-
Char Shabad
एखादी घटना, एखादा अनुभव किंवा एखादी साहित्यनिर्मिती मला आवडली की दुसर्या कुणाला तरी त्याबद्दल सांगून, त्याविषयी लिहून, इतरांना त्या आंनदात सामील करुन घ्यावे ह्याची माझ्या मनाला ओढ लागते. मग ती घटना कुठल्याही क्षेत्रातली असो नाही तर विषयातली असो. एखादे चांगले पुस्तक वाचले, चांगली कविता वाचली किंवा चांगल्या गाण्याची मैफिल जमून गेलेली पाहिली की, तिच्याविषयी बोलायचा किंवा लिहायचा मला अनावर मोह होतो. ‘चार शब्द’ ह्या संग्रहातील या प्रस्तावनादेखील माझ्या स्वभावातल्या ह्या अनावर मोहापोटीच निर्माण झालेल्या आहेत. गेली पन्नासएक वर्षे कलानिर्मितीच्या निरनिराळ्या क्षेत्रांत मला वावरायला मिळाले. ह्या काळात मी लिहिलेल्या या प्रस्तावना आहेत. मात्र ह्या प्रस्तावना म्हणजे एखाद्याच्या लेखनातले गुणदोष दाखवणारे चिकित्सक समीक्षण नाही. मला आवडलेल्या पुस्तकांचे आस्वादकाच्या भूमिकेतून केलेले हे स्वागत आहे. मीच एका ठिकाणी प्रस्तावनांना ‘स्वागतपर गद्य’ असे म्हटलेले आहे. ह्यामागे, स्वत:च्या लेखनाने ज्यांनी आपल्याला आनंद दिला, त्या लेखकांविषयीची कृतज्ञतेची भावना आहे. सुंदर कलाकृती वाचकाचे, श्रोत्याचे किंवा प्रेक्षकाचे जीवन अधिक सुंदर करून जाते. माझ्या सुदैवाने, अचानक धनलाभ व्हावा तशी ही पुस्तके मला वाचायला मिळाली. ह्या प्रस्तावना लिहिण्याचा मुख्य हेतू, निरनिराळ्या पुस्तकांकडे वाचकांचे लक्ष जावे हाच आहे.
-
Vyakti Aani Valli
१९४३ साली ’अभिरुची’ च्या एका अंकात पुरुषोत्तम देशपांडे नामेकरून कोण्या नवख्या लेखकाचे ‘अण्णा वडगावकर’ हे व्यक्तिचित्र प्रसिद्ध झाले तेव्हा त्या मासिकाचे मर्यादित पण जाणकार वाचक-मंडळ चमकून उठले. विनोदाच्या देशात ‘हा कोण संप्रति नवा पुरुषावतार? ’ अशी सोत्कंठ पृच्छा होऊ लागली. हा प्रदेश तेव्हा अत्रे, शामराव ओक, चिं. वि. जोशी यांच्यासारख्या मानकर्यांनी गजबजलेला होता. अन्य विनोदकारही होते आणि ते जनताजनार्दनाला हसविण्याची यथाशक्ती खटपट करीत होते. मराठी विनोदाची पेठ अशी तेजीत असूनही, देशपांड्यांचे न्यारे कसब डोळ्यात भरले. ते कसब तेथेच न थबकता, अनेक अंगांनी फुलून आले. त्याला नवे नवे धुमारे फुटले, एकेकसुद्धा भान हरवील असा; ‘किमु यत्र समुच्चयम्’? साहित्याचे विविध ढंग, संगीत रंगभूमी, चित्रपट असा या प्रतिभेचा चौरस आणि मुक्त संचार. चोखंदळ रसिकांनाही थक्क करणारा आणि ‘जन-साधारण’ भारुन जातील असा. आज तर, असे साक्षर मराठी घर नसेल की ‘पु. ल.’ म्हटले की कौतुकादराची लाट उसळत नाही! अशी आपुलकी ललाटी असणारा कलावंत एखादाचं! देशपाड्यांनी खूपखूप पाहिले. कंठाळी एकसुरी चाल टाकून जीवनाच्या तर्हातर्हा धुंडाळल्या आणि तिखट नजरेने माणसामाणसांतील विसंगती हेरली. ती अशा रंगतीने सांगितली की महाराष्ट्र खळखळून हसला. ती रंगत जातिवंत विनोदाची. त्याला करुणेची किनार असते. विसंगती हा मनुष्य स्वभावाचा धर्मच आहे ही उदार समज त्यात आहे. त्याने या विनोदाला गहिरेपण मिळते आणि नाट्यही. माणसे सहसा तशी सपाट नसतात चांगल्या-वाईटाचा शिक्का सहज उठवावा अशी. कोपरे-कंगोरे निघतात! आत कोठेतरी ‘वल्ली’ दडलेली असते. दोषांच्या राशीत गुणाची एखादी अकल्पित रेषा गवसते. देशपांड्यांनी या व्यक्ति आणि वल्ली टिपल्या त्या माणुसकीखातर. या वल्लींनाही व्यक्तित्व आहे. त्यांतील बर्या-वाईटाचे अंतर्नाटय देशपांडयांनी सराइतपणे पकडले आहे. कानामात्रेच्या फरकाने तसले नाट्य तुमच्या आमच्यांत आहे आणि लेखकातही!
-
Asa Me Asaami
तुळशीवृंदावनापासून ते कॅक्टसच्या कुंडीपर्यंत कळत न कळत काळाबरोबर वाहत वाहत गेलेल्या एका कारकूनाचे हे आत्मचरित्र आहे. निरनिराळ्या मासिकांतून त्यातला बराचसा भाग यापूर्वीच आला आहे. मुख्यत: ‘दीपावली’च्या दिवाळी अंकांतून ‘असा मी असामी’ व त्यानंतर ‘पुन्हा मी पुन्हा मी’ असे दोन भाग प्रसिद्ध झाले होते. ह्या काल्पनिक आत्मचित्राचा नायक माझ्या मनात अनेक वर्षे घर करून बसला आहे. निरनिराळ्या लेखांतून तो डोकावतो. त्याला मी इथे ह्या पुस्तकात पकडून ठेवला तरी माझ्या मनातले घर सोडायला तो तयार नाही. ह्या अफाट मुंबई शहरातल्या ज्या मध्यमवर्गीय समाजात मी वाढलो त्यातलाच हा एक! कुठल्यातरी हपिसासाठी जगायचे आणि पेन्शनीसाठी किंवा प्राविडंट फंडाकडे डोळे लावून दिवसादिवसाने म्हातारे होत जायचे याहून मोठी महत्त्वाकांक्षा त्याला परवडलीच नाही. लोकलगाडीसाठी धावताना, ट्राम गाठताना किंवा बसच्या रांगेत आमच्या भेटीगाठी झाल्या-आजही होतात; यापुढेही होतील. बटाट्याच्या चाळीतसुद्धा ह्याच्या नात्याची माणसे आहेतच. ह्याचेही बरेचसे आयुष्य तसल्याच खास मुंबई फ्याशनीच्या वास्तूत गेले आहे. त्याच्या ह्या आठवणी आहेत. नव्या जगाशी जुळवून घेताना लागलेल्या धापा आहेत. रक्तातूनच आलेल्या कोकणी खवटपणाला हा काही अगदीच पारखा नाही. आणि म्हणूनच वैतागाच्या क्षणीही तो थोडासा हसतो आणि थोडासा हसवतोही. मात्र कुणी हसल्याबद्दल त्याला मुळीच राग येणार नाही. त्वेषाने चिडून वार करायला जाणे त्याला जमणार नाही. असल्या स्वभावाला कोणी डरपोकपणा म्हणेल; त्यालाही त्याची हरकत नाही. आपले चरित्र सांगण्याचे त्याने धारिष्ट्य दाखवले हेच पुष्कळ झाले. ह्या चरित्रातल्या निरनिरळ्या घटनांच्या संदर्भात आलेल्या माणसांच्या नावांशी कुण्या वाचकाचे नाव जुळून आले तर तो केवळ योगायोग आहे असे त्याने अगर तिने समजण्याची कृपा करावी.
-
Aapulki
पुलंनी त्यांना भेटलेल्या काही निवडक व्यक्तिंबद्दल आपुलकीने केलेल्या काही पूर्वप्रकाशित लेखांचा संग्रह म्हणजेच ‘आपुलकी’! सदर पुस्तकात समाविष्ट लेख * एक वडीलधारा माणूस (हमारी बात (महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, पुणे), डिसेंबर १९७९) * बालगंधर्व : एक अटळ स्मरण (स्वराज्य, ६ नोव्हेंबर १९७६) * दादा (महाराष्ट्र साहित्य पत्रिका, एप्रिल-मे-जून १९७४) * मुशाफिर टिकेकर (महाराष्ट्र टाइम्स, १६ ऑगस्ट १९७६) * ‘किमया’कार माधव आचवल (अप्रकाशित) * नाट्यरंगी रंगलेला शरद तळवळकर (महाराष्ट्र टाइम्स, १ नोव्हेंबर १९८१) * आमची आवाबेन (महाराष्ट्र टाइम्स, २ जुलै १९७२) * अब्द अब्द मनीं येतें (स्वराज्य, ४ ऑगस्ट १९८४) * अनंत काणेकर (वीणा, मे १९५७) * शिक्षकांचे शिक्षक (मौज, दिवाळी १९९८) * शंकर घाणेकर : एक हसवणारा फकीर (महाराष्ट्र टाइम्स, १० फेब्रुवारी १९७४) * शुक्ल कवी (परचुरे, जुलै १९६२) * माधवराव (अप्रकाशित) * अग्रलेखक गोविंदराव तळवळकर (ललित, मे १९७५) * कोल्हापूरचे नाट्यप्रेमी लोहिया (कोल्हापूरदर्शन, २३ जानेवारी १९७१)
-
Gangot
यथा काष्ठं च काष्ठं च समेयातां महौदधौ। समेत्य च व्यपेयतं तद्वद्भूतसमागम:॥ वाढत्या वयाबरोबर पुढे पाहण्याऐवजी मन मागेच पाहण्यात रमते... आयुष्याच्या ह्या प्रवासात कितीतरी माणसे भेटली. नात्याची, बिननात्याची, कुणी पोटापाण्याच्या व्यवसायात भेटली. कुणी मैफिलीत भेटली. कुणाकुणाच्या बैठकीत सामील होण्याचे योग आले. कुणी प्रवासात भेटले. कुणी शेजारी म्हणून लाभले. कुणी आळीतले आळीकर, कुणी गावातले गावकर. कुणी जवळ आले, कुणी खेचून जवळ घेतले. काहींचे आकर्षण वाढले, काहींचे अचानक कमीही झाले. वर्ड्स्वर्थच्या ‘यारो रीव्हिजिटेड्’ यासारखी काही माणसे पुनर्भेटीत निराळीच वाटली. काहींच्या वेव्ह्लेंग्थ्स पटकन जमल्या, काहींच्या नाही जमल्या. काहींनी कधीही न फेडता येणार्या ऋणाचा भार अलगद खांद्यावर ठेवला. प्रत्येकाला हे असे कधी जवळीक तर कधी दुरावा अशा हेलकाव्यात तरंगणारे गणगोत लाभतच असते. माणूस कधीही एकटा नसतो. त्याने तसे असूही नये. माझे ‘गणगोत’ फार मोठे आहे. अनिलांनी म्हटल्याप्रमाणे ‘इथे सखे नि सोबती कुणी इथे कुणी तिथे!’ पुढल्या शे-दोनशे पानांतून दिसणारी माणसे खरोखरीच तशी आहेत की नाहीत हे मला ठाऊक नाही. आपुलकीच्या डोळ्यांनी पाहताना त्यांचे जे मला दर्शन घडले त्याची ही चित्रे आहेत. न जाणो, त्यांचा आणि माझा जो सहवास घडला, त्या सहवासाचीच ही चित्रे असतील एखादे वेळी! ह्या पुस्तकातली सुरेख चित्रे काढणारे आणि पुस्तकाला सुंदर वेष्टण देणारे माझे चित्रकार मित्र श्री. ओक यांचा मी अत्यंत आभारी आहे. २३ एप्रिल १९६६ ह्या दिवशी हे पुस्तक प्रसिद्ध व्हावे अशी माझी इच्छा होती. ज्योतिषाने काढलेला मुहूर्त म्हणून नव्हे तर आम्हा उभयतांवर वडीलधार्या माणसासारखी माया करणारे डॉ. भाई व सौ. इंदूताई दिवाडकर यांच्या लग्नाचा आज पंचविसावा वाढदिवस आहे, तो मुहूर्त गाठायचा होता म्हणून. ही इच्छा पुरी केल्याबद्दल मी प्रकाशक रा. ज. देशमुख आणि कल्पना मुद्रणालयाचे लाटकर बंधू, भालोबा खांडेकर आणि सहकारी मुद्रक वर्गाचा ऋणी आहे. ह्या पुस्तकात घालण्यासाठी जी रेखाचित्रे काढली आहेत त्यांचे मूळ फोटो ज्यांनी ज्यांनी दिले, त्या सर्वांचा मी आभारी आहे. विशेषत: रावसाहेबांचा फोटो दुर्मिळ होता; तो श्रीमती काशीबाईंनी दिल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार.