-
Adamura (अदमुरं)
“जगी घाण नि चिखलच सारा, म्हणो कितीही कुणी शहाणा पदोपदी मज कमळ घालते गुणगंधाचा नवा उखाणा. " बोरकरांप्रमाणेच श्रेयालाही अवघी सृष्टी पदोपदी गुणगंधाचा उखाणा घालत असते आणि तो गुणगंध इतरांनीही अनुभवावा ही असोशी तिच्या लेखणीतून झरते. पुस्तकाच्या शीर्षकाप्रमाणेच तिचं लिखाण ताजं, अलवार, मधुर आहे. ते मुक्तछंद काव्य आहे की लयदार गद्य हे ठरवणं कठीण आहे पण तशा कोणत्याच साच्यात न बसवता आपण त्यात रममाण होतो. यात वर्णिलेल्या घटना तुमच्या-आमच्या दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्याच. मग वेगळेपण काय ? तर एरवी त्रासदायक वाटणाऱ्या प्रसंगांकडे बघण्याची श्रेयाची सौंदर्यदृष्टी, ‘अतिपरिचयातब अवज्ञा' झालेल्या भवतालाची दखल घेणं, त्याला दाद देणं. ह्या पुस्तकातल्या ‘कथुल्यां'मध्ये पती-पत्नी, माय-लेक, सखा- सखी, अशा विविध नात्यांचे पदर गुंफलेले आहेतच. त्याशिवाय लेखिकेचं निसर्गाशी, ऋतूंशी-विशेषतः पावसाशी, परिस्थितीशी, निसर्गाशी, कविता, पुस्तकं, गीतांशी असलेलं नातं देखील सकारात्मकतेचं, आनंदाचं लेणं लेवून येतं आणि वाचकालाही आनंदित करून जातं. श्रेयाच्याच शब्दांत सांगायचं तर - हे पुस्तक म्हणजे - 'दुसऱ्या चैतन्याला हाक देणारी एका चैतन्याची आभा.' -- मंजिरी धामणकर
-
Gutenbargachya Savlya (गुटेनबर्गच्या सावल्या)
'गुटेनबर्गच्या सावल्या या पुस्तकात प्रा. डॉ. प्रवीण घोडेस्वार यांनी भारतातील आणि मुख्यतः महाराष्ट्रातील प्रकाशन व्यवसायात कार्यरत असलेल्या स्त्रियांच्या कामगिरीचा आढावा घेतलेला आहे. हा आढावा महत्त्वाचा याच्यासाठी आहे की, ज्ञानप्रसाराचे एक माध्यम म्हणून स्त्रिया जेव्हा प्रकाशन व्यवसायाचा विचार करू लागल्या तेव्हा त्यांना आपल्या दुय्यमत्त्वाची जाणीव होती आणि या जाणिवेतून जगाला समतेचा विचार देण्यासाठी आणि मुख्यतः स्त्रियांच्या हक्काची, अधिकाराची मांडणी करण्यासाठी या व्यवसायात त्या उतरल्या. यातील काही स्त्रियांचे प्रयत्न या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. वृत्तपत्रात चालवलेल्या पाक्षिक सदराचे रूपांतर या पुस्तकात झाले आहे. त्यातून प्रकाशन व्यवसायात कार्यरत असलेल्या स्त्रियांच्या विचारविश्वाचा परिचय करून देण्याचा आणि त्यांची ऐतिहासिक कामगिरी मांडण्याचा प्रयत्न प्रवीण घोडस्वार यांनी केलेला आहे. या दृष्टीने या पुस्तकाचे महत्त्व निर्विवादपणे मान्य करावे लागेल. उर्वशी बुटालिया, रितू मेनन, चिकी सरकार, मिली ऐश्वर्या, नीता गुप्ता, कार्तिकी व्हीके, नाझिया खान यासारख्या महाराष्ट्राबाहेरील प्रकाशन व्यवसायात कार्यरत असलेल्या स्त्रियांच्या कामगिरीचा आढावा या पुस्तकात घेतला आहे. या सर्व स्त्रिया स्त्रियांच्या अधिकारांचा पुरस्कार करणाऱ्या आणि स्त्रीवादी सिद्धांतनाची मांडणी करणाऱ्या स्त्रिया आहेत. ' --वंदना महाजन प्राध्यापक, मराठी विभाग, मुंबई विद्यापीठ, मुंबई