-
Vivekvad (विवेकवाद)
विवेक म्हणजे विवेचक शक्ती किंवा भेद करण्याची शक्ती. सत्य आणि असत्य, चांगले आणि वाईट, न्याय आणि अन्याय इत्यादींचा भेद ओळखण्याची ती शक्ती आहे. आज सर्व मूल्यांचा कल्लोळ होत असताना माणसाने या शक्तीचा उपयोग करण्याची गरज आहे. अशा प्रकारे केलेल्या वर्तनाचा आणि त्यामागील तत्त्वज्ञानाचा सांगोपांग विचार या पुस्तकात केलेला आहे.
-
Shankhatala Manus (शंखातला माणूस)
कथारचनेच्या विविध शक्यतांशी खेळणे हा रंगनाथ पठारे यांचा स्वभाव. मराठीत खूप कमी लेखकांनी कथेच्या रचनेच्या अंगाने तिच्याशी संवाद साधल्याचा दिसतो. कथा एक सत्त्वशोध आणि समकालीन वास्तवाला दिलेली तीव्र प्रतिक्रिया. स्वतःत चाललेली जीवघेणी घालमेल. रंगनाथ पठारे यांच्या प्रत्येक कथेत ही घालमेल प्रत्ययाला येते. ही घालमेल वाचकाला खूप आत आत आवर्तात घेऊन जाते. पठारे मराठी लघुकथेला कथेच्या मूळ स्वरूपाकडे घेऊन जात आहेत. रूढ पारंपरिक कथासमीक्षा दृष्टीस हा प्रकार आकळणे थोडे कठीणच. पण पन्नास वर्षांनंतर जो वाचक `गांधीजी अकरा सप्टेंबर 2001’ ही गोष्ट वाचेल तेव्हा या लेखकाच्या असाधारण प्रतिभाशक्तीची प्रगल्भता जाणवू शकेल. पठारे मौखिक परंपरेतील ज्ञानसंक्रमणाचे साधन म्हणून निर्मित झालेल्या कथापरंपरेस पचवून इथल्या मातीच्या कथा रचत आहेत, हे हा संग्रह वाचून प्रत्ययास येते. - राजन गवस
-
M T Aayava Maru (एम टी आयवा मारू)
एम टी-मोटर टॅंकर म्हणजे यंत्रचलित द्रववाहक. `मारू’ म्हणजे जहाज. `आयवा मारू’ या जपानी शब्दांचा अर्थ – प्रेम आणि एकरूपता यांच्या भावुक चेतनेचे जहाज. `एम टी आयवा मारू’चे कथानक हॉंगकॉंगच्या किनार्यावर सुरू होते. चीनच्या किनार्यावर वेग घेते. फिलिपीन्सच्या किनार्यावर रंगू लागते... `एम टी आयवा मारू’ हा प्रेम-द्वेष, मत्सर-घृणा या भावभावनांचा जिवंत झंझावत आहे. पंचमहाभूतांचे जीवघेणे वादळ आहे. ही कादंबरी वाचताना एकच विचार सतत मनात येत राहीलः ही काल्पनिक कादंबरी आहे? की सत्य घटनांचे विवेचंन आहे? ही कादंबरी वाचताना जर सागराने आभाळात भिरकावलेली `आयवा मारू’ तुम्हांला स्वतःला दिसली असेल, जर लाटांचे तांडव तुम्ही स्वतः अनुभवले असेल, जर वार्याचे घोंघावमे तुम्हांला स्वतःला ऐकू आले असेल, जर `आयवा मारू’ ने तुम्हांलाही झपाटले असेल, तर ही `आयवा मारू’ केवळ कल्पित असणे शक्य आहे का?
-
Sun Ja Dil Ki Dasta (सुन जा दिल की दास्तां…)
ससंगीत…, मन, संवेदना, स्पंदनांना मदहोश करणारे अभिव्यक्तीचे एक अत्यंत सुमधूर माध्यम. या माध्यमाला इतक्या कलात्मक लडिवाळपणे सांभाळणारा कलेचा खरा प्रामाणिक उपासक मला आजपर्यंत भेटला नव्हता. संगीताच्या अनुभूती अनुभवतांना देश, भाषा वा कोणत्याही सीमा व्यक्तीला जाणवत नाहीत. एख विशुद्ध आनंद समरस होऊन लुटायची तयारी असणारे मन ज्याच्याठायी आहे त्याने हे सीमातीत सुख भान हरवून उपभोगावे. जयंताचा छंद जणु सुचवतोय- जपण्यासारखे खुप आहे. व्यक्तीचे मन, आवडी-निवडी, भावना, संस्कृती, परंपरा, मूल्य, कला आणि बरेच, बरे… जयंताच्या व्यक्तित्वात आस्था आहे, व्यवहारात माणुसकी आहे, प्रयत्नांना निश्र्चित उद्देश आहे, तथ्यपूर्ण, अर्थपूर्ण लयबद्ध शोधण्याची, जपण्याची ओढ आहे. या सुरांच्या भागीदारीत कशाची अपेक्षा नाही. हृदय, संवेदना, स्पंदनांना जिंकणार्या सुरांच्या बेसुमार वैभवायचे रंग ज्याच्या जीवनात मिसळले आहेत त्या जयंताची भेट घ्या आणि जीवनातील सहजतेत स्वाभाविकपणा शोधण्याची कला शिकून घ्या. जयंत तुम्हाला कानमंत्र देतील ते स्वतःला विसरून जगण्याचा आणि तुमचा निरोप घेतांना दिलखुलास हंसून तुम्हाला ऐकवतील… ``हम है और आपकी खुशी है आजकल, जिंदगी, जिंदगी हैआजकल…’’ त्या क्षणी तुमच्या जागी मी असेन तर निश्र्चित म्हणेन… “My Hats off to You Jayant…!”
-
Hema Tobiyam Ji ('हेमा टोबियम जी')
डॉ. गाडगीळांनी त्यांच्या गुहागर जवळच्या गिमवी गावातील एका असाध्य रोगावर संशोधन करून लास शोधून काढली. डॉ. गाडगीळांनी त्यांच्या ८८ वर्षांच्या दीर्घ आयुष्य प्रवासाची सांगितलेली सध्या व रसाळ भाषेतील ही सरस आत्मकथा, जेष्ठांना भूह्ताकालात नेणारी व तरुणांना मार्गदर्शक ठरणारी...
-
Cancel (कॅन्सल)
कथाकार आणि कादंबरीकार म्हणून मनोहर तल्हार यांना मराठी वाङ्मयात महत्त्वपूर्ण आणि आगळेवेगळे स्थान प्राप्त झाले आहे, ते त्यांच्या ‘माणूस’ या कादंबरीने आणि विपुल कथालेखनाने. त्यांच्या कथेचे परिशीलन करताना ती जीवनाची समग्रता शोधताना दिसते. विविध स्तरांतील जीवनाचा वेध ती सारख्याच मन:पूर्वकतेने घेताना दिसून येते. कथाविषयाकरिता किंवा कथेतील जीवनदर्शनाकरिता ती स्वत:वर कुठलीही बंधने लादून घेत नाही. तशीच ही कथा स्वत:वर कुठलाही तत्त्वविचार, मतप्रणाली लादून घेत नाही. जीवनदर्शनातील ही निकोपता विरळाच म्हणता येईल. मनोहर तल्हार यांच्या कथेतील व्यक्ती सर्वार्थाने जीवनाला सामोर्या जाणार्या आहेत. समृद्ध जीगिषेने त्या जीवनाकडे पाहतात. जीवनसंघर्षात या व्यक्ती अनेकदा पराभूत होतात, हताश होतात; पण तरीही पराभवावर मात करण्याकरिता जटायूप्रमाणे ह्या व्यक्ती संकटांवर तुटून पडतात; रक्तबंबाळ होतात. ह्या संघर्षात मग पराभवाची क्षीणशी जाणीवही त्यांना नको असते. कारण जीवनाच्या सश्रद्ध संघर्षातूनच पुढच्या विजयाच्या पाऊलखुणा त्यांनी ह्या प्रक्रियेतून उमटविलेल्या असतात. स्वत:च्या जीवनेच्छेबरहुकूम नव्या अस्तित्वाच्या पायवाटा निर्माण करणार्या या कथांमधील व्यक्ती मनोहर तल्हारांच्या पृथगात्मतेची आणि असीम जीवनश्रद्धेची निश्चितच प्रतीती देणार्या आहेत. - डॉ. रवीन्द्र शोभणे