Disha Gharachya (दिशा घराच्या)
दिशा घराच्या लेखक : सानिया गेली पाच दशके सातत्याने सरस व सकस साहित्यनिर्मिती सानिया करीत आहेत. ‘शोध’, ‘प्रतीती’, ‘खिडक्या’, ‘दिशा घराच्या’, ‘ओळख’ ‘भूमिका’, ‘वलय’, ‘परिमाण’, ‘प्रयाण’, ‘ओमियागे’ आणि ‘अशी वेळ’ यांसारखे कथासंग्रह, ‘स्थलांतर’, ‘आवर्तन’ व ‘अवकाश’ यांसारख्या कादंबऱ्या आणि ‘काही आत्मिक काही सामाजिक’ हा ललित लेखांचा संग्रह, हे सारेच लेखन वाचकाला आत्मभान व विश्वभान देणारे आहे. कदाचित म्हणूनच ‘दिशा घरांच्या’च नव्हे तर स्वतःच्यादेखील कसून शोधण्यासाठी प्रेरित करणाऱ्या, वैचारिकता व प्रतिमात्मकता यांची सांगड घालणाऱ्या एकंदर चार दीर्घकथांचा हा संग्रह वर्तमानात चौतीस वर्षांनी पुनर्मुद्रित होतो आहे ही घटना निश्चितपणे स्वागतार्ह म्हटली पाहिजे. कारण लिंग, जात, वर्ण, वर्ग, प्रदेश, भाषा व विचारसरणी यांना ओलांडून जाणाऱ्या मानवी अस्तित्वाच्या गाभ्याला भिडण्याची प्रेरणा येथे प्रबळ आहे. व्यवस्था बदलली तरी माणसांमधील परस्परसंबंध, त्यातील निरगाठी सहजपणे सुटत नाहीत. मूल्यांचे टकराव कधी सौम्य तर कधी तीव्र पण ते होत राहतात. म्हणून समकालीन आणि सार्वत्रिक, विशिष्ट आणि व्यापक व कलात्मकता आणि कौशल्यपूर्णता यांची उत्तम सांगड घालणाऱ्या या दीर्घकथा आजही वाचनीय व प्रस्तुत ठरतात, यात शंका नाही.