-
Monalisache Smit (मोनालिसाचे स्मित)
राजकारण! प्रत्येक सामान्य माणसाच्या आयुष्याला वेढून राहिलेला विषय. राजकारणाशिवाय सामाजिक जीवन असूच शकत नाही. मग कोणला त्यात रुची असो अथवा नसो. प्रत्येकाचे राजकीय मत हे असतेच. लोकांची ही मते स्वानुभवावरून, टीव्हीवरील बातम्यांवरून, वृत्तपत्रातील लेख- अग्रलेखांवरून बनत असतात. इतर कोणत्याही माध्यमापेक्षा वृत्तपत्रातील लेख- अग्रलेखांमधून तत्कालीन राजकीय घटनांचे विस्तृत विश्लेषण केले जाते. या लेखांमधून राजकीय व्यक्तींचे शह-प्रतिशह, डावपेच यांचे दर्शन तसेच राजकीय घटनांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय परिणामांबद्दलच्या परखड विचारांचे प्रकटीकरण होत असते. राजकीय घटनांचा, व्यक्तींचा शोध म्हणजे आपल्या सामाजिकतेचा शोध. वृत्तीप्रवृत्तींचा शोध. असा शोध घेणारे हे काही राजकीय विषयांवरील, व्यक्तींवरील विचारप्रवर्तक लेख. काही लेखांना तत्कालीन परिस्थितीचे संदर्भ आहेत. काही लेखातून राजकीय धुळवडीचे विषण्ण करणारे चित्रण आहे. तर काही लेखांतून मोनालिसाच्या स्मिताप्रमाणे गूढतेचे धुके दाट झाले आहे. आजकालच्या पुढच्या पायरीवरून या घटनांकडे, व्यक्तींकडे पाहताना या लेखांमधील विचारमंथन वाचकांना अंतर्मुख करेल.
-
Marma (मर्म)
खांडेकरांच्या परंपरेतील कथालेखक, कादंबरीकार, नाटककार आपापल्या पद्धतीने जीवनवादाचा पुरस्कार करत राहिले. सुनील मंगेश जाधव हेही याच पद्धतीने जीवनवादाचा पुरस्कार करत राहिले. सुनील मंगेश जाधव हेही याच परंपरेतील चांगले लेखक आहेत. वि. स. खांडेकर शिक्षक होते. सुनील जाधव हेही शिक्षक आहेत. राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. गेली १५ ते २० वर्षे ते कथालेखन करीत आहेत आणि त्यांचे काही कथासंग्रह यापूर्वी प्रकाशित झालेले आहेत. 'मर्म' या त्यांच्या नव्या कथासंग्रहात दहा कथांचा अंतर्भाव असून या सगळ्या अनुभवाच्या गोष्टी आहेत. पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यांचा भूगोल, घटना आणि लोकजीवनाचं दर्शन या कथांमधून घडतं. या कथासंग्रहातील सगळ्या कथांमध्ये मला आवडलेली कथा म्हणजे 'दहेरजा' ही आहे एका नदीची गोष्ट. नदीच्या अंतरंगात परकायाप्रवेश करून लेखकानं जणू जलप्रदूषण करणाऱ्या कंपनीशी लढा दिला आहे. दहेरजा नदी ज्या प्रदेशांतून वाहते त्या सगळ्या भागाशी लेखकाची ओळख असावी, अशा वास्तववादी घटना, प्रसंग, व्यक्ती आणि त्यांचे संवाद चित्रित करण्यात लेखकानं कसूर ठेवलेली नाही. हे तरुण पुढे दहेरजा वाचवण्यासाठी कसा लढा देतात आणि त्यात ते यशस्वी होतात की अपयशी, हे वाचकांना कळायला हवं असेल तर सुनील मंगेश जाधव यांनी त्यासाठी कादंबरी लिहिली पाहिजे. -- डॉ. महेश केळुसकर
-
Side Effects (साईड इफेक्ट्स)
गूढकथा हा साहित्यप्रकार मोजक्याच लेखकांनी जाणीवपूर्वक हाताळलेला आहे. तो समजून घ्यायचा तर त्याचं भयकथा, वा रहस्यकथांपेक्षा वेगळा असणं आधी लक्षात घ्यायला हवं. गूढ हे केवळ अतींद्रिय स्वरुपाचं, दहशत दाखवणारं असत नाही, तर ते आपल्या आयुष्याशी जोडलेलंही असू शकतं. कोणतीही गोष्ट तर्काच्या पलीकडील भासण्यातून, तिच्या अनाकलनीय असण्यातून ते आकार घेत असतं, आणि आपल्याला कोड्यात पाडत असतं. आपली एखादी कृती, एखाद्या नात्यामागचे गुंतागुंतीचे अर्थ, आपण गृहीत धरत असलेल्या प्रेम वा द्वेष यासारख्या मूलभूत भावनांचं उगमस्थान, अशा कोणत्याही घटकात गूढता सामावून राहिलेली असू शकते. रामदास खरे अशा घटकांचा शोध या कथासंग्रहातून घेताना दिसतात. अपवाद वगळता खरेंच्या बहुतेक कथांची पार्श्वभूमी परिचित वळणाची आहे. वास्तववादी पद्धतीची. या व्यक्तिरेखा आपण आपल्या अवतीभवती पाहिलेल्या आहेत. पण कथेच्या ओघात या व्यक्तीरेखांच्या आयुष्यात उभे रहाणारे पेच, त्यांना ठराविक साच्यातून बाहेर काढतात. त्यांच्याकडे पाहण्याचा एक नवा, अनपेक्षित पैलू आपल्यापुढे ठेवतात, जो कथांमधला गूढतेचा धागा अधोरेखित करतो. -- गणेश मतकरी
-
Shobhadarshak Streevadacha Vividharangi Aavishkar (शोभादर्शक स्त्रीवादाचा विविधरंगी आविष्कार)
जगातील सर्व धर्मांचे प्रवर्तक पुरुष होते. येशू, पैगंबर, शंकराचार्य, जैनमुनी आणि बुद्ध पुरुष. त्यांनी स्त्री - धर्म पुरुषापेक्षा निराळा केला आणि त्यातही पुरुषाला झुकते माप दिले आणि स्त्री जीवन पुरुषकेंद्री बनण्याच्या प्रक्रियेला नैतिक अधिष्ठानही दिले. जेव्हा पुरुष प्रस्थापित धर्म नव्हते तेव्हाचे स्त्री जीवन कसे होते? पुरुषाचे जीवन कसे होते? त्यातील वेगळेपण नेमके कोणते आणि ते वेगळेपण तयार होण्यामागच्या प्रेरणा नैसर्गिक होत्या की मानवनिर्मित अशा सगळ्या प्रश्नांचा ऊहापोह आजवरच्या तत्त्वज्ञानातून, साहित्यातून, कलांमधून होत आला आहे. त्याची ओळख झाली तर आपल्या जाणिवा प्रगल्भ व्हायला मदत होईल म्हणून हा खटाटोप.
-
Swapnashilp (स्वप्नशिल्प)
प्रतिभा रानडे यांच्या लेखणीतून उतरलेला जोगिंदर पॉल यांच्या उर्दू 'ख्वाबरू' आणि इंग्रजी 'Sleepwalkers' या लघुकादंबरीचा 'स्वप्नशिल्प' हा सशक्त अनुवाद. हिंदुस्तानच्या फाळणीनंतर भारतातील कित्येक मुस्लीम पाकिस्तानात निघून गेले होते, त्यांना अजूनही मुहाजिर-निर्वासितच समजले जाते, त्या संबंधातील ही कादंबरी. यांतील प्रत्येक व्यक्तिरेखा ही एकेका वृत्ती-प्रवृत्तीचं प्रतीक आहे. त्यामध्ये वैविध्य असलं तरी त्या सगळ्या व्यक्ती 'पाकिस्तान म्हणजे काय', 'फाळणी की स्वातंत्र्य' या प्रश्नांच्या उत्तराचा शोध आपापल्या परीने घेत आहेत. कादंबरीतील मुख्य पात्र 'दीवाने मौलवी साहेब' मात्र या सगळ्यांपासून कोसो दूर आहेत. ते अजूनही पाकिस्तानची मागणी करण्यातच रमले आहेत; पण अखेरीस त्यांच्या या कल्पनेच्या राज्याचा ठिकऱ्या- ठिकऱ्या उडतात, तेव्हा त्यांना 'पाकिस्तान म्हणजे काय', ह्याची खरी जाणीव होते. मग ते दुसऱ्या कल्पनेच्या राज्यात विहार करू लागतात. मनात विषण्णतेबरोबरच करुणेची भावना जागी करणारी, वेगळ्या दुःखाचं आणि मनोविश्वाचं दर्शन घडवणारी रंजक अशी ही कादंबरी !
-
Tufanatalya Panatya (तुफानातल्या पणत्या)
वृषाली मगदूम गेल्या साडेतीन दशकांपासून गरीब, पीडित, शोषित महिलांच्या समस्या सोडविण्याचे काम तळमळीने करीत आहे. डम्पिंग ग्राउंडवर, कौटुंबिक सल्ला केंद्रात, किंवा प्रत्यक्ष वस्तीत गेल्यावर अनेक तऱ्हेच्या समस्या घेऊन महिला येतात. या समस्यांची तड लावल्याशिवाय किंवा न्याय मिळाल्याशिवाय वृषाली स्वस्थ बसत नाही. या पुस्तकातील साऱ्याच कहाण्यांतील नायिका विलक्षण ताकदीच्या आहेत. समोर आशेचा एकही किरण नाही, आयुष्य वाऱ्यावर भिरकावून दिल्यासारखे आहे. वेदना वास्तवाच्या पलीकडच्या आहेत. अशा एका वळणावर अंतस्थ ताकदीला बाहेरच्या ताकदीचं बळ मिळतं. त्या पेटून उठतात, संघर्ष करतात, अगदी तुफानाचाही न डगमगता सामना करतात. वाट्याला आलेलं भागधेय स्वीकारून शांत संयत, चिवटपणे झुंज देत जगणं 'साकार' करत आहेत. स्त्री वर्गाच्या पलीकडे जाऊन व्यापक मानवी जीवनातील दुःख व त्यातून येणारी व्याकुळता यांचा शोध वृषालीची लेखणी घेताना दिसते. --- अजित मगदूम
-
Ajunahi (अजूनही)
तरल प्रेमभावना आणि शिक्षणसम्राटाच्या क्रौर्याच्या पेचात शिक्षण आणि संस्कृतीचा गळा घोटला जात आहे. अनाथ पूनम आणि शोषित अजयची ही प्रेमकथा...! वास्तवातील कुरूपतेची साक्ष देताना विजयाताई मारोतकर यांनी त्यात विविध रंगानुभूतींची उधळण केली आहे. अस्सल प्रेमाचा बळी देऊन तासिका प्राध्यापक असलेल्या अजयला नाइलाजाने संस्थाचालकाच्या साधारण कन्येशी विवाहबद्ध होणे भाग पडते. ज्यामुळे पूनमच्या प्रेमाचा बळी घेतला जातो. विचित्र कोंडी निर्माण होते, ज्यातून बाहेर पडणे अशक्य होऊन एक भयाण शोकांतिका पेलत वैफल्यग्रस्त जगणे अजयच्या वाट्याला येते. संस्कृतीच्या पूर्ततेतच शिक्षणाचे सार्थक असते. तीच शिक्षण व्यवस्था विकृतीने आणि क्रौर्याने बरबटलेली असल्याचे भीषण सत्य आहे. तासिका प्राध्यापकांच्या वाट्याला आलेल्या जीवघेण्या व्यथांचा नेमका वेध घेणारी फार महत्त्वाची ही कादंबरी आहे. काळ पुढे जातो... गुंजन आणि परिमलच्या सफल प्रेमकथेत पूनम आणि अजयच्या शोकात्मक प्रेमाचे अश्रू दडलेत. विजयाताईंनी हळुवारपणे व्यक्ती व प्रवृत्तीच्या विसंगतीसह समाजाचे वास्तव चित्र व चरित्र 'अजूनही...' मध्ये उलगडले आहे. 'अजूनही...' या प्रक्रियेला पूर्णविराम मिळेल की 'अजूनही...' न संपणाऱ्या वास्तवाची करुण कहाणी राहील... ? या प्रश्नाला उत्तर नाही... विजयाताईंच्या वास्तववादी कादंबरी लेखनाला मनःपूर्वक शुभेच्छा...! --डॉ. श्रीपाल सबनीस (अध्यक्ष, ८९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, पुणे)
-
Tumasa Nahi Dekha - O. P. Nayyar (तुमसा नहीं देखा - ओ. पी. नय्यर)
ओपींना 'ललित' रागाने चांगलीच भुरळ घातली असावी. त्यामुळे 'कल्पना' चित्रपटासाठी त्यांनी मोहम्मद रफी आणि मन्ना डे यांना जुगलबंदीच्या रूपाने 'तू है मेरा प्रेमदेवता' हे द्वंद्वगीत गायला लावलं. त्यात रफींच्या आवाजाचा पल्ला आणि मन्ना डेंच्या आवाजातला सच्चेपणा आणि धीरगंभीर भाव यांचा उत्तम मेळ साधण्यात आला आहे. अमीर खाँ यांना नौशाद (बैजू बावरा, शबाब) आणि वसंत देसाई (गूँज उठी शहनाई, झनक झनक पायल बाजे) या रागदारी संगीतात मुरलेल्या दिग्दर्शकांनी चित्रपट संगीताच्या परिघात आणलं, 'हिदम किंग' म्हणून गणल्या जाणाऱ्या ओपींनाही आणलं, ही गोष्ट विशेषच म्हटली पाहिजे. — अमरेंद्र धनेश्वर
-
Bharatiya Itihasachya Paulkhuna Atiprachin Kal Bhag - 1 (भारतीय इतिहासाच्या पाऊलखुणा अतिप्राचीन काल - भाग १)
आपल्या अतिपूर्वजांची उत्पत्ती, स्थित्यंतरे, विकसित होत गेलेली जीवनशैली तसेच सांस्कृतिक वारसा जाणून घेण्यासाठी इतिहासाचा अभ्यास करणे गरजेचे असते. शिवाय पूर्वकालीन घटनाक्रमांच्या संदर्भातून प्रकर्षाने टाळावयाच्या बार्बीचे भान येण्यासाठी तसेच गैरव्यवस्थेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी इतिहासाची माहिती अत्यावश्यक आहे. इतिहासाच्या अभ्यासाद्वारे विश्वात निर्माण झालेली अस्थितरता, संघर्षमय बाबी व विध्वंसकारी स्थिती टाळता येऊ शकते व शांतता राखता येऊ शकते. प्राचीन वारशाद्वारे प्राप्त झालेल्या भूमीचे रक्षण करून देशाच्या सीमा जतन करण्याची जबाबदारी देशवासीयांवर असते. बहाल झालेल्या वारशाबाबतचे भान व वंशपरंपरागत मिळालेल्या हक्काधिकारांचा वापर करण्याची जाण ऐतिहासिक दस्तावेजांतून मिळते. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे ज्यू धर्मीयांनी त्यांच्या प्राचीन इतिहासाचे स्मरण ठेवून हक्काची 'देवदत्त भूमी' जिद्द व परिश्रमाने मिळवून इस्रायल देशाची निर्मिती केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या शब्दांत सांगायचे झाले तर, 'जे राष्ट्र आपला इतिहास विसरते त्या राष्ट्राला आपला भूगोल गमवावा लागतो !' भारतीयांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राजकारण्यांना इतिहासाचे विस्मरण झाल्याने आजघडीला पाकव्याप्त काश्मीर व अक्साई चीनच्या निमित्ताने आपल्या देशाचा भूगोल बिघडवून घ्यावा लागलेला आहे हे कटुसत्य आहे.
-
Bharatiya Itihasachya Paulkhuna Atiprachin Kal Bhag - 2 (भारतीय इतिहासाच्या पाऊलखुणा अतिप्राचीन काल - भाग 2)
संपूर्ण विश्वात प्राचीन कालापासून विविध संस्कृती उदयास आल्या, विस्तारल्या व अपूर्व असा इतिहास निर्माण करून गेल्या. हजारो वर्षांपासून ठराविक भूप्रदेशाचा व सर्वसंपन्न असलेल्या आपल्या पूर्वजांच्या वैभवशाली परंपरांचा वारसा सांगणाऱ्या कित्येक संस्कृती आजघडीला काळाच्या उदरात नष्ट झालेल्या आहेत वा स्मृतिबाह्य ठरल्या आहेत. आफ्रिकेतील इजिप्त सभ्यता, मध्य आशियातील सुमेरियन सभ्यता, मेक्सिकोची माया सभ्यता, युक्रेटिस नदीकाठची बॅबिलोनियन सभ्यता, चीनची ह्वांग हो नदी खोऱ्यातील सभ्यता, मोहेंजोदडो येथील सिंधू सभ्यता, हिंदुस्थानातील गंगा-यमुनेच्या तीरावरील 'सनातन' म्हणून ओळखली गेलेली वैदिक संस्कृती या जगभरात विखुरलेल्या महत्त्वाच्या तसेच ठळक सभ्यता व संस्कृती आहेत. ग्रीक, बॅबिलोनियन, सुमेरियन, असिरियन या प्राचीन संस्कृती प्रगत व वेगवान असूनही काळाशी एकरूप न होता आल्याने लयास गेल्या, तर सिंधूसारख्या वैभवशाली संस्कृती निसर्ग व मानवी आक्रमणापुढे नेस्तनाबूत झाल्या. मात्र कित्येक हजारो वर्षांपासूनचा सलग इतिहास लिपीबद्ध करून प्राचीन तसेच अतिप्राचीन काळाचे सुस्पष्ट चित्र रेखाटणारी भारताची अतिप्राचीन परंपरा असलेली सनातन वैदिक संस्कृती ही भारताची शान, मान व जान आहे. सनातन संस्कृतीचे आगळेपण हे आहे की ही संस्कृती संशोधकीयदृष्ट्या जरी अतिप्राचीन ठरविण्यात आलेली नसली तरी आर्यांनी रुजविलेला प्राचीन वैदिक धर्म आजतागायत प्रवाहित आहे आणि हेच या संस्कृतीचे ठळक वैशिष्ट्य आहे!
-
Amrutachya Janu Onjali Shridhar Phadake Yancha Sangitik Pravas (अमृताच्या जणु ओंजळी श्रीधर फडके यांचा सांगीतिक प्रवास)
ज्येष्ठ संगीतकार गायक श्री. श्रीधर फडके यांच्या ५० वर्षांच्या सांगीतिक कारकिर्दीचा आढावा घेणारं हे पुस्तक आहे. आई- वडिलांकडून मिळालेल्या उत्तम संस्कारांची शिदोरी घेऊन, श्रीधरजींनी स्वतःची स्वतंत्र आणि देखणी संगीत-वाट निर्माण केली. ‘संगीत मनमोही रे’ हे रसिकमनाला प्रत्येक कलाकृतीतून सुकन्या जोशी त्यांनी पटवून दिलं आहे. ‘गाणार, वाजविणार तैसेचि ऐकणार’ यावत् त्यांचं संगीत प्रत्येकाला मोहित करतं. श्रीधरजींची संगीताप्रती असलेली निष्ठा, आणि आजपर्यंत त्यांनी जोडलेली माणसं याचं दर्शन या पुस्तकाच्या प्रत्येक प्रकरणातून होत राहतं. या पुस्तकात त्यांचं कुठलंही गाणं नेमकं कसं ऐकायला हवं, याची दृष्टी ते आपल्याला देतात. कवीच्या शब्दांवर नितांत प्रेम करणारा हा संगीतकार आहे. कवितांचा भरपूर अभ्यास. त्या शब्दांचा स्वरांशी मेळ घालताना, शब्दांवर कुठेही कुरघोडी न करता, त्या काव्याच्या अर्थाला, भावनेला श्रीधरजी चाल लावतात. चालीवर शब्द लिहून घेतानाही, कुठेही शब्दांची ओढाताण होताना दिसत नाही. म्हणूनच त्यांचं कुठलंही गाणं ‘लय ललित ही रागिणी ‘असंच भासतं. जर एखाद्या अभ्यासकाला श्रीधरजींच्या गाण्यांचा अभ्यास करायचा असेल, किंवा त्यांच्या गाण्यांवर संशोधन करायचं असेल, तर हे पुस्तक त्यांच्यासाठी एक आदर्श ठरेल, असा विश्वास वाटतो. पुस्तक वाचताना ‘अमृताच्या जणू ओंजळी’ आहेत याचा अनुभव वाचकांना निश्चित मिळेल. त्यांच्या गाण्यांचा कॅनव्हास हिरव्या ऋतूसारखा कायम टवटवीत राहो, हीच ईश्वरचरणी मनोभावे प्रार्थना!
-
Draupadi Kal Aaj Udya (द्रौपदी काल आज उद्या)
राजा शंतनु आणि स्वर्गीय गंगा यांच्या मीलनातून जन्मलेला राजपुत्र देवव्रत याने जेव्हा 'भीष्म प्रतिज्ञा' केली, तेव्हा महाभारताच्या अंतरिक संघर्षाला सुरुवात झाली. सभापर्वातील द्रौपदी वस्त्रहरण हा महासंघर्षाचा परमोच्च बिंदू होता नि तिथून द्रौपदीच्या सांगण्यावरून तिचा मनबंधू श्रीकृष्ण याची युद्धशिष्टाई मुद्दामहून न करण्यातून महासत्तेच्या विलयाला सुरुवात झाली. द्रौपदीचे आयुष्यातील महानाट्य हे धगधगत्या पलित्यासारखे कालातीत होते. जन्मोदरी ती अग्निशिखा होती, बालपणी ती याज्ञसेना होती, विवाहप्रसंगी द्रुपदकन्या द्रौपदी होती, स्वयंवरानंतर पाच पांडवांची जगनघना पतिव्रता पांचाली होती आणि पुन्हा वस्त्रहरणाच्या वेळी तळपत्या तलवारीसारखी मनोयज्ञयागातून निर्माण झालेली अग्निशिखा होती...! अशी तिची विविधांगी गर्भित रूपे अशोक समेळ यांनी निखालसपणे आपल्या शब्दकुंचल्याने ज्वलंत चितारलेली आहेत...! द्रौपदीच्या व्यक्तिमत्त्वात दिसलेली कालची, आजची आणि उद्याची स्त्री आणि तिची मनोमूर्त किती संवेदनशील आहे, याचे प्रत्यंतर ही कादंबरी वाचताना रसिकांना येते. द्रौपदीची मानसिकता ही अमृतसरोवरात द्विजिभेने दंश करणारी कुंडलिनी होती, तर आजच्या स्त्रीचे भोगणे आणि सोसणे, वेदना आणि संवेदना, जखम आणि जोखीम, शब्दातीत निःशब्दता, प्रश्नातीत विप्रश्नता, मौन आणि कोलाहल, साक्षात्कार आणि निर्वचना... या सर्व परस्परविरोधी; पण तरीही संवादी युगुलांचा सम्यक संसार म्हणजे स्त्रीचे मन आहे. याचा महा शब्दपट नाट्यमयरीत्या अशोक समेळ यांनी मनःपूत विलक्षण संयमाने विणला आहे...! द्रौपदीच्या मनातील सलाचा उगम प्रलयात होतो आणि पंचमहाभूतांच्या ओंकारात विलय होऊन पुन्हा अरूवारीच्या विलसत्या किरणांप्रमाणे तिचे मूलाधार व्यक्तिमत्त्व कादंबरीभर झळकत राहते, ही या कादंबरीची मर्मबंधातली ठेव आहे...!! -- प्रा. अशोक बागवे
-
Aabhjan Priyajan (अभिजन प्रियजन)
बहुआयामी, बहुरंगी व्यक्तिचित्रांचा किंवा शब्दचित्रांचा हा संग्रह म्हणजे एका अर्थाने जयराज साळगावकरांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंचा आरसाच आहे. त्यांच्या व्यासंगाचा आवडीचा आवाका बघून अचंबित होणे एवढेच आपल्या हाती उरते. चोखंदळ वाचन, नुसते पाहणे नाही तर खोलात जाऊन पूर्ण माहितीसह जीवनाचा आस्वाद घेणे या वृत्तीमुळेच असे लिखाण करणे शक्य होते आणि सोबत वाचकालाही समृद्ध करते ! -- रघुवीर कुल
-
Vaya Gelele Por (वाया गेलेले पोर)
डॉ. विजय शिरीशकर या वसईतील स्त्री-रोगतज्ज्ञाच्या जीवनावर बेतलेल्या पुस्तकाचे. 'डिंपल पब्लिकेशन'चे प्रकाशक अशोक मुळे यांनी डॉक्टरांच्या जीवनाचे शब्दचित्र रेखाटण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविली. कोरोना साथीच्या काळात व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल्सच्या माध्यमातून कथन-लेखन-वाचनाचा प्रवास सुरू झाला. या प्रवासास शब्दसाज चढवत असताना डॉक्टरांचे आश्चर्यकारक वळणांचे आयुष्य उलगडत राहिले. एक निष्णात आणि अनुभवी स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून ज्यांची वसईमध्ये ख्याती आहे ते डॉक्टर शिरीशकर म्हणजेच 'वाया गेलेले पोर' आहे यावर विश्वास बसणे कठीण. मुळात हे 'पोर' म्हणजे 'बाळा', वाया गेला होता म्हणजे नक्की कसा होता हे येथे सांगणे उचित ठरणार नाही.
-
Swarswamini Asha(स्वरस्वामिनी आशा)
माझी आशाची पहिली ओळख झाली तेव्हा तिची छबी ही साधे पाचवारी पातळ, पोलके, कपाळावर कुंकवाचा मोठा टिळा, गच्च केसांच्या दोन वेण्या आणि हातात खूपशा सोन्याच्या बांगड्या घालणारी स्त्री अशी होती; जी मनमोकळ्या, लाघवी व थट्टेखोर स्वभावाची होती. 'जिवलगा, राहिले रे दूर घर माझे' हे मी लिहिलेले गाणे आशाने गायले आहे; त्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी तिने काठावर फाटलेली पांढरी रेशमी साडी घातलीहोती. त्या फाटलेल्या साडीला मी सुई दोऱ्याने चार टाके घातले होते. फाटकी साडी केवळ लकी आहे म्हणून नेसणारी आशा ही अशी जरा मन:स्वी आहे. आशाचे तिच्या सर्व भावंडांवर प्रेम आहे व त्याचीच प्रचिती लता दीदींवर तिने लिहिलेल्या 'आमचे छोटे दादा' यामध्ये आलीआहे, पण जिभेने ती जरा तिखट आहे. आशाला वाचनाची देखील विलक्षण आवड आहे. थोडक्यात काय तर मंगेशकरांच्यासोन्यासारख्या कलासंपन्नते बरोबरच या घराचे साधे निर्मळपणही आशाच्या रक्तात पुरेपूर भिनलेले आहे. स्वकष्टाने, जिद्दीने, धैर्याने आणिकलेच्या अखंड साधनेने आशाने चित्रपटसृष्टीमध्ये आजचे हे मानाचे स्थान मिळविले आहे. -- शांता शेळके