Ratri Bara Chi Lavani (रात्री बारा ची लावणी)
अशोक मानकर यांच्या कथा म्हणजे वऱ्हाडी मातीतला सुगंध आहे. त्या केवळ वऱ्हाड संस्कृतीचं प्रतिनिधित्व करत नाहीत, तर अखिल मानवी वर्तनावर भाष्य करतात. कारण त्यात जीवन आणि मूल्यं आहेत. वऱ्हाडातलं अस्सल ग्रामीण जनजीवन त्यांच्या कथांनी सही सही जोखलं आहे आणि त्यांची वऱ्हाडी बोलीवरील हुकुमत वाखाणण्याजोगी आहे. मानवी जीवनातल्या विसंगती टिपूनही या कथा इतक्या सभ्य, शालीन आणि कुलीन असतात, की आबालवृद्धांनी त्या सोबत वाचाव्यात. त्यांच्या कथांमधला डोळ्यांत भरणारा गुणविशेष म्हणजे व्यक्तिचित्रण. ही पात्रं खरीखुरी आणि हाडामांसाची वाटतात. असं वाटतं, ही माणसं आपल्या आसपास वावरत आहेत किंवा आपण यांना कुठेतरी भेटलेलो आहे. विशेष म्हणजे, निरक्षर वा अल्पशिक्षित असलेली ही पात्रं आपल्याला जीवनानुभव शिकवतात.