Hoy Hoy Warkari (होय होय वारकरी)
वारकऱ्यांनी सर्व नव्या साधनांचा स्वीकार केला तसा नव्या विचारांचा पण स्वीकार करायला हवा, असं मला वाटायचं. समाजधुरिणांनी सतत जुना विचार नवा करायचा असतो. महात्मा फुले, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, बा. र. सुंठणकर, गं. बा. सरदार, वि. भि. कोलते, भालचंद्र नेमाडे, अरुण कोलटकर, दिलीप पुरुषोत्तम चित्रे, सदानंद मोरे, आ. ह. साळुंखे यांनी वारकरी विचाराच्या संदर्भात वेळोवेळी असे नवे आयाम सादर केले. आधुनिक समजल्या जाणाऱ्या विचार व्युहातील समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेचे वातावरण वारकरी संप्रदायानेही तयार केलेले होते. संत साहित्य म्हणजे केवळ अध्यात्मिक अवडंबर नव्हे, तर संत साहित्य म्हणजे मूल्य रुजवण्याचे प्रभावी माध्यम होते. संतांनी समाजावर, राष्ट्रावर, भाषेवर, माणुसकीवर प्रेम करायला शिकवले. धर्मविचार कधीच कालबाह्य नसतात. तसे असते तर बाबासाहेब निर्धमी राहिले असते. धर्माशिवाय समाज धारणा होत नाही. धर्माला आपली गरज नाही. आपणाला धर्माची गरज आहे. वारकरी चळवळीचा असा सर्वांगाने कुणीतरी विचार करावा असे मला नेहमी वाटायचे. वरील विचारवंतांपैकी सर्वच लेखक, कवी आणि विचारवंत होते. पण मला वाटायचं प्रत्यक्ष वारकरी संप्रदायातल्या एखाद्या कीर्तनकारानेही अशा प्रकारचा विचार करावा आणि वारकरी परंपरेला नवे परिमाण द्यावे. ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज बंडगर यांचे ‘होय होय वारकरी’ हे पुस्तक वाचले आणि माझ्या सर्व अपेक्षा पूर्ण झाल्या. अत्यंत कमी वयात ज्ञानेश्वर बंडगर महाराजांनी केलेला व्यासंग आणि कमावलेली मर्मदृष्टी ही त्यांच्या कठोर साधनेची फलश्रुती आहे. बंडगर महाराज यांचे हे लेखन परीवर्तनकारी ठरेल याची मला खात्री आहे.