-
LongLeges
जेरुशा - अनाथालयातली एक पोरकी मुलगी. तिची बुद्धिमत्ता पाहून एक दयाळू विश्वस्त तिचा कॉलेजशिक्षणाचा पूर्ण खर्च उचलतात. मात्र अट एकच. तिची प्रगती तिनं पत्रांतून त्यांना कळवत ठेवायची. जेरुशानं आपल्या अनामिक उपकारकर्त्याला एकदाच ओझरता पाहिलेला. लांब ढांगांचा उंच मनुष्य. म्हणून त्याचं नाव - ’डॅडी लाँगलेग्ज’! आपल्या अनामिक वडलांना जेरुशानं पाठवलेली नितांत सुंदर पत्रं म्हणजे ही कादंबरी. एका तरुण, देखण्या अनाथ मुलीचं भावविश्व हळुवारपणे उलगडत नेणारी, मनावर प्रसन्नतेचा शिडकावा करणारी...
-
Hans Akela
तसं तर काल उत्कटपणे ’जगलेलं’ सारं तितक्याच ताजेपणानं आपल्या नजरेसमोर आजही उभं असतं- नवे अर्थ हाती घेऊन! लक्षात येत असतं की, आपला बहुतेकांचा भोवताल वरवर सारखाच आहे, पण तरीही प्रत्येकाचं प्राक्तन निराळं, निर्णय निराळे, स्वीकार-नकार निराळे, कारण इथं प्रत्येक व्यक्ती दुसरीहून निराळी! स्वतंत्र! माणसाच्या जगण्यात प्रातिनिधिक असं काही नाही. अगदी आपणसुद्धा आयुष्यातल्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळे असल्याचं अनुभवत असतोच की! जितकी आपली ’उमजण्या’ची ताकद मोठी, तितकं आपलं ’भंगणं’ अधिक! ’उमजून’ घेण्याच्या मनानं मांडलेल्या या खेळात म्हणूनच सोबत उरते ती फक्त एकटेपणाची तीप संवेदना! जाणिवेच्या अथांग आकाशात झेप घेऊ पाहणारा प्रत्येक हंस अकेला आहे, तो या अर्थानंच! वेगवेगळ्या माणसांचं वेगवेगळं, परंतु तरीही हे ’अकेलापन’ अधोरेखित करणार्या मेघना पेठेंच्या कथा.
-
Jhadajhadti
तुमच्या बागा फुलाव्यात, ऊस मळे झुलावेत, साखर कारखाने निघावेत, यंत्रं चालावीत, तुमच्या घराघरात वीज खेळावी, म्हणून आम्ही आमची गावं आणि आमचं भवितव्य धरणाच्या घशात कोंबलं. विकासाचा नारळ फोडण्यासाठी दगड म्हणून आमची डोकी वापरलीत. खोबरं तुम्हाला मिळालं आणि आम्ही पाण्यासाठी, साध्या स्मशानासाठी भिका मागायच्या.जिवंतपणी आणि मेल्यावरही झडती चालूच. गाव आणि देव पाठीवर बांधून चालणार्या हजारो धरणग्रस्तांची मन सुन्न करणारी कहाणी.
-
Life And Death In Shanghai
'सामान्य माणसांना सतत जागृत ठेवण्यासाठी क्रांतीचे धक्कातंत्र अनुसरले पाहिजे’, या माओच्या वचनाचा आधार घेऊन १९६६ साली चीनमध्ये ’सांस्कृतिक क्रांती’ नावाची प्रचंड उलथापालथ घडवून आणली गेली. चिआंग चिंगने म्हणजे माओच्या पाताळयंत्री बायकोने घडवून आणलेल्या त्या ’क्रांती’मध्ये जिचे जीवन पार उद्ध्वस्त झाले, अशा एका अभागी चिनी मातेचे हे चित्तथरारक आत्मकथन आहे. निएन चंग हे तिचे नाव. ही कथा जशी तिच्या हालअपेष्टांची, तशीच तिच्या हरपलेल्या मुलीचीही. विध्वंसक रेड गार्ड्स, मतलबी पक्षनेते आणि बापुडवाणे जनसामान्य या सर्वांचे अत्यंत प्रत्ययकारी चित्रण यांमुळे जगभर गाजलेले पुस्तक.
-
Sarvottam Ravindra Pinge
ललित लेखन हा साहित्यातील बहुधा सर्वात सोपा आणि तितकाच अवघड प्रकार असावा. कोणीही उठावं आणि कोणत्याही विषयावर लिहावं आणि त्यास ललित लेखन असं लेबल चिकटवावं, असं गेली अनेक वर्ष सुरू आहे. तरीही कसदार ललित लेखकांची परंपरा मराठीत मोठी आहे. याच परंपरेतील एक भारदस्त नाव रवींद्र पिंगे असं आहे. पिंग्यांचं गेल्याच वर्षी निधन झालं. त्यापूर्वीची सलग तीन-चार दशकं ते लिहीत होते. हे काम सोपं नाही. इतका प्रदीर्घ काळ सातत्यानं वाचकांना मोहून टाकणारं लिखाण करणं, ही एक तपश्चर्याच आहे. त्याचं कारण म्हणजे कथा-कविता-कादंबरी अशा कोणत्याही राजमान्य साहित्यप्रकाराऐवजी पिंगे हे केवळ ललित लेखनच करत राहिले आणि त्यातून त्यांनी स्वत:चा असा विशिष्ट वाचकवर्ग तयार केला. पण पिंगे हे केवळ लेखकच नव्हते. तर ते एक साहित्यकर्मी होते. अनेक साहित्यिक उपक्रमांशी त्यांचा निकटचा संबंध होता आणि अनेकांना लिहितं करण्यातही त्यांचा मोठा वाटा होता. पिंग्यांनी नोकरी केली ती आकाशवाणीत. त्यानिमित्तानं त्यांचा अनेक मोठमोठ्या व्यक्तिमत्त्वांशी संबंध आला. शिवाय, पिंग्यांना प्रवासाची आवड होती आणि चांगलंचुंगलं खाण्याचीही. वाचन हा तर त्यांचा केवळ छंद नव्हे, तर त्यांच्या जीवनाचाच एक अविभाज्य घटक होता. त्यातून त्यांचं आयुष्य कमालीचं समृद्ध होत गेलं. हेच अनुभव पिंगे शब्दबद्ध करत गेले आणि त्यातून एक मोठा लेखक निर्माण झाला.