-
Warsaw Te Hiroshima
जगाच्या इतिहासावर नजर टाकली तर सार्या जगाचा कायापालट करणारी विलक्षण, प्रचंड विध्वंसक घटना कोणती असेल तर ती आहे दुसरे महाविनाशक महायुद्ध. सारा युरोप आपल्या लष्करी सामर्थ्याच्या बळावर गदागदा हलवून सोडायचा या राक्षसी महत्त्वाकांक्षेने बेभान झालेल्या हिटलरने वॉर्साच्या रोखाने आपले सैन्य धाडताच, त्याच्या या उद्याम आवेगाला आवर घालण्याचा निर्धाराने ३ सप्टेंबर १९३९ रोजी ब्रिटनने जर्मनीविरुद्ध युद्धाचा पुकारा केला आणि तेव्हापासून दुसर्या जागतिक महायुद्धाचा भडका उडाला आणि बरोबर सहा वर्षांनी म्हणजे २ सप्टेंबर १९४५ रोजी या रणयज्ञाची सांगता झाली. या महायुद्धात सत्तावन्न देशांनी भाग घेतला त्यापैकी जर्मनी, ब्रिटन आणि रशिया या तीन राष्ट्रांची अपरिमित हानी झाली विनाशाचे एवढे भीषण तांडव जगाने यापूर्वी कधीही अनुभवले नव्हते. एवढे प्रदीर्घ आणि प्रखर झुंज जगाने प्रथमच अनुभवली. वॉर्साच्या रोखाने हिटलरची घोडदौड सुरू होताच या कहाणीचे पहिले पान लिहिले गेले तीन कोटी माणसांच्या रक्ताने. या कहाणीची मधली सारी पाने भिजून गेली आणि तिचे भरतवाक्य छातीवर अणुबॉंब झेलणार्या हिरोशिमाने उच्चारले. जगाला न ओळखण्याइतके बदलून टाकणार्या या महाभयानक घनघोर रणसंग्रामाचा चित्रदर्शी शब्दपट.
-
Antaral Spardha (अंतराळ स्पर्धा)
अंतराळाकडे कुतूहलानं बघणाऱ्या माणसाला आपण अंतराळात प्रवास करावा असं वाटायला लागलं आणि एक नवं युग सुरू झालं. यासाठीचं विज्ञान आणि तंत्रज्ञान अर्थातच अद्भुत आहे. या सगळ्याची निर्मिती कोपर्निकस, गॅलिलिओ, न्यूटन, आईनस्टाईन यांच्यासारख्या महामानवांनी दाखवून दिलेल्या मार्गावर चालल्यामुळे साध्य झाली असली तरी तिचा कळस विसाव्या शतकाच्या मध्यावर झाला. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांच्यात सुरू झालेल्या शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही महासत्तांमध्ये एकमेकांवर हरप्रकारे कुरघोडी करण्यासाठीची रस्सीखेच सुरू झाली. याचाच एक भाग अंतराळावर हुकमत गाजवण्याचा होता. कहर म्हणजे हिटलरच्या नाझी राजवटीत यासाठीच्या तंत्रज्ञानाची पाळंमुळं रचली गेली, हे ऐकून आपण सर्दच होऊ. अंतराळामध्ये प्रथम जाण्यासंबंधीच्या या स्पर्धेची अत्यंत रोमहर्षक, चित्तथरारक, भारावून सोडणारी आणि वेगळ्याच विश्वात नेणारी कहाणी म्हणजे `अंतराळ स्पर्धा`! फॉन ब्राऊन आणि कोरेलियॉव्ह हे दोघे विलक्षण हुशार आणि अफाट जिद्दीचे तंत्रज्ञ या शर्यतीमधले मुख्य प्रवासी ठरले. त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करणारी ही रंजक सफर खास मराठी वाचकांसाठी!
-
Teenagers A Natural History (टीनएजर्स-अ नॅचरल हिस्
प्रत्येक गोष्ट शास्त्रीयदृष्ट्या समजून घेणारे पालक वयात येणं का समजून घेऊ शकत नाहीत? कारण ‘वयात येणं’ या घटनेमागे फक्त शारीरिक बदल नाहीत, सामाजिक, सांस्कृतिक, मानसिक, शारीरिक, जीवशास्त्रीय असे सगळेच संदर्भ टीनएजला आहेत. उत्क्रांतीपासून सामाजिकतेपर्यंत सगळीकडेच टीनएजर्सची पाळंमुळं घट्ट रुजलेली आहेत. एरवी पालकांसाठी ‘प्रवेश निषिद्ध’ असणाऱ्या किशोरवयीन मुलांच्या अद्भुतरम्य जगाची सफर या पुस्तकाने घडवून आणली आहे. एखादं न सुटणारं अवघड कोडं सोडवताना जसा आनंद मिळतो, तसाच आनंद निसर्गाने घातलेलं कोडं सोडविण्यात आहे.‘टीनएजर्स’चं तर्कापलीकडचं गणित उकलताना जगण्याच्या प्रत्येक पायरीवर आपण अधिकाधिक समृद्ध होत जातो.
-
Sahityapratibha-Samarthya Ani Maryada (साहित्यप्रत
‘साहित्यप्रतिभा-सामर्थ्य आणि मर्यादा’ हा वि.स.खांडेकरांचा व्यक्तिकेंद्रित; परंतु साहित्याच्या अंगाने लिहिलेला समीक्षात्मक लेखसंग्रह होय. यात खांडेकरांनी आपल्या पूर्व व समकालीन नाटककार, कवी, कथाकार असलेल्या सुहृद साहित्यिकांच्या वाङ्मय व व्यक्तिविचारांची प्रज्ञा व प्रतिभा अशा दुहेरी अंगाने स्वागतशीलपणे परंतु नीरक्षीर न्यायविवेकी समीक्षा केली आहे. समकालीनांविषयीची आस्था व्यक्त करणारे हे लेखन सुहृदांचे व्यक्तिगत व वाङ्मयीन योगदान अधोरेखित करते, ते गुण-दोषांसकट! म्हणून प्रज्ञावंत साहित्यिकांची प्रतिभा मूल्यांकित करण्याचा वस्तुपाठ समजून या टीकालेखनाकडे पाहिले जाते. स्वागतशील, आस्वादक समीक्षा लेखनाचा आदर्श ज्यांना अनुसरायचा असेल, त्यांना ‘प्रतिमा आणि प्रतिभा’ प्रतिदर्श ठरावा.
-
Swapnasrushti (स्वप्नसृष्टी)
‘स्वप्नसृष्टी’ हा वि. स. खांडेकरांच्या सन १९२५ ते १९७६ या पाच दशकांतील निवडक अशा सुमारे ४० भाषणांचा संग्रह असून, त्यात प्रसंग, विषय, औचित्य, शैली यांचं वैविध्य आहे. खांडेकरांची भाषणे प्रकट चिंतन असायची नि आत्मीय हितगुजही! ज्या कुणाला स्वातंत्र्यपूर्व भारताचं वास्तव अन् स्वातंत्र्योत्तर काळात समाजमनात आलेलं स्थित्यंतर आणि परिवर्तन समजून घ्यायचं आहे, त्यांना हा भाषणसंग्रह आरसा ठरेल. माणसाचं सारं जीवन म्हणजे स्वप्नांचा पाठलाग केल्यानंतर हाती येणारं वास्तव! भौतिक समृद्धीला जर भावनेची किनार अन् समाजहितदर्शी वृत्तीचा स्पर्श नि पूर्वअट असेल, तरच मनुष्यजीवन माणुसकीचं जिणं होतं; अन्यथा ते एक मे-फ्लाय संस्कृती बनतं, लक्तर विकृतीकडे वाटचाल करत राहतं, हे समजावणारी ही भाषणं माणुसकीचा भर चौकात लिलाव करणाऱ्या नि तमाशा मांडणाऱ्या वर्तमान काळानं अंतर्मुख होऊन वाचायला हवीत!
-
Pradnya Ani Pratibha (प्रज्ञा आणि प्रतिभा)
प्रज्ञा आणि प्रतिभा’ (भाग-२) हा वि.स.खांडेकरांचा प्रातिनिधिक समीक्षात्मक लेखांचा संग्रह आहे. यात एकूण एकवीस समीक्षात्मक लेख आहेत. ‘सरस्वती मंदिरातील दिवाणी दावा’ या लेखातून खांडेकर मराठी भाषेची बिनतोड वकिली करतात, तर अव्वल इंग्रजी कालखंडानंतर मराठी भाषा व साहित्यास स्वबळ व स्वचेहरा प्राप्त कसा झाला, ते ‘लघुकथा’ आणि ‘मराठी लघुकथा’ या दोन लेखांतून स्पष्ट करतात. तसेच त्यांच्या स्वत:च्या ‘ययाति’, ‘उल्का’, ‘कांचनमृग’ या कादंबऱ्यांवरही त्यांनी लेख लिहिले आहेत. साहित्य संमेलनांवरही त्यांनी भाष्य केलं आहे. तर हे सगळेच लेख खांडेकरांची काव्य-शास्त्र-विनोदाची जाण, त्यांची अभ्यासू, स्वागतशील वृत्ती, मराठीविषयीचं प्रेम, त्यांचा दांडगा व्यासंग इ. गुणांचं दर्शन घडवणारे आहेत आणि पुढील पिढीसाठी मार्गदर्शक आहेत. ते अवश्य वाचले पाहिजेत.
-
Gadhvachi Geeta Ani Gajrachi Pungi (गाढवाची गीता आ
‘गाढवाची गीता आणि गाजराची पुंगी’ हा वि.स.खांडेकरांनी विनोदी शैलीत केलेल्या लेखनाचा संग्रह. विनोदी लेखांमधून खांडेकर समाजबदल टिपतात, आपली निरीक्षणं नोंदवतात. ‘वर्तमानावर केलेलं भाष्य’ असं या लेखनाचं स्वरूप आहे! विसंगत झालेल्या श्रद्धा नि कल्पनांना धक्का देण्याच्या हेतूने झालेले हे लेखन होय. विनोद हा ‘फॉर्म’ नसून ‘वृत्ती’ आहे, ज्यांना समूजन घ्यायचं आहे त्यांच्याकरिता सदर पुस्तक वस्तुपाठ ठरावे असे आहे. यात नाट्यछटेची कलात्मकता नि एकांकिकेची संवाद शैली याचं सुंदर मिश्रण आहे. एका साहित्यिक चिंतकाचं ‘स्वगत’ ‘प्रकट’ होणं काय असतं ते हे लेखन समजावतं.
-
Dimbhak (डिंभक)
नॅनो तंत्रज्ञानाद्वारे मृतांना जिवंत करण्याचा प्रयोग... मृत माणसाच्या मेंदूचं रोपण जिवंत कुत्रीच्या शरीरात करणे... भविष्यात नेऊ शकणारी खुर्ची आणि एका राजकीय नेत्याने तिचा केलेला गैरवापर... शिशाच्या अणूचे सोन्याच्या अणूमध्ये रूपांतर करण्यात यशस्वी झाल्याने मालामाल झालेला शास्त्रज्ञ ...परग्रहावरील डिंभक...पिंजकांमुळे लाभलेल्या अदृश्य होण्याच्या शक्तीमुळे एका शास्त्रज्ञाने अतिरेक्यांचा केलेला खात्मा...क्लोननिर्मिती...गर्भाबरोबरच वाढणाऱ्या ट्यूमरला शास्त्रज्ञाने दिलेली मात...ग्राफीनच्या कणांवरचं संशोधन...विशिष्ट प्रयोगाद्वारे खुन्यांपर्यंत पोचणारा शास्त्रज्ञ...एक विचित्र कीटक...अशा विविध वैज्ञानिक संकल्पनांचा सदुपयोग, दुरुपयोग करणारे शास्त्रज्ञ...त्यातून घडणारं मानवी मनाचं दर्शन... वैज्ञानिक संकल्पना आणि मानवी मन यांच्या गुंफणीतून साकारलेल्या रंजक विज्ञान कथांचा वाचनीय संग्रह.
-
Anandtarang (आनंदतरंग)
पावसाळ्यातल्या एका दुपारी ग्रेचेन रुबिनला अचानक साक्षात्कार झाला, आणि तो देखील एका अनपेक्षित ठिकाणी – बसमध्ये. तिला जाणवले की, “दिवस मोठे असतात, पण वर्षे छोटी असतात”. “वेळ निघून जात आहे, आणि महत्वाच्या गोष्टींवर मी पुरेसे लक्ष देत नाही आहे.” त्याक्षणी तिने पुढचे एक वर्ष तिच्या ‘हॅपीनेस प्रोजेक्ट’ला वाहून घेतले. आनंदी कसे व्हावे या विषयी युगानयुगे अनुभवातून आलेले शहाणपण, हल्लीचे शास्त्रशुद्ध संशोधन आणि वेगवेगळ्या संस्कृतीमधून मिळवलेली माहिती, हे सगळे वापरून रुबिन तिच्या आनंदी होण्याच्या प्रयत्नांचा बारा महिन्याचा प्रवास तिच्या रोचक आणि खिळवून टाकणाऱ्या शैलीत वर्णन करते. या प्रवासात तिला बऱ्याच गोष्टी जाणवल्या – नाविन्य आणि आव्हाने यातून आनंद निर्माण होतो, योग्य प्रकारे वापरला तर पैसादेखील आनंद देऊ शकतो, तुमच्या आजूबाजूचे नेटकेपण तुम्हाला मनःशांती देऊ शकते आणि छोट्यातले छोटे बदल खूप मोठा फरक घडवून आणतात.
-
Trishanku (त्रिशंकू)
रामाच्या सूर्यवंशातील दिलीप राजाला देवांनी तू काही काळ निपुत्रिक होशील असा शाप दिला होता...कशामुळे मिळाला होता त्याला शाप?...कसा दूर झाला तो शाप?...समुद्राची निर्मिती कशी झाली...रावणाला चार जणांकडून कोणते चार शाप मिळाले होते...विजयादशमीला आपण सोनं का लुटतो...कसं झालं राम-लक्ष्मण-भरत-शत्रु्घ्न यांचं महानिर्वाण...चंद्रवंशाचे दोन भाग कसे झाले...शबरासुराने कृष्णाचा पुत्र प्रद्युम्नाला समुद्रात फेकून दिलं...तरी तो वाढत होता शबरासुराच्या महालात...कसा? बाणासुराची रूपवती कन्या उषा हिच्या स्वप्नात एक देखणा तरुण रोज येतो आणि स्वप्नातच ती त्याच्याशी विवाह करते... कोण असतो तो तरुण?...सत्यवती अंध भिकारी असलेल्या वर्धनशी लग्न का करते?...तिला वैभव कसं प्राप्त होतं?...उदंक ऋषींना श्रीकृष्ण काय वर देतो...श्रीकृष्णाची महानिर्वाणाकडे वाटचाल कशी होते...हे जाणून घेण्यासाठी वाचा रामायणातील आणि महाभारतातील असंख्य कथांनी-उपकथानकांनी सजलेला वाचनीय कथासंग्रह त्रिशंकू.
-
Aayushyacha Antim Sanskar (आयुष्याचा अंतिम संस्कार
फिलिप गूल्ड म्हणजे इंग्लंडचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांचे निकटवर्तीय, आणि त्यांचे प्रमुख ‘स्ट्रेटेजिस्ट’. २००८ साली, वयाच्या अठ्ठावन्नाव्या वर्षी त्यांना अन्ननलिकेचा कॅन्सर झाला असल्याचं निदान केलं गेलं. त्यांच्यातल्या स्ट्रेटेजिस्टने निवडणूक डावपेच रचण्याच्या हिरिरीनेच या भयानक रोगाशी सामना करायचं ठरवलं. जसजशी त्यांची प्रकृती ढासळत गेली तसतसं आपल्या कॅन्सरविषयी आणि मनातल्या विचारांविषयी लोकांना सांगण्याची त्यांना अनिवार इच्छा झाली. ‘आयुष्याचा अंतिम संस्कार...’ म्हणजे या तळमळीचाच परिपाक आहे. वाचकाला हेलावून सोडणारी ही कथा स्फुर्तिदायक ठरेल यात शंका नाही. शिवाय मानवी आयुष्य आणि नातेसंबंधांचे मर्मही यात दडले आहे, जे प्रत्येकाला विचार करायला लावेल.
-
Aakash Zeltana (आकाश झेलताना)
शुभदा म्हणजे खरोखर आकाश झेलणारी गंगाच होती. हे करत असताना आलेल्या अनंत संकटांना तिनं आपल्या मजबूत खांद्यावर पेललं होतं. ग्रीष्मातल्या प्रखर सूर्यासारखी अनेक दाहक संकटे तिच्यासमोर एकापाठोपाठ एक उभी ठाकली होती; पण त्या सर्व संकटांवर मात करून तिनं आपल्या कर्तृत्वानं सुखाचं, कल्याणाचं, आनंदाचं वातावरण निर्माण केलं होतं. संकटांचं आकाश झेलून तिनं साठे परिवाराला सुखाची, समाधानाची सावली दिली होती. तिच्यात असलेल्या प्रत्येक गुणाचा कस लावून, कर्तृत्वाच्या कसोटीवर खरी उतरणारी शुभदा आता सर्वांना दिसणार होती सुखाचं, समृद्धीचं, समाधानाचं आकाश झेलताना! हेच तिच्या आयुष्याचं सार्थक होतं. हीच इतिकर्तव्यता होती.
-
Survanta (सुर्वंता)
सुर्वंता...मल्हारी या ऊसतोडणी कामगाराची देखणी बायको...नवऱ्याबरोबर ऊसतोडणीला गेल्यावर तिला प्रकर्षाने जाणीव होते मुकादमाकडून होणाऱ्या शोषणाची...मुकादम तिच्यावर बलात्कार करतो आणि गर्भपात होतो तिचा...तिचं मन तडफडायला लागतं त्या चिरडलेल्या जीवनातून बाहेर पडण्यासाठी...तेजरामच्या रूपाने तिला बाहेर पडायचा रस्ता दिसतो...पण स्वत:चं शील विकून...काय होतं पुढे? सुर्वंताचं सुस्थिर जीवन जगण्याचं स्वप्न साकार होतं का?
-
Davhala (डव्हाळं)
"‘डव्हाळं’ हा श्री. बा. ग. केसकर यांच्या सोळा कथांचा संग्रह. या संग्रहात श्री. केसकर यांनी ग्रामीण जीवन आणि त्या जीवनातील समस्या, गुंतागुंत व मूल्यसंघर्ष यांचं विश्लेषण प्रत्ययकारी केलं आहे. आजच्या ग्रामीण जीवनात सुनी जीवनमूल्ये, अंधश्रद्धा आणि कालबाह्य परंपरा काही प्रमाणात कमी होत आहेत, परंतु त्याऐवजी नवी जीवनदृष्टी आणि नव्या यंत्रयुगाच्या प्रखर वास्तवाचं भान मात्र आवश्यक त्या प्रमाणात येत नाही. त्यामुळे एकीकडे दारिद्र्यात राहूनही कष्ट करणाऱ्या ग्रामीण स्त्रीविषयी सहानुभूती वाटते, तर दुसरीकडे अन्याय, शोषण करणाऱ्या समाजातल्या एका समूहाविषयी विलक्षण संताप निर्माण होतो. नवी पिढी मात्र संवेदनशून्यपणे, वास्तवाकडे मुर्दाडपणे (की अगतिकतेने?) पाहत जगत आहे. ही अनकलनीय शोकांतिका वाचकाला अंतर्मुख करते. "
-
Ashich Kahi Pana (अशीच काही पानं)
सरस्वतीबाई राजवाडे म्हणजे अद्भुत कादंबरीतल्या नायिका किंवा आकाशातून या भूतलावर अवतरलेल्या जणू शापग्रस्त अप्सराच! आपल्या असामान्य रूपामुळे काही काळासाठी त्या रंगभूमीवर झळकल्या. वाद्यवृंदाबरोबर गायिका म्हणून बालवयातच त्यांनी भारतभर प्रवास केला. पंधराव्या वर्षी त्या अंबिकापती रायशास्त्री राजवाडे या उच्चपदस्थ अधिकाऱ्याशी विवाहबद्ध झाल्या. त्यांनी श्रीमंत संसाराच्या सुखाबरोबरच एकान्तवासाचं दु:खही अनुभवलं. या कालखंडात त्यांनी अनेक भाषा आत्मसात केल्या. त्यांनी तमिळमध्ये पहिली कथा लिहिली. त्यानंतर त्यांनी कन्नडमध्ये कथा लिहायला सुरुवात केली. त्यांनी स्वत: स्त्रियांसाठी `सुप्रभात` नावाचं मासिकही चालवलं. सरस्वतीबार्इंचं जीवनचरित्र म्हणजे जीवनभर प्रेमाचा शोध घेत, एकाकी जगत एकान्ताकडे वळलेल्या एका जिवाची कथा!
-
Shisticha Bali (शिस्तीचा बळी)
‘इन्डॉमिटेबल’ युद्धनौकेवरील खलाशी बिली बडला त्याचे सहकारी अडचणीत आणत असतात. जॉन क्लॅगार्ट हा निशाण खात्याचा प्रमुख या सगळ्या प्रकारामागे आहे, असं या युद्ध नौकेवरचा अनुभवी पण वयस्कर खलाशी लास्कर, बिलीला वारंवार सांगतो; एके दिवशी अगदी सहजपणे जॉनचं खरं रूप बिलीच्या समोर येतं. काय होतं तेव्हा?
-
Idea Man (आयडिया मॅन)
पॉल अॅलन...मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सहसंस्थापक...विद्यार्थी दशेपासूनच संगणकाची जबरदस्त ओढ...त्या ध्यासातूनच बिल गेट्सबरोबर मायक्रोसॉफ्टची केलेली स्थापना...मायक्रोसॉफ्टचे चढ-उतार...बिलबरोबरचे व्यावसायिक आणि वैयक्तिक पातळीवरचे संबंध...मायक्रोसॉफ्टमधून बाहेर पडल्यावर बास्केटबॉल, अंतरिक्ष, संगीत, मेंदू संशोधन इ. क्षेत्रांतील महत्त्वपूर्ण संचार...पॉलनी कॅन्सरशी दिलेला लढा...अशा महत्त्वपूर्ण घटनांची रेलचेल असलेलं पॉल अॅलन यांचं वाचनीय आणि प्रेरणादायक आत्मकथन आहे ‘आयडिया मॅन.’