Nadi Vahate Ahe (नदी वाहते आहे)
या कथांची मांडणी करताना मधुरा थेट अनुभवाच्या आतल्या गाभ्यालाच जाऊन भिडते. लेखिका एक स्त्री आहे, म्हणून स्त्रीगत काही लेखनमर्यादा स्वतःवर घालून घेणाऱ्या काही लेखिका असतात. कारण त्यांना त्या अनुभवात शिरताना 'स्व'चा विसर पडत नाही. उलट त्या 'स्व'ला अधिकाधिक सुरक्षित ठेवतात. त्यामुळे त्या अनुभवाला त्या भिडूच शकत नाहीत. मधुरा त्या-त्या अनुभवला थेट भिडण्याचा प्रयत्न करते. माणसांना चितारताना पुरेपूर उघडंनागडं करावं, त्याला आतून-बाहेरून सोलून काढावं हा सर्जनशील लेखनाचा जो मूलधर्म आहे, त्याचे ती शिस्तीत पालन करते. म्हणूनच तो अनुभव मग मातृत्वाचा असेल, दैहिक व्याकूळतेचा असेल, प्रणयाच्या उन्नत क्षणाचा असेल किंवा पोटाच्या भूकेचा असेल; त्या अनुभवाला चितारताना ती कुठेही आडपडदा ठेवत नाही. जे सांगायचे आहे, ते सांगून पूर्णपणे मोकळे होणे हा तिचा लेखनधर्म आहे. त्यामुळे तिची कथा आपल्या मनात वरवर रेंगाळत न राहता, आतवर खोल रुतून बसते. तिच्या वाचनाचा संस्कार दीर्घकाळ मनावर कायम असतो. - डॉ. रवींद्र शोभणे