-
Ek Aatpat Nadi Hoti (एक आटपाट नदी होती)
नदीचे सर्व सजीवांमध्ये असलेले महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. त्यातही मानवी जीवनात असलेले स्थान हे कधीही पुसता न येण्यासारखे आहे. तिने मानवासाठी दिलेले योगदान हे मोठे आहे. पण गेल्या काही वर्षात या नद्यांना नजर लागली. नागरीकरण आणि औद्योगिकरण यात या नद्यांचे अपरिमित नुकसान झाले. त्यामुळे एकेकाळी नितळ, स्वच्छ वाहणारी आता गटारगंगा म्हणून वाहू लागली. पण आता नदीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. यासाठी तुमच्या सारख्या लहानग्यांची साथ या पुढील काळात लागणार आहे. 'नदी वाचवा' हि हाक आता पुढच्या काळात अधिक तीव्रतेने तुम्हाला ऐकू येईल. नदी हि आपल्या पर्यावरणाचा एक अविभाज्य भाग आहे हे आपल्या लक्षात अजूनही आलेले नाही. या नद्यांचे वास्तव आणि त्यांचे संवर्धन हे जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपण नद्या वाचवू शकत नाही. त्यामुळेच उद्याचे नागरिक म्हणून तुमची जबाबदारी हि जास्त आहे. हाच सांगावा घेऊन नदी सांगत्येय तिची कहाणी.
-
Maharashtracha Safarnama (महाराष्ट्राचा सफरनामा)
सारेच महाराष्ट्राच्या प्रेमात.. !! महाराष्ट्र हे नाव जरी नुसते उच्चारले, तरी आपण पर्यटनाच्या वेगळ्याच विश्वात जातो. या विश्वात इतिहास, भूगोल, सह्याद्री, मंदिरे, नद्या, जंगले, गड-किल्ले, समुद्रकिनारे, स्मारके, संग्रहालये, गावे, या साऱ्या गोष्टी सामावल्या आहेत. पर्यटनाच्या बाबतीत महाराष्ट्राचे अवकाश खूप मोठे आहे. इतर राज्यांपेक्षा कांकणभर अधिक सरस आहे. कोकण, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र अशा विविध भागांतली संस्कृती आणि वेगळेपण हासुद्धा एक अनुभवायचा भाग आहे. या राज्याला लाभलेला शिव-छत्रपतींचा इतिहास तर कळसबिंदू ठरावा. कितीतरी गोष्टींनी महाराष्ट्र समृद्ध आहे. एक जन्मसुद्धा अपुरा पडेल हे सारे डोळे भरून पाहायला. संपूर्ण महाराष्ट्र हा पर्यटनाच्या बाबतीत एका पुस्तकात कधीच मावणार नाही. या पुस्तकात विविध भागांतील निवडक ठिकाणांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाराष्ट्राचा हा सफरनामा निश्चितच तुम्हाला आवडेल.
-
Enjoy (एंजॉय)
गेल्या ४-५ वर्षांमध्ये कारणपरत्वे वृत्तपत्रांमध्ये आणि हौसेने दिवाळी अंकांमध्ये मी लिहिलेल्या काही लेखांचं संकलन म्हणजे हे पुस्तक होय. ह्या लेखांना सन्मानाने जागा देणाऱ्या संपादक-प्रकाशकांची मी ऋणी आहे. तसंच सध्याच्या थोड्या अवघड वाङ्मयीन वातावरणातही हे पुस्तक प्रसिद्ध करणाऱ्या नावीन्य प्रकाशनाचे श्री. नितीन खैरे आणि त्यांचे सर्व सहकारी ह्यांचीही मी आभारी आहे. लेख मराठी भाषेत, लेखिका मराठी प्रेमी, मग पुस्तकाचं शीर्षक इंग्रजी का असावं? असं विचारणारे कोणी निघतील. त्यांना उत्तर असं की, एकतर आता 'एंजॉय' हा इंग्रजी शब्द मराठी भाषेत अत्यंत प्रचलित झाला आहे. गाणं-खाणं-सभा-संमेलन- प्रवास-निवास ह्यासारख्या सर्व व्यवहारांमध्ये 'एंजॉय करा' असं उच्चरवाने सांगितलं जातं. करताकरता एंजॉय हा नुसता शब्द न राहाता वृत्ती बनत चाललीय. आसपास काहीही, कितीही, अनुकूल- प्रतिकूल असो-नसो जगणाऱ्याने त्याचा आनंद लुटण्याचा प्रयत्न करावा. होणाऱ्या गोष्टी होणारच. मग पुढ्यातला क्षण मनमुराद उपभोगू का नये ? ‘एंजॉय!’ हे पुस्तक वाचणाऱ्यांनी हीच दृष्टी ठेवावी असं मी नम्रपणे सुचवेन. खुलेपणाने स्वीकारल्यास ह्या पुस्तकात दिलखुलास क्षण नक्कीच मिळतील. ते वाचकांनी घेतले, प्रसंगी माझ्याकडे नोंदवले तर मला ह्या लेखनाच्या खटाटोपाचं सार्थक झाल्यासारखं वाटेल. मग काय, करणार ना 'एंजॉय ?' -- मंगला गोडबोले
-
Gajlelya Jagatik Rajkiya Hatya (गाजलेल्या जागतिक राजकीय हत्या)
गाजलेल्या जागतिक राजकीय हत्या' हे पुस्तक म्हणजे अब्राहम लिंकन (१८६५) ते बेनझीर भुत्तो (२००७) असा प्रदीर्घ रक्तरंजित इतिहास आहे. लेखक धनंजय राजे यांनी अतिशय कौशल्याने जगात गाजलेल्या १५ राजकीय हत्यांचा अभ्यासपूर्ण वेध घेतला आहे. या पंधरा व्यक्तिपैकी म. गांधी आणि मार्टीन ल्यूथर किंग यांना वगळता बाकीच्या तेरा व्यक्ती त्या त्या देशात सर्वोच्च पदावर होत्या. जगात खळबळ माजविणाऱ्या या क्रूर हत्यांमागचे कटकारस्थान, घटनांचे चित्रदर्शी वर्णन वाचकांना खिळवून ठेवेल. जग जसजसे आधुनिकतकडे जात गेले तसतसे खून करण्याच्या पद्धती, खुनासाठी वापरलेली हत्यारे यांमध्येही बदल होत गेले. म्हणजे विषप्रयोग, तलवार, सुरा, खंजीर इथपासून ते मानवी बाँबपर्यंत हा कलंकित मानवी प्रवास येऊन ठेपतो. ज्येष्ठ संपादक, पत्रकार श्री. कुमार केतकर लिहितात-हे पुस्तक केवळ सुजाण वाचकांसाठी मर्यादित नाही, केवळ करमणुकीसाठी नाही तर हे अभ्यासाचे पुस्तक आहे. विविध परीक्षांना (यूपीएससी इत्यादी) ते अगदी केबीसी (कौन बनेगा करोडपती) साठी तयारी करणाऱ्यांनाही हे उपयोगी पडेल. राजकीय हत्या या राजकारणाचा, सत्तेचा समतोल बदलण्यासाठी केल्या जातात. त्या घडत नाहीत, घडविल्या जातात. राजे यांच्या या पुस्तकाबद्दल इतकेच म्हणता येईल की, हा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास आहे आणि तो एखाद्या रहस्यकथेसारखा सादर केला आहे.
-
Cancer Grastha, Tarihi Swastha (कॅन्सरग्रस्त, तरीही स्वस्थ)
“गेलेले आयुष्य सुंदरच होते, पण त्या आठवणीत बुडायचे नाही. जुने राग लोभ त्यांच्या जागी, त्यांचा आता काही संबंध नाही. काही, काही ठरवायचे नाही. उद्याचा तर विचारही नाही. आजचा दिवस नक्की आपला, तो सुंदर करणे आपल्याच हातात!!!” गेली अडीच-तीन वर्षे मी हे प्रयत्नपूर्वक पाळते आहे. म्हणूनच माझा आजार थोडातरी आटोक्यात ठेवू शकले असावे. हा आठ पायांचा विंचू कधीही, कुठेही आपल्याला घट्ट करकचवून टाकू शकेल ह्या भानासह ह्या काळातल्या जाणीवा, अनुभव शब्दात पकडण्याचा हा प्रयत्न! माया धर्माधिकारी ◆ कॅन्सरग्रस्त असूनही शक्यतो स्वस्थ राहू बघणारी ही लेखिका माझी सख्खी धाकटी बहीण आहे. उपचारादरम्यान व नंतर मनात होणारी भावनिक आंदोलनं, भेटलेली माणसं, जाणवलेल्या वृत्ती प्रवृत्ती, झालेले साक्षात्कार ह्यांचं तिच्याकडून झालेलं वर्णन थेट वाचणंच योग्य ठरेल... त्यातून अनेक व्यक्तीगत, सामाजिक विचारांना चालना मिळू शकेल.