे सामान्यातल्या सामान्य वाचकांच्या मनोविश्वाला स्र्प करून जाते. त्या स्र्पाने वाचक अंतर्मुख व्हावा असे सामर्थ्य 'वपुं'च्या कथेत आहे.
-
Fantasy Ek Preyasi
वपुंच्या कथा, कादंबरी या लिखाणातून त्यांच तत्वचिंतन एखाद्या मध्येच येणार्या सुखद शिडकाव्या प्रमाणे असते. कथेच्या ओघात, कहाणीत वाचक गुंतलेला असताना अलगदपणे हे चिंतन मनात उतरत जाते- आणि त्यामुळेच कथेला एक वेगळी खुमारी येते. पण ललित लेखांचा बाणाच वेगळा. साहित्याचा गाभा असलेल्या सौंदर्यानुभुवाच्या पातळीवरिल मीत्वाचा शोध हा या साहित्यप्रकारात अधिक सहजपणे,स्पपणे वेगवगेळ्या खपातून व्यक्त होताना दिसते. एका छोट्या घटनेतून, घटनेच्या निमित्ताने उलगडत जाणारे,उमलत जाणारे विचारांचे बहुरंगी पुष्प वाचकाला वाचनानंदाचा सुगंध देते. वपुंचे या पुस्तकातील लेख असेच आनंददायी क्वचित गोंधळून टाकणारे,व बरेचदा सखोल विचारांच्या गर्तेत नेणारे आहेत. वाचकांच्या मनातील अनेक अव्यक्त भावना,विचार,ह्यातून शब्दरूपात भेटल्यासारखे वाटतात. तर काही विधानं, विचार हे खास 'वपु’ व्यक्तित्व घेऊन अवतरतात. 'मनातील,स्वप्नातील अणि वास्तवातील स्त्री’या लेखात मांडलेल्या विचारांच्या, कल्पनांच्या मनोरम खेळात वाचक हरवून जातो. त्यातील अनुभूती प्रत्यक्ष घडल्याची, घडावी अशी तीव्र जाणीव जागते. 'प्रिय भाले’ मधून मांडलेला विचार, 'प्रत्येकवेळी आपण कुणालातरी हाक मारीत असतो’ हा मनोमन पटतो. त्या हाकेमागे असलेला आक्रोश, आनंद, दु:ख, असोशी मनात झिरपत जाते. असे अनेक वैचारिक भावनिक पातळीवरील विचारांची कवडसे या पुस्तकातून भेटतात."
-
Swar (स्वर)
काही काही रागदारीत काही काही स्वर वर्ज्यच असतात... वर्ज्य झालेला स्वर वाईट असतो म्हणून वगळायचा नसतो. तर एक राग उभा करण्यासाठी आपण तो खुशीनं विसरायचा असतो... वाद्यातल्या तेवढ्या पट्ट्या उपटून फेकायच्या नसतात, त्यांना फक्त चुकवायचं असतं...! म्हणून तुझ्या आठवणीत, सहवासात माझा नवरा बसू शकत नाही आणि एकमेकांच्या संसारात आपणा एकमेकांना स्थान नाही लोकप्रिय कथाकार वपु काळे अतिशय सहजतेनं अशी चपखल उदाहरणं देऊन आयुष्यातली गुंतागुंत सोपी करण्याचा नेमका धागा आपल्या हाती देतात. त्यांच्या सर्वच कथांमध्ये कथेच्या ओघात मिसळून असं चिंतन येतं आणि ते वाचकांना विचार करायला लावतं. मुळात कथा अतिशय खुमासदार; सहसा कुणाच्या ध्यानीमनी न येणार्या क्षणांच्या, घटनांच्या झालेल्या. त्याची अभिव्यक्ती असते वपुंच्या खास मिस्कील शैलीत! त्यांच्या लेखनातील जीवनविषयक प्रसन्न, उदार, आशावादी दृकिोनामुळे त्यांची प्रत्येक कथा वाचकाचं मन जिंकून घेते. 'स्वर’मधील कथाही वाचून संपल्या तरी मनात दीर्घकाळ रेंगाळत राहतील...
-
Moden Pan Vaknar Nahi
समाजात वावरताना अनेक व्यक्ती भेटतात. प्रत्येक व्यक्तीचं स्वत:चं असं एक तत्त्वज्ञान असतं. जगण्याची पद्धत असते स्वत:चे नियम, मतप्रणाली असते. आपल्या मनानं स्विकारलेल्या मतांप्रमाणे माणसं वागत असतात नि मतं वंशपरंपरेनं, संस्कारानं, परिस्थितीनं अशा अनेक कारणानं तयार होतात. प्रत्येक व्यक्तीगणिक या मतांचे आविष्कार भिन्न भिन्न होत असतात. यालाच आपण व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणत असतो. सर्वसामान्य माणसांचे राग, लोभ, मत्सर, प्रेम, करुणा यांचे आविष्कारही सर्वसामान्य असतात. त्याला स्वतंत्र चेहरा नसतो. परंतु काही माणसं मात्र वेगळी दिसतात. त्यांची भावना विचार व्यक्त करण्याची पद्धतही सर्वांहून वेगळी असते. म्हणूनच आपण त्यांना विक्षिप्त म्हणतो. या कथासंग्रहात अशाच आठ विक्षिप्त व्यक्तींच्या तर्हा रंगवल्या आहेत. नामशेष होण्याचा धोका असतानाही माघार न घेणार्या या व्यक्तींच्या कथा आपल्या मनात घर करतात. कारण मनाच्या कोणत्यातरी कोपर्यात आपल्यालाही केव्हांतरी असंच वागायची इच्छा असते. सार्या जगाला झिडकारण्याचं, ठोकरण्याचं धाडस या व्यक्तींमध्ये दिसते. अशा व्यक्तींच्या वपुंनी रेखाटलेल्या या आठ खुमासदार कथा.
-
Partner (पार्टनर)
तशी ही प्रेमकहाणीच आहे पण ती वपुंनी लिहिलेली आहे, हेच तिचे वैशिष्ठ्य . त्याला ती आवडणे आणि तिला जिंकण्यात त्याने यशस्वी होणे हे अशा कहाणींचे वळण. ते दोघेही आहे पण ते कोण्या 'जोश्या'चे नसून वपुंचे आहे म्हणून ते येथे 'वलय’ झाले आहे. राजवाड्यावर म्हणाल ती अप्सरा टाळीच्या इशार्यावर नाचवण्याची ज्याची ताकद तो वेडबंबू शकुंतलेसाठी पागल व्हावा तसेच हे आहे आणि वेडबंबू येथे औषधानिमित्ताने दुकानात येणार्या अनेकांपैकी एका मुक्त वागणार्या पण स्वत:ला गुप्त ठेवणार्या पार्टनरची लाजवाब साथ मिळाली आहे म्हणूनच ही कहाणी. 'शाकुंतल' सारखी वारंवारं 'आवृत्ती'त जात राहिली आहे.
-
Sakhi
सखी' पासून 'झकासराव' पर्यंत नऊ कथांद्वारे वाचकांना निर्मळ आनंद देणारा वपुंचा हा कथासंग्रह. ह्यात केवळ हा आनंदच मिळतो असे नाही तर जीवनाकडे कोणत्या दृष्टीने बघावे आणि आला क्षण कसा सुखद करावा ह्याचीही नकळत शिकवण मिळते. खुद्द लेखकाची अशी एक स्वच्छ दृष्टी आहे आणि हा दृष्टिकोन सहजगत्या मांडण्याचे कसब त्यांना साधले आहे म्हणून लेखकाची 'सखी' वाचकाचीही 'सखी' होऊन जाते. तसे झाल्याने लेखकाला दुस्वास वाटणे शक्यच नाही कारण तसे व्हावे म्हणून तर त्याने हा लेखनप्रपंच केला असावा ! नव्हे केला आहेच ! वपुंचे एक वाक्य आहे - "सावली देऊ शकणार्या वटवृक्षानं विश्रांतीला आलेल्या पांथस्थाला बाकीची झाडं सोडून तुला नेमका मीच सापडलो का, असं विचारायचं नसतं !"
-
Vapu Mahotsav
सगळी थोर, रसिक वाचक मंडळी आपापल्या आवडत्या लेखकाला एक ठराविक प्रश्न का विचारतात?- तो प्रश्न म्हणजे, "तुम्हाला अशी व्यक्ती प्रत्यक्ष भेटली होती का हो?"- खरं तर अशा व्यक्ती आपल्या आसपास असतात. काही घरी चालून येतात. वाचकांना जाणीवही नसेल की, अशा कितीतरी व्यक्ती त्यांच्या शेजारूनही जात असतील की ज्यांनी काही ना काही साधना केली असेल. कुणी कवी, कुणी गणितज्ज्ञ, कुणी काही, काही, कुणी काही. असाच एखादा (किंवा एखादी) कुणा लेखकाला भेटतो (भेटते) मग वाटतं, समाजापर्यंत ह्या व्यक्तीला न्यायलाच हवं.’ असे खुद्द 'वपुं’नी 'महोत्सवारंभी’च म्हटले आहे आणि त्यांच्या ह्या लेखनाचे सूत्र आहे म्हणूनच येथे वाचकांनाही त्यांच्या आजूबाजूच्याच व्यक्ती भेटतात पण त्या येथे वपुंच्या लेखणीतून भेटण्याची खुमारी काही वेगळीच आहे.
-
Dost
दोस्त' यामध्ये विविध प्रकारच्या माणसांच्या कथा आहेत. स्वत:चा, स्वत:च्या कुटुंबीयांचा स्वाभिमान जपणारी, कोत्या स्वभावाची, हट्टी, बेडकासारखे विशिष्ट आखलेले जग असणारी, परिस्थितीवर मात करणारी, तिला शरण जाणारी, चाकोरीबद्ध जीवनाविरुद्ध कंटाळून बंड करणारी... अशी ही माणसे आहेत. या माणसांचे स्वभाव, त्यांची सुखदु:खे, त्यांच्या समस्या, त्यांची स्वप्ने ही आपल्या आजूबाजूलाच आढळणारी आहेत. त्यांच्या आयुष्यात घडणारे प्रसंग आपल्या आयुष्यात कधीतरी घडलेले असतात किंवा इतरांच्या आयुष्यात त्याचे प्रतिबिंब बघितलेले असते आणि म्हणून ती माणसे आपली वाटतात. छोट्याशा कथाबीजाचे फुलवत फुलवत भावस्पर्शी कथेत रूपांतर करण्याचे वपुंचे कसब व सामर्थ्य, साध्या सोप्या संवादातून जीवनाचे एखादे तत्त्वज्ञान सांगण्याची त्यांची हातोटी, जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला वेगळेच बळ देतो. कथासंग्रहाला ज्या कथेचे नाव दिले आहे; त्या कथेत या सर्वांचा परमोच्च बिंदू गाठला गेला आहे.
-
Hunkar ( हुंकार )
तारुण्य-आयुष्यातील सळसळत्या उत्साहाचा काळ. प्रेम करण्याचा, प्रेमात हरवण्याचा, प्रेमासाठी वाट्टेल ते करण्याचा. स्वत:ची झालेली फट्फजिती कबूल करण्याचा, दुसर्याची गंमत मजेत दुरून बघण्याचा, पण कधीकधी भलतीच ठेच लागते, अगदी जिव्हारी लागते. विसरू म्हणता विसरता येत नाही. नकळत झालेली चूक स्वीकारताही येत नाही. वास्तवाला सामोरे जायचे धैर्यही कधीकधी दाखवावे लागते. संसारात पडल्यावर दुखरा कोपरा मनात ठेवून काहीजण जगतात, काही त्यातून बाहेर येतच नाहीत. मागचे भोग विसरून वाटेला आलेला संसार टुकीने, नेटकेपणाने करणारे असतात. तर व्यवहारात भलत्याच काळ्या वाटेने जाऊन काहीजण फसवे सुख मिळवतात. प्रेमाच्या निरनिराळ्या छटा, त्यातील आततायीपणा, जोम, परिस्थितीमुळे असफल झालेल्या प्रेमातील वेदना, कारुण्य, संसारातले वास्तव, तडजोड, सच्चेपणा, मुलांबद्दलचा उमाळा, हळवेपणा या सार्या अवस्था वपुंनी या संग्रहातील वेगवेगळ्या कथांमधून चितारल्या आहेत. कधी विनोदाने मनाला खुदकन हसवणार्या, कधी डोळ्यांच्या कडा ओल्या करणार्या, तर कधी सरळ सत्याला भिडणार्या अशा या कथा आहेत.
-
Hi Vat Ektichi
वपु काळे ह्यांचे कादंबरीलेखन मोजकेच आहे. त्यातील ही त्यांची पहिलीच कादंबरी. जिच्याभोवती हे लेखन झाले आहे तिच्या तडक, ठाम निर्णयामुळे आणि तिच्या एकाकी झुंजीमुळे हे लेखन प्रथम जेव्हा वाचकांपुढे आले तेव्हांच त्याने वाचकांच्या मनाचा ठाव घेतला होता. लेखनातला तो ताजेपणा अजूनही टिकून आहे म्हणूनच जग वेगाने बदलत असले तरी हे लेखन अजूनही तितक्याच उत्कटतेने वाचावेसे वाटते आणि ते वाचकाला तितकेच अजूनही धरून ठेवते. बाबीचे निर्धाराने आल्या प्रसंगाला सामोरे जाणे आणि अखेर आपलाच दाम खोटा निघाल्याचे बघून घायाळ होणे - हे वाचकालाही तितकेच घायाळ करणारे आहे - वपुंच्या लेखनाचा हा एक वेगळाच पैलू आहे. त्याने वाचकाला स्तंभित केले आहे.
-
Ghar Haravleli Manasa
मुंबईसारख्या शहरात राहून आपल रोजचं आयुष्य जगणार्या मध्यमवर्गीय माणसांची होणारी कुचंबणा या कथातून मांडलेली आहे. चाळीतलं वास्तव्य, लहान जागा याबरोबरच विसंवादाचे उठणारे सूर यानं माणसाचं जीवन अवघड करून टाकलं आहे. आयुष्याचं संगीत तीन स्वरात विभागलेल बालपण, तारूण्य आणि वार्धक्य. सर्वाधिक उमलण्याचा, फुलण्याचा, उत्कटतेचा काळ तो तारूण्याचा शरीराचे, मनाचे, भावनांचे, संवेदनांचे, कर्तृत्वाचे सगळे उत्सव बहराला येण्याचा काळ. पण तारूण्यातच अनेक प्रकारच्या कुंचंबणेनं माणसाचं आयुष्य बांधून टाकलेलं. अनेक संसारातून यामुळं उठलेले विसंवादाचे सूर, हे अस्वस्थ करणारे जखम करणारे. पाचशे स्क्वेअर फूटच्या घरात 10-10 माणसं राहतात. त्यांच्यातले नाते संबंध, पतीपत्नीला हवा असेलेला एकांत, स्वस्थपणा. ही अप्राप्य गोष्ट. आणि त्यासाठी असे क्षण खेचून घेणं म्हणजे सगळीच विटंबना. तीस माणसासाठी एकच संडास आणि रोजच्या नित्यकर्मासाठी करावी लागणारी रोजची धडपड हे सर्व कीव आणणारं आहे. अनंत प्रश्न उभे करणारं आहे. माणसं घरात राहतात. कधी कधी एकमेकांत कधीत न कोसळणार्या भक्कम भिंती उभारून अशा अनेक प्रश्नांच्या या कथा. प्रत्येकला आपल्या वाटणार्या ...
-
Aapan Sare Arjun
आपल्या कथाकथनाने हजारो रसिकांना हास्यअश्रूंच्या लाटेवर लीलया लोटून देणारे कथाकार वसंत पुरुषोत्तम काळे यांना ब्रेन ट्युमरने मृत्यू पावलेल्या आपल्या प्रिय पत्नीच्या दुराव्यानंतर अंतर्बाह्य उन्मळत असल्याचा प्रत्यय आला. आपण सुपर संभ्रमात विषादावस्थेत सापडलो आहोत असे वाटले. त्या मन:स्थितीतून बाहेर पडण्यासाठी त्यांना एका मित्राने ओशो रजनीश यांच्या गीतेवरील प्रवचनांच्या कॅसेट्स भेट देऊन, त्या ऐकण्यास सांगितले. आणि आश्चर्य हे की त्या कॅसेटस ऐकून वपुंना जगण्याचे नवे बळ मिळाले. भगवद्गीता हा धार्मिक ग्रंथ नसून तो मानसशास्त्रावरचा पहिला जागतिक ग्रंथ आहे हे त्यांना उमगले. आपण स्वत:च अर्जुन आहोत, आणि स्वत:च नव्हे तर प्रत्येक माणूस हा अर्जुन आहे, आणि त्याला अर्जुनाप्रमाणेच आपण पदोपदी कोंडीत सापडल्याची, गोंधळल्याची, संभ्रमाची जाणीव होते, असेही त्यांना कळून चुकले. महाभारताला शेवट नाही, फक्त सुरुवात आहे अशीही एक कल्पना वपु भारावून मांडतात. ओशो रजनीशांच्या कॅसेट्सनी आपल्याला श्रीकृष्ण उलगडून दाखवला, महाभारताचा वेगळा अर्थ सांगितला. माणूस कळायला एक नवा डोळा दिला असे म्हणून वपु 'आपण सारे अर्जुन’ या लेखमालेच्या रूपाने स्वैर व स्वच्छंद चिंतन मांडण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यातील पहिल्या 19 लेखांचा (किंवा प्रवचनांचा) हा संग्रह. वपुंच्या कथाशैलीवर मराठी माणूस फिदा आहे. वपुंच्या गोष्टीवेल्हाळ प्रकृतीला असा स्वैर मुक्त चिंतनाचा फॉर्म साजेसा आहे.
-
Vapurvai
श्रेष्ठ कथाकथनकार’ म्हणून वपुंची असलेली ओळख ही त्यांची अनेक मनोरम वैशिष्ठ्ये सिध्द करते. मनाची पकड घेणारी कथा लिहणारे लेखक, कथेतील पात्रे जीवंत करणारे, श्रोत्यांना गुंतवून ठेवणारे कथनकार आणि या सर्वांमागे सूप्तपणे उभे असलेले डोळस रसिक तत्वचिंतक! प्रत्येक कथेतून वपु वाचकांना भेटत असतात. एकाच वेळी अनेकांना अंतर्मुख करणारी, बहिर्मुखातून अंतर्मुखता देणारी; लोकरंजनातून वैचारिकतेकडे झुकणारी अशी वपुंची कथा असते. ज्यांच्या कथेतून अनोख्या प्रतिमांमधून सतत माणूसपणाचा उद्घोष असतो. वेगवेगळ्या परिस्थितीत सापडलेली, संघर्ष करणारी, हसणारी, रडणारी, कुढणारी सर्वसामान्य माणसं आणि त्यांच्यातली असामान्यत्वाची झलक वपुंनी नेमकी पकडलेली असते. आपल्या प्रसन्न, खुमासदार, मिश्किल शैलीतील -- आविष्कार कथा वाचनीय आणि श्रवणीयही करतो. वपुंच्या खास कथांची ही वपुर्वाई वाचकांना अपुर्वाईची ठरेल.
-
One For The Road
पुरुषालाही स्वत:च्या पत्नीव्यतिरिक्त अन्य स्त्रीच्या सहवासाचे सौख्य रोमांचित करणारे वाटते असे आपण धरून चालतो. 'वन फॉर द रोड’चा नायक आगगाडीत भेटलेल्या मोहिनीच्या सहवासात रममाण होण्याऐवजी स्वप्नात बघतो ते काहीतरी भलतेच. त्याच्या सत्प्रवृत्त, पापभीरू मनाला त्या अनैतिक सुखाचा आनंद मात्र तीळमात्रही लुटता येत नाही आपले मनच असले भलतेच सुख अंगी लावून घेत नाही- हे सारे एखादा गांभीर्याने वा विशिष्ट तत्त्वाचा आव आणून सांगेन. वपु अर्थातच तसे करत नाहीत तरीही सांगायचे ते सांगतातच. ह्याचप्रमाणे वपु प्रादशिकेतही शिरलेले नाहीत. त्यांच्या ह्या कथांचे वातावरण शहरी मध्यमवर्गीय आहे न् त्यांच्या ह्या कथांचे विषयही तसेच आहेत शहरी मध्यमवर्गीय !
-
Tu Bramath Aahasi Vaya
वपुंच्या कथांनी वाचकांच्या संवेदनांना हलकेच जागे केले, हलवले आणि प्रगल्भतेच्या प्रवासाला प्रवृत्त केले. पूर्णपणे अनलंकृत आणि सहजगर्भ शैलीतल्या वपुंच्या कथांनी मध्यमवर्गीय आयुष्यातील सुखदु:खे, मानापमानाचे अवघड प्रसंग, भावभावना आणि विकारविचारांची आंदोलने व्यक्त करणारी दुखरी नस पकडली शुद्ध जीवनातून विचारांतून, आपल्या आकलनाच्या खोलवरच्या चिंतनातून व्यक्त होणारे अनुभव आपल्या स्वप्रतिभेनं कथांमधून झळाळू लागले. सहस्त्रदल कमल सूर्य किरणांनी अलगद उमलावे तसे विविध प्रसंग कलाकृतींतून उमलावे लागतात. या कादंबरीत हे कमळ संपूर्ण उमलले आहे. ऐहिक जीवनाचारातून मनप्रवृत्तीला उंच नेणारी अलगदपणे प्रशांत शांततेकडे नेणारी प्रकाशवाट उजळणारी नायिका हे या कादंबरीचे बलस्थान आणि आकर्षण केंद्र संपूर्णपणे ऐहिक यशात जीवनाची परिपूर्णता मानणार्या आजच्या मानवाचं प्रतिक म्हणजे ओंकारनाथ- या यशामागून येणारं निस्तत्व, रसहीन, आवेगहीन आयुष्य भोगणारा परंतु त्याचीही जाणीव नसणारा अशा मानवाला खर्या चैतन्याकडं, संपूर्ण आनंदाकडं बोटं धरून नेणारी ही कादंबरी वाचकालाही उत्कट प्रेमाचे आणि त्यागाचे असीम अविनाशी आनंदाचे दान देते. ज्ञानेश्वर, कबीर, येशू, बुद्ध या सर्वांचा वैचारिक अंगीकार केलेली उत्तुंग नायिका- सायरा आस्वादापलिकडचा आनंद देऊन जाते हे निश्चित.
-
Duniya Tula Visrel
वावां'ची शायरी दाद द्यावी अशी तर होतीच, तशीच समरसून दाद द्यावी असे हे 'वपुं'नी केलेले त्या शायरीचे तितकेच शैलीदार, तितकेच ओघवते, मनधुंद करणारे रसग्रहण. "उर्दू ढंगाची शायरी मराठीत करताच येणार नाही" ह्या ठाम विधानाला तोच ढंग घेऊन पण त्या ढंगाच्या नियमावलीत न अडकता भाऊसाहेब (वा.वा.) पाटणकरांनी ढोल उत्तर दिले होते आणि त्यांच्या ह्या ठोस उत्तराला सार्या मराठी रसिकांनी उचलूनही धरले होते. ह्या शायरीला विदर्भाच्या चौकशी पडल्या नव्हत्या - मुळातच समजले समजले वाटावेसे हे काव्य वपुंनी तोच ढंग अचूक पकडून खुलविले असल्याने त्याची खुमारी वाढली आहे- सुरेशचंद्र नाडकर्णी ह्यांनी केलेल्या ह्या रसग्रहणाच्या रसग्रहणासह !