-
Picasso (पिकासो)
पिकासोचे कलाजीवन जितके रोमहर्षक तितकेच त्याचे प्रेमजीवनही चित्तथरारक ! फर्नान्द ऑलिव्हिए आणि फ्रान्स्वाज गिय्यो यांच्यासारख्या त्याच्या प्रेयसींनी त्याच्याबरोबर व्यतीत केलेल्या दिवसांच्या सुरस आणि चमत्कारिक कहाण्या लिहून ठेवलेल्या आहेत. जाकेलीन रॉकसारख्या सहधर्मचारिणीने पिकासोच्या उतारवयात त्याची नेकीने साथ केली. ज्या दिलदारपणाने आपल्या मुलाबाळांचा सांभाळ केला त्याच नेकीने त्याने शिल्पकला, मुद्राचित्रे आणि मातीकाम या कलांना आपले सर्वस्व वाहिले. विसाव्या शतकाच्या कलेच्या इतिहासात पिकासो एखाद्या उत्तुंग खडकासारखा उभा आहे. नव्वदपेक्षा जास्त वर्षे कार्यक्षम राहिलेल्या या अलौकिक कलावंताच्या जीवनाचे आणि प्रतिभेचे रहस्य शोधून काढण्याचा हा एक सच्चा प्रयत्न आहे.
-
Bonsay (बॉनसाय)
आधुनिक काळात अनीतिमान व्यवहाराला प्रतिष्ठेचे स्वरूप येऊ लागले आहे. स्वाथी मनोवृत्ती वाढू लागली आहे. मोठ्या मानाच्या प्रतिष्ठेचा जागेवर फार छोटी, खुरट्या मनोवृत्तीची, अनीतिने वागणारी माणसे स्थानापत्र होऊ लागली आहेत... शिक्षण-क्षेत्रातही नैतिक मूल्यांची घसरण होत आहे. सत्तास्पर्धा, भ्रष्टाचार शिक्षणक्षेत्रात बोकाळला आहे. शिक्षणक्षेत्रातील अशा भ्रष्ट व्यवहाराचे चित्रण सुभाष भेण्डे यांनी समर्थपणे `बॉनसाय’ या कादंबरीतून केले आहे. -विश्र्वनाथ शिंदे शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर कादंबरीतील प्रसंग, प्रसंगांचा तपशील, त्यांत वावरणारी आणि भाग घेणारी पात्रे कादंबरी वाचत असताना माझ्या डोळ्यांसमोर पिंगा घालत होती. त्यातील प्रत्येक पात्र पुणे विद्यापीठातीलच आहे, असा मला भास होत होता. कादंबरीमध्ये विद्यापीठ कारभाराच्या अनेक प्रकरणांचे पुरेपूर प्रतिबिंब पडलेले आहे हे कोणाही जाणकाराच्या सहज ध्यानात येईल. प्रा. एन. सी. (शरद) जोशी कार्यकारिणीचे माजी सदस्य, पुणे विद्यापीठ आशय, विषय आणि मांडणी या सर्वच दृष्टींनी कादंबरी सुदृढ झाली आहे. अशा लेखनातून आत्मिक समाधानाबरोबरच चिंतनाला एक दिशासुद्धा मिळत असते यात शंका नाही. - प्रा. सदानंद देशमुख - जानेफल, जि. बुलढाणा `बॉनसाय’मधील प्रवृत्ती मूलतः मानवी प्रवृत्ती आहे. आजही ही किडलेली प्रवृत्ती समाजातील इतर क्षेत्रांप्रमाणे पवित्र समजल्या जाणार्या विश्र्वविद्यालयातील शैक्षणिक क्षेत्रात कशी फोफावली आहे याचे अत्यंत प्रत्ययकारी चित्रण या कादंबरीत आले आहे. - प्रा. विद्या प्रभुदेसाई - फोंडा, गोवा
-
Attar Aani Gulabpani (अत्तर आणि गुलाब पाणी)
ललितलेखक रवींद्र पिंगे हे हरहुन्नरी लेखणीचे धनी आहेत. व्यक्तिचित्रं रेखाटणं हा त्यांचा हातखंडा. जयवंत दळवी, प्रभाकर माचवे, हमीद दलवाई, सुमती पायगावकर, सेतु माधवराव पगडी अशा भिन्न पिंडांच्या साहित्यसेवकांची ही जिवंत दर्शनं. आस्वादक दृष्टिकोन, माहितीचे बारीकसारीक कण आणि स्वयंभू बाजाची आकर्षक भाषाशैली हे पिंगे ह्यांचे व्यक्तिरेखाटनाचे विशेष आहेत.
-
Shantaram Paritoshik Katha (शांताराम पारितोषिक कथा
मराठीतील सुप्रसिद्ध कथाकार प्रा. के. ज. पुरोहित ऊर्फ शांताराम यांच्या नावे दरवर्षी सर्वोत्तम कथेला दिल्या जाणार्या `शांताराम कथा पारितोषिक’ योजनेला आता पंधरा वर्षे पूर्ण झाली आहेत. इतक्या सातत्याने मराठी कथेसाठी दिले जाणारे हे एकमेव पारितोषिक आहे. गेल्या पंधरा वर्षांत मराठी कथेने जी वेगवेगळी रूपे धारण केली आणि वेगवेगळ्या जीवनानुभवांचे जे कवडसे कथांद्वारे साकार केले ते पाहता भिन्नभिन्न कथाकारांनी लिहिलेल्या `शांताराम कथा-पारितोषिक’प्रांप्त गुणवान कथांचा प्रस्तुत संग्रह म्हणजे विविध रंगरूपांनी विनटलेले मराठी कथाविश्र्वातील मनोहर इंद्रधनुष्य आहे. मराठी कथासाहित्य समृद्ध करणारे या संग्रहातील सुमेध वडावाला रिसबूड, प्रिया तेंडुलकर, रोहिणी कुलकर्णी, आशा बगे, प्रकाश नारायण संत, मेघना पेठे, अनुराधा चिन्मुळगुंद, संजीव लाटकर, राजन खान, राजन गवस, मधुकर धर्मापुरीकर, मोनिका गजेंद्रगडकर, लक्ष्मण लोंढे, श्रीरंग विष्णू जोशी, माधुरी शानभाग हे सर्व कथाकार शांताराम कथापारितोषिकाचे मानकरी आहेत. समकालीन मराठी कथेच्या स्वरूपाचे यथार्थ दर्शन घडविणारा हा संग्रह केवळ वाचनीयच नाही तर संग्राह्य आहे.
-
Ek Manus Ek Divas:2 (एक माणूस एक दिवस भाग : २)
एखाद्या प्रसिद्ध, नामवंत व्यक्तीबरोबर एखादा दिवस घालवून त्याबद्दल लेख लिहिण्याची ह. मो. मराठे यांची कल्पना एकदम अभिनवच ठरली. `घरदार’ मासिकातून ही कल्पना त्यांनी राबवली. हे लेख प्रसिद्ध होऊ लागले आणि वाचक अत्यंत उत्सुकतेने आणि चवीने ते वाचू लागले. एक लेख वाचून झाला की पुढल्या महिन्यात हमो कोणत्या प्रसिद्ध व्यक्तीच्या भेटीला आपणाला नेताहेत याची वाटच वाचक बघू लागले. कारण, या लेखातून आपणच त्या व्यक्तीच्या सहवासात एखादा दिवस घालवतो आहोत असा अनुभव वाचकांना येऊ लागला. या लेखांच्या रूपाने `पर्सनॉलिटी रिपोर्ट’ चा एक नवा फॉर्म हमोंनी पत्रकारितेला दिलाच, पण त्यांनी शैलीही अशी सिद्ध केली की हे लेख `वृत्तपत्रीय लेखना’च्या पातळीवरून वर उचलेले गेले आणि त्यांना व्यक्तिदर्शनात्मक वाङ्मयीन लेखांचे मूल्य प्राप्त झाले! हमो मराठे यांनी `किर्लोस्कर’मध्ये लिहिलेल्या त्याच लेखमालेतील लेखांचा हा दुसरा भाग! या भागात वाचाः मुख्यमंत्री मनोहर जोशी, प्रमोद नवलकर, जयंत नारळीकर, बाबा आढाव, विक्रम गोखले, प्रभाकर पणशीकर, शरद जोशी इत्यादी व्यक्तींबरोबर एक दिवस घालवून लिहिलेले लेख.
-
Ek Manus Ek Divas:1 (एक माणूस एक दिवस भाग : १)
एखाद्या प्रसिद्ध, नामवंत व्यक्तीबरोबर एखादा दिवस घालवून त्याबद्दल लेख लिहिण्याची ह. मो. मराठे यांची कल्पना एकदम अभिनवच ठरली. `घरदार’ मासिकातून ही कल्पना त्यांनी राबवली. हे लेख प्रसिद्ध होऊ लागले आणि वाचक अत्यंत उत्सुकतेने आणि चवीने ते वाचू लागले. एक लेख वाचून झाला की पुढल्या महिन्यात हमो कोणत्या प्रसिद्ध व्यक्तीच्या भेटीला आपणाला नेताहेत याची वाटच वाचक बघू लागले. कारण, या लेखातून आपणच त्या व्यक्तीच्या सहवासात एखादा दिवस घालवतो आहोत असा अनुभव वाचकांना येऊ लागला. या लेखांच्या रूपाने `पर्सनॉलिटी रिपोर्ट’ चा एक नवा फॉर्म हमोंनी पत्रकारितेला दिलाच, पण त्यांनी शैलीही अशी सिद्ध केली की हे लेख `वृत्तपत्रीय लेखना’च्या पातळीवरून वर उचलेले गेले आणि त्यांना व्यक्तिदर्शनात्मक वाङ्मयीन लेखांचे मूल्य प्राप्त झाले!
-
Saki: Bar Aani Restaurant ( साकी : बार अँड रेस्टॉर
वर्षाला दहा कोटी रुपयांचा संगणकाचा व्यवसाय करणार्या पंकज करुलकरांचा हा तिसरा कथासंग्रह. त्यांच्या ‘डायरी’ कथासंग्रहाला राज्य पुरस्कार व श्री. दा. पानवलकर पुरस्कार मिळाले. मराठीत कसदार व उत्कृष्ट कथालेखन केले जात नाही ह्या विधानाला छेद देणारे त्यांचे लेखन आहे. मुंबईसारखे महानगर हा त्यांच्या लेखनाचा आवडता विषय. साधी व सरळ अर्थवाही भाषा, त्यामधून येणारा समृद्ध आशाय, आयुष्याबद्दलची खोल जाणीव ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये. मराठी लेखक शब्दांमध्ये, भाषेमध्ये अडकतात. कुरुलकरांचे लेखन त्याला अपवाद. ते तुम्हाला विलक्षण अस्वस्थ करते, त्रास देते. त्यांचा आशय अंगावर येतो आणि श्वास गुदमरून टाकतो. पहिल्या वाक्यापासून त्यांची कथा घेरून टाकते. कुठल्याही स्तरातील माणसाबद्दल ते सहजपणे लिहितात ह्याचे कारण मुंबई त्यांनी फार जवळून बघितली आहे. आयुष्यभरात एखादी गल्ली समजली तरी पुरे असे त्यांना स्वत:ला वाटते. त्यांचे लेखन बघता त्यांना मुंबई शहराची दाहक जाणीव आहे ह्याची खात्री पटते. ते कुठल्याही ‘ईझम’चा झेंडा बाळगत नाहीत, माणसाकडे अगदी स्वच्छपणे बघतात. ते वाचकाचे प्रबोधन करत नाहीत, मास्तरकी करत नाहीत. त्यांच्या व्यवसायामुळेही त्यांच्या लेखनात विलक्षण मोकळेपणा आला असेल.
-
Digambaraa (दिगंबरा)
गोव्यातील एका प्रतिष्ठित जमीनदार घराण्यातील ‘दिगंबरा’ ह्या मुलाची ही आत्मनिवेदनपर कादंबरी.लहानपणापासून कष्टात गेलेले बालपण, मॅट्रिकपर्यंतचे कष्टपूर्वक झालेले शिक्षण, वडिलांचा दुरावा, त्यांनी ठेवलेली रखेली, वडिलार्जित बागायती जमीन प्राप्त करून घेण्यासाठी कराव्या लागलेल्या कोर्टकचेर्या, त्यामुळे आईची होणारी परवड. वेगवेगळ्या नोकर्यांतील कटू अनुभव, पायी केलेली गाणगापूर यात्रा, तिथे भेटलेले साधू व संन्यासी व अन्न भिन्न स्वभावधर्मी माणसे, स्वत:च्या प्रेमानुभवाच्या छटा, इतरांचे लैंगिक जीवन यांचे चित्रण या कादंबरीतून येते. या कादंबरीतील निवेदकाचे आध्यात्मिक व अतींद्रिय अनुभव प्रत्ययकारीपणे आविष्कृत झाले आहेत. स्वत:ला आलेले अतींद्रिय अनुभव, अधूनमधून त्या अनुभवांविषयी निवेदकाच्या मतात निर्माण होणारी आशंका, त्याचे स्वप्नदृष्टांत, स्वानुभवांच्या विपरित व विसंगत असणारी त्याच्या सभोवतालची परिस्थिती व त्यामुळे त्याच्या मनाचा होणारा कोंडमारा यांचे वास्तव निवेदन हे या कादंबरीचे बलस्थान आहे.
-
Maharashtrachi Suvarnagatha (महाराष्ट्राची सुवर्णग
महाराष्ट्र राज्याची निर्मिती १ में १९६० रोजी झाली. त्यापूर्वीपासून आजतागायत वसंत (दादा) देशपांडे वृत्तसंकलन करत आहेत. महाराष्ट्र निर्मितीचा सोहळा, महाराष्ट्र विधानसभेचे पहिले अधिवेशन, यशवंतराव चव्हाण यांची भाषणे, सत्ताबदल, आपत्ती व्यवस्थापन आणि संकटांचा मुकाबला अशा विविध अंगांना स्पर्श करत त्यांनी अचूक संदर्भांसह हा ग्रंथ सिद्ध केला आहे. या ग्रंथाची भाषा अथपासून इतिपर्यंत वृत्तपत्रीय आहे. हे लिखाण ललित करण्याचा मोह देशपांडे यांनी टाळला आहे. वृत्तपत्रीय लिखाणात अचूकता, नेटकेपणा आणि कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त माहिती वाचकांपर्यंत पोहोचविणे या तीन घटकांना सर्वाधिक महत्त्व असते. यच तंत्राचा अवलंब देशपांडे यांनी केला आहे.
-
Saitanachi Khushi (सैतानाची खुशी)
राकेश भडंगची कविता विचारपरिप्लुत आहे; पण विचारजड नाही. तो सार्या जगाचे प्रश्न, भावभावना समजावून घेऊ शकतो आणि थेट मानवी अस्तित्वाच्या मुद्यालाच भिडतो. बिकट तत्त्वज्ञान वाटावे अशी ही गुंतागुंत तो कवितेच्या रेषांमधून सरळ मांडत जातो. त्यामध्ये हसण्याखेळण्याची कविता आहे, स्त्रीमुक्तीची कविता आहे, इसापाचीही कविता आहे... राकेश भडंगच्या कवितांचा हा पसारा वाचून त्याच्या आधुनिक दृष्टीचा प्रत्यय येईल आणि वाचकाची समजूत प्रगल्भ होईल...
-
Chidgosh (चिदघोष)
नवकथा ज्या काळात बहराला येत होती, त्या काळात, म्हणजे 1949 साली, ज्ञानेश्वर नाडकर्णी यांनी ‘सत्यकथे’सारख्या दर्जेदार मासिकात आपल्या कथालेखनाला सुरुवात केली. ‘चिद्घोष’पासून ‘प्रस्थान’ पर्यंत या कथालेखनात कधी खंड पडला नाही. अनुभूतीची खोली व विविधता, तंत्राचा जागरूक शोध आणि दीघकर्थेच्या दिशेने वाटचाल ही या काळातील त्यांच्या कथांची वैशिष्ट्ये. त्यांची प्रातिनिधिक प्रसादचिन्हे ‘चिद्घोष’मध्ये दिसतील. आज जवळजवळ चार दशकांनंतरसुद्धा या कथांची टवटवी कार्यम राहिल्याचे लक्षात येईल. कथा, कादंबरी, समीक्षा इत्यादी क्षेत्रांत गेल्या अर्धशतकापेक्षा जास्त काळ कार्यरत असलेल्या ज्ञानेश्वर नाडकर्णी यांच्या ‘चिद्घोष’ या कथासंग्रहास 1966 सालच्या सर्वोत्कृष्ट सहा पुस्तकांस देण्यात आलेल्या ‘ललित’ पारितोषिकांपैकी एक पारितोषिक मिळाले होते.
-
Moun Hoi Bolke (मौन होई बोलके)
'मूकं करोति वाचालम' हे आपण ऐकून असतो. मात्र हा केवळ दैवी चमत्कार नसतो. व्यक्ती मुकी का होते आणि तिला बोलते कसे करता येते यामागे शास्त्र असतेच; पण त्यापेक्षा असते प्रचंड मेहनत आणि माणूस म्हणून दिलेला प्रेमळ आधार. मुंबईत कर्णबधिरांसाठी शाळा काढून रोहिणी लिमये यांनी अनेकांना मुकेपणापासून मुक्ती देऊन व्यक्त होण्याची संधी उपलब्ध केली. कर्णबधिरांसाठी शाळेसह उपयुक्त कार्यक्रम आखले. श्रवण, वाचा व भाषाविष्कारासाठी विविध साधनांची निर्मिती केली. त्यांच्यातला माणूस घडवला. या अथक परिश्रमांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार झाला. स्वत: मूक राहून, आपल्या योगदानातून बोलणाऱ्या ध्यासाची ही कहाणी.