-
Mahapratapi Subhedar Malharrao Holkar (महाप्रतापी सुभेदार मल्हारराव होळकर)
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचा विस्तार हिंदुस्थान आणि हिंदुस्थानाबाहेर करणारे आणि मराठेशाहीचा इतिहास घडवणारे काही शूरवीर होते. त्यामध्ये अग्रस्थानी असणारे सुभेदार मल्हारराव होळकर हे अत्यंत पराक्रमी, शूर, बुद्धिमान आणि धाडसी असे सुभेदार होते. धर्म, आचार, विद्या, व्यापार आणि युद्धकला या सर्वात ते पारंगत होते. सामर्थ्य, न्याय, नीतिमत्ता, महत्वकांक्षीपणा आणि स्वतःच्या मनगटाच्या बळावर या सामान्य मेंढपाळ व्यक्तीने दिल्लीचा बादशाह कोण व्हावा हे ठरवण्यापर्यंत स्वतःचे कर्तृत्व सिद्ध केले. त्यामुळे एखाद्या स्वतंत्र राज्याच्या राजासारखे ते आयुष्यभर वागले. पण छत्रपती शाहू महाराज आणि श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्यावरील निष्ठा त्यांनी अखंड जपली. एकूण ७४ परगणे मल्हाररावांच्या ताब्यात होते. प्रत्येक युद्धात मल्हाररावांनी भीम पराक्रम केला. आपल्या कारकिर्दीत ते एकूण ५२ लढाया लढले आणि त्या सर्वांमध्ये त्यांनी यश मिळवले. मराठेशाहीच्या उत्कर्षात मल्हारराव होळकर यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. मराठेशाहीचा भगवा झेंडा अटकेपार फडकवण्यात मल्हाररावांचा सिंहाचा वाटा होता. उत्तर हिंदुस्थानात मराठेशाहीचा पाया मल्हाररावांनी बळकट केला. आपल्या राज्यात प्रशासन, शेती, जलव्यवस्था, न्याय, धार्मिक बाबी, स्थैर्य, शांतता राबवून त्यांनी शिवरायांचा लोककल्याणकारी राज्याचा वारसा समर्थपणे पुढे चालवला. रघुराज मेटकरी हे प्रतिभावंत साहित्यिक आहेत. त्यांनी अनेक पुस्तके, दुमिर्ल कागदपत्रे धुंडाळून मल्हारराव होळकर यांचे हे चरित्र लिहिलेले आहे. मल्हाररावांचे हे चरित्र प्रेरणादायी आहे. मराठी वाचकांना ते नक्कीच आवडेल, असा विश्वास आहे. डॉ. देवीदास पोटे (ज्येष्ठ साहित्यिक आणि इतिहास संशोधक, मुंबई)
-
Menduchi Mashagat (मेंदूची मशागत)
‘मेंदूची मशागत’ या देवा झिंजाड लिखित पुस्तकात गावाशी जोडलेले अनुभव, संघर्ष आणि ज्वलंत विषय मांडले आहेत. शहरात राहत असूनही त्यांच्या लेखनाची नाळ गावाशी जोडलेली आहे. वाचनसंस्कृतीचे महत्त्व ते वारंवार अधोरेखित करतात. मेंदूच्या विकासासाठी वाचन गरजेचे असून, हे पुस्तक छोट्या प्रकरणांतून अनुभवांद्वारे मौल्यवान संदेश देते. आजचा मेंदू मोबाइलमध्ये अडकला असून, तो पुन्हा डोक्यात आणण्यासाठी अशी ‘मेंदूची मशागत’ आवश्यक आहे, असे मत शरद तांदळे यांनी व्यक्त केले. – शरद तांदळे
-
Krudhyati Ek Thararak Mahasangram (कृध्यती एक थरारक महासंग्राम)
मानवतेच्या कल्याणासाठी महाभारतासमान विध्वंस पुन्हा होऊ नये, हे गरजेचे होते. याच उद्देशाने श्रीकृष्णाने दैवी अस्वे सुरक्षित ठेवण्याची सोय केली होती; परंतु सत्तेच्या लोभापायी मनुष्य कोणताही थर गाठू शकतो, हे कृष्णमृत्यूपश्चात सातशे वर्षातच समजले. कृथ्यति, हा दैवी शक्तीने भरलेला एक असा विक्षिप्त गुन्हेगार उठ्यास आला, ज्याचे लक्ष्य शत्रू राज्यातील गर्भाचा वध करणे, हे होते. हा योद्धा जर 'विद्यधुरंधर स्पर्धा जिंकून इंद्रपदी बसला, तर समग्र आर्यावर्ताचा सर्वनाश होणार हे निक्षित. या दैवी शक्तीने उन्मत्त विक्षिप्त गुन्हेगाराला छोट्याशा राज्याचा सेनापती वीरसेन रोखू शकेल का? डॉ. ऋषिकेश बोधे यांसारख्या लेखकांनी 'कृथ्यती'सारखी गहिराई असलेली साहित्यकृती साकारून मराठी फिक्शनला एक नवे परिमाण दिले आहे. या कादंबरीचे साहित्यिक मूल्य अत्यंत ठोस आहे. तिचं भाषिक सौंदर्य, मनाच्या गुंतागुंतीचा सुक्ष्म येध आणि अंतःप्रेरणेला भिडणारी तिची शैली यामुळे ही कादंबरी एक दीर्घकाळ आठवणीत राहील अशी ठरते. खरे सांगायचे तर, बऱ्याच काळानंतर एवढं शुद्ध, विचारप्रवृत्त आणि संवेदनशील साहित्य वाचायला मिळाल्याचा आनंद झाला. मराठी साहित्यात अनेक वर्षापासून अशा प्रकारच्या सशक्त कल्पनाविष्काराच्या अभावाची जाणीव होती; पण 'कृध्यती मुळे त्या पोकळीची भरपाई झाल्याचे समाधान वाटते. आगामी काळात ह्याचे पुढील भागही येवोत, अशा शुभेच्छा.
-
Santaji Ghorpade Japhatan Mulukh (संताजी घोरपडे जफतन मुलूख)
छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचं राज्य बुडालं या औरंगजेबाच्या भावनेला संताजींनी जोरदार तडाखा दिला. चार साडेचार वर्ष ब्रम्हपुरी या ठिकाणच्या काळ्या मातीत औरंगजेब बादशहा राहिला. त्याला कारण म्हणजे मराठ्यांचा सेनापती संताजी घोरपडे यांनी बादशहाला निर्माण केलेला धोका होय. वडू कोरेगावच्या बादशाही छावणीवर सन १६८९ साली जो धाडसी छापा संताजी यांनी घातला त्यांने बादशहाची झोपच उडाली, बादशहा मरता मरता त्या रात्री वाचला. संताजीला ठार केल्याशिवाय बादशहाला ब्रम्हपुरीच्या छावणीतून बाहेर पडता येईना. औरंगजेब बादशहा आणि मोगल राजवट ही आशिया खंडातील बलाढ्य राजवट होती. संताजी घोरपडे यांचा अलौकिक पराक्रमाचा दरारा या राजवटीवर एवढा पडला होता की मोगल सरदार संताजी घोरपडे यांच्या बरोबर युध्द प्रसंग पडल्यावर ते युध्द टाळण्याचा प्रयत्न करत. अशा या नर शार्दुल रणधुरंधरास स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांकडून मुजऱ्यास न येणे पासून ते ममलकतमदार ह्या पदवी पर्यंतचा प्रवास म्हणजे संताजी बाबा. संताजी घोरपडे यांच्या जीवनावर आधारित असलेली, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू उलगडणारी कादंबरी म्हणजे संताजी घोरपडे जफतन मुलूख.
-
Eklavya (एकलव्य)
दुमदुमत्या आसमंताला निठेपुढं झुकायला लावणारा, स्वअध्ययनान धनुर्विद्या मिळवणारा, कुळभेदाच्या जाचक भिंतींना तोडून सर्वश्रेष्ठ धनुर्धर होणारा निषाधराजा एकलव्य ! महाभारतातलं असं एक पात्र जे कुरुक्षेत्रावरच्या युद्धामध्ये असतं तर त्या युद्धाचं चित्र कदाचित बदललं गेलं असतं. एकलव्यानं गुरुदक्षिणेत अंगठा गुरू द्रोणाचार्य यांना दिला, त्याच्या निष्ठेनं सर्वांना भुरळ घातली. अशी गुरुदक्षिणा देऊन साहस, त्याग, निष्ठा व समर्पणाच्या जोरावर परत पर्वतासारखा उभा राहून एकलव्यानं आदर्श निर्माण केला. भुंकणाऱ्या कुत्र्याच्या तोंडात फक्त आवाजाच्या दिशेनं बाण मारून लक्ष्यवेध करणारा एकलव्य बाणावर इतकं नियंत्रण असणारा महाभारतातला एकमेव धनुर्धर म्हणजे एकलव्य! तो एक बुद्धिमंत हुशार राजा होता, त्यांनीही अनेक युद्ध लढली. युद्धात कृष्णालाही नमायला लावणारा तो एक शक्तिशाली धनुर्धर आणि योद्धा होता. एकलव्य ही कादंबरी वाचल्यावर आपल्या मनाजवळ असलेला राजा. एकलव्य आपल्याला निश्चित सापडेल.
-
Rayari (रायरी)
एकविसाच्या शतकातील युवक नेमका कशाच्या आहारी जातोय ? महापुरूषांबद्दल तो काय विचार करतोय ? गाव पातळीवरील राजकारणात त्याचे अस्तित्व काय आहे ? महिलांवरील अत्याचार कसे पाठीशी घातले जातात ? युवाशक्तीचा वापर कोण व कसा करून घेतोय ? महापुरूषांच्या अस्मितांचा वापर स्वार्थासाठी कसा होतोय ? शेतकऱ्यांना राजा मानणाऱ्या समाजात सध्या त्याचे स्थान कुठे आहे ? सर्वसामान्य जनतेवर अन्याय का केला जातोय ? राजकारण नावाचे शस्त्र रयतेच्या संहारासाठी का संरक्षणासाठी ? रयतेला नासवायचे आणि नागवायचे पाप कुणाचे ? लोकशाहीतली खुर्ची कोण ठरवत ? खर प्रेम काय ? सामान्य जनतेने ठरवले तर काय होऊ शकतं ? काळ बदलण्याचे सामर्थ्य कुणामध्ये आहे ? खरे शिवभक्त कोण ? या सर्व प्रश्नांची उत्तरे म्हणजे 'रायरी' आहे.
-
Mansik Aaghat Samjun Ghetana (मानसिक आघात समजून घेताना)
'मानसिक आघात समजून घेताना' हे पुस्तक मानसिक आरोग्यावर गांभीर्याने भाष्य करते. या पुस्तकाचे धागे माझ्या व्यक्तिगत आयुष्याशी जोडले जातात. मी शिक्षण घेत असताना आणि करियर करत असताना गुन्हेगारी, तुरुंगवास, व्यसन, बदनामी आणि त्यातून सावरताना नकारात्मक भावना अनुभवल्या होत्या. त्यामुळे झालेला मानसिक त्रास मी सहन केलेला आहे. मागच्या पाच-दहा वर्षांपासून अपराधीपणा, भीती, दुःख आणि राग या टोकाच्या भावना मी अनुभवल्या आहेत. त्या वेळी मला योग्य मार्गदर्शन मिळाले नाही, परंतु या पुस्तकाच्या माध्यमातून माझ्यासारख्या अनेकांना मार्गदर्शन मिळेल. माझ्या आयुष्यातली जी वर्षे भयाण अंधारात गेली, त्याला त्यांना सामोरे जावे लागणार नाही. पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात लेखिकेचे व्यक्तिगत जीवन आपल्यासमोर उलगडत जाते. त्यांचा खंबीरपणा, आत्मविश्वास, जिद्द, प्रामाणिकपणा, मेहनत आणि हार न मानण्याची वृत्ती याबद्दल कौतुक वाटते. कारण अशा परिस्थितीतून सावरताना माणूस व्यसन, गुन्हेगारी आणि गैरवर्तनाला बळी पडतो. पण अशा कुठल्याही आमिषांना बळी न पडता त्यांनी मानसिक आघाताशी धैर्याने दिलेला लढा प्रेरणादायी आहे. 'जवळच्या व्यक्तीचा मृत्यू' हा आघात सहन करताना अनुभवायला येणारी 'शोक' ही भावना शरीर व मन यावर कसा परिणाम करते, हा सहसा न बोलला जाणारा विषय या पुस्तकात सोप्या पद्धतीने समजावून सांगितला आहे. एकूणच आजच्या धकाधकीच्या काळात मानसिक आरोग्याचे महत्त्व ठळक करणारे हे पुस्तक आहे.
-
The Last Courtesan (द लास्ट कोर्टेसान)
१९९३ मधील बो बाजार बॉम्बस्फोटामुळे कोलकाता येथील व्यस्त व्यावसायिक जिल्ह्यातील कोठा संस्कृतीचा अंत झाला. पुढच्या काही वर्षांत डान्स बार आणि डिस्को म्युझिकने मुजरा, कथ्थक आणि ठुमरी या जुन्या काळातील मंत्रमुग्ध करणाऱ्या कलांची जागा घेतल्याने तवायफांनी आपला व्यवसाय सोडण्यास सुरुवात केली. रेखाबाई या तवायफसमोर अनिश्चित भविष्यकाळ उभा ठाकला होता. तिने कुठे जावे? तिने पुढे काय करावे? रेखाबाई मुळात कंजारभाट जमातीतील. तिला अत्यंत कोवळ्या वयात विकले गेले आणि तवायफ बनण्याचे धडे दिले गेले. १९८० च्या दशकात कोठ्यांना अभिजात कलेचा मान मिळत नव्हता. तो अदाकारीच्या वेषात असलेला वेश्याव्यवसाय आहे, अशी समाजाची समजूत होती. त्यामुळे तवायफच्या कलेला नाकारले गेले. अशा काळात रेखाबाईंनी कलकत्ता आणि बॉम्बेमध्ये एक गायन- नृत्य करणारी प्रसिद्ध कलावंत म्हणून नाव कमावले. तो एक काळ होता, जेव्हा तिला बंदुका, गुंड आणि गालिबच्या गझलांना हुलकावणी देऊन स्वतःची नियती घडवायची होती. मोठ्या कुटुंबाचा गुजारा करायचा होता. शिवाय मुलाला इंग्रजी माध्यमाच्या बोर्डिंग स्कूलमध्ये वाढवायचे होते. या हृदयस्पर्शी आठवणीत, तिने कधीही बेताल न होता आपल्या मुलाजवळ तिच्या जगण्याची भावनांनी ओतप्रोत भरलेली अविश्वसनीय कहाणी प्रामाणिकपणे, औचित्यपूर्ण आणि खेळकर शैलीत कथन केली आहे
-
Ichhamaran Ek Satyakatha (इच्छामरण एक सत्यकथा)
डॉ.भारत लोटे सर हे अतिशय हुशार, निष्णात, शांत, मनमिळावू व प्रेमळ व्यक्तिमत्त्व होते. त्यांना कुणीही आणि कधीही मदतीची हाक मारली तर ते सदैव तत्पर असायचे. अगदी चोवीस तास काम करूनही डॉक्टरांचा चेहरा नेहमी हसरा आणि आनंदी असायचा. संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात गरिबांचा डॉक्टर म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीदवाक्य त्यांनी खरे करुन दाखविले होते. त्यांच्या याच रुग्णसेवेची पोचपावती म्हणून शासनातर्फे २००५ साली त्यांना मानाच्या आनंदीबाई जोशी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ज्या व्यक्तीने स्वतः डॉक्टर असताना रुग्णसेवा हिच ईश्वरसेवा समजून आपलं संपूर्ण आयुष्य लोकांना वाचवण्यासाठी घालवलं, त्याच व्यक्तीला त्याच्या आजारपणात हॉस्पीटलच्या चुकीच्या ट्रिटमेंटमुळे आणि सरकारच्या मदतीच्या अनास्थेमुळे एवढ्या मोठ्या लोकशाही देशात इच्छा मरण मागावे लागणे यासारखी दुसरी शोकांतिका नाही…
-
Faceless Facebook (फेसलेस फेसबुक)
फेसलेस फेसबुक : हा विस्तीर्ण पोकळीतील कुशल माणसांचा सतेज चेहरा आहे. ज्या दोन हातांनी या विश्वनिर्मितीत मोलाचं योगदान दिलं, त्या हातांचं निर्विवाद प्रतिनिधित्व आहे. लेखकाने शोधलेली माणसं केवळ काळजात कोलाहल करत नाहीत, तर आपलं स्वतंत्र घर करुन राहतात. ज्या माणसांच्या कार्यकर्तृत्वाचा इतिहास काळाच्या ओघात नजरेआड होतो, नेमकी तीच माणसं लेखकाला दिसतात आणि लेखक आपल्यासमोर त्यांचं जग रेखाटतो. 'फेसलेस फेसबुक' मध्ये लिहलेली सगळी पात्रं आपल्या अवतीभोवती खोल रुजलेली आहेत. बन्याचदा ती माणसं आपल्या सगळ्यांची सावलीसुद्धा झालेली आहेत. पण आपल्याकडून ती दुर्लक्षिली गेली आहेत. त्या माणसांच्या सावलीची कृतज्ञता लेखकाने शब्दात व्यक्त केली आहे. मनोरंजनाचा विडा उचललेला सोंगाड्या बालम, जुन्या वस्तूंशी नातं जोडलेला संग्राहक भगवान, चळवळ जिवंत रहावी यासाठी अहोरात्र झगडून मेलेला राजाराम, माय भगिनींच्या सेवेला आयुष्य समर्पित केलेला अमोल, कुस्तीसाठी जगलेला आणि बैलांसाठी राबलेला मल्हारी अशी सगळी पात्रं डोक्यात झिणझिण्या आणून सोडतात. काळजाची तार छेडतात. या सगळ्या माणसांना समाजाने न्याय दिला का ? हा सवाल उभा करतात. या सगळ्यांच्या गोष्टी मांडताना लेखकाने केलेली शब्दफेकिची जादू नक्कीच भुरळ पाडते. त्यामुळे हि पात्रं आपलीशी होऊन जातात. जगण्याच्या खोल तळाशी जाऊन माणसांच्या भावभावनांचा शोध घेतात. गावाकडील माणसांच्या जगण्यातली अस्सलता आणि त्यांच्या अफाट कर्तृत्वाची सर्जनशाळा म्हणजे 'फेसलेस फेसबुक' आहे. मला हे पुस्तक प्रचंड भावलंय. त्यामुळेच गेल्या काही वर्षातला 'व्यक्तिचित्रण' मांडणारा उत्तम लेखक म्हणून मी मारुती शिरतोडे यांच्याकडे पाहतो. शरद तांदळे
-
Inuchi Gosht (इनुची गोष्ट)
एका मजुरी करणाऱ्या आईच्या पोटी जन्माला आलेल्या युनुसचा संघर्ष हा आधीच काही कमी नव्हता. वेटर, सेल्समन, सिक्युरिटी गार्ड मिळेल ते काम करत, तो पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत अन् सोबत अधिकारी होण्याचं स्वप्नही बाळगून होता. अशात त्याच्या आयुष्यात नियतीने कॅन्सररुपी घाला घातला. आता इनु मरणार या विचाराने अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं. पण आपल्या इनुकडे लढण्याची अन् आईला सुखाचे दिवस दाखविण्याची उमेदच निराळी होती. आईच्या चेहऱ्याकडे आणि संघर्षाकडे पाहून त्याला जगण्याची नवी उमेद मिळाली. आर्थिक तसेच बाकीच्या असंख्य अडचणी, त्यात अनेक असाध्य रोग एकाच वेळी त्याला झाले, अगदी मृत्यूच्या जवळ पोहोचूनही अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहण्याचा चंग बांधलेल्या इनुने हिंमतीने कॅन्सरवर मात केली. त्याची ही मात फक्त असाध्य आजार झालेल्यांनाच नाही तर माझ्यासारख्या अनेकांना आयुष्याकडे बघण्याची नवीन उमेद आणि दृष्टी तर देतेच पण कोणत्याही परिस्थितीशी लढणाऱ्या प्रत्येकाने स्वानुभव असलेली 'इनुची गोष्ट' वाचावी आणि अंर्तमनात सांगवं की संघर्ष मान्य आहे "कारण अजून मी जिंवत आहे..."
-
Vihirichi Mulgi (विहिरीची मुलगी)
कादंबरी कशाबद्दल आहे ? तर एका बावीस तेवीस वर्षाच्या बंडखोर मुलीची ही कहाणी. या वयात एक विश्वास असतो की मी म्हणेल ते बरोबर, माझ्या आयुष्याचा निर्णय मीच घेणार. तारुण्याच्या उत्साहात आपण आयुष्य घडवायला पाहतो. सगळं व्यवस्थित चाललं आहे म्हणतानाच अचानक सगळे गड किल्ले कोसळतात आणि सोबत आपणही भुइसपाट होऊन जातो. हे कोसळणे प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी घडतेच. पण या पडझडीनंतर पुन्हा स्वतःला उभं करताना, कोणती मूल्यव्यवस्था कामी येते, कोण आपल्याला आधार देतं आणि जगाला सामोरं जात असतानाच स्वतःला ही पुन्हा एकवार कसं समर्थ बनवायचं, अशा प्रकारची ही एका तरुणीची कथा आहे. तरुणीची यासाठी, कारण आपल्या समाजात पुरुष आणि स्त्री हा भेदभाव आजही पाहायला मिळतो. पुरुषांना जे अनेक प्रकारचे स्वातंत्र्य सहज मिळते, स्त्रीची मात्र प्रत्येक ठिकाणी अडवणूक केली जाते. कधी इतर लोक तिला बंधने घालतात तर कधी ती स्वतः च हरवलेल्या आत्मविश्वासामुळे स्वतः ला गमावून बसते. तर भेदभाव करणारी ही समाजव्यवस्था समजून घेत, तिच्यासमोर एक मुलगी कशी स्वतःचे विश्व घडवू शकते, या आत्मशोधाची ही कादंबरी आहे. अनेक वर्षे पुरुष त्यांच्या नजरेतून आपल्याला स्त्रियांची कहाणी सांगत राहिले. पण या पुस्तकात मात्र स्वतः स्त्रीच्या नजरेतून नायिकेची कहाणी सांगितली आहे. तिच्या मनासकट आणि शरीरासकटसुद्धा. ज्या गोष्टी बोलायच्या नाहीत हे सांगितले जाते, त्याच गोष्टी बोलून, बदल घडवून आणायची आशा आहे.
-
when my father...(व्हेन माय फादर...!)
नात्यांची झापडं डोळ्यावर ओढून बसलेल्या समाजाला नात्यांपलीकडे बघण्यासाठी भाग पाडणारी कादंबरी. माणूस विकारांसह जगत आला आहे आणि विकृत वागत आला आहे. बालकांचे लैंगिक शोषण ही सामाजिक समस्या तशी जुनीच आहे. वर्तमान काळ त्याला अपवाद नाही. आपण रोजच तशा बातम्या पाहत असतो, ऐकत असतो, वाचतो. मात्र; या विषयावर व्यक्त होणे टाळतो. बाललैंगिक शोषणाच्या बहुतांश घटनांमध्ये अपराधी ओळखीतला किंवा कुटुंबातलाच असतो. कधी अगदी जवळच्या नात्यातला तर कधी अगदी सख्खा बाप सुद्धा. अशावेळी प्रत्येक आईने कादंबरीतल्या नायिकेच्या आईप्रमाणे कणखर बनून आपल्या लहानग्यांना समजून घेणं अपेक्षित आहे.
-
Case No: 533/2007 (कोइ नं ५३३-२००७)
जेव्हा भूतकाळात गढून जाते सत्य, हतबल होते माणुसकी, बुडून जाते न्यायव्यवस्था आणि उद्ध्वस्त होते खरे प्रेम. तेव्हा उभी राहते ती नियती. निर्माण होतो एक तटस्थ नायक आणि घटीत होतात त्याच्या आयुष्यात अकल्पित, अनाकलनीय अशा घटना. मग सुरु होतो पाठलाग अनेक रहस्यांचा. काळाच्या पडद्याआड लपलेल्या अमानुषतेवर खरंच नियतीच करेल काय योग्य न्याय?
-
Neharu Mithak Aani Satya (नेहरू मिथक आणि सत्य)
पं. जवाहरलाल नेहरूंची जीवनकथा ही भारतीय स्वातंत्र्यलढ्याची आणि स्वतंत्र भारताच्या पुनर्निर्माणाची एक विराट गाथा आहे. युगायुगांपासून आलेलं तुटलेपण आणि परकीय गुलामगिरीतून मुक्त झाल्यानंतर भारत ज्या विचारांच्या बळावर आपलं पाऊल घट्ट रोवून उभा राहिला आणि ज्या विचारांमुळे त्याचं स्वातंत्र्य सुनिश्चित झालं, त्याचप्रमाणे त्याच्या आधुनिकतेला आणि विकासाला ठोस मार्ग उपलब्ध करून दिला, ते विचार पं. जवाहरलाल नेहरू यांचे होते. या विचारांवर मानवमुक्तीची वैश्विक परंपरा आणि भारतीय चिंतनाचा सखोल प्रभाव होता. त्यांच्या जीवन-संघर्षानं त्यांच्या विचारांना आकार आला होता, भारताप्रती संपूर्ण समर्पण आणि सच्च्या प्रेमानं त्यांच्या विचारांना शक्ती दिली होती. बघता बघता पं. नेहरूंबद्दल असत्य आणि संभ्रमाचा एक विराट ढीग रचला गेला, ही खरोखरच एक दुर्दैवाची बाब आहे.
-
Marathyanchya Dakshinetil Paulkhuna (मराठ्यांच्या
श्री शहाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज व छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्यकाळात दक्षिण मार्तात मराठ्यांच्या घडलेल्या घडामोडी व त्यांचे आजचे अस्तित्व यांचा संशोधनात्मक मागोवा. दक्षिण भारतात मराठ्यानी बांधलेले किल्ले, निर्माण केलेल्या राजधान्या, वसवलेली गावे, त्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारी शहरे, मराठ्यांच्या दक्षिणेत झालेल्या लढाया, त्यांच्यावर आधारित शिलालेख, मराठ्यांची समाधी स्थळे अशा अनेक प्रकारची संशोधनात्मक माहिती आपल्याला या या म मधून वाचायला मिळणार आहे. दक्षिण भारताकडे गेल्या काही वर्षात पर्यटक व इतिहास प्रेमींचा ओढा वाढलेला आहे. परंतु सर्वात मोठा प्रश्न असतो तो तिथे जाऊन नक्की काय पहावे, भाषा आणि भूगोल या अडचणींवर मात करता येऊन जास्तीत जास्त किल्ले, मंदिरे, समध्या, शिल्पे, राजवाडे, राजधान्या इ. अभ्यासता यावीत म्हणून इतिहास आणि भूगोलाची सांगड घालून दक्षिण भारतात विखुरलेली मराठ्यांच्या पराक्रमाची यशोगाथा वाचकांच्या भेटीस आणत आहे.
-
Ek Bhakar Teen Chuli (एक भाकर तीन चुली)
एक भाकर तीन चुली’ संकटांतून धीराने मार्ग काढणारी आणि गरिबीशी वाघिणीसारखी लढणारी स्त्री ह्या कादंबरीची नायिका आहे. गाव-खेड्यातील शेतकरी व शेतमजूर स्त्रियांच्या वाट्याला आलेले बेसुमार कष्ट आणि त्यांची हिंमत हा कादंबरीचा गाभा आहे. तिची व्यथा, तिची वेदना, तिचा संघर्ष, या कादंबरीत अनुभवता येईल. नाळ तोडायच्या आधीपासून ते चितेपर्यंत, ज्या स्त्रियांंच्या वाट्याला संघर्ष आला, तरीही ती न हारता न डगमगता लढत राहिली अशा जगातल्या सगळ्याच स्त्रियांना ही कादंबरी समर्पित…
-
Pichkari (पिचकारी)
हे जीवन नक्की कसं जगलं पाहिजे हे सांगणारी एक ज्वलंत, वास्तववादी, उत्कंठावर्धक आणि डोळ्यात अंजन घालणारी कादंबरी…
-
Angulimal (अंगुलीमाल)
अंगुलीमाल इतिहासातील तो क्रूरकर्मा ज्याने शेकडो लोकांच्या हत्या करून त्यांच्या - अंगुल्याच्या (करंगळीच्या) माळा बनवून गळ्यात घातल्या. असा निर्दयी, क्रूर, हत्यारा अंगुलीमाल बुद्धांना तरी का चंद्रासारखा प्रकाशमान वाटला असेल ? हातात खंडा घेऊन प्रतिदिन लोकांची मुंडकी उडवणारा, रक्तपात करणारा अंगुलीमाल बुद्धांच्या एका वचनाने भिक्षुक झाला तरी कसा? मुळात अंगुलीमाल होता तरी कोण ? श्रावस्थीमध्ये कुठून आला? कशासाठी आला? अश्या कितीतरी प्रश्नांच्या उत्तरासाठी अंगुलीमालाच्या इतिहासाची केलेली ही उजळणी!
-
Gadhivarun (गढीवरून)
कृषी-परंपरेतल्या बहुजनांच्या आणि त्यातल्या जराश्या उच्च स्थानावर बसलेल्या किंवा फलाण्या जातीत जन्म घेतल्यामुळे आपण उच्च स्थानावरच आहोत, असं समजून वागणाऱ्या माणसांच्या आत असलेले मानसिक-सामाजिक-सांस्कृतिक आणि राजकीय गंड यांना हात घालणाऱ्या कथा या संग्रहामध्ये बहुसंख्येने आहेत. आपलं वर्तमान केवढं अशक्त आहे, यापेक्षाही आपला इतिहास केवळ दिव्य होता हेच सांगण्यात ज्यांना कृतकृत्यता वाटते, किंवा आपण स्वतः किती कर्तृत्वहीन आहोत ही गोष्ट साफ नजरेआड करून आपल्या पणजोबांच्या काळात आपल्या गढीवरून केवढी जबरदस्त सरदारी होती, याच्या खऱ्याखोट्या कथांमध्ये रमून त्या सरदारीचे अवशेष विकून खात राहणं आणि त्यालाच 'खानदानीपण' म्हणत राहणं, यातलं विदारकत्व राजाभाऊ, विनोदाच्या उपरोधाच्या उपहासाच्या माध्यमातून दाखवायला लागतात, तेव्हा ते सामाजिक अंगानेही फार महत्वाचं वाटत राहतं. मराठी साहित्यात मानसपुत्रांची मोठी परंपरा आहे. बाळकराम आणि तिबूनाना किंवा चिमणराव आणि गुंड्याभाऊ वगैरे अतिशय प्रसिद्ध जोड्यांमध्ये या गढीवरून प्रकटत असलेली 'राजाभाऊ' आणि 'तंबूशेठ' ही जोडीही नक्कीच एक वेगळा आणि स्मरणीय ठसा उमटवणारी आहे. एकुणातच या संग्रहाच्या निमित्ताने 'गढीवरून' उतरून एक सशक्त अशी कथात्मक अभिव्यक्ती साहित्याच्या प्रदेशात प्रवेश करत आहे. वाचकांनी उत्सुकतेने स्वागत करावं, असंच हे कथन आहे.