Bidhar
बिढार' आत्मचरित्र व कादंबरी यांच्या समन्वयाने बनवलेला साहित्यप्रकार आहे. एका सीमित जगाचा घेतलेला अनुभव नेमाड्यांनी अतिशय नेटकेपणाने, प्रभावीपणाने पुढे मांडला आहे, हे या कादंबरीचे यश आहे. साहित्य जीवनानुगामी आहे, असे आवर्जून म्हणणारे काही लेखक जीवनातील घाणच उपसत बसतात, तिरकस शैलीदारपणे आपण काही वैशिष्ट्यपूर्न सांगतो आहे असे भासवतात. नेमाड्यांनी असे काहीच केलेले नाही. पण जीवन व साहित्य यांच्यामधली दरी एका बाजूने नष्ट करून, दुसर्या बाजूने जीवन अधिक सामर्थ्याने व खोलपणे प्रस्तुत करून नेमाड्यांनी खूपच उंच झेप घेतली आहे यात शंका नाही. कितीतरी प्रसंग इतके प्रभावशालीपणे त्यांनी रेखाटले आहेत की, शिल्पचित्रांची मूर्तता, भरीवपणा त्यात येऊन दृक्प्रत्यय येतो. अनुभवाला विकृत करणारे, भडक करणारे, कृतिमता आणणारे साहित्याचे संकेत एकीकडे त्यांनी तोडले आहेत, पण ते तोडतांना कुठेही अतिरेकीपणा केलेला नाही. प्रदर्शन केलेले नाही. ही एका मनाची मोडतोड व जडणघडण आहे, असे एकाच वेळी 'बिढार' वाचतांना वाटते.