-
Vidyatai Ani (विद्याताई आणि)
महाराष्ट्रात महात्मा फुले आणि महर्षी कर्वे यांनी स्त्री-शिक्षणाची पायाभरणी केली. नंतरची पायरी होती स्त्रीयांचं आत्मभान जागृत करण्याची, समाजास स्त्रीप्रश्नांप्रती संवेदनशील बनवण्याची. हे कार्य हाती घेतलेल्यांमध्ये विद्या बाळ यांचं नाव अग्रस्थानी आहे. प्रथम 'स्त्री' आणि नंतर 'मिळून साऱ्याजणी'चं माध्यम वापरून विद्याताईंनी स्त्रियांमध्ये स्वत्वाची भावना चेतवली. संवाद हे विद्याताईंचं बलस्थान. न पटलेल्या रूढी- रिवाजांशा संघर्ष करणं – तो मात्र पटेल अशा शब्दांत ही त्यांची खास शैली. दृढ कृतीचा आग्रह, पण भाषा मात्र अनाग्रही आणि ॠजू. पुरुषप्रधानतेस विरोध दर्शवतानासुद्धा त्या पुरुषांशी संवाद साधण्यास प्रयत्नशील असतात. म्हणून तर स्त्रीमुक्ती चळवळीतील नेमस्त पंथाचं नेतृत्व आपसूक त्यांच्याकडे जातं. पूर्णवेळ गृहिणी ते पूर्णवेळ कार्यकर्ती हा विद्याताईंचा प्रवास म्हणजेच विद्याताई आणि..
-
Mi Alladiyakhan (मी अल्लादियाखां)
मरहूम उस्ताद अल्लादिया खांसाहेब जयपूर-अत्रौली घराण्याच्या विद्यमान गायकीचे उद्गाते जणू ‘गायनाचे गौरीशंकर' ! त्यांच्या गायकीच्या आजच्या घडीला कार्यरत वारसदारांपैकी डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे सांगत आहेत त्यांची चरितकहाणी. ख्यालगायनाच्या पद्धतीनुसार ‘रागबढत' किंवा ‘उपज' या अंगाने विस्तारत साकारलेली खांसाहेबांची ही जीवनकथा. त्यातून वाचकापुढे उलगडत जातं कधी सौंदर्यपूर्ण, प्रमाणबध्द स्थापत्यासारखं खांसाहेबांचं व्यक्तिमत्त्व, कधी त्यांच्या पारिवारिक आणि गुरुशिष्य नातेसंबंधांचं नाजूक, जरतारी विणकाम. विविध प्रसंगांतून उजागर होतात खांसाहेबांच्या व्यक्तिमत्त्वातल्या मनोहारी रंगछटा. एखाद्या कादंबरीसारख्या सुरस, रोचक घटनांनी भरलेलं हे खांसाहेबांचं ‘ललित चरित्र' म्हणजे रसिक वाचकांना तसेच अभिजात संगीताच्या साधकांना लाभलेली शब्दमैफिलीची पर्वणी.
-
Sahebee Jagat (साहेबी जगात)
भक्तीच्या नऊ प्रकारांत शेवटचा टप्पा असतो अमूर्त पूजेचा, असं त्या क्षेत्रातले जाणकार सांगतात. नवविधा भक्ती म्हणजे पहिला टप्पा मूर्तीच्या वा व्यक्तीच्या पायावर डोकं ठेवण्याचा. असं करत करत नवव्या टप्प्यावर समोर काहीच नसतं, तरी त्या काहीच नसण्याची पूजा करायची, असा. पर्यटनाचंही असंच असावं बहुधा. पहिला टप्पा हातात प्रेक्षणीय स्थळांची यादी घेऊन धावपळ करत यादीबरहुकूम एकेक स्थळ पाहिल्यावर त्या त्या नावासमोर 'टिक' करत जाण्याचा. नववा टप्पा हाती अशी कुठलीही यादी नसताना पर्यटनाचा निखळ आनंदानुभव घेण्याचा ! ताज्या इंग्लंड दौऱ्यात या टप्प्याच्या खूप जवळ जाता आलं, असं म्हणता येईल. इंग्लंडचं अंतरंग उलगडून दाखवणारी अविस्मरणीय सफर !
-
Sandanvaat (सांदणवाट)
सांदणवाट म्हणजे पळवाट नव्हे अथवा चोरवाटही नव्हे, सांदणवाट म्हणजे वेगळी वाट. आयुष्यात कायम वेगळा मार्ग अस्तित्वात असतो, मात्र तो राजमार्ग नसतो. अशी वेगळी वाट निवडून त्यावर निग्रहाने पावले टाकणे हे एक प्रकारे आव्हानही असते अन् संधीही ! जीवनाची सुरुवात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत होऊनही डॉ. पंडित विद्यासागरांनी नंतरच्या आयुष्यात बहुतेक वेळा जाणीवपूर्वक वेगळी वाट निवडली. त्यामुळे वाट्याला आलेल्या विविध अनुभवांचा लेखाजोखा मांडणारे हे प्रेरणादायी आत्मकथन
-
Dhulakshare Te Shalyakaushalya (धुळाक्षरे ते शल्यकौशल्य)
त्याच्याजवळ ना पैसा होता, ना कुणाचे पाठबळ. हातावरचे पोट असलेले आईवडील अन् गरिबीच्या उन्हात उभे राहिलेले घर. पण तो फक्त नावापुरता ‘ज्ञानेश्वर' नव्हता. आपल्या बुद्धिमत्तेला त्याने चिकाटीची धार चढवली. विलक्षण जिद्द अन् अभ्यासाच्या सातत्यातून तो प्रख्यात शल्यविशारद झाला. हा अवघड वळणाचा प्रवास सांगणारी एका समर्पित सर्जनची संघर्षकहाणी...
-
Done That Been There (डन दॅट बीन देअर)
हे भुयार आहे की विवर हे समजत नाही. आणि दिवा दाखवायला कुणी नाही. आठवणींच्या गच्च रानात हरवल्यावर हाक द्यायला कुणी नाही. मडक्यांची पुन्हा माती होताना कुणीच सोबत नाही. आणि या वाहत्या नदीच्या पाण्याचा ठाव घेता येत नाही. हे नीट उमगल्यावर माणूस स्वतःशी बोलू लागतो का ? आणि हे असं स्वतःशी बोलणंच असतं का लिहिणं वगैरे ? लिहिणाऱ्या समोर ठाकणारे असे अनेक प्रश्न.. ज्यांची उत्तरं लिहिणाऱ्याला लिहिता लिहिताच उमगत जातात. दुसरे आपल्याला समजतात, तितके मूर्ख आपण खचितच नसतो. पण आपण स्वतःला समजतो, तितके शहाणेही आपण क्वचितच असतो ! लिहिताना आणि लिहिल्यावर काय काय झालं, यातली तथ्यं मी मांडताना हे शक्य आहे, की 'या तथ्यांच्या जबड्यातून निसटून, सत्य कदाचित् दूर कुठेतरी एकटंच बागडत असेल!'
-
Jeevdan (जीवदान)
त्याने आपल्या आईचा खून होताना पाहिलं. आणि मग त्याने खुन्याला स्वतःच देहांताची शिक्षा दिली. कोण होता तो खुनी ?त्या खुन्याला शिक्षा दिल्यानंतर त्याला बालसुधारगृहात का जावं लागलं ? आपल्या इवल्याशा आयुष्यात काय काय सोसावं लागलं त्याला ! भावनिक आंदोलनं आणि मनोव्यापार यांची धक्कादायक कहाणी साकारणारी शोकांतिका
-
Lust For Mumbai (लस्ट फॉर मुंबई)
परेल-लालबागच्या गगनचुंबी टॉवरबनाखाली गाडलेल्या लाखो श्रमिकांचे हुंदके अन् उसासे... संपाच्या सुलतानीनं गिरणगावाला प्रथम चिरडलं, पाठोपाठ जागतिकीकरणाचा भूलभुलैय्या दाखवून गिरणबाबूंची हाडं नि फासोळया उखडल्या. चोरांची आणि थोरांचीही स्वप्नं एकजीव झाली. मुंबईत अंडरवर्ल्ड आणि ओव्हरवर्ल्डच्या सटिंगनं नंगा नाच ओढवला. शांघाय-सिंगापूरचं कुक्कू लावून चौदा हजार कोटी रुपयांच्या एफएसआयचा बाजार गरम केला गेला ! तुमच्या-आमच्या डोळयांसमोर लुटल्या गेलेल्या लाखो श्रमिकांच्या सार्वत्रिक फसवणुकीची एक काटेरी ठणकती महागाथा...
-
Harit Hindutva (हरित हिंदुत्व)
हिंदुत्वा'ची दोन मूलभूत वैशिष्ट्यं म्हणजे आध्यात्मिक जीवनदृष्टी, आणि त्यातून घडणारी संयमित उपभोगाची जीवनशैली. तसं जगणं, म्हणजेच खऱ्या अर्थानं 'धर्मपालन'; कारण, त्यातूनच पर्यावरणाची 'धारणा' सुनिश्चित होऊ शकते. पश्चिमी विचार-आचारांच्या प्रभावामुळे आपणच त्याला सोडचिट्ठी दिलेली आहे! त्यामुळे, साऱ्या जगाप्रमाणेच आपल्यालाही पर्यावरणाच्या विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशा काळात, सध्याचं भरकटलेलं हिंदुत्व नाकारत, निसर्गरक्षणासाठी उपयोगी ठरणाऱ्या मूळ हिंदुत्वाची युगानुकूल मांडणी करणारं, आणि त्याच्या आचरणाचा आग्रह धरणारं हे पुस्तक : स्वतः तसं जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका अभ्यासू आणि तळमळीच्या कार्यकर्त्यानं लिहिलेलं.
-
Hi Medha Kon (ही मेधा कोण)
जनुकीय विज्ञानात महत्त्वपूर्ण संशोधन करणारी एक नामांकित कंपनी, सदर्न जेनेटिक्सचे सर्वेसर्वा हर्ष मित्तल आपल्या संशोधनाच्या गुप्ततेसाठी विलक्षण जागरूक असतात. त्यांनी या संशोधनाच्या सुरक्षिततेची जबाबदारी 'एआय'वर कृत्रिम बुद्धिमत्तेवरसोपवली. अभेद्य वाटणारी ही सुरक्षाव्यवस्था कोणी मोडली ? हर्ष मित्तल यांच्या हत्येतून सुरू झालेली दुर्घटनांची साखळी कोणत्या दिशेने गेली ? एआय अयशस्वी ठरण्यामागे कोणाचा हात होता ? कोणी केली एआयवर मात करणारी खेळी ? मानव आणि एआय यांच्यात निर्माण होत असलेल्या गुंतागुंतीच्या नात्यातील विविध पैलूंचा वेध घेणारी 'अनपुटडाउनेबल' थरारक कादंबरी.
-
Natyabhaarati (नाट्यभारती)
नाटक म्हणजे अल्प रंगमंचसज्जा, सशक्त कथानक अन् सामर्थ्यवान भावदर्शी अभिनय यांच्या बळावर प्रेक्षकांना स्वतःचा, आसपासचा आणि व्यापक समाजाचा गंभीर विचार करायला लावणारं एक महत्त्वाचं माध्यम आहे, हे या नाट्यसंस्थेनं आपल्या नाट्यकार्यातून दाखवून दिलं. बृहन्महाराष्ट्रातील मराठी जनांची नाळ आजही मराठी भाषा आणि महाराष्ट्रीय संस्कृतीशी जोडलेली आहे, ही गोष्ट अधोरेखित करणारा इंदौरच्या रंगकर्मीचा सात दशकांचा सर्जन प्रयोग 'नाट्यभारती'.
-
Oxygen (ऑक्सिजन)
पृथ्वीवरच्या वातावरणात ऑक्सिजनचं प्रमाण असतं वीस टक्के. हे प्रमाण कायम राखण्यात वनस्पतींचा वाटा महत्त्वाचा. हे प्रमाण घसरू लागलं ! दहा टक्क्यांहूनही खाली घसरलं ! आणि जगात एकच हाहाकार माजला. या समस्येवरचा तोडगा काय ? तो शोधताना जगातील राष्ट्र दोन गटांत विभागली गेली. पंचेचाळीस प्रगत राष्ट्रांचा तोडगा होता झाडांविना जीवन. तर वृक्षसंपदेचं रक्षण करणारा राष्ट्रसमूह म्हणत होता, 'झाडांच्या सहवासात जीवन.' या झगड्यात भारताचं धोरण काय होतं ? जागतिक पातळीवर नव्याने स्थापन झालेल्या 'श्वास मंत्रालया'तर्फे पॉडच्या माध्यमातून बंदिस्त परिसंस्थेची निर्मिती करण्याची योजन नेमकी काय होती ही योजना ? 'ग्रीन ड्रीम' संघटनेचा या योजनेला विरोध का होता ? एव्हरेस्टची वाढणारी उंची अन् ऑक्सिजनच्या पातळीतील घट यांचा एकमेकांशी,पर्यावरणबदलाशी काय संबंध ? आजची काल्पनिका उद्याचे वास्तव ठरल्याची अनेक उदाहरणे विज्ञानाच्या क्षेत्रात सापडतात. या कादंबरीतून मांडलेली कल्पनाही भविष्यातील भयकारी वास्तव ठरेल का ? पर्यावरणाच्या व्यामिश्र समस्येशी थेट भिडणारी भविष्यवेधी ही कादंबरी!
-
Dubai Kal Aani Aaj (दुबई काल आणि आज )
दुबई म्हणजे वाळवंटात निर्मिलेले जणू नंदनवनच ! जिद्द, मेहनत आणि दुर्दम्य आशावाद या त्रिगुणांच्या जोरावर अरबी माणसाने सर्वस्वी प्रतिकूल परिस्थितीवर मात केली. पाण्याच्या चार घोटांसाठी वणवण करणारा हा अरब आज सेंट्रली एअरकंडिशन घरातील सुखासीन आयुष्य जगतोय. हा बदल 'याचि देही याचि डोळा' अनुभवणाऱ्या मेघना अशोक वर्तक. १९७६ ते २०२५ या कालखंडात मेघनाताईंनी आपले पती श्री. अशोक वर्तक यांच्याबरोबर दुबईत वास्तव्य केले. मेघनाताईंच्या नजरेला बदलणारी दुबई जशी भावली, तशी त्यांनी ती शब्दांकित केली. दुबईच्या जीवनशैलीच्या प्रत्येक वैशिष्ट्यपूर्ण कंगोऱ्याचे कालानुरूप बदलते रंग आपल्याला आलेल्या अनुभवांसहित त्यांनी रेखाटले आहेत. आणि म्हणूनच स्थानिक वाचक दुबईच्या भूतवर्तमानाशी समरस होतील, त्यांना ही आपलीच गोष्ट वाटेल. दुबईचे यथार्थ दर्शन घडवणारे आणि दुबई-दर्शनाची ओढ लावणारे दुबई काल आणि आज
-
Haravaleli Trophy Aani Itar Katha (हरवलेली ट्रॉफी आणि इतर कथा)
'शारदा सहनिवास' म्हणजे सतत काही ना काही उलथापालथ चालू असणारं जग. त्यात सगळ्यात भाव खाणार्या गोष्टी म्हणजे बॅडमिंटनचा खेळ अन् गणेशोत्सवाचं नाटक. ‘आंतर सहनिवास बॅडमिंटन करंडक' शारदा सहनिवासने कसा जिंकला ? तो करंडक हरवला कसा ? अन् त्याचा शोध कसा लागला ? या सार्याचा गणेशोत्सवाच्या नाटकाशी काय संबंध ? दिलीप प्रभावळकर यांनी आपल्या खुसखुशीत, खमंग शैलीत उलगडलेल्या धमाल अन् कमाल आठवणी !
-
Mazya Dhammal Goshti (माझ्या धम्माल गोष्टी)
तो मुलगा धडपड्या आहे. चौकस आहे, पण भोचक नाही. त्याचं घर, त्याचं कुटुंब, शेजारीपाजारी, त्याची शाळा, त्याचे शिक्षक-शिक्षिका, त्याचे वर्गातले अन् सोसायटीतले मित्रमैत्रिणी या सगळ्यांनी भरलेलं त्याचं जग. त्याच्या या छोट्याशा जगात घडणाऱ्या अफलातून घटना. सुप्रसिद्ध अभिनेते आणि साहित्यिक दिलीप प्रभावळकरांनी खास त्यांच्या मिष्कील शैलीत उलगडलेल्या आपल्या बालपणीच्या आठवणी...
-
Yuddha Nakaranare Jag (युद्ध नाकारणारे जग)
युद्धाला द्यायला हवा ठाम नकार... जगाला संघर्षांनी वेढलेले असताना युद्ध आणि शांतता यांचा सम्यक विचार करणार्या या पुस्तकाचे महत्त्व अजोड आहे. संदीप वासलेकर हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे विचारवंत, ऑक्सफर्डचे स्कॉलर आणि ‘एका दिशेचा शोध' या १३ वर्षांत २५ आवृत्त्या निघालेल्या राजहंसी पुस्तकाचे लेखक आहेत. युद्धांमागील राजकारण, प्राणघातक शस्त्रास्त्रांच्या शर्यती, अतिरेकी राष्ट्रवादाचे दुष्परिणाम यांचा उदाहरणांसह परखड उहापोह या पुस्तकात वाचायला मिळेल. मानवी संस्कृती व सभ्यता यांच्या विनाशाची शक्यता संहारक युद्धांमुळे वाढत चालली आहे, हे सत्य सुस्पष्टपणे मांडले आहे. सर्वनाश टाळायचा तर मानवी समाजाने एकत्र येऊन आणि राजकीय नेत्यांना बाजूला ठेवून ठामपणे युद्धांना नकार दिला पाहिजे, असा लेखकांचा निष्कर्ष आहे. त्यासाठी त्यांनी आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी, तंत्रज्ञान, तत्त्वज्ञान आणि इतिहास यांचा योग्य परामर्श घेतला आहे. युद्ध हा मानवजातीचा नैसर्गिक गुणधर्म नाही. शांतता व युद्ध यातून शांततेची निवड करण्याची मुभा आपल्याला आहे, असे हे पुस्तक ठामपणे बजावते. एकीकडे धोक्याचा इशारा आणि दुसरीकडे विचारांना चालना हे त्याचे वैशिष्ट्य.
-
Patrapatri (पत्रापत्री)
आपल्या आजूबाजूच्या घटनांचा तिरकस लेखणीतून घेतलेला वेध... हे या पत्रापत्रीचं स्वरूप. तात्यासाहेब आणि माधवराव या जोडगोळीच्या साहाय्याने दिलीप प्रभावळकर हा पत्रप्रपंच मांडतात. यात कधी या दोघांचा रशियावारीतला पराक्रम हसवतो; तर कधी आफ्रिकावारीतले 'उद्योग' हसू आणतात. याच पत्रांतून कधी आयपीएलवरचं भाष्य समोर येतं, तर कधी होर्डिंग्जच्या सुळसुळाटासंबंधीचं तिरकस मत.. तात्कालिक घटनांकडे पाहण्याचा प्रभावळकरांचा मिस्कीलपणा आणि या जोडगोळीची धम्माल यासाठी वाचावं असं ...