-
Hamid
सीमेपलीकडून झालेल्या विश्वासघातामुळे हमीद अन्सारीच्या आयुष्याचं पार वाटोळं होणार होतं. वाचलंच पाहिजे असं पुस्तक- राज चेंगप्पा कहाणीतील प्रत्येक वळण हृदयाचा ठोका थांबवणारं आहे. खूपच उत्तम प्रकारे सांगितलेली कहाणी. - सुहासिनी हैदर तुमच्या हृदयाच्या तारा छेडणारी मनोवेधक कहाणी - राजदीप सरदेसाई नोव्हेंबर, २०१२ मध्ये २७ वर्षांचा मुंबईकर आयआयटी तज्ज्ञ हमीद अचानक कुठंतरी गायबच झाला. काय घडलं होतं त्याच्या बाबतीत ? तो गेला होता तरी कुठं? त्याच्या पालकांना एवढंच ठाऊक होतं की आपला मुलगा अफगाणिस्तानात काबूल इथे नोकरीच्या निमित्ताने गेला आहे. थोडी शोधाशोध केल्यावर त्यांना कळलं की आपला मुलगा सीमेपलीकडील काही पाकिस्तानी दोस्तांसोबत खास करून एका पाकिस्तानी मुलीसोबत चॅटिंग करत होता. हमीद अन्सारी आणि गीता मोहन यांनी अगदी आतल्या गोटातून आणि अधिकारवाणीने असं हे लेखन केलं आहे. वाणी प्रथेखाली जबरदस्तीने लग्न लावून दिलं जाणार होतं म्हणून एका मुलीला सोडवण्यासाठी जाणाऱ्या हमीदला दोन देशांतल्या सीमारेषा लक्षातही घ्याव्याशा वाटल्या नाहीत. त्याला कशाचीही भीती वाटली नाही, कसलीही आडकाठी त्याला झाली नाही परंतु पाकिस्तानातील त्याच्या मित्रांनीच त्याला दगाफटका केला. त्यानंतर पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी त्याचा निर्धार मोडून काढून त्याच्यावर गुप्तहेर असा शिक्का मारण्यासाठी जंग जंग पछाडलं. त्यानंतर पुढे काय झालं तर या उलट तपासणीच्या काळात सोसावा लागलेला छळ, एकांतवासात कोठडीत जखडून राहण्याची सजा आणि त्यातूनही तग धरून राहण्यासाठी केलेला संघर्ष. भारतात त्याची आई फौजिया अन्सारी यांनीही अथक लढा दिला. अगणित दारं त्यांनी मदतीसाठी ठोठावली आणि हमीदला परत आणण्यासाठी तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या मदतीने भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या तीन देशांना गदगदा हलवून सोडलं. १८ डिसेंबर २०१८ रोजी सरतेशेवटी हमीदनं भारताच्या भूमीला स्पर्श केला. अत्यंत जिगरबाज, हृदयद्रावक आणि गतिमान अशी ही कहाणी माणुसकी, प्रेम, विश्वासघात आणि विपरित परिस्थितीतही आशा जागृत ठेवणं म्हणजे काय चीज असते, याविषयी आपल्याला खूप काही सांगून जाते.
-
Alguj(अलगूज)
हा कथासंग्रह आपल्या हाती देताना मला मनापासून आनंद होत आहे. माणूस आयुष्यात भावनांवर जगत असतो. प्रत्येकाच्या आयुष्याचा आकृतिबंध त्याला येणारे अनुभव आणि मनात उमटणाऱ्या, त्यात गुंतलेल्या भावना यांवर अवलंबून असतो. आयुष्याच्या पटलावर ह्याच भावभावनांच्या रंगाने माणूस चित्र रेखाटत राहतो. प्रेम ही सगळ्यात सुंदर भावना. उदात्त भावना. स्त्री-पुरुषांमधील प्रेमभावना ही मला नेहमीच एखाद्या काव्यासारखी वाटली आहे. ती उदात्त असते. सुंदर असते आणि त्याहीपेक्षा हळवी अलवार असते. प्रेमाने जग जिंकता येते, हे खरं असलं तरी प्रत्येकाला जग नाही जिंकता येत. अव्यक्त राहिलेले प्रेम, अपूर्ण राहिलेली स्वप्ने हा मग जीवनाचा एक हळवा भाग होऊन जातो. अतृप्तीचा आणि आठवणींचा एक झरा काळजात आयुष्यभर पाझरत राहतो. साफल्यात जगण्याचा आनंद असतो, तर अशा अपूर्णतेतही जगण्याची कविता सापडते. अशा काही कविता म्हणजेच या कथा आहेत. आयुष्याच्या प्रवासात काही नाती निसटतात आणि काही परत भेटतातही. निसटलेल्या नात्यांमुळे दोन जिवांच्या आयुष्यात पडणारे अंतर एका जन्माचे असते. ते 'जन्मांतर' असते, तर कधी भेटलेल्या हव्याहव्याशा वाटणाऱ्या नात्यातून 'स्वप्नांचा गाव' उभा राहतो. कधी जोडीदाराची 'प्रतीक्षा' हेच फक्त आयुष्य उरतं, तर कधी पुन्हा गवसलेल्या नात्यांची 'गिफ्ट' ही मिळते. कधीकधी नाते पुन्हा नव्याने उमलायला 'उत्तररात्र' लागते. मनात वर्षानुवर्षे रंगवलेला 'संसार' कधी दोन दिवसांसाठी का होईना जगता येतो.
-
Pravas bakiya (प्रवास बाकीय )
'प्रवास बाकीय...' ही प्रियांका डहाळे या अष्टपैलू तरुणीची कादंबरी. प्रियांका डहाळे ही पेशाने पत्रकार होती. 'अनावृत्त रेषा' हा तिचा पहिला कवितासंग्रह आणि पहिलेच पुस्तक. त्यानंतर आलेले तिचे हे दुसरे आणि शेवटचे पुस्तक. कारण तिचे अपघाती निधन झाले आणि तिचा लेखनप्रवास मात्र अधुराच राहिला. अतिशय हरहुन्नरी असलेली प्रियांका डहाळे हिची शोधक-चिकित्सक-निरीक्षक वृत्ती आणि दृष्टी तिच्या या कादंबरीतूनही प्रत्ययास येते. या कादंबरीतील मुख्य नायिकाही पेशाने पत्रकारच आहे. आत्मिक आणि देहिक पातळीवरील मानवाचे स्थलांतर... नातेसंबंधातील स्थलांतर... भावभावनांच्या पातळीवरील स्थलांतर कसे घडते? त्याचे काय परिणाम घडतात? परिणामांचे भोग कसे भोगावे लागतात? याचा तिच्या पत्रकार मनाने घेतलेला शोध आपल्यालाही अंतर्मुख व्हायला भाग पाडतो.
-
Yamunatiri anande (यमुनातीरी आनंदे)
सामाजिक विषयांबरोबरच या कथासंग्रहात गूढकथा आणि विनोदी कथा हे दोन प्रकारही समाविष्ट केले आहेत. त्यामुळे हा कथासंग्रह म्हणजे सकाळी उठल्यानंतर देवासाठी फुलं वेचत असताना आपण तबकात बकुळीची सुगंधित फुलं, फारसा वास नसलेली पण नियमित फुलणारी तगर, अजिबातच सुगंध नसलेली पण आकर्षक रंगाची जास्वंद, एखादी दूर्वांची जुडी, तुळशीच्या चार मंजिऱ्या, या सगळ्या स्त्रीलिंगी फुलांच्या जोडीला तो अनंत किंवा तो चाफा अशी आरास रचतो, तसा हा कथासंग्रह विविधरंगी, विविधगंधी आहे.
-
-
Gas Chamber (गॅस चेंबर)
रत्नाकर मतकरी हे रुढार्थाने ललित लेखक असले तरी त्यांच्यामध्ये एक राजकीय निरीक्षक जागता असे. आपल्या भवतालातील गुंतागुंतींचा विचार करणं आणि तो विचार ललित कलाकृतींतून निर्भीडपणे वाचकांसमोर मांडणं ही लेखक म्हणून आपली सामाजिक बांधिलकी आहे , असं ते मानत. ‘गॅस चेंबर' मधल्या कथा वाचताना ही गोष्ट पुन्हा एकदा जाणवते.या संग्रहातील कथा अस्वस्थ वर्तमानाचं प्रतिबिंब टिपत भविष्यकाळाचं सूचन करणाऱ्या आहेत. या कथांना आजच्या काळाचा संदर्भ आहे. त्यापलीकडे या कथा एकुणात एकाधिकारशाही आणि तिच्या पकडीखाली दबल्या गेलेल्या समाजाबद्दलही बोलतात.
-
Arthshastracha Sankshipt Itihas (अर्थशास्त्राचा सं
हे छोटेसे पुस्तक आपल्याला खूप मोठी कहाणी सांगते. प्राचीन काळापासून ते आधुनिक जगापर्यंत अर्थशास्त्राच्या लघुतम इतिहासाचे हे पुस्तक म्हणजे युद्धांच्या मागे प्रच्छन्न आर्थिक शक्ती कशी काम करत असते, नवनवीन शोध कसे लागत असतात आणि सामाजिक बदल कसे होत असतात या गोष्टी मुळापासून उकरून काढते. भांडवलशाही आणि मार्केटच्या पद्धती यांचा उगम कसा होतो आणि अर्थशास्त्राच्या या विद्याशाखेला महत्त्वाच्या कल्पना प्रदान करणारे लोक कसा आकार देतात याचा मागोवा हे पुस्तक घेतं. कृषिक्रांतीपासून ते आपला ग्रह दिवसेंदिवस आणखी आणखीच कसा उष्ण होत जातोय, या गोष्टीपर्यंत अँड्य्रू ली हे आपल्याला अर्थशास्त्राविषयीची ही कहाणी सांगतात. या कहाणीत शतकानुशतकांपासून आणि वेगवेगळ्या खंडांचा विचार करत अर्थशास्त्र या विद्याशाखेमध्ये अंतर्भूत असलेली विविधता अधोरेखित होत राहते. मक्तेदारीच्या खेळाच्या मुळापर्यंत ते जातात आणि नांगराच्या शोधामुळे लैंगिक भेदाभेद कसे वाढले ते उलगडून दाखवतात. काही रोगांमुळे वसाहतवादाच्या काही प्रकारांना कसा आकार प्राप्त झाला तेही सांगतात. अमेरिकी शहरांमध्ये गगनचुंबी इमारती निर्माण होण्याची कारणे विशद करतात आणि बरेच काही सांगून जातात. या सगळ्या विचारमंथनाचा परिणाम म्हणजे आपल्या विवाला आकार देणारे असे अर्थशास्त्रीय कल्पनांवर आणि शक्तिस्त्रोतांवर प्रकाश टाकणारे हे रंजक पुस्तक.
-
Vihirichi Mulgi (विहिरीची मुलगी)
कादंबरी कशाबद्दल आहे ? तर एका बावीस तेवीस वर्षाच्या बंडखोर मुलीची ही कहाणी. या वयात एक विश्वास असतो की मी म्हणेल ते बरोबर, माझ्या आयुष्याचा निर्णय मीच घेणार. तारुण्याच्या उत्साहात आपण आयुष्य घडवायला पाहतो. सगळं व्यवस्थित चाललं आहे म्हणतानाच अचानक सगळे गड किल्ले कोसळतात आणि सोबत आपणही भुइसपाट होऊन जातो. हे कोसळणे प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी घडतेच. पण या पडझडीनंतर पुन्हा स्वतःला उभं करताना, कोणती मूल्यव्यवस्था कामी येते, कोण आपल्याला आधार देतं आणि जगाला सामोरं जात असतानाच स्वतःला ही पुन्हा एकवार कसं समर्थ बनवायचं, अशा प्रकारची ही एका तरुणीची कथा आहे. तरुणीची यासाठी, कारण आपल्या समाजात पुरुष आणि स्त्री हा भेदभाव आजही पाहायला मिळतो. पुरुषांना जे अनेक प्रकारचे स्वातंत्र्य सहज मिळते, स्त्रीची मात्र प्रत्येक ठिकाणी अडवणूक केली जाते. कधी इतर लोक तिला बंधने घालतात तर कधी ती स्वतः च हरवलेल्या आत्मविश्वासामुळे स्वतः ला गमावून बसते. तर भेदभाव करणारी ही समाजव्यवस्था समजून घेत, तिच्यासमोर एक मुलगी कशी स्वतःचे विश्व घडवू शकते, या आत्मशोधाची ही कादंबरी आहे. अनेक वर्षे पुरुष त्यांच्या नजरेतून आपल्याला स्त्रियांची कहाणी सांगत राहिले. पण या पुस्तकात मात्र स्वतः स्त्रीच्या नजरेतून नायिकेची कहाणी सांगितली आहे. तिच्या मनासकट आणि शरीरासकटसुद्धा. ज्या गोष्टी बोलायच्या नाहीत हे सांगितले जाते, त्याच गोष्टी बोलून, बदल घडवून आणायची आशा आहे.