-
Aadim Dukhhache Vartul (आदिम दुःखाचे वर्तुळ)
लोकगीतांची शब्दकळा स्वतःमध्ये मुरवून घेऊन आधुनिक युगातील जगण्याचा वेध घेणारी सशक्त कविता भारती पाटील यांच्या 'आदिम दुःखाचे वर्तुळ' या संग्रहातून भेटते. ग्रामजीवनातील चैतन्याने रसरसलेल्या जगण्याबरोबरच तिथले दुःख-दैन्य कवेत घेणारी ही कविता मनाचा ठाव घेते. कोणतीही चांगली कविता वाचकांना आपल्या गद्य जगण्यापलीकडच्या भावविश्वात सहजपणे घेऊन जात असते. भारती पाटील यांची कविता त्या निकषावर अस्सल ठरते. घासातला घास खाऊ म्हणताना कुणीही परका नसल्याचे सांगताना ही कविता माणसांमाणसांमध्ये उभ्या केल्या गेलेल्या सगळ्या भिंतींना पार करून जाते.
-
Dayari Of A Home Minister (डायरी ऑफ ए होम मिनिस्टर)
"समाजकारणाची आस धरून राजकारणात उतरलेलं एक बहुआयामी व्यक्तिमत्त्वं म्हणजे श्री. अनिल देशमुख. छोट्या छोट्या पदांपासून सुरू असलेला हा प्रवास थेट गृहमंत्री पदापर्यंत पोहोचला. गृहमंत्री म्हणून ज्या यंत्रणेवर नियंत्रण मिळवलं, त्याच यंत्रणेतल्या एका सडलेल्या मनोवृत्तीने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यापुढे संकटांची रास उभी केली. आणि एका गृहमंत्र्यांनाच खोट्या आरोपांखाली तुरुंगवास अनुभवावा लागला. ... पण तुरुंगातल्या दिवसांनाही त्यांनी सकारात्मकतेत परिवर्तित केलं. त्यांचा हा विलक्षण, अंतर्मुख करणारा प्रवास... स्फोटक, परखड, तरीही तितकंच काळजाला हात घालणारं विलक्षण आत्मकथन...
-
Davinchich Kod (दाविन्चीचं कोडं)
डॉ. कौशिक – सायन्टिस्ट आणि अमृतराव मोहिते – कमिशनर या दोन मित्रांच्या कर्तृत्वाची ही गोष्ट. कायद्यातील अडचणी या विज्ञानाच्या माध्यमातून कशा सोडवता येतात ते हे दोन मित्र दाखवून देतात. जगात लागणारे नवनवीन शोध आपल्या भारतातही कुठे-कुठे उपलब्ध आहेत, हे माहिती असणारे डॉ. कौशिक त्यांच्याकडच्या माहितीचा योग्य जागी कसा उपयोग करतात ते वाचण्यासारखे आहे. अगदी कम्प्यूटरबरोबर एका काही अंशी कोमात गेलेल्या मुलीने केलेला संवाद असू देत अथवा एका बलात्कारी मुलीला न्याय देण्यासाठी तयार केलेला रेकॉर्डर ड्रेस, ए.आय.च्या मदतीने शोध घेतलेलं मृत्युपत्र असू देत अथवा वैज्ञानिक तपासण्यांतून पकडलेली एका चित्राची चोरी असू देत... सगळंच अद्भुत. मुलांबरोबर मोठेही रमतील; कारण वैज्ञानिक कथा असूनही ते तंत्र आपल्या भारतात कुठे वापरले जाते हे समजल्यावर अंगावर अभिमानाचे रोमांच उभे राहतात. हा अनुभव जगण्यासाठी वाचा ‘दा विन्चीचं कोडं!’
-
Chirantan Yashache 10 Niyam (चिरंतन यशाचे १० नियम)
आयुष्यात यशाचा एक अर्थपूर्ण मार्ग शोधताना - यशाच्या मार्गावर जाण्यासाठी आवश्यक असलेली प्राथमिक पात्रता— तारुण्य, उत्साह, बुद्धिमता, आशावाद आणि याचबरोबर असंख्य परिस्थितींतून गेलेल्या अनुभवी लोकांच्या अनुभवातून मिळणार्या आधाराची भासणारी आवश्यकता - अनेक महान स्त्री–पुरुषांंचं आयुष्य आणि त्यांचे योग्य – अयोग्य निर्णय व त्यांचे जीवनावर उमटलेले पडसाद - महान व्यक्तींच्या आयुष्यातलं यश आणि आनंद - काळानुसार बदलत जाणारं यशाचं चित्र - जगात होणार्या कोणत्याही उलथापालथेत कायम टिकणारी मूलभूत वैशिष्ट्यं – ती आचरणात कशी आणायची? - यशाच्या जवळ असावं असं वाटणं; पण यश म्हणजे काय, ते कसं मिळतं आणि ते कसं टिकवून ठेवता येतं, याची उत्तरं स्व-ज्ञान, दृष्टी, पुढाकार, धाडस, प्रामाणिकपणा, संयोगक्षमता, विनयशीलता, सहनशक्ती, हेतू, लवचीकपणा अशा दहा महत्त्वाच्या वैशिष्ट्यांमधून मिळतात - यशाचा अर्थ नव्याने तपासून सांगतायत `मारिया बार्टिरोमो!’
-
Ullu Ani Itar Katha (उल्लू आणि इतर कथा)
‘उल्लू आणि इतर कथा’ हा १६ हलक्या फुलक्या विनोदी ललित कथांचा संग्रह आहे. आर. बी. मातकारांची लेखनाची एक स्वतंत्र शैली आहे जी वाचकांना नेहमीच भावते. त्याच शैलीत त्यांनी लिहिलेल्या या खुमासदार कथा मनोरंजक आहेत. रोजच्या धावपळीच्या जीवनात हवे हवेसे वाटणारे हास्याचे क्षण हा कथासंग्रह वाचतांना तुम्हाला नक्की मिळतील.
-
Mansik Aaghat Samjun Ghetana (मानसिक आघात समजून घेताना)
'मानसिक आघात समजून घेताना' हे पुस्तक मानसिक आरोग्यावर गांभीर्याने भाष्य करते. या पुस्तकाचे धागे माझ्या व्यक्तिगत आयुष्याशी जोडले जातात. मी शिक्षण घेत असताना आणि करियर करत असताना गुन्हेगारी, तुरुंगवास, व्यसन, बदनामी आणि त्यातून सावरताना नकारात्मक भावना अनुभवल्या होत्या. त्यामुळे झालेला मानसिक त्रास मी सहन केलेला आहे. मागच्या पाच-दहा वर्षांपासून अपराधीपणा, भीती, दुःख आणि राग या टोकाच्या भावना मी अनुभवल्या आहेत. त्या वेळी मला योग्य मार्गदर्शन मिळाले नाही, परंतु या पुस्तकाच्या माध्यमातून माझ्यासारख्या अनेकांना मार्गदर्शन मिळेल. माझ्या आयुष्यातली जी वर्षे भयाण अंधारात गेली, त्याला त्यांना सामोरे जावे लागणार नाही. पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात लेखिकेचे व्यक्तिगत जीवन आपल्यासमोर उलगडत जाते. त्यांचा खंबीरपणा, आत्मविश्वास, जिद्द, प्रामाणिकपणा, मेहनत आणि हार न मानण्याची वृत्ती याबद्दल कौतुक वाटते. कारण अशा परिस्थितीतून सावरताना माणूस व्यसन, गुन्हेगारी आणि गैरवर्तनाला बळी पडतो. पण अशा कुठल्याही आमिषांना बळी न पडता त्यांनी मानसिक आघाताशी धैर्याने दिलेला लढा प्रेरणादायी आहे. 'जवळच्या व्यक्तीचा मृत्यू' हा आघात सहन करताना अनुभवायला येणारी 'शोक' ही भावना शरीर व मन यावर कसा परिणाम करते, हा सहसा न बोलला जाणारा विषय या पुस्तकात सोप्या पद्धतीने समजावून सांगितला आहे. एकूणच आजच्या धकाधकीच्या काळात मानसिक आरोग्याचे महत्त्व ठळक करणारे हे पुस्तक आहे.
-
Ravanayan (रावणायन)
श्रीलंकेत रामापेक्षा रावणाचे भक्त जास्त आहेत. रामाचे दिव्यत्व मान्य करताना सर्वच बाबतीत बलाढ्य असलेल्या, सोन्याची लंका निर्माण करणाऱ्या रावणाकडे आपले दुर्लक्ष झाले का ? वस्तूच्या तीन बाजू पाहायची सवय झाल्याने उरलेल्या कितीतरी बाजू अज्ञात राहतात हे मान्यच करावे लागेल. या अज्ञाताचा शोध घेण्याचा प्रयत्न म्हणजे हे लेखन आहे. महाभारत आणि रामायण या महाकाव्यांनी अनेक लेखक-कवींना प्रतिभावंत केलेले आहे. आशय आणि अभिव्यक्ती अशा दोन्ही स्तरांवर प्रयोगशील लेखन अनेकांनी केले आहे. याच प्रयोगशील लेखनाच्या परंपरेत यामिनीताईंचे लेखन 'रावण' या अतिप्रचंड व्यक्तिमत्त्वाला सहानुभाव व्यक्त करणारे आहे. पारंपरिक रचनाबंध नाकारून, त्यातील कृत्रिमता तोडून यामिनीताईंनी नवा रूपबंध आकारण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. सहजसुलभ भाषेतून घडवलेले विदारक अनुभूतींचे दर्शन, कालिक संदर्भ जागविणारे भाषारूप, भाषिक कृतींची विविधता अशा अनेक वैशिष्ट्यांसह हे पुस्तक वाचकांच्या मनाचा ठाव घेईल असा विश्वास वाटतो.
-
Beda (बेडा)
परिघाबाहेर असलेल्या भटक्या विमुक्तांच्या जीवनाचे चित्रण अशोक पवार यांनी या आधीच्या कादंबऱ्यांमधून केले आहे. 'बेडा' ही कादंबरी बहुरूपी या भटक्या समाजाच्या जगण्यातील व्यथांना शब्दरूप देणारी आहे. भटके लोक पाल देऊन राहतात त्या जागेला 'बेडा' म्हणतात. जात पंचायतीच्या रूपाने असलेली जातीअंतर्गत शोषणाची व्यवस्था, कायम वाट्याला आलेले विस्थापन, प्रस्थापित समाज व्यवस्थेकडून पदरी येणारी अवहेलना या बाबी 'बेडा' मधून पानोपानी दिसतात. ठेचाळत का होईना पण चालू असलेल्या प्रबोधनाच्या चळवळी आणि त्यातून होत असलेली जागृती अशा आशादायी वळणावर ही कादंबरी संपते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानंतरही भटक्या समाजाचे प्रश्न अजूनही संपले नाहीत याचा प्रत्यय ही कादंबरी वाचून येतो. -- आसाराम लोमटे
-
Katha Sanhita (कथा संहिता)
मराठी कथा साहित्यामध्ये आजच्या घडीला कथा अभ्यासकाची वानवा आहे. त्या पार्श्वभूमीवर श्री. सुनील साळुंके यांच्या पुस्तकातील कथालेख वाचल्यानंतर एक आश्वासकता त्यात आढळते. त्यांनी निवडलेल्या कथेकडे कथा अभ्यासक कोणत्या परिप्रेक्ष्यातून पाहतो हे पाहणे अधिक उद्बोधक आहे. एखादी कथा आपल्या अभ्यासासाठी निवडताना तिच्याकडे आस्वाद म्हणून पहायचे की, चिकित्सा म्हणून पहायचे, की या दोन्हीच्या सरमिसळीतून त्या कथेकडे बघायचे ? त्यापेक्षाही श्री. साळुंके हे कथांतर्गत आशय आणि त्याकडे बघण्याचा नवा दृष्टीकोन ठेवतात. त्यांनी निवडलेली कथा, त्यातील भाषा सौष्ठव, विस्तार, वळणे, लावलेला अन्वयार्थ अचूकपणे आपल्यासमोर ठेवतात. कथेचा आस्वाद घेताना कथांतर्गत असलेल्या सौंदर्य स्थळांचा तिच्या आशयासह उकल आस्वादक या नात्याने करतात. या पुस्तकात त्यांनी निवडलेल्या कथा या मराठीतल्या "मास्टरपीसच" आहेत. यावरून श्री. सुनील साळुंके यांच्या अभिरूचीची, परिपक्वतेची कल्पना येते. कथेचा परिचय करून देताना त्यांनी आपली भूमिका आस्वादक ठेवलेली आहे आणि त्यामध्ये वाचक देखील पूर्णपणे सहभागी होईल याचे भान त्यांनी जपलेलं आहे. मधल्या काळात कथा वाङमयाची पीछेहाट होण्यापाठीमागे अनेक वाङमयीन व्यवहार कारणीभूत ठरले आहेत. तरीही श्री. साळुंके यांच्या कथाभ्यास- संहितामुळे कथा विरोधी प्रवाहाला निश्चितच आळा बसून, नवे कथालेखक आणि अभ्यासक कथा वाङ्मयाकडे गांभीर्याने पाहतील. कथा निर्मितीला पूर्वीसारखाच सूर प्राप्त होईल. इतकी आश्वासकता त्यांच्या कथाभ्यास-संहितेमध्ये असल्याचे दिसून येते.
-
The Last Courtesan (द लास्ट कोर्टेसान)
१९९३ मधील बो बाजार बॉम्बस्फोटामुळे कोलकाता येथील व्यस्त व्यावसायिक जिल्ह्यातील कोठा संस्कृतीचा अंत झाला. पुढच्या काही वर्षांत डान्स बार आणि डिस्को म्युझिकने मुजरा, कथ्थक आणि ठुमरी या जुन्या काळातील मंत्रमुग्ध करणाऱ्या कलांची जागा घेतल्याने तवायफांनी आपला व्यवसाय सोडण्यास सुरुवात केली. रेखाबाई या तवायफसमोर अनिश्चित भविष्यकाळ उभा ठाकला होता. तिने कुठे जावे? तिने पुढे काय करावे? रेखाबाई मुळात कंजारभाट जमातीतील. तिला अत्यंत कोवळ्या वयात विकले गेले आणि तवायफ बनण्याचे धडे दिले गेले. १९८० च्या दशकात कोठ्यांना अभिजात कलेचा मान मिळत नव्हता. तो अदाकारीच्या वेषात असलेला वेश्याव्यवसाय आहे, अशी समाजाची समजूत होती. त्यामुळे तवायफच्या कलेला नाकारले गेले. अशा काळात रेखाबाईंनी कलकत्ता आणि बॉम्बेमध्ये एक गायन- नृत्य करणारी प्रसिद्ध कलावंत म्हणून नाव कमावले. तो एक काळ होता, जेव्हा तिला बंदुका, गुंड आणि गालिबच्या गझलांना हुलकावणी देऊन स्वतःची नियती घडवायची होती. मोठ्या कुटुंबाचा गुजारा करायचा होता. शिवाय मुलाला इंग्रजी माध्यमाच्या बोर्डिंग स्कूलमध्ये वाढवायचे होते. या हृदयस्पर्शी आठवणीत, तिने कधीही बेताल न होता आपल्या मुलाजवळ तिच्या जगण्याची भावनांनी ओतप्रोत भरलेली अविश्वसनीय कहाणी प्रामाणिकपणे, औचित्यपूर्ण आणि खेळकर शैलीत कथन केली आहे
-
Pandhara Gulmohar (पांढरा गुलमोहोर)
रूढ समजांच्या थोडं पल्याड जाऊन, बदलत्या संदर्भात नातेसंबंध समजून घेता आले तर घालमेलीत कोंडलेली मनं मोकळी होतील, माणूसपणाला अधिक अर्थ येईल, असं विचारभान देणाऱ्या वसुंधरा घाणेकर यांच्या 'पांढरा गुलमोहर' या संग्रहातील कथा प्रगल्भ वाचनानुभव देणाऱ्या आहेत. 'पांढरा गुलमोहर' मधील नऊ दीर्घकथा स्त्री-पुरुष नातेसंबंधांचा परीघ विस्तारत नेतात आणि लेखिकेचं समाजभान आपल्या प्रत्ययाला आणून देतात. या कथांमधील व्यक्तिचित्रण, भाषिक वाक्-वळणे, नाट्यात्मता आणि तरल संवेदनशीलता यामुळे 'पांढरा गुलमोहर' हा कथासंग्रह आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणारा झाला आहे. समकाळातला वास्तव गुंता, आधुनिक व पारंपरिक संस्कृतीची घुसळण व ताणेबाणे निःसंकोचपणे मांडत असताना कथाकार वसुंधरा घाणेकर यांच्या कथांची बांधणी, आशय आणि अभिव्यक्तिचे अद्वैत साकारते. - - डॉ. महेश केळुसकर