-
Narsinha - Hiranya Kashyap Part -2 (नरसिंह - हिरण्य कश्यप भाग - २)
सूडाने पेटलेला हिरण्यकश्यप इंद्राचं राज्य उद्ध्वस्त करू इच्छित होता. परंतु मुलानेच आपल्याला विरोध करण्याचा निर्णय घेतल्यामुळे तो त्रस्त होता. नरसिंह प्रल्हादचा शोध घेण्यास निघतो, परंतु या प्रवासात त्याला त्याचा एक जुना मित्र भेटतो आणि एक प्राचीन विष ज्यामुळे त्याच्या योजनांमध्ये अडथळा निर्माण होतो. क्रोधाने पेटून उठलेली होलिका आपल्या भाच्याचा शोध घेते, परंतु त्याच्या बालपणीविषयीच्या वेदनादायी परिस्थितीबद्दलचं वर्णन तिच्या वाचनात येतं. आणि त्यामुळे आपल्या कृतींवर पुनर्विचार करायला तिला भाग पडतं. हिरण्यकश्यप इंद्राला हरवू शकेल का? होलिका आपल्या भाच्याप्रति असणारा राग विसरू शकेल का? नरसिंह प्रल्हादला शोधू शकेल का आणि त्याच्याबाबतीत सांगितलं गेलेलं भविष्य खरं ठरेल का? हा अद्भुत रोमांचकारी प्रवास बेस्टसेलर लेखक केविन मिसाल यांच्या नरसिंह या पुस्तकत्रयीच्या दुसर्या पुस्तकात सुरूच आहे.
-
Narsinha - Pralhad Part -3 (नरसिंह - प्रल्हाद भाग - ३)
सूड. क्रोध. धार्मिकता. तीन व्यक्ती, नशिबाने एकमेकांशी बांधल्या गेलेल्या, पण प्रभावांमुळे विभक्त झालेल्या. कोण टिकून राहणार? आपल्या आयुष्यात नरसिंहाला इतका राग कधीच आला नव्हता. हिरण्यकश्यपच्या मृत्यूनंतर आता तो काश्यपुरीवर राज्य करत आहे आणि सूड घेण्याची योजना आखण्यातच आपला वेळ घालवत आहे. चेनचेनच्या मृत्यूमागे असलेल्या इंद्रदेवाला मारण्याची त्याने शपथ घेतली आहे. नरसिंहाचा क्रोध जास्तच वाढत असल्याचं जेव्हा प्रल्हादाच्या लक्षात येतं तेव्हा, नरसिंहाने आणखी काही निरपराध लोकांचा जीव घेण्यापूर्वी आणि सर्वत्र अराजकता माजण्यापूर्वी त्याला थांबवायला हवं हे प्रल्हादला जाणवतं. परंतु जे आवश्यक आहे, ते तो करू शकेल? स्वतःला अंधारात न गमवता तो आपल्या एकमेव पित्यासमान व्यक्तीला मारू शकेल? केविन मिसाल यांच्या सर्वाधिक खपाच्या नरसिंह पुस्तकत्रयीच्या या अंतिम पुस्तकात भगवान नरसिंह आणि प्रल्हादच्या हृदयस्पर्शी, प्रेरणादायी आणि थरारक गोष्टीची सांगता होते.
-
Kshama (क्षमा)
पल्लवी, एक उच्चशिक्षित, हुशार, विवाहित आयटियन तरुणी... ऑफिसच्या कामाच्या निमित्ताने ती अमेरिकेला जाते आणि अनपेक्षितपणे तिच्यासमोर उभा ठाकतो चेतन (चेतू), तिचा शाळूसोबती. चेतूचं आणि तिचं परस्परांवर प्रेम असतं; पण काही कारणाने ते लग्न करू शकलेले नसतात. आता तिचं लग्न झाल्यानंतर बऱ्याच कालावधीने ते एकमेकांसमोर आलेत. अविवाहित असलेला चेतू अजूनही तिच्यावर तेवढंच प्रेम करतोय. तिच्या अमेरिकेतल्या मुक्कामात ते परस्परांवर प्रेमाची मुक्त उधळण करतात, अर्थात मर्यादा सांभाळून; चेतू तर तिच्याशी लग्न करायलाही तयार असतो; पण ती संसार आणि प्रेम या द्वंद्वात सापडते. शेवटी ती असा निर्णय घेते की चेतूपासून मूल होऊ द्यायचं आणि ते मूल त्यांच्या प्रेमाची निशाणी असेल. तिच्या वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांमुळे तिच्या आईने आत्महत्या केलीय. ती वडिलांना क्षमा करू शकलेली नाही. या पार्श्वभूमीवर ती तिच्या निर्णयाची अंमलबजावणी करते का? भावांदोलनांनी सजलेली व्यामिश्र कादंबरी.
-
Sherlock Holmes Chya Samagra Kadambarya (शेरलॉक होम्सच्या समग्र कादंबऱ्या)
सर आर्थर कॉनन डॉयल (१८५९-१९३०) हे स्कॉटिश लेखक होते. त्यांनी जवळजवळ १२५ वर्षांपूर्वी निर्माण केलेलं ‘शेरलॉक होम्स’ हे काल्पनिक पात्र आजही जगातल्या सर्वांत लोकप्रिय नायकांपैकी एक आहे. त्यांच्या कामाचा आवाका अफाट होता. त्यांनी २००हून अधिक कथा, कादंबर्या, कविता, नाटकं इत्यादींचं लेखन केलं. त्यात शेरलॉक होम्स मालिकेतल्या ४ कादंबर्या आणि ५ कथासंग्रहांचा समावेश आहे. रहस्यकथा-लेखनातला एक मापदंड म्हणून आजही जगभर या कादंबर्या ओळखल्या जातात. त्यांच्या लिखाणावर आजवर अनेक चित्रपट, टीव्ही मालिका, नाटकं रचली गेली आहेत. एक शतकाहून अधिक काळ लोटून गेल्यानंतरही लहान-मोठे वाचक त्यांच्या सुरस आणि चमत्कृतीपूर्ण कथांचा मनमुराद आस्वाद घेत आहेत
-
Samagra Jim Corbett (समग्र जिम कॉर्बेट)
जिम कॉर्बेट वंशाने भारतीय नसले, तरी त्यांचा जन्म भारतातल्या नैनितालमध्ये झाला आहे. तसंच आपल्याला ते ‘वाघांचा शिकार करणारा शिकारी’ म्हणून परिचित असले, तरी ‘शिकार करण्याचा आनंद घेणारा शिकारी’ या घट्ट, निष्ठुर चौकटीत या माणसाला बंदिस्त करता येत नाही. उलट जंगलं, प्राणी, निसर्ग आणि त्याचाच भाग असलेली माणसं असं तो सगळं एकसंध पाहतो. शिकार करतानाची जिम कॉर्बेटची तन्मयता जितकी लोभस आहे, तितकीच त्या प्राण्याबाबतची आत्मीयताही! म्हणूनच या थरारक कथा रूढार्थाने आपल्याला हिंसक भावनेचा प्रत्यय देत नाहीत. उलट त्या माणसातला निसर्ग जागा करणार्या किंवा शाबूत ठेवणार्या कथा आहेत. या कथा आजही आपल्याला इतकं वेधून का घेतात? कारण पांढरपेशा जगण्यातला चूक-बरोबरचा फास आणि तो आवळण्यासाठीचे गळे या कथांना ठाऊक नाहीत. यांच्या ठायी नर्मविनोद आहे, पण त्यांना उपेक्षा करणं माहीत नाही. त्या उघड्या तोंडाच्या गोष्टी आहेत. राग-लोभासहित माणसातला निसर्ग आणि निसर्गासकटचा माणूस पोटात घेणार्या गोष्टी आहेत. म्हणूनच त्या वाघांच्या शिकारीच्या उत्कंठेसाठी वाचल्या जात असल्या, तरी निश्चितच फक्त वाघांपुरत्या मर्यादित राहत नाहीत... स्वतःतल्या खोल जंगलात उतरायला त्या आपल्याला भाग पाडतात. सुप्रसिद्ध शिकारी व निसर्गसंवर्धक जिम कॉर्बेटच्या अजरामर जंगल कथा.
-
Devi Rakshati Rakshita (देवी रक्षति रक्षितः)
''ऐं ह्रीं क्लीं चामुंडा विच्चै...'' जोरजोरात मंत्रोच्चारण सुरु होते. समोरच कालीमातेची एक मोठी मूर्ती उभी होती. त्या मूर्तीकडे बघूनच भल्या भल्यांच्या हृदयाचा ठोका चुकत असेल. मूर्तीच्या गळ्यात वेगवेगळ्या माळा दिसत होत्या. त्यातल्या फुलांच्या माळा तिला ओळखू आल्या. पण बाकीच्या माळा एवढ्या दुरून तिला ओळखू येत नव्हत्या. त्या ओळखू याव्यात अशी तिची इच्छाही नव्हती. त्या विचारानेच जणू तिला अचानक थंडी वाजू लागली. तिने ओढणीने अंग झाकून घ्यावे म्हणून हात हलवले. ओढणी शोधतानाच तिला अचानक आपल्या अंगावर एकही वस्त्र नसल्याचे जाणवले. फुलांचा येत असलेला मंद सुवास आणि अंगाला होणारा थंडगार स्पर्श फक्त फुलांच्या माळा आपल्या शरीरावर असल्याची जाणीव करून देत होत्या. भितीने, शरमेने तिच्या अंगावर शहारा आणि डोळ्यात पाणी आले. तिला इथून निघून जायचे होते. पण पायात जणू मणाच्या बेड्या होत्या. तिचे पूर्ण अंग कशालातरी जखडले होते. इथून सुटका होणे अशक्य होतेच पण अंगावर वस्त्रही नसल्याने सुटकेची छोटीशी आशा जी मनात होती ती ही मावळली होती. समोर होमकुंड धगधगत होते. एकजण देवीची जोरजोरात प्रार्थना करत होता. त्याचा चेहरा मात्र तिला दिसत नव्हता. समोर एक रेडा बांधलेला होता. तिथे एक बलीवेदी दिसत होती. त्या रेड्याचे भवितव्य तिला क्षणार्धात कळले. त्या रेड्याला समोर आणले गेले. ते खड्ग उचलले गेले. न राहवून ती जोरात किंचाळली.. "थांबा...". देवी रक्षति रक्षित: कादंबरीचे कथानक स्वप्नातील कालीमातेच्या मूर्तीसमोर घडणाऱ्या एका प्रसंगापासून सुरु होते. 'आता काय होणार?', असे वाटत असतानाच कळते की हे एक स्वप्न होते. इथेच कथेच्या नायिकेची भेट होते, ती म्हणजे शांभवी! संवादादरम्यान तिचा भाऊ अष्टमीचा उल्लेख करतो आणि खऱ्या अर्थाने कथेतील गूढ निर्माण व्हायला सुरुवात होते. पुरातत्व विभागात काम करणारी शांभवी, तिचे आईबाबा, भाऊ पार्थ, मैत्रीण जयंती, अपघातामुळे ओळख झालेला कपिल आणि शांभवीचा बॉस असलेला रूद्र या निवडक पात्रांभोवती फिरणारे हे कथानक आहे. नेमकीच पात्रे अधूनमधून भेटीला येतात आणि कादंबरीत सुटसुटीतपणा जाणवतो. अधूनमधून झलक दिसणारा 'तो' म्हणजे नक्की कोण? ,स्वप्नात दिसणारे पुसट चेहरे कोणाचे? हे प्रश्न कादंबरीच्या शेवटापर्यंत विचार करायला पुरतात. शांभवीच्या वडिलांनी केलेला खुलासा, कपिलकडून झालेला शक्तीपीठाचा उल्लेख, शांभवीच्या मनातील विचारमंथन अन् प्रश्न आणि एका अघटितातून सुरू झालेला प्रवास कथेला रंजक वळणावर घेऊन जातो. परिस्थितीने आणलेल्या एका वळणाची सुरुवात पुन्हा एकदा शक्तीपीठापासूनच होते. आईबाबांचा मृत्यू, शांभवीचे अटक वॉरंट, नाशिकला जाणे, हे सगळे पूर्वनियोजित होते की खरोखरच वेळेनुसार घडत होते? प्रवास आणि त्यात डोक्यात विचारांचे काहूर माजलेली शांभवी पाहून नकळत मनातील हळवा कोपरा जागा होतो. हळूहळू उलगडणारी शक्तीपीठे, शिव-सतीची कहाणी, इतरही पौराणिक कथा, संदर्भ, काही ज्ञात तर काही अज्ञात गोष्टी, जरी आधी ऐकले वाचले असतील किंवा नसतीलही, तरी वाचकाला खिळवून ठेवतात.मठपतींच्या मंत्रातून मिळालेला मार्ग आणि दशमहाविद्यांच्या दिशेने नव्याने सुरू झालेला प्रवास वाचकाला या प्रवासासोबत जोडून ठेवण्यात यशस्वी ठरतो. नाशिक, पाथर्डी, तुळजापूर, कोलकाता, आसाम, उमानंद द्वीप, पुरी,... अशी ठिकाणे असोत किंवा मग नवनाथ, दीन महाराज मठ, कालीमाता, भैरव, कालिका, बामाखेपा, कामाख्या, उमानंद, दशावतार, पंचायतन, दशमहाविद्या, विमला, जगन्नाथ, तारातारिणी,.. इ. असोत, प्रत्येक वेळी काहीतरी नवा उलगडा होतो. मधूनच जयंतीची शंका घ्यायला लावणारी झलक, तर मधेच शंका वाढवणारा कपिल जाणवत राहतात. रूद्र नावाचा रहस्य दडवणारा खडूस बॉस नक्की रक्षक की भक्षक? हे सर्व तर कादंबरी वाचल्यावरच समजते. शेवटाकडे आल्यावर पुन्हा एकदा तोच मंत्र पडद्यासमोर येतो आणि या रहस्यमय वातावरणावरचा पडदा दूर होतो. शेवटी फायद्याशिवाय कोणासाठी काही करणारे दुर्मीळच! त्यामुळे 'आपल्या' चेहऱ्यांमागचे कपटी चेहरे आणि रहस्यमय वागण्यामागचे 'आपले' चेहरे याचा अंदाज बांधणे कठीणच... शिवशक्तीचे मिलन आणि 'देवी रक्षति रक्षितः' शीर्षकाला साजेसा असा कादंबरीचा शेवट मनाला भिडतो. सोबतच शेवटी मात्र लेखिकेने एका नव्या अध्यायाचे धागेदोरे सोडले आहेत.