-
Periplus Of Hindusthan Khand 1 (पेरिप्लस ऑफ हिंदुस्थान - हिंदुस्थानची प्रदक्षिणा खंड १)
अज्ञाताचा शोध ही मानवाची आदिम काळापासूनची प्रेरणा. क्षितिजापारच्या अवकाशाची ओढ त्याला स्वस्थ बसू देत नाही. म्हणून आपली वस्ती, आपली माणसं, आपला प्रदेश आणि सारं काही मागे ठेवून तो निघतो.... जग जिंकायच्या ईर्ष्यने खैबर खिंड ओलांडून आलेला अलेक्झांडर सिंधू नदीच्या खोऱ्यात उतरून परततो. त्यानंतर कुणी मेगॅस्थेनिस चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात सेल्युकस निकोटरचा ग्रीक राजदूत म्हणून राहतो आणि तत्कालीन भवताल 'इंडिका' नावाने नोंदवून ठेवतो. मेगॅस्थेनिसचा 'इंडिका', अज्ञात नाविकाचा 'पेरिप्लस ऑफ एरिथ्रियन सी', अल्बेरुनीचा 'तहकिक-ए-हिंद' किंवा अफानासी निकितीनच्या 'नोटस'... अशा मूळ ग्रीक, लॅटिन, पर्शियन, अरबी, चिनी, रशियन दस्तावेजांतून सुमारे दोन हजार वर्षांचा तत्कालीन हिंदुस्थानचा सांस्कृतिक इतिहास नोंदवला गेला... खरं तर, फक्त सांस्कृतिक व्यवहारच नव्हेत तर सुमारे दोन हजार वर्षांतील तत्कालीन लहानमोठी राज्ये, राजेरजवाडे, शेतीवाडी, समाज, सणवार, चालीरीती, व्यापार, चलने... अगदी खाद्यसंस्कृतीपासून लढायांपर्यंत त्यांनी जे-जे काही पाहिले ते नोंदवून ठेवले, आपल्या देशात परतल्यावर इतरांना सांगितले, त्यातून पुढे ते ग्रंथरूप झाले. सुनंदा भोसेकर यांनी या परदेशी प्रवाशांच्या ग्रंथांमधून परिश्रमपूर्वक शोधून त्या त्या काळातील हिंदुस्थान या पुस्तकातून आपल्यासमोर ठेवला आहे. हा सारा दस्तऐवज हिंदुस्थानाचा इतिहास नक्कीच म्हणता येणार नाही, पण आपल्या आजच्या भारताचा इतिहास शोधणाऱ्यांसाठी तुकड्यातुकड्यांनी विणलेला सुंदर कोलाज आहे. सव्वीस जगप्रवाशांना दिसलेल्या हिंदुस्थानाची सुनंदा भोसेकर यांनी आपल्या कॅलिडोस्कोपमधून केलेली ही 'पेरिप्लस' म्हणजेच अक्षरप्रदक्षिणा!
-
Anhad (अनहद)
अनहद' हा मनातील निःशब्द शांततेला शब्दांत उतरविण्याचा वैशिष्ट्यपूर्ण ललितघाट. चिमुकल्या काळातील हा हृदयसंवाद आहे. 'तो' आणि 'ती' यांच्याबरोबरच 'स्व'शी तसेच सृष्टिविषयीची ही अनावर अशी संवादरूपे आहेत. या लेखनविश्वात प्रत्यक्षातल्या जगापेक्षा एका वेगळ्या जगाची खेच आहे. ते जग म्हणजे भूतकाळ, आदिमता आणि अमूर्ताचे जग. प्रत्यक्षातले जग हे मानवी अस्तित्व छाटणारे जग आहे. या जगात आणि स्वप्नसृष्टीत ताणतणाव आहेत. त्यामुळे भोवतालच्या जगाला म्यूट करून विहिरीतळातील जिवंत झऱ्यांच्या सृष्टीबद्दलचा जिव्हाळाभाव त्यामधून प्रकटला आहे. त्याच्या जोडीला चंद्र चांदवा, चांदणं, चांदुकली, जलदेवता आणि झाडफुलांच्या मोहमायारूपी ऋतुचक्राच्या नांदवणुकीचे भरगच्च संदर्भ आहेत. एका अर्थाने या जगात झेपविसावा आहे. टेकडीबाईच्या त्रिकोणाची हवीहवीशी नजर आणि अनेक 'हाकां'चे ध्वनी - प्रतिध्वनी आहेत. याबरोबरच काव्यनिर्मितीची अनामिक हुरहुर आणि त्या तरुतळी विसरलेल्या गीतांचा आठव आहे. स्त्रीजीवनाच्या संदर्भात खास भारतीयत्वाचे संदर्भ आहेत. त्यामुळेच आभाळओल्या हळदकुंकवाच्या ओढीचा स्त्रीचिंतनाचा पैस त्यास लाभला आहे. स्वप्नील जगाबरोबर काही प्रमाणात गतकातरता, रोमँटिकतेच्या आकर्षणाबरोबरच सहजसंवादी सलगीची भाषा, काव्यात्मता, चिंतनशीलता, दृश्य रंगसंवेदनांचे घनदाट प्राचुर्य, संगीतादिचित्रांचे संदर्भ, हिंदी-उर्दूतील मिठीजुबान आणि मोहक शब्दकळेचे आकर्षण ही या गद्याची वैशिष्ट्ये होत. भाषेतील पद्मनादमेळाचे विलक्षण आकर्षण या गद्यशैलीस आहे. त्यामुळे, या ललितगद्यास खुल्या प्रसरणशील ललितगद्याचा घाट प्राप्त झाला आहे. 'अनहद' नादाचे प्रतिध्वनी वाचकांना बहुमुखी अर्थवलयांचा नक्कीच भरगच्च प्रत्यय देतील. - प्रा. डॉ. रणधीर शिंदे
-
Nani Palkhiwala (नानी पालखीवाला)
नानी पालखीवाला : एक सहृदयी, सुसंस्कृत वकील' हे पुस्तक नानी पालखीवाला यांच्या जीवनावर आधारित आहे. ते त्यांच्या जीवनाचे विविध पैलू आपणास दाखवते. या पुस्तकाचे हस्तलिखित वाचताना प्रकर्षाने जाणवले, की पुस्तकाचा आशय खूप विस्तृत व अंतरंगाला भिडणारा आहे. हे पुस्तक ॲड. विजय गोखले यांनी मोठ्या प्रयासाने, अभ्यासपूर्ण असे लिहिलेले आहे व मोठ्या खुबीने वाचकांसमोर मांडलेले आहे. नानाभॉय आर्देशीर पालखीवाला ह्यांना सर्व नानी पालखीवाला या नावाने ओळखतात. पुस्तकाचे नावच त्यातील आशय दर्शवते. नानी पालखीवाला यांच्या स्वभावातील व आयुष्यातील वेगळे पैलू लेखकाने वाचकांच्या समोर समर्पकपणे मांडले आहेत. 'नानी पालखीवाला ही परमेश्वराने भारताला दिलेली देणगी आहे' हे चक्रवर्ती राजगोपालाचारी यांनी काढलेले उद्गार यथोचित आहेत. नानी पालखीवाला यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. ते कायदेपंडित तर होतेच, शिवाय एक निष्णात अर्थतज्ज्ञ, करतज्ज्ञ व उत्कृष्ट वक्ते होते. त्यांचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व हे वादातीत व असामान्य होते. ही असामान्यता त्यांना मिळालेली जन्मजात किंवा निसर्गदत्त देणगी नव्हती तर त्यांनी प्रचंड मेहनत व प्रयत्न यांच्या साहाय्याने ती विकसित केली होती. लहानपणापासूनच ते महत्त्वाकांक्षी होते व एखादे काम करायचे ठरवल्यास ते यशस्वीरित्या पूर्ण करण्याचा ध्यास घेत व ते पूर्ण झाल्यावरच स्वस्थ बसत. त्यांना लहान-पणापासूनच वाचनाची प्रचंड आवड होती. विविध विषयांवरील पुस्तके ते वाचत असत. त्यांच्या वाचनछंदाच्या अनेक मार्मिक गोष्टी व किस्से लेखकाने या पुस्तकात उद्धृत केले आहेत.
-
Niragastecha Najarana (निरागसतेचा नजराणा)
बालकांच्या मनोविश्वातील स्वर्गीय रंगांची दुनिया कलावंत किती संवेदनशीलतेने... तरलतेने आपल्यासमोर खुली करतात. बालमनाची निरागसता केवळ मौनातून, मंद-स्मितातून बोलती करतात. बालकांचे निरभ्र... नितळ... निर्मळ मन... जाती, धर्म, देश, रंग, रूप यांच्या सीमा पार करून आपल्याशी संवाद साधतं. कोमेजलेल्या मनाला पुलकित करण्याचं सामर्थ्य त्यात असतं. त्यांचं रूपडंच मुळात आरस्पानी! त्यांच्या पारदर्शीपणात आपण आपलं प्रतिबिंब पहावं... आणि आपणच लख्ख होऊन जावं !!
-
Charles Darwin (चार्ल्स डार्विन)
डार्विन या शास्त्रज्ञाच्या आठवणीचा कोलाज असं या आत्मचरित्राच्या अनुवादाचं वर्णन करता येईल. एका थोर वैज्ञानिकाचं जगणं सर्वसामान्य जनतेसमोर त्याच्याच शब्दांतून मांडण्याचा हा अनुवादी प्रयत्न निःसंशय कौतुकास्पद आहे. विज्ञान आणि वैज्ञानिक याविषयी आपल्या समाजातील उदासीनता दूर करण्यासाठी अशाप्रकारच्या वेधक शैलीतील लिखाणाची आज खरोखरच गरज आहे. एका वैज्ञानिकाच्या आत्मचरित्राच्या निमित्तानं वैज्ञानिकाचं अंतरंग, त्याची मानसशास्त्रीय जडणघडण, विज्ञान क्षेत्रातील त्याचा सर्जनशील प्रवास याला भिडणारं असं हे पुस्तक आहे
-
Glokal Lekhika (ग्लोकल लेखिका)
आपल्या सुशिक्षित सुसंस्कृत समाजात अजूनही जगातील साहित्याबद्दल, सांस्कृतिक वैविध्याबद्दल आणि सामाजिक जीवनशैली आणि भावविश्वाबद्दल खूप कुतूहल आहे. तितकेच किंवा त्याहूनही अधिक कुतूहल आहे लेखिका, महिला कलाकार, महिला नाटककार यांच्याबद्दल अधिक कुतूहल असण्याचे कारण गेली सुमारे दीड-दोनशे वर्षं या साहित्य- कला विश्वावर वर्चस्व आणि प्रभुत्वसुद्धा पुरुष लेखक- नाटककारांचे राहिले आहे. जगभर, अगदी भारतात, आफ्रिकेत व चीन- जापानमध्येसुद्धा. ही ' पुरुषी प्रभुत्ववादी' साहित्य चौकट संजीवनी खेर यांनी एकप्रकारे मोडली आहे. त्यातूनच हा 'ग्लोकल लेखिका' प्रकल्प त्यांनी सुदेश हिंगलासपूरकर यांच्या मदतीने सिद्धीस नेला आहे. - कुमार केतकर
-
Yoddha Karmayogi : Eknath Sambhaji Shinde (योद्धा
"माझी आई कधी कधी मला म्हणायची, “बाबासाहेब, माणसानं नेहमी समजून वागायचं.” हे समजून वागणं जे काही आहे नं, ते एकनाथरावांमध्ये आहे. एकनाथी हा ज्ञानी मनुष्य आहे. हवाहवासा मनुष्य आहे. त्यांच्या मनात आलं की, जी काही मदत करायची ती ते तुम्हाला करणार. त्याबद्दल कुठलाही गाजावाजा करणार नाहीत. मी हे केलं, मी एवढं केलं, हा मीपणा त्यांच्यात नाही. अहंकाराचा दुर्गंधही येणार नाही. फार चांगला मनुष्य आहे. नेता असावा तर असा! ... आणि इतकं करूनसुद्धा भोळेबिचारे असंही नाहीये. त्यांच्यामध्ये जेवढे राजकारणी गुण हवेत, तेवढे नक्की आहेत. सात्त्विक आहेत. एक शिस्त आहे. ती ते बरोबर पाळणार. स्वत:चं दुःख हे आपल्यापाशी मनाच्या कपाटात ठेवायचं आणि दुसऱ्याच्या सुखाचा सतत विचार करायचा. दुसऱ्याच्या सुखात आपला आनंद व्यक्त करणं, तेही प्रामाणिकपणे, हे एकनाथरावांना जमलं आहे. हसत हसत दुःख ओलांडून पलीकडे जाण्याची ताकद परमेश्वरानं त्यांना दिलीय. - शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
-
Marathi Bhasha : Lekhan-Margadarshan (मराठी भाषा :
श्री. सलील वाघमारे हे शासनमान्य मराठी लेखनविषयक नियमांचे केवळ अभ्यासकच नाहीत, त्या विषयावर त्यांचे प्रभुत्व आहे. हे या लेखांच्या स्वरूपावरूनच लक्षात येते. शिवाय, शालेय विद्यार्थ्यांना, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, इतकेच नव्हे तर, मराठी भाषेत लेखन करणाऱ्या लेखकांना, वृत्तपत्रांना, औपचारिक लेखन करणाऱ्यांना, शासकीय लेखन करणाऱ्यांना अशा सर्वांना निर्दोष लेखन करता यावे, या उद्देशाने सोप्या शब्दांत केलेले विवेचन हे ह्या पुस्तकातील लेखांचे वैशिष्ट्य आहे. या सर्व लेखांतून मराठीच्या विविध शब्दांचे लेखन, त्यासंदर्भात येणारे काही व्याकरणातील शब्द, सामान्य वाचकाला अपरिचित शब्द, यांचे स्पष्टीकरण श्री. वाघमारे यांनी इतक्या सोप्या, सुलभ पद्धतीने केले आहे, की त्यामुळे सर्वसामान्य मराठी भाषकांना हे पुस्तक अतिशय आवडेल, ते संग्राह्य वाटेल, इतकेच नव्हे, तर त्या पुस्तकाचे वारंवार वाचन करून मराठीच्या विविध शब्दांचे अनुकरण करावे, असे वाटेल. यास्मिन शेख (ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ)
-
Lavnaya Nakshatra (लावण्य नक्षत्र...)
लावणी आणि तमाशा कलावंतांच्या जीवनावर आधारित ही कथा आहे. आजवर तमाशा कलावंतांच्या आयुष्यावर अनेक चित्रपट, कादंबऱ्या लिहिल्या गेलेल्या आहेत. मात्र ही कादंबरीदेखील प्रत्येकाप्रमाणेच वेगळी आहे हे निश्चित. यात एक नायक, एक नायिका आणि त्यांचं प्रेम आहे. तसंच दोन बहिणींचं घट्ट नातं कसं असतं हे देखील यात दाखवलं आहे. मात्र तरीही ही केवळ एक प्रेमकहाणी आहे असं मी म्हणणार नाही. अर्थात असं का, ते वाचकांच्या ही कादंबरी वाचल्यानंतरच लक्षात येईल. या कहाणीमध्ये फक्त प्रेम नाहीये. तर विरहही आहे, दुःख आहे, वेदना आहेत, ताटातूट आहे. त्याच जोडीला लावणीची साधना आहे, त्याग आहे, घुंगरांचा नाद आहे, ढोलकीचा आवाज आहे, गरिबी आहे, प्रसिद्धी आहे, अन्याय आहे, विद्रोह आहे, समर्पण आहे आणि समाधानसुद्धा. म्हणूनच ही फक्त प्रेमकहाणी नसून जीवनकहाणी आहे.
-
Patanjalyogdarshan (पातंजलयोगदर्शन )
उपनिषदांचा काळापासूनच भारतीय तत्त्वचिंतकानी मानवी अस्तित्वाचा अर्थ शोधण्याचा गंभीर प्रयत्न सातत्याने केला आहे. भौतिक जगापलिकडे असलेल्या गूढ अशा सृष्टीच्या परमतत्त्वापर्यंत मानवी अस्तित्व पोहोचू शकते का? विस्तारू शकते का, याचा शोध घेण्याचे सर्वोत्तम साधन म्हणजे योगसाधना! याची जाणीव झाल्यावर भारताच्या आध्यात्मिक इतिहासाचा फार मोठा भाग योगसाधनेच्या अनेक मौलिक प्रणालींनी व्यापला आहे. पातंजल महाभाष्याबरोबरच योगसूत्रांचेही कर्तृत्व ज्यांच्याकडे जाते ते पतंजली इसवीसनापूर्वी सुमारे दीडशे वर्षे होऊन गेलेले महापंडित. त्यांचे योगदर्शन म्हणजे भारतीय योगविषयक तत्त्वाचिंतनाचा सर्वमान्य आणि सर्वाधिक प्रमाण मानला गेलेला ग्रंथ आहे. पूर्वाभ्यासांच्या आधारे या योगसूत्रांचे साधे आणि आकलनसुलभ असे विवेचन इथे केले आहे. साधनेच्या मार्गावर पाऊल ठेवणाऱ्या सर्वांना योगशास्त्राची ओळख करून देण्याचे काम या पुस्तकाने केले आहे असे लक्षात येते. एक महत्त्वाचा योगविषयक ग्रंथ सर्वसामान्यांच्या आकलन कक्षेत यावा ही या पुस्तकामागची प्रेरणा अभिनंदनीय आहे. - डॉ. अरुणा ढेरे