Santaji Ghorpade Japhatan Mulukh (संताजी घोरपडे जफतन मुलूख)
छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचं राज्य बुडालं या औरंगजेबाच्या भावनेला संताजींनी जोरदार तडाखा दिला. चार साडेचार वर्ष ब्रम्हपुरी या ठिकाणच्या काळ्या मातीत औरंगजेब बादशहा राहिला. त्याला कारण म्हणजे मराठ्यांचा सेनापती संताजी घोरपडे यांनी बादशहाला निर्माण केलेला धोका होय. वडू कोरेगावच्या बादशाही छावणीवर सन १६८९ साली जो धाडसी छापा संताजी यांनी घातला त्यांने बादशहाची झोपच उडाली, बादशहा मरता मरता त्या रात्री वाचला. संताजीला ठार केल्याशिवाय बादशहाला ब्रम्हपुरीच्या छावणीतून बाहेर पडता येईना. औरंगजेब बादशहा आणि मोगल राजवट ही आशिया खंडातील बलाढ्य राजवट होती. संताजी घोरपडे यांचा अलौकिक पराक्रमाचा दरारा या राजवटीवर एवढा पडला होता की मोगल सरदार संताजी घोरपडे यांच्या बरोबर युध्द प्रसंग पडल्यावर ते युध्द टाळण्याचा प्रयत्न करत. अशा या नर शार्दुल रणधुरंधरास स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांकडून मुजऱ्यास न येणे पासून ते ममलकतमदार ह्या पदवी पर्यंतचा प्रवास म्हणजे संताजी बाबा. संताजी घोरपडे यांच्या जीवनावर आधारित असलेली, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू उलगडणारी कादंबरी म्हणजे संताजी घोरपडे जफतन मुलूख.