Jaganyachi Gatha (जगण्याची गाथा)
आधुनिकरणाच्या टप्प्यावर गावाची प्रचंड पडझड होत आहे. भौतिक साधने व यंत्रसामगीच्या धावत्या गतीमुळे मानवी जीवनाचा कायाकल्प अपरिहार्य ठरतो आहे. नवी मने घडत आहेत. जागतीकिकरणाने प्रभावित काळाचे दृश्य स्वरुपबरोबरच मानवी आंतरिकतेवरही आघात होत आहेत. हा कालबदलतील दुभंग, पेच मोहन कुंभार याच्या कवितेत मध्यवर्ती आहे. नगर केंद्री मानवी कोलाहलाच अटीतटीचा संघर्ष या कवितेत आहे. शहर आणि गाव या व्द्व्दसमासातून तो व्यक्त झाला आहे . तो भूत आणि वर्तमानाशी सांधलेला आहे .शहरकेन्द्रि मूल्यांच्या चौखूर आक्रमणाची नोंद या कवितेत आहे . एका अर्थाने भूमी ,प्रदेश व संस्कृतीवरील हे आक्रमण आहे . भूतकाळातील विसाव्याच्या सावलीतून त्याच्या वाट्याला आलेल्या परके व पोरकेपणाची जाणीव आहे . याचा शेवट काय असेल या भीतीचे सावट तीवर आहे. मायनिगरुपाने शेती व प्रदेश बेचिराख करणाऱ्या काळ्या सावलीचे गडद सूचन या कवितेत आहे . वर्तमानातल्या क्षणांना तोलून धरणारी विसाव्याच्या सृष्टीतील ओलाव्याची क्षणचित्रे या संवेदनशीलतेत आहेत . ती संयत अशा भाषारुपातून व तळाकोकनी बोलीचिन्हांच्या लयींतून अवतीर्ण झाली आहेत . भूमी , निसर्ग व मानवी जगावर होणाऱ्या आक्रमणाची नोंद यंत्रसंस्कृतीशी निगडीत हिंस्त्र प्रतिमांमधून घेतली गेली आहे . मनुष्य व निसर्गाजीवनातला अस्वस्थ . कालस्वर जगण्याची गाथा मधून व्यक्त झालेला आहे .