-
A-Joon Tendulkar (अ जून तेंडुलकर)
समग्र मराठी साहित्य-परंपरेमध्येच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावरदेखील विजय तेंडुलकर यांचे स्थान ‘लेखक’ म्हणून अढळ व अनन्यसाधारण आहे. नाटक, कथा, कादंबरी, एकांकिका, ललितगद्य व पटकथा – संवाद अशा सर्व लिखित व दृक् – श्राव्य माध्यमांवर तेंडुलकरांनी आपल्या अम्लान प्रतिभेची लखलखीत मुद्रा उमटवली. समकालीनता व सार्वकालीनता समर्थपणे अभिव्यक्त करणाऱ्या तेंडुलकरांच्या साहित्याचे अर्थनिर्णयन व पुनर्मूल्यांकन करण्याचा प्रयत्न एकूण सोळा लेखकांनी अंत:स्फूर्तता आणि वैचारिकता यांचा मेळ घालत येथे केला आहे. कारण कटू सत्याचे प्रयोग करणारे ‘तें’ तथा तेंडुलकर अ-जून, आजही प्रस्तुत ठरतात.
-
Ashihi Ek Jhunj (अशीही एक झुंज)
ही कहाणी आहे औषधकंपन्यांच्या नफेखोरीची! माणसाच्या जिवाशी खेळणाऱ्या राजकारणाची! वर्णद्वेषाची अन् वर्गसंघर्षाची! पण या कहाणीला दुसरी बाजूही आहे- जगातला कुणीही रुग्ण औषधाविना तडफडू नये, ‘परवडत नाही’ म्हणून त्याला उपचारापासून वंचित राहण्याची वेळ येऊ नये, यासाठी धडपडणाऱ्या एका भारतीय औषधकंपनीची अन् त्या कंपनीच्या ध्येयवेड्या प्रवर्तकाचीही ही कहाणी आहे. संपूर्ण आफ्रिका खंडात वणव्यासारख्या पसरलेल्या एड्सच्या विळख्यातून रुग्णांना सोडवण्यासाठी ‘सिप्ला’ या भारतीय औषधकंपनीनं दिलेली अशीही एक झुंज
-
Chaukat Udhalale Moti (चौकात उधळले मोती)
उर्दू. हिरव्या पानांवरचं लोभस नक्षीकाम. वासंतिक वाऱ्याचा सुगंधी श्वास. भारतमातेच्या गळ्यातला मौल्यवान चंद्रहार. एका ऐतिहासिक युगाचा आर्त विलाप. उर्दू. जीवनाचं समग्र, उग्र-मधुर भान. अनेक भाषा-भगिनींच्या मायसावलीत वाढली अन् पाहता पाहता उर्दू शक्तिमान, सुस्वरूप झाली. आणि समजूतदारही. तिचा विचारव्यूह व्यापक आणि बहुआयामी होता. एकाच वेळी ती फारसी भाषेशी गुफ्तगू, भारतीय तत्त्वज्ञानाशी विचारविनिमय आणि टोपीकर ब्रिटिशांशी फिरंगी खलबतं करत होती. काय ते पदलालित्य…काय ते समेवर येणं ! मोगल सल्तनतीच्या उदास सांध्य-उन्हात उर्दू उजळून निघाली, भारताच्या लोकगंगेत मिसळून गेली. भले सरंजामी काळात जन्माला आली असेल; पण माणुसकी, बंधुता आणि स्वातंत्र्य ही आधुनिक मूल्यं तिने अम्लान निष्ठेने जोपासली. काव्य हा उर्दूचा प्राणदिवा. अनेक श्रेष्ठ कवी तिच्या निळ्या ज्योतीवर पुन्हा पुन्हा झेप घेत होते नि लिहीत होते. त्यांची कहाणी म्हणजे हे पुस्तक. शायर आणि शायरीची मनभावन मैफल. मीर तक़ी ‘मीर’, ‘सौदा’, ‘ज़ौक़’, मिर्झा ग़ालिब, ‘मोमिन’, दाग़ देहलवी, नज़ीर अकबराबादी, अकबर इलाहाबादी, जिगर मुरादाबादी आणि मजाज़ अशा निवडक कवींच्या काव्यप्रवासाची ही सुरस आणि संवेदनशील सनद. सौम्य रंगांतली ही शब्दचित्रं लेखणीच्या पाच-सहा फटकाऱ्यांनी सिद्ध झालीयेत. ती वाचून वाचकांना उर्दू काव्याचा अंदाज येईल आणि मूळ लिखाणाची ओढ लागेल.
-
Sonyachya Sangatit (सोन्याच्या संगतीत)
घरात परंपरेने आलेला सोन्याचा व्यवसाय निष्ठेनं आणि आवडीनं चालू ठेवणाऱ्या एका छोट्याशा उद्योजकाचं हे अनुभवकथन! सोन्याचे दागिने घडतात कसे? मोडतात कसे? गुंतवणूक म्हणून कितपत उपयोगाचे? सोन्याचा कस कसा ओळखायचा? सोन्याच्या लगडी कशा घडतात? सोन्याचा कचरा कसा वेचतात? साध्यासुध्या ग्राहकापासून लबाड, धोकादायक ग्राहकांपर्यंत गमतीजमती सांगणारं – सुवर्णव्यवसायातील आव्हानांचा वेध घेणारं – छोट्यामोठ्या सुवर्णकारांचं, सराफांचं जग चित्रित करणारं –
-
Raoparv (रावपर्व)
सरकारला बहुमत नसताना, काँग्रेस पक्षाचा मनापासून पाठिंबा नसताना, पक्षात स्वतःचा गट नसताना आणि पक्षातील अनेक गट विरोधात असताना, गांधी घराण्याशी विसंवाद असताना, डाव्यांचा कडवा विरोध असताना, देशात धार्मिक व जातीय तणाव तीव्र झाले असताना अवघड आर्थिक स्थित्यंतर शांतपणे घडवून आणले ते पंतप्रधान पी.व्ही.नरसिंह राव यांनी! सोने गहाण ठेवण्याची वेळ आलेल्या भारताला दिवाळखोरीच्या उंबरठ्यावरून परतवून भक्कम आर्थिक स्थैर्य दिले ते पंतप्रधान पी.व्ही.नरसिंह राव यांनी! देशाची अर्थशक्ती जागवून त्यांनी उद्योगक्षेत्र अन् बाजारपेठेची पक्की बांधणी केली. नव्या उद्योगधोरणाव्दारे अनेक क्षेत्रे त्यांनी खाजगी उद्योगांसाठी खुली केली. अवघ्या तीन वर्षांत एक्कावन्न हजार कोटींचे परकीय चलन देशाच्या तिजोरीत जमा झाले ते नरसिंह राव यांनी कल्पकतेने राबवलेल्या आर्थिक सुधारणांमुळे ! आर्थिक स्थित्यंतराच्या या अवघड काळाचा आणि त्या काळाला शांतपणे आकार देणाऱ्या शिल्पकाराचा वेधक धांडोळा.. रावपर्व
-
Amhi Fauji (आम्ही फौजी)
सशस्त्र सेनेतील आयुष्य म्हणजे वेगळ्याच जगात जगणे. एकीकडे क्षणाक्षणाचा आनंद पुरेपूर उपभोगण्याची वृत्ती; तर दुसरीकडे डोक्यावर युद्धाची, मृत्यूची टांगती तलवार. कडक करड्या शिस्तीबरोबर धाडसी बेदरकारी. रक्ताच्या नात्यापासून दूर असूनही, जिवाभावाचे जुळणारे बंध. मध्यमवर्गीय नागरी कुटुंबात, सुरक्षित कोशमय वातावरणात, स्वच्छंदी फुलपाखरी जीवन जगणारी मुलगी विवाहानंतर एका सेनाधिकाऱ्याची पत्नी झाली आणि अचानक एका आयुष्यपालटाला सामोरी गेली. आपल्या या ‘फौजी’ आयुष्याची तिने टिपलेली क्षणचित्रे. आम्ही फौजी
-
George Orwell (जॉर्ज ऑर्वेल)
जॉर्ज ऑर्वेल ‘१९८४’ आणि ‘अॅनिमल फार्म’ या कलाकृतींनी जागतिक साहित्यात मोहर उमटवणारा निर्भीड कादंबरीकार. धारदार, तर्कशुद्ध आणि स्फटिकशुभ्र भाषेत लिहिणारा निबंधकार. हुकूमशाही आणि साम्राज्यशाहीचा कट्टर विरोधक. अनुभवांच्या शोधात बेघर फिरस्त्यांसोबत राहणारा मानवतावादी. जिवावर उदार होऊन लढणारा शूर सैनिक. हळव्या मनाचा बाप. हा मनस्वी लेखक कसा जगला? त्याचे सार्वकालिक ठरलेले विचार कोणत्या विलक्षण अनुभवांच्या मुशीतून घडले? कोणत्या विचारांचं बीज पेरत होता तो? त्याच्या आयुष्याची आणि साहित्याची ही कहाणी – जॉर्ज ऑर्वेल
-
Mi Sandarbha Pokhartoy (मी संदर्भ पोखरतोय)
मला माहीत होतं थडग्यांवर जीव लावणारी माणसं सर्वच धर्मांत असतात माणसांवर जीव लावणारी माणसं सापडत नाहीत कुठेही! धर्मानं बांधल्या होत्या कधीच्याच कबरी माणसाचं अस्तित्व खोल पुरून कधी मंदिरावर उभारलेल्या कळसामधून कधी मशिदीवर रोवलेल्या चंद्रकोरीमधून माणसांच्या विचारांना विचारांनी तिलांजली देणारी माणसं विवेकाचा कत्लेआम करत असतात दररोज…
-
Brahmos (ब्राह्मोस)
ब्राह्मोस! आपल्या लक्ष्यावर अचूक आघात करणारे, ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणारे जगातले सर्वात वेगवान क्रूझ क्षेपणास्त्र. या क्षेपणास्त्राच्या विकास आणि निर्मितीचा भारत आणि रशिया यांच्या संयुक्त प्रयत्नांतून साकारलेला प्रकल्प म्हणजे ‘ब्राह्मोस’! अज्ञात वाटेवरील संशोधनाचे हे साहस म्हणजे ‘आपण हे करू शकतो’ असा आत्मविश्वास जागवणारा पहिलावहिला अनुभव! मर्यादित गुंतवणूक, व्यावसायिक व्यवस्थापन, गतिशील निर्णयप्रक्रिया, अनोखी कार्यपद्धती आणि पारदर्शी प्रामाणिकता यांच्या संयोगातून वास्तवात उतरलेले हे स्वप्न. या प्रकल्पातून जन्मलेले यशस्वी प्रारूप आत्मनिर्भर राष्ट्रनिर्मितीसाठी अन्य क्षेत्रांमध्येही उपयोगात आणता येईल. या प्रकल्पाची त्याच्या निर्माणकर्त्याने सांगितलेली जन्मकथा: वेधक तितकीच प्रेरकही!