Jag Badal Ghaluni Ghaav ( जग बदल घालुनि घाव)
जातीय दुःखावर उत्तरे शोधता शोधता स्वतःसोबत हजारो दलितांच्या जीवनात सन्मानाची ज्योत पेटवणा-या एकनाथ आवाड यांचे दलित साहित्याच्या प्रवाहात एक पाऊल पुढे टाकणारे आत्मकथन. जगण्याच्या लढाईत आलेल्या यशापयशाची व्यक्तिगत पातळीवरची नोंद यातून या पुस्तकाची वीण तयार होते, तर या लढाईला जातिअंताच्या लढाईचं परिमाण लाभल्यामुळे एका सार्वजनिक चळवळीचा इतिहास त्यातून प्रतिबिंबित होतो. जातिअंताच्या लढाईत समाज किती पुढे सरकला, या प्रश्नाचं उत्तर काहीसं निराशाजनक आहे, तरी पण हे स्वकथन कार्यकर्त्यांना निराश करत नाही. कारण मुळात ज्याच्याविरुद्ध आपण लढाई सुरू केली तो शत्रू किती बलवान आहे हे समजून-उमजून ही लढाई केल्यामुळे इथला पराभवसुद्धा चळवळीतल्या कार्यकर्त्यांला एक वेगळा उत्साह देणारा आहे, याचाच प्रत्यय येत राहतो. या लढाईत स्वजातीच्याच एका माणसाने आवाडांवर प्राणघातक हल्ला करावा आणि एका परजातीच्या प्रौढेने हात जोडून आवाडांची विचारपूस करावी, यातील अंतर्विरोध जातिअंताच्या लढाईतल्या कार्यकर्त्यांना वेगळं बळ देणारा आहे.