-
Buddhimatehun Adhik Mahatvachi Bhavnik Buddhimatta (बुद्धिमतेहून अधिक महत्वाची भावनिक बुद्धिमत्ता)
भावना जाणण्याची, मूल्यांकन करण्याची, व्यक्त करण्याची आणि नियंत्रित करण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता (इक्यू). केवळ बौद्धिक क्षमता (आयक्यू) आयुष्यात यश मिळवण्यासाठी पुरेशी नाही. आयक्यू आणि इक्यू एकमेकांना पूरक ठरतात, तेव्हाच ते प्रभावी असतात. भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे, भावनांना प्रभावीपणे समजून घेण्याची आणि त्यांचं व्यवस्थापन करण्याची क्षमता. कामाच्या ठिकाणी भावनिक बुद्धिमत्ता महत्त्वपूर्ण फायदे मिळवून देऊ शकते आणि अधिक चांगले संबंध निर्माण करण्यासाठी, तसंच सकारात्मक वातावरण-निर्मितीसाठी मदत करू शकते. भावनिक बुद्धिमत्ता महत्त्वाची आहे, कारण ती वैयक्तिक आणि व्यावसायिक असे दोन्ही प्रकारचे संबंध सुधारण्यासाठी मदत करू करते. सामाजिक गुंतागुंतीतून मार्ग काढण्यासाठी, नेतृत्व करण्यासाठी, करिअरमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी उच्च भावनिक बुद्धिमत्ता मदत करू शकते. सदर पुस्तकात लेखकाने मेंदूचं कार्य आणि त्यामागची भावनिक आणि तार्किक प्रक्रिया सोप्या शब्दांत मांडलेली आहे. तसंच भावनिक बुद्धिमत्तेचं संगोपन कसं करता येऊ शकतं आणि ती कशी वृद्धिगंत करता येऊ शकते, हे दाखवून दिलं आहे. वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात हमखास यश मिळवण्यासाठी सदर पुस्तक वाचकांना निश्चितच उपयुक्त ठरेल.
-
Manus Navacha Sundar Shilpa (माणूस नावाचं सुंदर शिल्प)
एक मानव जन्माला येतो. जसजशी त्याच्या शरीराची वाढ होते, तसतशी त्याच्या मनाची, बुद्धीची, भावनांची खोली आणि रुंदी वाढत जाते. त्याच्या वाढीला दिशा, रूप-रंग येत राहातात. पण त्या बुद्धी-भावनांच्या खोलीला, रुंदीला, रंगारूपाला, आणि त्याच्या कर्तृत्त्वाला सार्थकी लावण्यासाठी त्या मानवाला योग्य दिशेनं घडवण्याची आवश्यकता असते. तरच तो मानव या जगासाठी आणि स्वतःसाठी उपयुक्त होऊ शकतो. ही घडवण्याची क्रिया म्हणजे एखाद्या शिल्पकारानं घडवलेल्या एका सुंदर शिल्पाची प्रक्रियाच असते. आणि, मानवाच्या घडणीचे शिल्पकार म्हणजे त्याचे जन्मदाते आईवडील, शिक्षक (गुरू), समाज आणि तो मानव स्वतः. एक नवजात बालक कच्च्या मातीच्या खंडाप्रमाणे असतो, ज्यावर अनेक कलाकार वेगवेगळ्या प्रक्रिया करत असतात. त्या प्रक्रिया अखंड चालू असतात. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. ते मानवी शिल्प किती सुंदर घडतंय, यावर त्या मानवी जीवाचं सार्थक ठरतं. या घडणावळीचे पैलू अत्यंत गुंतागुंतीचे असतात. कधी एकमेकांना पूरक तर कधी परस्परविरोधी. या सगळ्या पैलूंचं विश्लेषण करणं गरजेचं आहे. तरच आपला समाज, मानवी क्षमता, संस्कृती आणि हे विश्व संतुलित राहू शकतील. हाच या पुस्तकाचा गाभा आहे.
-
Bhartiy Samaj Va Sanskruti (भारतीय समाज आणि संस्कृती)
भारतीय समाज आणि संस्कृती या ग्रंथात भारतीय समाजातील विविधता लक्षात घेऊन अनेक मुलभूत मुद्यांचा समावेश केला आहे. या ग्रंथात भारतीय समाजव्यवस्था व त्यातील विविध मुलभूत तत्वे, भारतीय संस्कृती, चार आश्रमव्यवस्था, पुरूषार्थ, कर्म सिद्धांत, जातीय संरचना व जातीच्या उत्पतीचे सिद्धांत, विवाहसंस्था व कुटुंबसंस्था या विश्लेषनाबरोबर भारतीय स्त्रिया आणि भारतीय सामाजिक जीवनावर इस्लाम आणि पाश्चात्य संस्कृतीचा पडलेल्या प्रभावाची विश्लेषनात्मक मांडणी करण्यात आली आहे. या ग्रंथात भारतीय समाजाचे सर्वागिंण दर्शन होईल. भारतीय समाजातील अनेक मुद्याचा समावेश करून विद्यार्थी, अभ्यासक, संशोधक, प्राध्यापक अशा सर्वाना उपयोगी सिद्ध होणारा हा महत्वपूर्ण ग्रंथ होय. समाजशास्त्र विषयाचे प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थ्यांना हे पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरेल असा आम्हाला विश्वास वाटतो.
-
Bhartiy Lokshahi Arth Aani Vyavahar (भारतीय लोकशाही अर्थ आणि व्यवहार)
भारताने १९५० मध्ये लोकशाही संविधान स्वीकारले. मात्र भारताच्या एकूण राजकीय विचारविश्वात अजूनही एक शासनप्रकार म्हणून आणि राजकारण करण्याचा मार्ग म्हणून लोकशाहीविषयीचे वाद अस्तित्वात आहेतच. या वादांमधूनच लोकशाहीबद्दल विविध दावे-प्रतिदावे उभे राहिलेले दिसतात. या वादांचा आढावा घेणारा हा लेखसंग्रह आहे. इतर अनेक देशांमध्ये ज्या आव्हानांमुळे लोकशाही व्यवस्था कोलमडल्या त्याच आव्हानांना तोंड देत भारतात लोकशाही टिकून राहिली. हे कसे शक्य झाले याचा आढावा या लेखसंग्रहातील लेख घेतात. लोकशाही व्यवस्था लादली जाण्यापेक्षा संथपणे उत्क्रांत झाल्यामुळे काय फायदा होतो ते भारताच्या उदाहरणावरून दिसून येते. मात्र, काळाच्या ओघात टिकून राहतानाच, भारतीय लोकशाही आशयघन स्वरूप प्राप्त करू शकली का हा प्रश्न उरतोच. या प्रश्नांची चिकित्सा या पुस्तकात केलेली आहे. १९८० च्या दशकापासून सुरू झालेले आर्थिक बदल जनविरोधी आहेत, अशी टीका केली जाते. जातीयवाद, जमातवाद, भ्रष्टाचार, गुंडगिरी यांचा लोकशाही व्यवहारांवर दुष्परिणाम; परद्वेषावर आधारित जनसंघटनंामुळे लोकशाहीला नव-फॅसिस्ट स्वरूप येते, या सर्वांवर लक्ष वेधलेले आहे; आणि या सर्वांमुळे लोकशाही आशयघन बनवून खरोखर प्रातिनिधिक व सहभागप्रधान बनवण्याचे उद्दिष्ट दूर जाते असे म्हटले जाते. या पार्श्वभूमीवर या पुस्तकात राज्यशास्त्राचे भारतातील आघाडीचे अभ्यासक हे या संदर्भातल्या प्रश्नांकडे कसे पाहता येईल याविषयी मांडणी करतात. पहिल्या भागातील निबंध लोकशाहीच्या बहुविध अर्थांच्या संदर्भात ही चिकित्सा करतात तर दुसर्या भागात धर्मनिरपेक्षता, मागास जातींचे राजकारण, पक्षीय राजकारणातील अस्थिरता आणि सामाजिक चळवळींचा र्हास या चार संदर्भांत लोकशाही व्यवहारांची चिकित्सा केली आहे. सैद्धान्तिक मांडणी आणि अनुभवनिष्ठ संशोधने एकत्र आणून हा ग्रंथ भारतीय राजकारणाच्या अभ्यासकांना अभ्यासाची पुढील दिशा ठरविण्यासाठी साहाय्य करतो. तसेच विद्यार्थी, पत्रकार, कार्यकर्ते यांना भारतीय लोकशाहीचे अर्थ व व्यवहार यांच्याविषयी चिकित्सक परिचय करून देतो.
-
Ashtapailu Vyaktimatvasathi Samarth Ramadasanchi Shikavan (अष्टपैलू व्यक्तिमत्वाठी समर्थ रामदासांची शिकवण)
समर्थ रामदासांचा ‘दासबोध’ हा ग्रंथ अभ्यासून आत्ताच्या काळात उपयुक्त ठरतील अशा काही ओव्या निवडल्या आहेत आणि सदर पुस्तकात त्यांचे साध्यासोप्या भाषेत विवरण केले आहे. समकालीन उदाहरणे देऊन दासबोधात सांगितलेला विचार अधिक स्पष्ट केला आहे. मराठीमध्ये अनेक संतांचे उत्तमोत्तम ग्रंथ आहेत, परंतु रामदासांच्या साहित्याचे स्थान वेगळे आहे. रामदास केवळ ज्ञान सांगत नाहीत, तर सृष्टीतील ज्ञान आत्मसात कसे करावे, त्यासाठीची साधने कोणती, उत्तम ग्रंथांचा अभ्यास कसा करावा याही विषयी मार्गदर्शन करतात. विद्याभ्यासाला त्यांनी अनन्य महत्त्व दिले आहे. व्यावसायिक जीवनात उपयुक्त असणार्या वेळचे व्यवस्थापन, नेतृत्वकला, ताण-तणावांचे व्यवस्थापन, सकारात्मक दृष्टीकोन अशा अनेक विषयांवर दासबोधामध्ये विवेचन आहे. समर्थ रामदासांना आळस, निष्क्रियता, निराशा यांचा अगदी तिटकारा होता. प्रयत्नवाद, चतुराई, सारासार विचार यांवर त्यांचा भर होता. दासबोधामध्ये राजकारण, समाजकारण, चातुर्यलक्षण, लोकसंग्रह या महत्त्वाच्या विषयांवर तर विस्ताराने सांगितले आहेच, पण बोलावे कसे (कम्युनिकेशन स्कील्स), अक्षर कसे काढावे, वैयक्तिक स्वच्छता कशी राखावी इथपासून ते ज्ञानोपासना करणार्या व्यक्तीचा दिनक्रम कसा असावा इथपर्यंत विवेचन केले आहे. व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करून एक कार्यक्षम आणि यशस्वी आयुष्य जगण्यासाठी सदर पुस्तक वाचकांना निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास वाटतो.
-
Aajchya Divshi Itihasachya Pananmadhun (आजच्या दिवशी इतिहासाच्या पानांमधून)
"मानवी इतिहासाचे अवलोकन केल्यास सामान्य माणसांनी आंतरिक ऊर्मीतून केलेल्या कृतींमधून बहुतांश इतिहास रचला गेल्याचे लक्षात येते. शास्त्रज्ञांचे शोध, कलाकारांच्या कलाकृती, समाज सुधारणा, विविध खाद्यपदार्थांच्या निर्मितीमागील कथा अशाच आंतरिक ऊर्मीचे दर्शन घडवतात. ठरवून केलेले विक्षिप्त प्रवास आणि जीवावर बेततील अशी साहसे करणार्या व्यक्तीही आंतरिक ऊर्मीने पछाडलेल्या दिसतात आणि इतिहास घडत जातो. या सत्यकथांमधून माणसातील सहृदयतेचे दर्शन होत रहाते तर कधीकधी हिंस्त्र प्रवृत्तीही जाणवते. हजारो वर्षांच्या इतिहासातील ३६५ अनोख्या आणि वैविध्यपूर्ण सत्यकथांना आणि त्यांच्याशी निगडित असलेल्या इतिहास घडवणार्या व्यक्तिमत्वांना या पुस्तकातून लेखक र. कृ. कुलकर्णी यांनी प्रस्तुत केले आहे. या कथा वाचकांसाठी मनोरंजक आणि विचारप्रवर्तक ठरतील याविषयी खात्री वाटते."
-
Saran (सरण)
जोपर्यंत तुम्ही गर्दीत राहल, तोपर्यंत लोक तुमचा आदर करतील. तुम्ही वेगळा मार्ग चोखाळलात, तर मात्र तुमची धडगत नाही`,... सरोजा आणि कुमरेशनच्या प्रेमाची ही कथा अखेरीस ह्याच वळणावर येते. सामाजिक जातवास्तव नाकारण्याचा प्रयत्न करणारे हे तरुण जोडपे - विवाहबंधनात अडकते खरे! पण एकमेकांसोबत आनंदाने आयुष्य व्यतीत करण्याचे त्यांचे स्वप्न अखेर स्वप्नंच राहते. रंग-रूप-अंगकाठी- बोली यांवरून माणसाची जात ओळखणा-या समूहाच्या द्वेषाला ते बळी ठरतात. स्वप्न की सत्य हे कळेपर्यंत सरोजाला त्या द्वेषाच्या आगीने वेढलेले असते. खोट्या प्रतिष्ठेपायी अल्लड सरोजाचा घेतलेला बळी या कादंबरीने चित्रमय पद्धतीने मांडला आहे.
-
Motiharicha Manus (मोतिहारीचा माणूस)
भूतकाळाच्या जखमांमधून सावरत असलेला, लेखक होण्याच्या वाटेवरचा देखणा असलम आणि लॉस एंजेलिसहून आलेली जेसिका — सामाजिक कार्यकर्ती आणि प्रौढ चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री — एका अनपेक्षित भेटीत एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडतात. ही कादंबरी आहे त्यांच्या विसंगत वाटणार्या पण खोलवर जोडलेल्या आयुष्यांची, त्यांच्या संघर्षांची, आणि एका अशांत काळात फुलणार्या प्रेमाची. पार्श्वभूमी आहे भारतात उजव्या विचारसरणीच्या राजकीय लाटेची. आणि ही कथा घेऊन जाते वाचकाला भारताच्या हृदयभूमीकडे — बिहारमधील मोतिहारी या छोट्याशा गावात, जिथून गांधीजींनी पहिल्यांदा सत्याग्रहाची वाट चालायला सुरुवात केली आणि जिथे जॉर्ज ऑरवेलचा जन्म, त्याच्या लेखनविश्वाला आकार देणार्या आठवणींसह, इतिहासात कोरला गेला. ही एक प्रेमकहाणी आहे — केवळ दोन व्यक्तींमधली नव्हे, तर विचार, स्मृती आणि देशाच्या अंतर्मनाशी गुंफलेली.
-
Khol Khol Pani (खोल खोल पाणी)
बुटक्या एका जमीनमालकाकडे कामाला असलेला अस्पृश्य मुलगा. दिवसभर बकर्या चारणारा, शेतात काम करणारा लहान मुलगा... खडतर आयुष्याचे चटके खाताना (सोसताना) मित्रांच्या सोबतीत आणि निसर्गात विरंगुळा शोधणारा. चिमूटभर आनंदसुद्धा धरून ठेवण्यासाठी धडपडणारा... पण, अपार कष्ट आणि पोटाची आग यांत त्याचं चैतन्यमय निरागस बालपण हरवून गेलेला.... या कादंबरीतलं चित्रदर्शी वर्णन, घटना, प्रसंग, पात्रे, संवाद आणि त्यातून उलगडत जाणारं भीषण वास्तव वाचकाला अस्वस्थ करतं, खिळवून ठेवतं आणि अंतर्मुख करतं. ‘कुलामाठारी` या पेरुमाल मुरुगन लिखित अत्यंत वाचनीय तमिळ भाषेतील कादंबरीचा तितकाच प्रवाही, परिणामकारक अनुवाद केला आहे सुप्रिया वकील यांनी."
-
Vaghache Katade Pangharnara Shur Sardar (वाघाचे कातडे पांघरणारा शूर सरदार)
अरब राजा रोस्तेवांचा पराक्रमी, निष्ठावान सेनापती अवथांदिल आणि राजाची रूपवती कन्या थीनाथीन, परस्परांच्या प्रेमात आहेत. एकदा त्यांच्या राज्यात एक शूर वीर येतो आणि त्याच्या चौकशीसाठी गेलेल्या राजाच्या सैनिकांना ठार मारून नाहीसा होतो. त्या शूर वीराच्या शोधात अवथांदिल निघतो. खडतर प्रवासानंतर महत्प्रयासाने त्याला तो शूर वीर भेटतो, त्याचं नाव असतं तारियल. तो अखिल हिंदुस्थानचा राजा असतो. त्याची प्रेयसी राजकन्या नेस्तां-दारेजां हिचं ज्या राजकुमाराशी लग्न होणार असतं, त्याला तो ठार मारतो आणि परागंदा होतो. त्याचं राज्य आणि प्रेयसी दोन्हीपासून दुरावतो. त्याची प्रेयसी शत्रूच्या हाती लागते. विरहाने वेडापिसा झालेला तारियल तिचा ठावठिकाणा माहीत करून घेण्यासाठी जंग जंग पछाडत असतो. तिला शोधून आणण्याचं आव्हान अवथांदिल स्वीकारतो. तारियल आणि नेस्तां-दारेजांची भेट घडवण्यात तो यशस्वी होतो का? उत्कट प्रेमाची, मैत्रीची, निष्ठेची उत्कंठावर्धक वळणांनी पुढे सरकणारी महाकाव्यरूपी गाथा.
-
Razor Sharp (रेझर शार्प)
एक अमानुष सीरियल किलर मुंबईच्या रस्त्यांवरून मोकाट हिंडत आहे… त्याने आपल्या बळींची अत्यंत निर्घृण तऱ्हेने हत्या केलेली आहे. नायलॉनच्या दोरीने हात बांधून मृताच्या तोंडात धान्य कोंबणार्या या सीरियल किलरमुळे संपूर्ण शहर भीतीच्या छायेत जगत आहे.. पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना एकाच प्रश्नाने पछाडलं आहे : एकामेकांशी काडीचाही संबंध नसणाऱ्या या सर्व मृतांना जोडणारा दुवा नेमका कोणता आहे? एका चित्तथरारक मालिकेतील पहिल्या ‘रेझर शार्प’ या कादंबरीच्या पानांमधून आश्विन सांघी यांनी पुन्हा एकदा अत्यंत गुंतागुंतीचं, मती गुंग करणारं थरारनाट्य गुंफण्याचं आपलं अप्रतीम कौशल्य उलगडून दाखवलं आहे. ही कादंबरी एकदा हातात घेतल्यावर वाचकांना ती संपवल्याशिवाय खाली ठेवणं शक्यच होणार नाही.
-
Parvati (पार्वती)
पार्वतीचं आपल्या संस्कृतीतील अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करत शिवप्रिया पार्वतीच्या व्यक्तिमत्त्वाच्या ज्ञात-अज्ञात पैलूंचा वेध घेणारी कादंबरी ! पार्वतीच्या जन्मापासूनच कथा सुरू होते. पार्वतीला तीच सती आहे हे कुणी सांगितलं? तिचा भगवान शंकरांशी विवाह होताना त्याबाबत पार्वतीच्या मातेचं मत काय होतं? पार्वतीने कोणतं युद्ध लढलं? या प्रश्नांच्या उत्तरांसह गणेशाच्या जन्माची पुराणातील एक अपरिचित कथा, कार्तिकेयाची कथा, 'काली'चं रूप आणि मुख्य म्हणजे शंकर-पार्वती संवाद या कादंबरीत वाचकांना वाचता येईल.
-
Shrimant Aanandibai Peshave (श्रीमंत आनंदीबाई पेशवे)
ध चा मा केला नसतांनाही...बदनाम झालेली...पेशवाईतील वादळज्योत... श्रीमंत आनंदीबाई पेशवे यांच्या जीवनावरील एक ऐतिहासिक कादंबरी
-
Swatachya Aatmyachya Shodhat Mahatma Gandhi (स्वतःच्या आत्म्याच्या शोधात महात्मा गांधी)
गांधीजींची पत्नी कस्तुरबा यांचं आयुष्य कसं गेलं. गांधीजी कडून त्यांना कशी वागणूक मिळत होती ...याचा शोध या पुस्तकात लेखकाने घेतल्याचे दिसून येते
-
Dapur te Delhi (दापूर ते दिल्ली)
एकनाथ आव्हाड हे सिद्धहस्त बालसाहित्यकार असून साहित्यातील अतिशय प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी पुरस्कार - २०२३ त्यांना मिळाला आहे. त्यांची पुस्तके मुलांबरोबरच शिक्षक आणि पालकांसाठी अतिशय मनोरंजक, उपयुक्त आणि ज्ञानवर्धक आहेत. आव्हाड यांचे मूळ गाव सिन्नर तालुक्यातील दापूर हे असून त्यांच्या बालपणात डोकावून पाहिले तर एक होतकरू, परिस्थितीवर मात करणारा मुलगा, खाऊच्या पैशात किंवा भाजी विकून मिळालेल्या पैशात पुस्तके विकत घेऊन वाचणारा, गुरुजनांचा लाडका विद्यार्थी ते पुढे मुलांचे आवडते बालसाहित्यकार, कथाकथनकार अशा अनेक रूपांनी आव्हाड वाचकांना भावणारे आहेत. त्यांच्या बालसाहित्यावर दिल्ली दरबारी साहित्य अकादमीची मोहर उमटली, ही आम्हा वाचकांसाठीसुद्धा आनंदाची गोष्ट ठरली. एकंदरीतच दापूर ते दिल्ली असा उल्लेखनीय प्रवास करणाऱ्या आव्हाड यांच्या लेखनाचा आवाका जाणून घेण्यासाठी, त्यांच्या पुस्तकांची अधिक माहिती होण्यासाठी तसेच त्यांचा साहित्यप्रवास आपल्या सर्वांसमोर एकत्रितपणे मांडण्यासाठी केलेला अभ्यासपूर्ण प्रयत्न म्हणजे हे पुस्तक होय.