-
Bakhar Sansthananchi (बखर संस्थानांची)
स्वातंत्र्यपूर्व काळच्या हिंदुस्थानातील संस्थाने आणि संस्थानिक म्हणजे ब्रिटीशराजच्या इतिहासातील बहुरंगी पाने. कुणाचा इंग्रजांना टोकाचा विरोध, तर कुणी इंग्रजांचे पराकोटीचे लांगूलचालन करणारे. या संस्थानिकांच्या एकमेकांमधील स्पर्धा, त्यांचे विक्षिप्त छंद, विलासी आयुष्य, विचित्र सवयी या साऱ्यांच्या कहाण्या, आख्यायिका अन् दंतकथा बनल्या. एका टोकाला फंदफितुरी, कटकारस्थाने; तर दुसऱ्या टोकाला कला-क्रीडा-साहित्य यांना उदार आश्रय. एकीकडे प्रजेचा पुत्रवत सांभाळ करणारे प्रजाहितदक्ष राज्यकर्ते, दुसरीकडे प्रजेची पिळवणूक करणारे लहरी कुशासक. अशा अनेकविध रंगांनी रंगलेली, महत्त्वपूर्ण संस्थानांच्या वस्तुनिष्ठ इतिहासाचा वेध घेणारी, तरीही कथा-कादंबरीसारखी रंजक असणारी बखर संस्थानांची
-
Bharatachi Dharmairpekshata:Dhokyachya Valnavar (भ
भारताच्या भवितव्याच्या दृष्टीने आपल्या देशातील धर्मनिरपेक्षता टिकून राहणे अत्यावश्यक आहे. तथापि गेल्या सत्तर वर्षांतील आपली वाटचाल मात्र अत्यंत निराशाजनक आहे. आता तर देश हिंदुराष्ट्राच्या दिशेने जाणाऱ्या मार्गाला लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे वळण अत्यंत धोक्याचे ठरेल, असा गंभीर इशारा देणारे हे पुस्तक आहे. घटनापरिषदेत झालेल्या मान्यवर नेत्यांच्या चर्चेपासून असंख्य घटनातज्ज्ञांच्या, राजकीय नेत्यांच्या लेखनापर्यंत विविध संदर्भ देत एका अनुभवसंपन्न, तत्त्वनिष्ठ सनदी अधिकाऱ्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. निव्वळ टीकाटिप्पणी करण्यात समाधान न मानता राष्ट्रीय परिस्थिती सावरण्यासाठी व सुधारण्यासाठी काय काय करता येईल, याबद्दलच्या काही उपयुक्त सूचनाही त्यांनी केल्या आहेत. त्यामुळे या विचारप्रवर्तक पुस्तकाचे मोल खचितच वाढले आहे. सर्व विचारसरणींच्या विवेकी अनुयायांनी अवश्य वाचावे, विचारात घ्यावे, अशा लक्षणीय पुस्तकाचा तितकाच समर्थ अनुवाद.
-
Teenej Dot Com 1 (टीनएज डॉट कॉम १)
‘मी अशी का वागते हल्ली?' ‘माझ्या दिसण्यात एकदम हे बदल का होताहेत?' ‘आजकाल आई-बाबा सारखी कुरकुर का करतात माझ्याबद्दल?' ‘माझी एवढी जवळची मैत्रीण - आता एकदम परक्यासारखी का वागतीये?' प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न! कोणाला विचारायची अशा प्रश्नांची उत्तरं? प्रश्न विचारायला पण कसंतरीच वाटतं. मग त्याबद्दलची तपशीलवार चर्चा तर दूरच! ‘टीन एज'मध्ये प्रवेश करणाऱ्या सगळ्याच मुलामुलींना सतावणाऱ्या समस्या अन् प्रश्न. त्यांना समजूतदारपणे सामोरे जाऊन त्यांचं शास्त्रीय पद्धतीनं निराकरण करणारं - केवळ मुलामुलींनाच नव्हे तर पालक अन् शिक्षकांनाही उपयुक्त ठरणारं पुस्तक. या क्षेत्रात नावाजलेल्या तज्ज्ञ डॉ. वैशाली देशमुख यांनी मुलामुलींना आपलंसं करून सांगितलेल्या या गोष्टी म्हणजे सल्लामसलत नाही, तर या आहेत किशोर मित्रमैत्रिणींशी मारलेल्या दिलखुलास गप्पा! टीनएज डॉट कॉम # १ @दहा ते चौदा वर्ष.
-
Mi Mohammad Khan Shapathevar Sangato Ki (मी महंमद
महंमद आमिर खान-जुन्या दिल्लीतील एका गरीब कुटुंबातील सालस मुलगा. दहावीच्या परीक्षेनंतर कराचीत राहणाऱ्या आपल्या मोठ्या बहिणीला भेटायला पहिल्यांदाच एकट्याने निघतो. परंतु दिल्ली सोडण्याआधीच गुप्तहेर यंत्रणेचे अधिकारी त्याला रस्त्यात गाठून त्याच्यावर पाकिस्तानातून एक पाकीट आणण्याची कामगिरी सोपवतात. अजाणतेपणी तो या कामास होकार देतो. पण कराचीत पोचल्यावर पोलिसांच्या भीतीपोटी तो ते पाकीट फेकून देऊन रिकाम्या हाताने दिल्लीला परततो. आणि सुरु होतात त्याच्या दुर्दैवाचे दशावतार: पोलिसांकडून अपहरण, गुप्तहेर यंत्रणेकडून अनन्वित छळ, खोट्या साक्षीपुराव्यांसह दहशवादी म्हणून तिहारमध्ये रवानगी, तुरुंगात बेदम मारहाण आणि चौदा वर्षांची एकांत कोठडी. परंतु महंमद आमिरची कहाणी म्हणजे फक्त एवढेच नाही. काळ्याकुट्ट अंधारातसुद्धा शिक्षणाचा, सच्छीलतेचा आणि आशेचा दिवा तेवत ठेवणाऱ्या जिद्दीचीसुद्धा ही कहाणी आहे. ‘मी महंमद खान शपथेवर सांगतो की...’ हे निरपराध महंमद आमिरचे उद्वेगजन्य परंतु चांगुलपणावरचा विश्वास अबाधित ठेवणारे आत्मकथन होय.
-
Savadh Aaika (सावध ऐका)
कितीही वाटले, तरी आपले शेजारी बदलता येत नाहीत. पाकिस्तान आणि चीन... हे आपले दोन सख्खे शेजारी देश. अगदी सुरुवातीपासूनच आपल्याला पाण्यात पाहणारे, आपल्याशी लढून हरवायची खुमखुमी बाळगणारे आणि भल्याबुऱ्या मार्गांनी सतत आपल्या कुरापती काढणारेदेखील! जागतिक महासत्ता बनण्याच्या मार्गावर वेगाने झेपावणारा चीन आणि भारतद्वेषापायी कोणत्याही थराला जाऊ शकणारा पाकिस्तान हे दोन देश संगनमताने आपल्याला आव्हान देऊ पाहात आहेत. त्या दोघांच्या व्यूहरचनेचा दीर्घकालीन आढावा घेणारे हे पुस्तक प्रत्येक देशप्रेमी नागरिकाला सावधानतेचा अगदी समयोचित इशाराही देत आहे...
-
Chitrabhaskar ...(चित्रभास्कर)
भारतीय चित्रपट-संगीताचा केवळ संगीताच्या अंगाने नव्हे; तर परंपरा, इतिहास, सामाजिक स्थित्यंतरे, आर्थिक बाबी अशा कितीतरी पैलूंचा वेध घेणारा बहुआयामी ग्रंथ.
-
Danshakal (दंशकाल)
विहिरीत अंधार आहे. डोकावून पाहिलं तर भोवळ वगैरे येईल इतपत अंधार. अंधारात काहीही असू शकतं; काहीहीम्हणजे काहीही. पण ते काहीही म्हणजे नेमकं काय? हे आत उतरल्याशिवाय कळणार नाही. आजवर आयुष्यातल्या अप्रिय, असह्य, नको असणाऱ्या गोष्टी मी विहिरीत टाकल्या. अगदी अडगळीत टाकाव्या तश्या टाकल्या. पण विहीर म्हणजे अडगळ नाही. विहिरीत आई आहे, अण्णा आहेत. विहिरीत काकूचं बाळ आहे, नंदाकाका आहे. विहिरीत दमी, तायडी आणि सुपडीही आहे. विहिरीत अनेक उत्तरं आहेत. अशा प्रश्नांची उत्तरं जे प्रश्न मला कधी पडलेच नाहीत; किंवा जे प्रश्न मी स्वत:ला कधीच पाडून घेतले नाहीत; किंवा असे प्रश्न ज्यांची उत्तरं मी कधी शोधलीच नाहीत. विहीर माझ्या आयुष्याचा रहस्यभेद आहे, जो अनेकदा शक्य असूनही मी आजवर कधीही केलेला नाही. विहिरीत उतरणं हे माझं प्राक्तन नाही. विहिरीत उतरणं हा मी राजीखुशी निवडलेला एक पर्याय आहे. बाहेरच्या वास्तवाला तोंड देण्यापेक्षा विहिरीत लपून बसणं कधीही सोपंच.
-
Katha Aklechya kaydyachi (कथा अकलेच्या कांद्याची)
चोर चोरी करू शकत नाही, शासक कर लावू शकत नाही, भाऊबंदांमध्ये वाटणी होत नाही आणि तिचे ओझेही वहावे लागत नाही. अशी संपत्ती म्हणजे बौद्धिक संपदा. तरीसुद्धा तिचेही रक्षण करावेच लागते. अगदी व्यक्तिगत पातळीपासून सामूहिक अन् राष्ट्रीय स्तरापर्यंत ही सृजन संपत्ती जपावी लागते, वाढवावी लागते. ही बौद्धिक संपदा तुम्हाला देत असते विशिष्ट हक्क. पेटंट, कॉपीराइट, ट्रेडमार्क, भौगौलिक निर्देशक, इंडस्ट्रियल डिझाइन - अशा अनेक प्रकारांनी हे हक्क तुम्हाला मिळतात. कसे मिळवायचे हे हक्क? कसे राखायचे हे हक्क? कुणी या हक्कांचा भंग केल्यास तो रोखायचा कसा? राष्ट्रीय अन् आंतरराष्ट्रीय कायद्यांची यात काय भूमिका असते? अशा अनेक मुद्द्यांबाबत मोलाचे मार्गदर्शन करणारे - संशोधक-उद्योजकांपासून लेखक-प्रकाशकांपर्यंत, गीतकार-संगीतकारांपासून नाट्य-चित्रपट दिग्दर्शकांपर्यंत, चित्रकार-छायाचित्रकारांपासून इंजिनीअर-तंत्रज्ञांपर्यंत, साऱ्या सर्जनशील व्यक्तींना त्यांच्या अनमोल निर्मितीचे भान करून देणारे - कथा अकलेच्या कायद्याची.