-
Sanvadu Anuvadu (संवादु अनुवादु)
अनुवादाच्या क्षेत्रात उमातार्इंचा अनुभव खूपच दांडगा आहे. लग्नापर्यंतचा काळ बेळगावात गेल्याने कन्नड भाषा कळत होती, मात्र ती त्यांची बोली भाषा नव्हती. पती विरुपाक्ष मात्र कन्नड बोलणारेच होते. त्यांच्या नोकरीमुळे लग्नानंतर पुण्याच्या वास्तव्यात मित्र परिवारात सकाळ -संध्याकाळ फिरणे, बाहेर जेवणखाण आणि आपसात भरपूर गप्पा, हाच उद्योग होता. या वेळी एकमेकांच्या साहित्यप्रेमाची ओळख पटली. त्याच वेळी कन्नड साहित्यातील शिवराम कारंतांच्या कादंबरीला तिसरा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. मराठी साहित्यापेक्षा कन्नड भाषेत निराळे काय आहे, याविषयी त्यांना औत्सुक्य होते. विरुपाक्षांनी कारंतांची ही कादंबरी वाचण्यासाठी मागवून घेतली, व त्यातील आशय जमेल तसा उमातार्इंना ते सांगू लागले. सहजच उमाताई त्याचं भाषांकन मराठीत कागदावर उतरवू लागल्या आणि हाच त्यांच्याकडून घडलेला पहिला अनुवाद. लहानपणच्या बेळगावातील वास्तव्याविषयी, तसेच नातेसंबंध, सामाजिक घडामोडी, याविषयीच्या अनुभवाविषयीचे कथन येते. आजूबाजूचा परिसर, मित्रमंडळी यांच्या प्रेमळ आठवणी, थोर साहित्यिकांच्या सहवासाचा, त्यांच्या स्वभावाचा समृद्ध करणारा अनुभवही कधी मिस्कीलतेने, कधी गंभीर भाष्य करून त्या सांगतात. आयुष्यात त्यांना भेटलेल्या विविध व्यक्तिरेखांच्या सवयी, स्वभाव बारकाईने सांगून त्यांची आपल्याशीही सहज भेट घडवतात. यात साहित्यिक लेखन, खाद्य पदार्थांची देवाणघेवाण, त्यांचा चित्रकलेचा छंद, नवीन गोष्ट शिकणे या सगळ्याची ओळख होते. नेहमीच्याच ओघवत्या शैलीतील हे वर्णन कन्नड संस्कृतीशी जोडून घेणारे, वाचकांना पुस्तकाशी गट्टी करायला लावणारे आहे. लेखिकेने आयुष्याच्या पूर्वार्धातील बेळगावातील वास्तव्याविषयी, नातेसंबंधांविषयी, सामाजिक घडामोडींविषयीचे कथन; तसेच, आजूबाजूचा परिसर, मित्रमंडळी यांच्या प्रेमळ आठवणी, थोर साहित्यिकांच्या सहवासाचा, त्यांच्या स्वभावाच्या समृद्ध करणाऱ्या अनुभवाविषयी केलेले मिस्कील, तर कधी गंभीरही भाष्य.
-
Kunti... (कुंती)
दृढनिश्चयी वृत्तीच्या, महत्त्वाकांक्षी स्त्रीची ही सत्यकथा आहे. `कुंती` (नाव बदलले आहे.) काहीशा सनातनी वातावरण असलेल्या परिवारात जन्म. लहानपणापासून नृत्य-संगीताची आवड. पण तिचे वडील डॉ. गजेंद्रप्रसाद त्याविरुद्ध. त्यासाठी कुंतीला घराबाहेर जायलाही मज्जाव करणारे डॉक्टर स्वतः मात्र स्त्रीसहवासाचे शौकीन. मद्यपानाचीही सवय. आपण पसंत करू त्याच्याशीच तिने लग्न केले पाहिजे हा अट्टाग्रह. मणिभद्र नामक तरुण गजेंद्रप्रसादांचा कम्पाउन्डर. बराच छेलबटाऊ. कुंती अठरा वर्षांची असतानाच कुंतीची आई निधन पावलेली. त्यामुळे घरातले सर्व व्यवहार कुंतीच पाहते. डॉ. चा राग, मद्यपान सहन करते. तरुण, देखण्या कुंती त व मणिभद्रमध्ये घनिष्ट संबंध निर्माण होतात. त्यातून तिला दिवस जातात. ती भयंकर घाबरते. मणिभद्रला लग्नाबद्दल सुचवते; पण लुच्चा मणिभद्र गुपचूप पळून जातो. निराश होऊन कुंती न सांगता घर सोडते व जीव देण्यासाठी शहरातल्या तलावाकडे निघते. पण उदरातील गर्भाच्या विचारात तिचे मन पालटते. अपत्याला जन्म देऊन वाढवण्याचा निर्धार करते. शहरातल्याच महिला आश्रमात आधार घेते. संचालिका सरलाबेन- कुंतीच्या आईची खास मैत्रीण. त्या तिला आश्रय देतात, तिची काळजी घेतात. आश्रमाचे एक उदार आधारस्तंभ अशा हरिराजस्वामींची कुंतीशी भेट होते. हरिराजस्वामींच्या तेजस्वी व्यक्तीमत्त्वाने व विलक्षण आपुलकीमुळे ती भारावून जाते. ठरल्या दिवसापेक्षा काही काळ आधीच कुंती मुलाला जन्म देते. नाव ठेवते `कर्ण`– अपुऱ्या दिवसांचा असूनही कर्ण प्रकृतीने चांगला असतो. आश्रमाच्या नियमानुसार विवाहापूर्वी झालेले बालक मातेजवळ ठेवता येत नाही, दत्तक द्यावेच लागते. पण सरलाबेन कर्ण सहा महिन्यांचा होईतोपर्यंत थांबतात. अखेरीस नियम सांगतात. कुंती कडाडून कर्णाला दत्तक देण्याबाबत विरोध करते. एक स्वीडिश जोडपे दत्तकासाठी आश्रमात येते. त्यांना कर्णच जास्त आवडतो. कुंतीचा विरोधही कळतो. `आपण तिची समजूत घालू` असे आश्वासन सरलाबेन देतात. एक दिवस कुंतीला `तिचा प्रियकर एका गावी लग्नाला आलाय, त्याला गाठ’ असे खोटेच सांगून हिंमतभाईसह दूर गावी पाठवले जाते. हिंमत सूरजमल शेठजींच्या मिलमध्ये नोकर. तसाच हरिराजस्वामींचा विश्वासू सेवक. इकडे कुंतीला कल्पना न देताच कर्णाचे दत्तकविधान आटोपले जाते. त्याचे स्वीडिश माता-पिता लगेचच मायदेशी परततात. निराश होऊन परतताच कुंतीला सर्व प्रकार कळतो. तिला विलक्षण धक्का बसतो. रागही येतो. सरलाबेन निरनिराळ्या तऱ्हेने समजूत घालायचा प्रयत्न करतात, पण कुंती कर्णाला परत आणण्याचा कृतनिश्चय करते. न्याय मागण्यासाठी ती राज्यपालांपासून राष्ट्रपतीपर्यंत अर्ज करीत राहते; पण तिला सरकारी छापील उत्तरे मिळतात. मध्यंतरी हरिराजस्वामी व सरलाबेन यांच्या सल्ल्यामुळे व मध्यस्थीमुळे कुंतीचा हिंमतभाईशी विवाह होतो. हिंमतला कुंतीच्या जीवनातील घटनेची कल्पना असूनही तो तिचा स्वीकार करतो; इतकेच नव्हे तर कर्णाला परत आणण्यासाठी मदतीचे आश्वासन देतो. काही दिवसांनी सरलाबेनना जीवघेणा अपघात होतो. हिंमत व कुंती बडोद्याला हॉस्पिटलात भेटायला जातात. `आपण जगणार नाही` हे लक्षात येताच सरलाबेन कुंतीला, आतापर्यंत लपवलेला कर्णाचा (आता अॅलनचा) पत्ता देतात. त्या मृत्यू पावतात. आता कुंती व हिंमत स्वबळावर कर्णाचा पत्ता हुडकून त्याला आणण्याचे प्रयत्न सुरू करतात. कुंतीचा दुसरा मुलगा `अर्जुन`ही मातेच्या मदतीस तत्पर होतो. कुंतीला कर्णभेटीचे वेड लागते. हरिराजस्वामींच्या संदेशामुळे फालूनला राहणारे धीरेन गांधी महत्प्रयासाने कर्णाला शोधून फोनवर संपर्क साधतात. इतकेच नव्हे तर कुंतीच्या स्वीडन प्रवासाचीही व्यवस्था करतात. कुंती त्यांच्या घरीच राहते. `कर्णाला भेटल्याशिवाय मी अन्न घेणार नाही` असे कुंती ऐकवते. त्या रात्री मोठ्या मुश्किलीने, हिमवर्षाव असताना धीरेनभाई तिला कर्णाकडे नेतात... पण तो कुंतीला `अस्सल माता` म्हणून मान्य करत नाही. तो पूर्ण स्वीडिश बनला आहे. धीरेनभाई त्याला सर्व समजवतात, तेव्हा कुंतीला तासाभरानंतर भेटतो– पण पूर्ण त्रयस्थपणे. मुलगा भेटला यावरच समाधान मानून कुंती परतीच्या प्रवासाला निघते. आश्चर्यकारकरीत्या कर्णाची पत्नी `कोरीन`- ही पण गुजराती दाम्पत्याला दत्तक गेलेली– सासूसह पहिल्या बाळंतपणासाठी भारतात यायला निघते. सर्व एकत्र येतात. सगळे व्यवस्थित झाले हे पाहून हरिराजस्वामी कायमसाठी आपल्या गावी पंजाबात, बटाल्याला जायला निघतात. कुंती, हिंमत, गजेंद्रप्रसाद इ. कुणाच्याच आग्रहाला ते मानत नाहीत. अखेर स्टेशनवर त्यांना सर्व जण साश्रू नयनांनी निरोप देतात.
-
His Day (हिज डे)
समाजातील उपेक्षित घटक असणारे तृतीय पंथीय अर्थात हिजडे यांची ही कहाणी. त्यांचेही निरनिराळे प्रकार असतात. कोणी जन्मत:च स्त्री किंवा पुरुषाऐवजी तृतीय पंथी किंवा हिजडा असतो. देहाची जाण/समज आल्यावर कोणी स्त्री आपण पुरुष व्हावे म्हणून तर कोणी पुरुष आपण स्त्री व्हावे म्हणून निसर्गाविरुद्ध जाऊन वाटेल तो त्रास, वेदना सोसायला तयार होतात. एखाद्या स्त्रीला स्त्रीदेहाचे तर एखाद्या पुरुषाला पुरुषदेहाचेच आकर्षण वाटते; अशांना लेस्बियन म्हणतात. दैनंदिन जीवनासाठी त्यांना भीक मागणे, शुभ प्रसंगी बधाईला जाणे किंवा शरीरविक्रय असे मार्ग पत्करावे लागतात. वेगळे जीवन वाट्याला आल्याने आणि समाजाकडून बहुधा तुच्छता तसेच हेटाळणीची वागणूक मिळाल्यामुळे हे सगळे एका छताखाली म्हणजेच एक वस्ती करून राहतात. यांनाही गुरू असतो/असते. सर्वांना आपली कमाई गुरुकडे जमा करावी लागते; त्या बदल्यात गुरू त्यांचे जेवण-खाण, कपडालत्ता, आजारपण यासाठी खर्च करतो/करते. अर्थात गुरू म्हणेल ती पूर्व दिशा! याच चाकोरीतून चेला पुढे गुरू होतो. यांचीही घराणी असतात आणि प्रत्येक घराण्याचा नायक असतो. हिजडा तरुण असताना जगण्यासाठी त्याला करावी लागणारी धडपड, तडजोड, वेदना यांना अंत नाही. आजार आणि म्हातारपण यांचा सामना करण्यासाठी मानसिक बळ मिळवणं हे मोठं आव्हान त्यांच्यासमोर आहे आणि तरीही हा तृतीय पंथ ताठ आहे. एकूण हे त्यांचं आयुष्य आहे, जे त्यांनी ‘असं आयुष्य हवं’ म्हणून न मागितलेलं आणि तरीही नशिबी आलेलं. त्यांनाही चांगलं आयुष्य हवं आहे आणि या चांगल्या आयुष्यासाठी त्यांचं एकच मागणं आहे – ‘आम्हाला माणूस म्हणून जगू द्या...’
-
The Dance of Intimacy (द डान्स ऑफ इंटिमसी)
सर्वाधिक खप असणाऱ्या ‘द डान्स ऑफ अँगर’च्या लेखिकेनं ‘द डान्स ऑफ इंटीमसी’ या पुस्तकात चांगले नातेसंबंध दृढ करण्यासाठी आणि बिघडलेल्या नातेसंबंधांत सुधारणा व्हावी यासाठी कोणती छोटी छोटी पावले उचलावीत याचे विवेचन केले आहे. सख्यत्वाचे नातेसंबंध, ज्यात काही कारणामुळे दुरावा, तीव्रता किंवा दु:ख यामुळे बाधा येत असते. त्यांचे सूक्ष्म निरीक्षण करून, त्या आपल्याला ‘स्व’ची दृढ जाणीव प्राप्त करण्यासाठी आणि इतरांशी सख्यत्वाची जवळीक साधण्यासाठी नेमके कोणते बदल करावेत, याची माहिती देतात. स्पष्ट सल्ला आणि उपचारार्थींची ठळक उदाहरणे यांच्या साहाय्याने डॉ. लर्नरनी सख्यत्वाच्या नातेसंबंधांविषयीचे एक भरीव आणि उपयोगी असे पुस्तक स्त्री-पुरुषांच्या हाती ठेवले आहे. याहून चांगले पुस्तक असू शकणार नाही.
-
Adolf Hitler....(अॅडॉल्फ हिटलर)
विसाव्या शतकामधला सगळ्यात गाजलेला माणूस म्हणून आपण अॅडॉल्फ हिटलरचं नाव घेऊ शकतो. पहिल्या महायुद्धात मानहानी झालेल्या जर्मनीला गतवैभव प्राप्त करून देण्याच्या ध्येयानं भारून गेलेल्या हिटलरनं अत्यंत अनपेक्षितरीत्या जर्मनीची सत्ता आपल्याकडे खेचून घेतली आणि भल्याभल्यांना जमणार नाही अशी कामगिरी करण्याचा चंग बांधला. एकामागून एका देशांवर आपलं वर्चस्व प्रस्थापित करत हिटलरनं सगळ्या जगाची झोप उडवली. त्याचं आसुरी स्वप्न मात्र नंतर भंगत गेलं. केवळ डझनभर वर्षांच्या आपल्या राजकीय कारकिर्दीत हिटलरनं अक्षरशः धुमाकूळ घातला. ज्यू लोकांचा संहार, आपल्या शत्रूंशी अत्यंत क्रूरपणे वागणं, आपल्याच सहकाऱ्यांवर विलक्षण अविश्वास दाखवणं, माणुसकीचा अंशही वागण्याबोलण्यातून न दाखवणं, अशा त्याच्या अनेक अवगुणांचं त्याच्या गुणांबरोबरच विश्लेषण करणं म्हणूनच महत्त्वाचं ठरतं. हुकूमशाही आणि एकाधिकारशाही यांचं थैमान त्याच्या कारकिर्दीत बघायला मिळालं. जगाला वेगानं दुसNया महायुद्धाकडे नेणाऱ्या या खलनायकाविषयी अनेक जणांना सुप्त आकर्षण वाटत असतं. मुळात हिटलर इतका लोकप्रिय कसा झाला आणि त्याच्याविषयी आजसुद्धा इतकं का बोललं जातं, या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याचा सखोल ऊहापोह अत्यंत सोप्या भाषेत सगळ्या वयोगटामधल्या मराठी वाचकांसाठी या पुस्तकात केला आहे. नव्यानं या जगात हिटलर निर्माण होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे, यासाठीची दृष्टीही वाचकांना या निमित्तानं मिळेल!
-
Bear Island....(बेअर आयलॅन्ड)
पृथ्वीवरील उत्तर ध्रुव प्रदेशाभोवतालच्या बर्फमय भूमीस आर्क्टिक सर्कल म्हणतात. तिथे हिवाळ्यात दिवसाचे तास कमी व रात्र मोठी असते. अशा ठिकाणी, ’बेअर आयलन्ड’ बेटावर आपले फिल्म युनिट नेऊन चित्रीकरण करण्याचा घाट एका निर्मात्याने घातला. आवश्यक ती सेटिंग्ज सामान-सुमान व माणसे घेऊन एका बोटीने तो तिकडे निघाला. पण वाटेत त्याच्या युनिटमधील काही जण मरण पावू लागले. तर काही जण ’बेअर आयलन्ड’ बेटावर मरण पावले, आणि जन्म झाला एका गूढ नाट्याचा. याचे मूळ दुसऱ्या महायुद्धात होते. अफाट संपत्ती, महायुद्ध व मनुष्यहत्या यांच्यातून एक जबरदस्त हिंसाचार उफाळून आला. संशयाचे काटे सर्वांवर फिरत होते, पण खूनी नक्कीच हुशार व मुरलेला होता. शेवटपर्यंत गूढ वाटणारी ही कादंबरी वाचकांची उत्कंठा कायम राखून ठेवते. एक गुंतागुंतीची विलक्षण कथा, मराठीत प्रथमच!
-
The Dance of Anger (द डान्स ऑफ अंगार)
‘राग’ या भावनेवर क्रेद्रित असलेलं पुस्तक आहे ‘द डान्स ऑफ अँगर.’ या पुस्तकातून राग या भावनेचा (विशेषत: स्त्रियांच्या बाबतीत) विविध दृष्टिकोनांतून विचार केला गेला आहे. स्त्रीला रागावण्याचा अधिकार नाही, असं समजलं जातं आणि ती रागावली तर तिला नकारात्मक विशेषणं लावली जातात, याकडे लेखिकेने लक्ष वेधलं आहे. स्त्रीचं रागावणं लोकांना का नको असतं, स्त्रीला रागावतानासुद्धा विचार का करावा लागतो, तिच्या रागावण्याचे परिणाम काय असतात याविषयी या पुस्तकात चर्चा केली आहे. तसेच राग आलेला असतानाही शांत राहण्यामुळे, ‘स्व’ची जाणीव कशी बोथट होत जाते, याबद्दलही लेखिकेने लिहिलं आहे. राग व्यक्त करण्याची पद्धत आणि त्यामुळे होणारे तोटेही लेखिका लक्षात आणून देते. रागाला जर विधायक वळण लावायचं असेल तर काय करायचं, याचं मार्गदर्शन लेखिकेने केलं आहे. स्त्रीची रागाची भावना पुरुषप्रधान संस्कृतीमुळे कशी दाबली जाते आणि त्यामुळे तिची क्षमता कशी झाकली जाते, याचीही चर्चा या पुस्तकात केली आहे. ज्या गोष्टीसाठी राग व्यक्त केला जातो, त्या गोष्टीसाठी अन्य पर्यायांचा विचार कसा करता येऊ शकतो, याचंही मार्गदर्शन या पुस्तकातून केलं आहे. स्वची स्पष्टता, नवरा-बायकोंमधील भांडणं हे मुद्दे सोदाहरण पटवून दिले आहेत. थोडक्यात, राग या नैसर्गिक भावनेला विधायक वळण देऊन, त्याचा सकारात्मक उपयोग करून आपल्या जीवनात आणि व्यक्तिमत्त्वात कसा बदल घडवून आणायचा, याचं नेमकं मार्गदर्शन या पुस्तकातून होतं. त्यामुळे हे पुस्तक व्यक्तिमत्त्व विकासासाठीही उपयुक्त ठरावं.