Adamura (अदमुरं)
“जगी घाण नि चिखलच सारा, म्हणो कितीही कुणी शहाणा पदोपदी मज कमळ घालते गुणगंधाचा नवा उखाणा. " बोरकरांप्रमाणेच श्रेयालाही अवघी सृष्टी पदोपदी गुणगंधाचा उखाणा घालत असते आणि तो गुणगंध इतरांनीही अनुभवावा ही असोशी तिच्या लेखणीतून झरते. पुस्तकाच्या शीर्षकाप्रमाणेच तिचं लिखाण ताजं, अलवार, मधुर आहे. ते मुक्तछंद काव्य आहे की लयदार गद्य हे ठरवणं कठीण आहे पण तशा कोणत्याच साच्यात न बसवता आपण त्यात रममाण होतो. यात वर्णिलेल्या घटना तुमच्या-आमच्या दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्याच. मग वेगळेपण काय ? तर एरवी त्रासदायक वाटणाऱ्या प्रसंगांकडे बघण्याची श्रेयाची सौंदर्यदृष्टी, ‘अतिपरिचयातब अवज्ञा' झालेल्या भवतालाची दखल घेणं, त्याला दाद देणं. ह्या पुस्तकातल्या ‘कथुल्यां'मध्ये पती-पत्नी, माय-लेक, सखा- सखी, अशा विविध नात्यांचे पदर गुंफलेले आहेतच. त्याशिवाय लेखिकेचं निसर्गाशी, ऋतूंशी-विशेषतः पावसाशी, परिस्थितीशी, निसर्गाशी, कविता, पुस्तकं, गीतांशी असलेलं नातं देखील सकारात्मकतेचं, आनंदाचं लेणं लेवून येतं आणि वाचकालाही आनंदित करून जातं. श्रेयाच्याच शब्दांत सांगायचं तर - हे पुस्तक म्हणजे - 'दुसऱ्या चैतन्याला हाक देणारी एका चैतन्याची आभा.' -- मंजिरी धामणकर