-
Tarphula (टारफुला)
...टारफुला ही या प्रवृत्तीची आणखी एक अप्रतिम कादंबरी आहे. हिचे आशयसूत्र मराठी कादंबरीच्या परंपरागत साचेबंदपणाला आव्हान देणारे होते. त्यातल्या एका गावाच्या बेबंदशाहीतून, सुरक्षिततेच्या प्रश्नातून आपल्या सबंध समाजाला रूपकात्मक अर्थ देण्याचे सामथ्र्य आहे. हे खरे तर 1964 च्या सुमारास सबंध देशाचेही रूपक होते. त्यामुळे स्थान प्रधानतेच्या बाहेर कृतीकडे वळणारे नौतिक तपशील ह्या कादंबरीत भरपूर होते. एका जबर शासनाच्या अस्तित्वाशिवाय असा समूह नीट चालत नाही हे एका जबर पाटलाच्या अस्तित्वाने आणि त्याच्या मृत्यूनंतरच्या भीतिदायक बेबंदपणाने नानाविध सूचक तंत्रांनी दर्शविले आहे. आबा कुळकण्र्याला हे विघटित समाजीवन सांभाळता येत नाही हे कुळकर्णी कुटुंबातल्या अस्थिर, दुर्बळ वातावरणातून शंकर पाटलांनी ज्या अल्पशब्दकतेतून चितारले आहे ते 1964 साली अपूर्व होते. गावातल्या विविध कुटुंबांतील नवरा-बायकोचे संवाद, गावातल्या गुंडांचे संबंध इ. प्रत्येक तपशिलातून दबावदार नेतृत्वाची गरज सुचवण्यात लेखकाने दाखवलेला निग्रह अभिजात मराठी कथनशौलीचा नमुना आहे. सबंध गावातील व्यवहारांचा भेदरलेल्या समाजजीवनातून विशाल पट दाखवत ही कादंबरी नव्या पाटलाने जम बसवेपपर्यंत चिरेबंद रूप मांडते...
-
Bandhara (बंधारा)
"मग कोन कोन हैत घरात?'" "घरात शेतीबिती असंल ?" "तुमचा देवाधर्मावर इस्वास हाय का न्हाई ?" "बगा ही अंगडी टोपडी. अहो, नवसासायासायनं झालाय मग हौस नको करायला ?" "घ्या, डिंकाचा लाडू घ्या. आईनं मुद्दाम सुनंसाठी दिल्यात." "थांबा हं, तुमाला एक वस्तू अशी दावतो कशी, अगदी बगण्यालायक!'" एक मोठं गोल फिरणारं प्लॅस्टिकचे हत्ती, घोडे असलेलं खेळणं काढलं. खेळणं फिरत होतं, आणि ते फिरवून दाखवणा-याच्या डोळ्यांत वात्सल्याचा आनंद उसळत होता. तो पाहून त्या सहप्रवाशाचे डोळे तरारले. आपल्या खिशातला रुमाल काढून तो आपले डोळे टिपत म्हणाला, "किती हौशी आहात हो ?" ..... अडीच तीन तासांचा त्याचा सोबती हे सारं थक्क होऊन बघत होता. इतका वेळ बाड बाड करणारी त्याची जीभ लुळी झाली. हातातलं ओझं पेलवेना झालं. गेलं माणूस कुणाचं कोण, पण त्याचा गळा दाटून आला. हुंदके अनावर होऊन आवर कसा घालावा हे कळेना झालं. तो तिथंच थोडा वेळ उभा राहिला. कढ जाऊ दिला आणि जड पावलं उचलत पुढे निघाला. बंधारा फुटावा तसं घडलं.
-
Tajmahalamadhye Sarpanch (ताजमहालमध्ये सरपंच)
ताजमहालमध्ये सरपंच' हा कायम टवटवीत राहतील अशा कथांचा संग्रह. या कथा म्हणजे खुसखुशीत विनोदाआडून घडवलेलं वास्तवदर्शनच ! शंकर पाटील यांनी कथा, कादंबरी, ललित लेख, वगनाट्य असे विविध साहित्यप्रकार हाताळले असले तरी ग्रामीण कथाकार म्हणूनच ते अधिक लोकप्रिय झाले. या संग्रहातील कथांमधून ग्रामीण राजकारण, जीवनौली तसंच समाजातील काही नमुनेदार नगांचं चित्रण आढळतं. प्रत्येक कथा चटपटीत संवाद आणि चुरचुरीत विनोद ल्यालेली दिसते. ती ठरवून लिहिलेली नाही तर उलगडत गेलेली आहे. सहजता आणि सोपेपणा या वैशिष्ठयांमुळे या कथा वाचकाच्या मनाला भिडतात.
-
Dhind (धिंड )
"म्या दारूला शिवलो न्हाई. शप्पत सांगतो, मी घेतल्याली न्हाई. उगा इनाकारणी माज्यावर अदावत घेऊ नका." राऊ खोतानं साफ झिडकारलं, तशी ती सारी चावडी खालवर झाली. लोक खदाखदा हसू लागले आणि राऊ खोतच म्हणाला. "हसून दावू नका. खरं सांगतो, मी घेतल्याली न्हाई." रामभाऊ हसून म्हणाले, "गड्या, तुझं डोळं सांगत्यात की रं !" "अण्णा, डोळं काय सांगत्यात ? गप, उगच गप्प बसा." "उतरंस्तवर गप बसावं म्हणतोस व्हय राऊ ?" "अहो, काय चढलीय का मला ?" "अजून चढली न्हाई म्हणतोस ?" "अहो, त्याचं नावसुदिक घेऊ नग. शिवल्याला न्हाई म्या त्याला !" एक सनदी पुढं झाला आणि मोठ्यानं म्हणाला, "शिवल्यालं न्हाईस तर मग दडून का बसला होतास ?" "शेबास ! म्या काय दडून बसलो होतो काय ?" "दडला नव्हतास तर मग माळ्यावर काय करत होतास ?" "माळ्यावर काय करतोय ! गडद झोपलो होतो ?" "मग खाली जागा नव्हती काय ?" "ते तुम्हाला काय करायचं ? आम्ही खाली झोपू न्हाईतर वर झोपू !" राऊ असं आडवं बोलला आणि सबंध चावडी पोट धरून हसू लागली. शंकर पाटलांच्या मराठी मनांवर अधिराज्य करणार्या ढंगदार कथा.
-
Patlanchi Chanchi (पाटलांची चंची)
चंचीच्या कप्प्यातून निरनिराळ्या वस्तू ठेवलेल्या असतात. विडा खाणारा त्या कप्प्यांमधून हव्या त्या वस्तू काढून घेऊन आपला विडा रंगवतो. शंकर पाटलांनी आपल्या मन:कोषात असेच विविध अनुभव जपून ठेवले होते. आणि लेखन रंगतदार करण्यासाठी त्यांनी त्या अनुभवांचाच उपयोग केला. खास कोल्हापुरी शब्दयोजना असलेली पाटलांची ही स्मरणचंची उघडली की वाचनविडा रंगायलाच हवा.
-
Fhakkad Goshti (फक्कड गोष्टी)
पाटलांच्या कथेतील एक स्वर दु:खाचा आहे, तर एक स्वर प्रसन्न हास्य खुलवणारा आहे. तसं पाहिलं तर विनोदी कथा लिहायची म्हणून शंकर पाटील यांनी लिहिलेली नाही. हास्याची अनंत बीजं असणा-या विविध जाणिवांतील गमतीदार विसंगती ह्या त्यांच्या कथांतील मध्यवर्ती घटना आहेत. त्यातच हास्यबीजं ठासून भरलेली आहेत. मराठी कथेत व्यंगचित्राचा घाट लाभलेल्या कथांची भर टाकण्याचे श्रेय शंकर पाटलांनाच द्यावे लागेल. The humorists are the wise men of the world because the most forcible way to impart truth is through laugh. शंकर पाटील या दृष्टीनं एक चतुर, खट्याळ आणि मिस्कील कथालेखक आहेत. त्यांच्याच या फक्कड गोष्टी.
-
Garvel
आपल्या बाळपणापासून शिवा त्या गारवेलाचा संसार बघत आला होता. एवढी दांडगी, डेरेदार चिंच गारवेलानं निम्मी झाकली होती. वर्षानुवर्ष भरतकाम करावं तसे टाके घालीत बसला होता. दरसाल आपलं जाळं विणतच होता. बघावं तिकडं सगळीकडं त्या झाडावर ती हिरवी वेलबुट्टी आणि फुलं दिसत होती. किती पावसाळे आणि किती उन्हाळे त्यानं पाहिले होते ! किती वादळांशी झोंबी घेतली होती ! गरजणा-या वळवानं झोडलं, झंझावातानं झिंजाडून विस्कटून बघितलं; पण आजवर त्यानं कधी कुणाला दाद दिली नव्हती, नमतं घेतलं नव्हतं. असा हा एवढा जिद्दीचा गडी, पण लागोपाठ पडलेल्या या तीन वर्षांच्या दुष्काळात डेंगला होता. त्याची सगळी रयाच गेली होती. यंदाच्या ह्या उन्हाळ्यात तर अंगावर एक हिरवं पान नव्हतं - मग फूल कुठलं ? नुसत्या जाळ्या राहिल्या होत्या. त्याही वाळून पळकाट्या झाल्यागत दिसत होत्या. तरी तग धरली होती. एवढा उन्हाळा पार झाला असता म्हणजे त्याला डग नव्हता. पुन्हा टाके घालत बसला असता. ती हिरवी जरतार खुलली असती. पण जगाहर्त अशा ह्या दुष्काळानं त्यालाही नाक घासायला लावलं. ना वादळ, ना वारा. एकाएकी कोसळला बाबा. संपला त्याचा शेर ! ती म्हातारी चिंचसुध्दा गदगदली. हे काय झालं, म्हणून ओणवी होऊन बघत राहिली.
-
Shreeganesha
गंगीला पदर येऊन ती मकरात बसली तेव्हापासून या खडकलाटेचे डोळे तिच्याकडं लागून आहेत. तिच्या रूपाची पडलेली भूल अजून तशीच आहे; कारण गंगीचं अंग चांगलं उफाड्याचं आहे आणि थोरवड अंगाच्या ह्या गंगीचं कातडंही हळदीगत गोरंपान आहे. तिच्या नाकाचा शेंडा जरासा खुडल्यागत दिसतो; पण तेच नाक तिला शोभून दिसतं असं तिथल्या तरुण पोरांचं मत आहे. तिच्या गो-या गालावर डाव्या बाजूला एक हिरवा तीळ आहे, तो तिला पाहणा-याच्या मनावर ठसल्याशिवाय राहत नाही. तिच्यासारखा वाकडा भांग गावातल्या दुस-या कुठल्या पोरीनं अजून काढला नाही, अनेक कुभांडं त्या गावानं तिच्यावर रचली आहेत. तिच्यासारखे कानावर फुगे पाडणारी पोर त्या गावात निपजायला अजून किमान दहा वर्षं तरी जावी लागतील !
-
Bhetigathi
तो असा बसताच चाबूक कडाडे... वादी पिंजून जाई, तुटून जाई. निबार कातडीवर वळ उठत. दवबिंदूगत रक्ताचे थेंब अंगावर थरथरत उभे राहत. कोयंड्याची काठी चिंबून, एकेक कुंडं मनगटाएवढा उठे; पण सर्जा जागचा हलत नसे. हे बघून लोक त्याला 'बशा' म्हणायचे. बशा बौल म्हणून सर्जाचं नाव बद्दू झालं. म्हातारपणी त्याच्या नशिबी बोल आला. त्याच्या गुणाला बट्टा लागला.... मृगाचा पाऊस सुरूझाला आणि सर्जाचं हाल कुत्र खाईनासं झालं. म्हशीपुढची काढलेली चिपाडं, शेणामुतात भिजलेला गदाळा त्याच्या वाट्याला येऊ लागला. पोट जाळायला तो तेसुद्धा खायचा - हपापून अपरूबाईनं खायचा. पण त्याच्या पोटाची खळगी भरली नाहीत. आतडी रिकामी राहिली. त्यात कामानं त्याची झडती घेतली आणि आता बसलं तर उठता येईना आणि उठलं तर बसता येईना अशी त्याची दशा झाली.