-
Udyog Yashogatha (उद्योग यशोगाथा)
एखादी कल्पना उद्योगात रूपांतरित करायला एक वेगळी जिद्द, अर्थशास्त्राची थोडी जाणीव वगैरे अनेक गोष्टी लागतात. त्या अनुभवाने शिकता येतात, पण त्याला अनेक वेळा कालमर्यादा मोठी लागते. यातून या नव्या उद्योजकाची दमछाक होते. अनेकदा कल्पना चांगली असूनही तो अयशस्वी ठरतो. यामुळे सरदेशमुखांनी अगदी लहानांपासून मध्यमवर्गीयांमधील काही व्यक्ती आंतरराष्ट्रीय दर्जावर कशा पोहोचू शकल्या, अशी अनेक वेगवेगळी उदाहरणे संवादात्मक शैलीत समजावून सांगितलेली आहेत. यामुळे नवीन उद्योजकांना प्रेरणा मिळायला निश्चित मदत होईल. आपण आपापल्या परीने जमेल तशी हळूहळू व्यवसायवृद्धी करत राहावी, असाही संदेश या पुस्तकातून मिळतो. भविष्यकाळामध्ये हे आवश्यक आहे, असाही संदेश यातून मिळतो
-
Ghumakkadi (घुमक्कडी)
सरधोपटता वजा केली, की तुम्हाला थोडं अधिक चांगलं लिहिता येऊ शकतं, हे नोरा एफ्रॉन या विदुषीचं तत्त्वज्ञान कविता महाजन यांनी त्यांच्या कथात्म लेखनकाळातच ओळखलं होतं. अकथनात्मक लेखन, अनुवादासाठी देशाच्या कानाकोपर्यातील लेखक-लेखिकांचं वाचन, संपादन या सर्व बाबींमुळे त्यांच्या लेखणीला धार आलेली दिसते. रा. भि. जोशींच्या प्रवासलेखनकुळाशी बरंचसं जवळचं नातं सांगणार्या ‘घुमक्कडी' या पुस्तकामध्येही आहे प्रवासाच्या गोष्टी आणि गोष्टींचा प्रवास. तो किती खोलवर आहे, याचा अंदाज यातील कोणताही लेख वाचल्यानंतर उमजून येईल. पृथ्वीची उत्पत्ती, सूर्याची, अग्नीची, पावसाची इतकंच नाही, तर मिठाची उत्पत्ती याबद्दलच्या लोककथांचा प्रवास कविता महाजनांच्या प्रवासाशी एकरूप होऊन रूढार्थानं प्रवासवर्णन नसलेलं एक अचंबित करणारं पुस्तक तयार झालंय. ब्लॉगसाठी लिहिल्या गेलेल्या या प्रवासनोंदी, पण अत्यंत गंभीर आणि अनंत तपशिलांना कवेत घेणार्या.
-
Aapuliya Bale Nahi Mi Bolat ( आपुलिया बळे नाही मी बोलत)
शताब्दीच्या उंबरठ्यावरचे दादा' गेली 50 वर्षे मी दादांना पाहातो आहे, ऐकतो आहे, आणि वाचतो ही आहेच, दादा म्हणजे मराठी साहित्यातले ज्येष्ठ लेखक-समीक्षक श्रीराम कृष्णाजी बोरकर, राष्ट्रीकृत बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी. दादांचे कुटुंब साक्षात गोकुळच. दादा त्यातले आदर्शवत कर्ता पुरुष. दादांची पहिली कादंबरी ते मॅट्रीकला असताना प्रसिद्ध दार्दाचे विविधांगी, विपुल लेखन लोकप्रिय मासिकांतून आणि प्रतिष्ठित वृत्तपत्रांमधून सातत्याने प्रसिद्ध, दैनिक महाराष्ट्र टाईम्सच्या रविवार पुरवणीतून सुरवातीपासून सतत 18 वर्षे दार्दानी असंख्य ललित ग्रंथाची परीक्षणे करून साक्षेपी समीक्षक म्हणून नाव मिळविले. दादांनी कविता, लघुकथा, लघुनिबंध, कादंबरी, समीक्षा, चरित्र आणि इतिहास असे वेगवेगळे वाडमय प्रकार स्वतःच्या ललित मधुर शैलीत समर्थपणे हाताळले. त्याचीच पुढे अनेक पुस्तके निघाली. डेमिसाईज आकारातला सुमारे 750 छापील पृष्ठाचा दादांचा श्रीमहाभारत' नामक भारदस्त संशोधनपर ग्रंथ विशेष लोकप्रिय आहे हा ग्रंथ दादांच्या वाङ्मयीन कार्यकर्तृत्वाचा एक चिरस्थायी ठेवा समजला जातो. "आपुलिया बळे नाही मी बोलत" या नावाचे दादांचे आत्मकथन पर नवे पुस्तक आज प्रकाशित होत आहे. दादांच्या आयुष्याचे व समग्र जडण-घडणीचे एक नितळ, प्रांजल दर्शन त्यातून घडते, ते मनोवेधक आहे, मनाने अतिशय निर्मळ, निगर्वी असणारे दादा स्वभावानेही तितकेच निष्कपट आणि निर्मत्सरी आहेत. शताब्दी वर्षातल्या त्यांच्या प्रवेशाची सारीजण आतुरतेने वाट पाहाताहेत, दादांनी शतायु व्हावे हीच सर्वाची शुभकामना !
-
Ase He Runanubandha (असे हे ऋणानुबंध)
'असे हे ऋणानुबंध' या कथासंग्रहातील सगळ्या कथा वाचल्या. यातील अनेक कथा सत्य घटनांवर आधारित आहेत. काळ, स्थळ, व्यक्तिंची नावे बदललेली आहेत. कथा साध्या व सोप्या भाषाशैलीत लिहिलेल्या आहेत. त्यामुळे पुढे काय ? याची उत्सुकता लागून राहते. कथेचा शेवट गोड केलेला आहे.
-
Suranchi Samaradnee : Lata Mangeshkar (सुरांची सम्राज्ञी : लता मंगेशकर)
लताचा आवाज ‘पल्याडच्या' दुनियेशी आपलं नातं जोडील अशा विलक्षण मधुर ताकदीचा होता. संगीत हे परमेश्वरापर्यंत पोहोचायचं साधन असेल, तर त्या प्रवासाला स्वत:च्या आवाजाचा मखमली रस्ता दिला, तो लताबाईंनी. पायांखाली गुलाबाच्या पाकळ्या अंथरल्या, त्या लताच्या आवाजानं, पायांखाली गुलाबाच्या पाकळ्या अंथरल्या, त्या लताच्या आवाजानं, तिच्या सुरांनी. एकेका स्वराचा, लयीचा, तालाचा आनंद घेत आणि मुक्तहस्तांनी आनंद वाटून देत आली लताची गाणी.. राग, अनुराग, प्रणय, मीलन, विरह, रुसवा, वंचना, निराशा, पश्चाताप, वात्सल्य, हर्ष, खेद... अशा अनंत भावछटांना लताच्या आवाजानं मूर्तरूप दिलं. या दैवी आवाजाची ना कुणाला व्याख्या करता आली, ना तो संगीताच्या कुठल्या गणिती मोजपट्टीत किंवा व्याकरणात बसवता आला. त्या अपूर्व स्वरलेण्याला ही विनम्र आदरांजली, लताबाईंच्याच निवडक पंचवीस गीतांच्या शब्द-सूर-अर्थ-आस्वादाच्या साथीने..
-
Navrasancha Jadugar Mohammad Rafi (नवरसांचा जादूगार मोहम्मद रफी)
मोहम्मद रफींचं नाव घेतलं अन् त्यांची एकाहून एक सरस नि सुरस गाणी आठवली की सद्गुणांना सुगंधी स्वर लाभला होता असं वाटल्याशिवाय राहत नाही ! पुरुषी स्वर, पण त्याला होती जितकी ऐट तितकीच अदब.. प्रेम, छेडछाड, प्रेमभंग, विफलता, उद्वेग, नटखटपणा, शुद्ध भक्ती आणि अशा असंख्य भावछटा, रफी-स्वरातून सारख्याच सहजपणे नि कुशलतेनं उमटल्या... रसिकांना नाना रसांच्या वर्षावात आजपर्यंत चिंब भिजवत राहिल्या.. म्हणून तर रफी ठरले नवरसांचे जादूगार ! संगीताच्या जाणकार नि प्रसिद्ध गायिका डॉ. मृदुला दाढे या पुस्तकात सांगतायत, रफींच्या आवाजातल्या जादूचं रहस्य ! अन् त्यानंतर आहेत रफींची निवडक पंचवीस गाणी आणि त्यांचं रेशमी रसग्रहण... क्यूआर कोड स्कॅन करून ती गाणी लगेच ऐकायची सुविधाही आहे...
-
Nivdak Gomaji (निवडक गोमाजी)
गोमाजी गणेशन या नावाने काही वर्षांपूर्वी 'साप्ताहिक अॅमॅच्युअर' मध्ये लिहिलेल्या काही निवडक स्फूट लेखांचा हा संग्रह आहे. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर हलकी-फुलकी टिप्पणी करणारे हे प्रासंगिक लिखाण दहा-पंधरा वर्षापूर्वीचे असले तरी आजही ते कालबाह्य वाटत नाही. अर्थात याचे श्रेय बदलत्या जमान्यातही न बदलणाऱ्या आपल्या आजकालच्या राजकीय व सामाजिक संस्कृतीला द्यावे लागेल. या पुस्तकातील लेख आणि त्यातील व्यक्ती व प्रसंग हे काल्पनिक असले तरी त्यांचे कोणत्याही जिवंत वा मृत व्यक्तींशी साधर्म्य आढळल्यास तो योगायोग समजू नये. किंबहुना त्यांच्यातील साधर्म्य वाचकांच्या लक्षात आणून द्यावे, याच हेतूने हे लिखाण केलेले आहे. हे पुस्तक म्हणजे आरसा असून त्यात पाहून कोणाच्या भावना दुखावणार नाहीत अशी अपेक्षा आहे.
-
Gajlelya Jagatik Rajkiya Hatya (गाजलेल्या जागतिक राजकीय हत्या)
गाजलेल्या जागतिक राजकीय हत्या' हे पुस्तक म्हणजे अब्राहम लिंकन (१८६५) ते बेनझीर भुत्तो (२००७) असा प्रदीर्घ रक्तरंजित इतिहास आहे. लेखक धनंजय राजे यांनी अतिशय कौशल्याने जगात गाजलेल्या १५ राजकीय हत्यांचा अभ्यासपूर्ण वेध घेतला आहे. या पंधरा व्यक्तिपैकी म. गांधी आणि मार्टीन ल्यूथर किंग यांना वगळता बाकीच्या तेरा व्यक्ती त्या त्या देशात सर्वोच्च पदावर होत्या. जगात खळबळ माजविणाऱ्या या क्रूर हत्यांमागचे कटकारस्थान, घटनांचे चित्रदर्शी वर्णन वाचकांना खिळवून ठेवेल. जग जसजसे आधुनिकतकडे जात गेले तसतसे खून करण्याच्या पद्धती, खुनासाठी वापरलेली हत्यारे यांमध्येही बदल होत गेले. म्हणजे विषप्रयोग, तलवार, सुरा, खंजीर इथपासून ते मानवी बाँबपर्यंत हा कलंकित मानवी प्रवास येऊन ठेपतो. ज्येष्ठ संपादक, पत्रकार श्री. कुमार केतकर लिहितात-हे पुस्तक केवळ सुजाण वाचकांसाठी मर्यादित नाही, केवळ करमणुकीसाठी नाही तर हे अभ्यासाचे पुस्तक आहे. विविध परीक्षांना (यूपीएससी इत्यादी) ते अगदी केबीसी (कौन बनेगा करोडपती) साठी तयारी करणाऱ्यांनाही हे उपयोगी पडेल. राजकीय हत्या या राजकारणाचा, सत्तेचा समतोल बदलण्यासाठी केल्या जातात. त्या घडत नाहीत, घडविल्या जातात. राजे यांच्या या पुस्तकाबद्दल इतकेच म्हणता येईल की, हा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास आहे आणि तो एखाद्या रहस्यकथेसारखा सादर केला आहे.
-
Kashmirchya Lokakatha (काश्मीरच्या लोककथा)
रेव्हरंड जे. हिंटन नोल्स (Knowles) है पंजाबमध्ये काम करणारे एकोणिसाव्या शतकातले अतिशय प्रसिद्ध असे ब्रिटिश मिशनरी होते. जिथे काम करायचे, आपले धर्मतत्त्व लोकांना पटवून द्यायचे, त्या लोकांची भाषा, चालीरीती वगैरेचे ज्ञान धर्मप्रचारकाला आवश्यक असते. ही गोष्ट नोल्स यांना चांगलीच माहीत होती. संस्कृतीचे ते जाणकार होते. लोकसाहित्य हे संस्कृतीच्या अभ्यासाचे प्रमुख अंग आहे याची जाण त्यांना होती. काश्मिरी म्हणींचा कोश त्यांनी प्रथम तयार केला. 1886 च्या सुमारास A Dictionary of Kashmiri Proverbs and Saying या नावाने तो प्रसिद्ध आहे. दूरुबनर आणि कंपनीने तो लंडनला प्रकाशित केला. लोकसाहित्याचे जाणकार म्हणून या कोशामुळे ते प्रसिद्धीला आले. रे. नोल्स यांचा Folks-Tales of Kashmir हा दुसरा ग्रंथ 1888 साली टूरुबनर आणि कंपनीनेच प्रकाशित केला. त्याचेच भाषांतर मी केले आहे.;Indian Antiquary या अतिशय पांडित्यपूर्ण आणि जगभर आदरास पात्र झालेल्या मासिकात यातल्या काही गोष्टी आलेल्या आहेत. माझे लक्ष प्रथम त्यांनीच वेधून घेतले. मेरी फ्रियर नंतर जे पाच-सात लोककथा-संग्राहक पाश्चात्त्य लोकसाहित्याच्या अभ्यास प्रथेत भारतीय लोककथाकारांचे अग्रदूत म्हणून गणले जातात त्यापैकी नोल्स हे एक आहेत. भारतीय लोककथांचा सर्वकष अभ्यास अद्याप झालेला नाही. भारतीय लोककथांचे संग्रह, त्यातल्या त्यात आता दुर्मिळ झालेले संग्रह भारतीय भाषांत अनुवाद होऊन पुढे आले तरच हा अभ्यास आता शक्य आहे. या हेतूने मी हा अनुवाद केला आहे.
-
Umbarkhind (उंबरखिंड)
इतिहासातील सर्वांत मोठा गनिमी कावा #उंबरखिंड वाचकांसाठी सज्ज शाहिस्तेखानाने कोकण जिंकण्यासाठी तीस हजारांची फौज पाठवली. सोबत दीड लाख तलवारी, एक लाख ढाली, बारा हजार बंदुका, चाळीस हजार भाले आणि दहा लाख रूपयांचा खजिना सोबत पाठवला. हजार मुडदे पडले तरी चालतील पण कोकण जिंकायचंच या इराद्याने शाहिस्तेखानाने कारतलबखान नावाच्या सरदाराकडं ही मोहीम सोपवली. कारतलबखान म्हणजे हाती तलवार नसेल तर दातांनी शत्रूचा गळा फोडणारा शूर आणि तेवढाच क्रूर सरदार. मोठ्या रुबाबात आणि विजयीभावानं मुघलांचा ताफा पुण्याहून निघाला आणि दोन दिवसांनी लोणावळ्यात पोहचला. पण, लोणावळ्याच्या पुढे असलेल्या उंबरखिंडीत सह्याद्रीचे वाघ मुघलांची वाट पाहतच थांबले होते आणि या वाघांचं नेतृत्व करत होते स्वत: छत्रपती शिवाजी महाराज. तीस हजार सैनिक, दहा सरदार आणि शाहिस्तेखानाचीही मती गुंग करणारा इतिहासातील सर्वांत मोठा गनिमी कावा म्हणजेच उंबरखिंड. आजपासून ही कादंबरी वाचकांसाठी उपलब्ध करुन देत आहोत. उन्हाळ्याच्या सुट्टीत ही कादंबरी अवश्य वाचा आणि घरातील लहान मुलांनाही वाचायला द्या. साधी, सोपी आणि सुटसुटीत लेखनशैली...
-
Atal Avichal (अटल अविचल)
ब्रिटिश काळातल्या गोऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एका अर्थाने विपुल असं लेखन केलेलं आढळतं. यापैकी काही लेखन ब्रिटिश प्रशासनाला साहाय्यभूत ठरणारं असं होतं, उदाहरणार्थ ‘अँडरसन मॅन्युअल'. हे पुस्तक तर आजही महसूलातलं बायबल आहे. काही गोऱ्या साहेबांनी भारतीय संस्कृतीबद्दल, भारतीय इतिहासाबद्दल, भाषांबद्दल कुतुहल दर्शवून त्या संदर्भात बरचसं लिखाण केलं आहे. काहींनी सामाजिक अंगानेसुद्धा लिहिलं आहे. अन्य ब्रिटिश लेखकांनीसुद्धा तत्कालिन समाज, भारतीय माणसाची मनोवृत्ती, राजे-महाराजे यांच्या सवयी इत्यादींबद्दल लिहिलेलं आहे. तद्नंतर, भारतीय प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वेळोवेळी काहीएक महत्त्वाचं लेखन केलेलं आहेच. याच परंपरेमध्ये आता ‘अटल-अविचल' या डॉ. दिपक म्हैसेकर यांच्या आत्मकथनाची भर पडलेली आहे. औरंगाबादल विभागीय आयुक्त कार्यालयात मी त्यांच्या सोबत काम केलेलं आहे. शिस्तप्रिय, पद्धतशीर काम करणारा (चशींहेवळलरश्र) आणि स्वच्छ चारित्र्याचा अधिकारी म्हणून डॉ. दिपक म्हैसेकरां ओळख सर्वत्र प्रचलित होती. ‘अटल अविचल' मध्ये त्यांनी लोकाभिमुख प्रशासनाची कहाणी रसपूर्ण भाषेत आणि ओघवत्या शैलीत सांगितली आहे. महसूल विभागाच्या सर्वोच्च पदाला स्पर्श करताना आलेल्या अनेक अवघड प्रसंगात ते अटल आणि अविचल राहिले याचा त्यांना रास्त अभिमान आहे. त्यांचं हे आत्मकथन अनेक अंगांनी वाचनीय, स्मरणीय असं असून महसूल विभागामध्ये ‘अटल' राहण्याची काय किंमत मोजावी लागते याचा लेखाजोखा या कथनात अतिशय प्रांजलपणे मांडलेला आहे. इतकंच नाही तर, डॉ. म्हैसेकर यांनी मराठी रसिकवाचकाला या प्रशासनातल्या आंतरविश्वाचं समर्थपणे दर्शन घडविलं आहे. त्या योगे मराठी साहित्यविश्वातील आत्मकथनाच्या परंपरेत मोलाची भर पडलेली आहे.