-
Shitpetitun Jevha Jag Yete... (शीतपेटीतून जेव्हा जाग येते...)
क्षितिज देसाई यांच्या 'शीतपेटीतून जेव्हा जाग येते...' या कथासंग्रहातील कथा आपल्याला एका अद्भुतरम्य दुनियेची सफर घडवून आणतात. अनामिक भविष्यातील त्या काळात माणसानं अंतराळात मुक्त विहार करण्याचं कौशल्य साध्य केलं आहे. त्याच्या मदतीनं त्यानं परग्रहांवर वसाहती स्थापन केल्या आहेत. धरतीपासून तिथपर्यंतचा पल्ला कमीत कमी वेळात गाठण्यासाठीच्या वेगवान वाहतूक यंत्रणेची स्थापना केली आहे. व्यक्ती-व्यक्तींमधील संपर्कासाठी भाषेच्या किंवा मोबाईलसारख्या यंत्रांच्या माध्यमांची गरज उरलेली नाही. मेंदूंची थेट जोडणी आणि तीही कोणत्याही तारांचा किंवा अशाच साधनांचा वापर न करता, विचारांचं आदानप्रदान करत आहे. आहारासाठी अनोख्या पोषणव्यवस्थेची रुजवात केली गेली आहे. आपलं तारुण्य राखून भविष्यात प्रवेश करण्यासाठी शीतपेटीची, हायबरनेशनची सोय झालेली आहे. आपल्याला हव्या त्या काळासाठी त्यात स्वत:ला गोठवून घेऊन परत जागं करणं शक्य झालं आहे. यंत्रमानव म्हणजेच रोबो सर्व सेवांसाठी तत्पर आहेत. मानव आणि यंत्रमानव एकमेकांबरोबर गुण्यागोविंदानं नांदत आहेत. त्यांचं सहजीवन बहरलेलं आहे. विज्ञान-तंत्रज्ञानातील विस्मयकारक प्रगतीनं साकारलेल्या या अनोख्या दुनियेत निसर्गानं त्याच्यावर लादलेल्या यच्चयावत शारीरिक आणि भौतिक मर्यादा माणसानं केव्हाच झुगारून दिल्या आहेत. सुखसोईंची परमावधी गाठलेली आहे पण माणसातील हीन प्रवृत्तींवर मात करणं मात्र त्याला शक्य झालेलं नाही. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षड्रिपूंच्या त्याच्यावरच्या विळख्यातून सुटका करून घेण्यात तो अपयशीच ठरला आहे. त्यामुळंच याही दुनियेत चोऱ्या होतात, पण संपत्तीच्या किंवा दागदागिन्यांच्या नाही तर संगणकीय कोडच्या. फसवणूक होते, पण तिचं स्वरूप वेगळं आहे. तरीही त्या आहेत चोऱ्याच. चोरून मारून इथंही अनधिकृत कालप्रवास होतो. घुसखोरी होते. याही दुनियेत खंडणीसाठी अपहरण होतं पण ते माणसाचं नसून यंत्रमानवांचं होतं. तेही घाऊक पद्धतीनं. खंडणी रोख पैशाच्या रूपात नाही तर क्रेडिट कॉईन्सच्या स्वरूपात मागितली जाते. आतंकवाद अजूनही बोकाळलेलाच आहे, पण अतिरेकी बाहेरून येत नाहीत सुरक्षा यंत्रणेतील कोणाच्या तरी संगणकीय जुळ्याच्या रूपात घरभेदी बनून हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. अर्थात सुरक्षा यंत्रणाही नवनवीन तंत्रज्ञानाच्या मदतीनं त्यांना शोधून काढतातच.
-
Anakalneey (अनाकलनीय)
'अनाकलनीय' या शीर्षकांतर्गत संकलित, प्रतिभा सराफ यांच्या कथा आश्वासक असून 'लघुकथा' या वाङ्मयप्रकाराची अंतस्थशक्ती वाढवणाऱ्या आहेत. 'ऐकलेल्या, पाहिलेल्या आणि अनुभवलेल्या घटनांचे पडसाद' या कथा प्रसारित तर करतातच पण जीवनपरिघातल्या अतर्क्यतेलाही स्पर्श करतात. जगण्यामध्ये एकच एक गणिती तार्किक क्रम नसतो, 'असंबध्दतेतली संबध्दता' ही असते हे मांडणाऱ्या आणि या तथ्याचे भान ठेवणाऱ्या या पक्व प्रवृत्तीच्या कथा आहेत. स्वभावतः त्यामुळे त्या, आंतरमुखी आणि सत्यदर्शनाभिलाषी होताना दिसतात, याचा मला संतोष आहे. जगत्व्यवहाराच्या पर्यावरणात दुःखाचा वावर असतो. या दुःखाची कारणे कोणती आणि विषादाचा उद्भव कोठून होतो याचा शोध आत्मनिष्ठ लेखकाला घ्यावा लागतो. प्रतिभा सराफ असा शोध या कथांमधून घेतांना दिसतात. शरीराची शुद्धी महत्त्वाची, पण मनाची (लेखिकेच्या भाषेत आत्म्याची) शुद्धी अधिक महत्त्वाची असून तशी ती साध्य केल्यास मनोजन्य आणि बुद्धीजन्य दुःखावर मात ही करता येते, असं निरीक्षण त्यांची कथा नोंदवते. (शुद्धीकरण) तेव्हा ही कथा परिहाराकडेसुद्धा निर्देश करते, हे विशेष! मराठीमध्ये 'अतर्क्य' लेखनाची एक परंपरा आहे. परात्मतेत संभावना दडलेल्या असतात असे ही परंपरा मानते. अशा परंपरेत स्त्री लेखकांनी विशेष असे लेखन केलेले नाही. प्रतिभा सराफ यांनी अशा निगूढतेला स्पर्श केला आहे हे त्यांचे श्रेय, आणि म्हणून हा विशेष इथे नोंदवला पाहिजे. जीवनव्यवहाराच्या खोलात डोकावू पाहणाऱ्या या कथा आश्वासक आणि महत्त्वाच्या आहेत. त्यांचे स्वागत; आणि शुभेच्छा ! भारत सासणे
-
Sutaka (सुटका)
भारती मेहता यांची 'सुटका' ही लघुकादंबरी मी उत्सुकतेने वाचली आणि ती मला आवडली. ती एक सुरेख कुटुंबकथा आहे. कुटुंब कथेतील कुटुंब-वात्सल्याने त्यांची ही कथा परिपूर्ण आहे. कोकणातील माणगाव-मुरुड यासारख्या लहान गावातील कुटुंबे, त्यांचे परस्पर संबंध, तेथील शेतीवाडी, तीमध्ये तनमनाने गुंतून राहिलेली, परस्परांशी प्रेमभावनांचे अनुबंध जपणारी सरळमार्गी, निष्कपटी माणसे व त्यांच्यातील एक सुसंस्कृत खानदानी कुटुंबाची ही कहाणी भारती मेहतांनी वाचकाचे मन गुंतून ठेवील अशा कौशल्याने लिहिली आहे. मध्यमवर्गीय, सुसंस्कृत जीवन हळूहळू अस्तंगत होत चाललेले दिसत असताना भारती मेहतांनी त्याला आपल्या प्रत्ययकारी लेखणीने जिवंत केलेले या कथानकांत दिसते. 'सुटका' हे कादंबरीचे शीर्षकही अन्वर्थक आहे. भारती मेहता यांनी भोवतालच्या समाजाचे बारकाईने आणि जातिवंत लेखिकेच्या नजरेने निरीक्षण केल्याचे जाणवते. मध्यमवर्गातील नातेसंबंध, रुसवे-फुगवे, मैत्रिणींमधील भांडणे व दिलजमाई, मोहिनी या मुलीचे अहंकारी वागणे व बऱ्या-वाईटाची जाणीव नसणे अशा अनेक स्वभाव वैशिष्ट्यांनी त्यांनी या कादंबरीचे लेखन केले आहे. त्यामुळेच ते प्रत्ययकारी वाचकाच्या मनाला भिडणारे झालेले आहे. साधी सरळ कुटुंबकथा किती नाट्यमय वळणे घेऊन पुढे सरकते हे वाचताना वाचकाची उत्कंठा वाढत जाते. - मधु मंगेश कर्णिक