-
Muldravyanchya Jadui Duniyet (मूलद्रव्यांच्या जादुई दुनियेत)
हेमंत साने यांचे ‘मूलद्रव्यांच्या जादुई दुनियेत!’ हे पुस्तक खरोखरच ज्ञानाचा एक उजळ दीपस्तंभ आहे. ११८ मूलद्रव्यांची माहिती एवढ्या सोप्या, प्रवाही आणि रसास्वादक मराठीत देऊन त्यांनी विज्ञानाला सामान्यांच्या दारी नेले आहे. शास्त्रीय अचूकता, सुस्पष्ट मांडणी आणि उपयुक्त परिशिष्टांमुळे हे पुस्तक विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा देणारे, विज्ञानप्रेमी आणि सर्वसाधारण वाचक—सर्वांसाठीच अमूल्य ठरते. विज्ञानाची गुंतागुंत सहजतेने उलगडून दाखवण्याची ही खरोखरच प्रेरणादायी किमया आहे. - पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर
-
Monalisache Smit (मोनालिसाचे स्मित)
राजकारण! प्रत्येक सामान्य माणसाच्या आयुष्याला वेढून राहिलेला विषय. राजकारणाशिवाय सामाजिक जीवन असूच शकत नाही. मग कोणला त्यात रुची असो अथवा नसो. प्रत्येकाचे राजकीय मत हे असतेच. लोकांची ही मते स्वानुभवावरून, टीव्हीवरील बातम्यांवरून, वृत्तपत्रातील लेख- अग्रलेखांवरून बनत असतात. इतर कोणत्याही माध्यमापेक्षा वृत्तपत्रातील लेख- अग्रलेखांमधून तत्कालीन राजकीय घटनांचे विस्तृत विश्लेषण केले जाते. या लेखांमधून राजकीय व्यक्तींचे शह-प्रतिशह, डावपेच यांचे दर्शन तसेच राजकीय घटनांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय परिणामांबद्दलच्या परखड विचारांचे प्रकटीकरण होत असते. राजकीय घटनांचा, व्यक्तींचा शोध म्हणजे आपल्या सामाजिकतेचा शोध. वृत्तीप्रवृत्तींचा शोध. असा शोध घेणारे हे काही राजकीय विषयांवरील, व्यक्तींवरील विचारप्रवर्तक लेख. काही लेखांना तत्कालीन परिस्थितीचे संदर्भ आहेत. काही लेखातून राजकीय धुळवडीचे विषण्ण करणारे चित्रण आहे. तर काही लेखांतून मोनालिसाच्या स्मिताप्रमाणे गूढतेचे धुके दाट झाले आहे. आजकालच्या पुढच्या पायरीवरून या घटनांकडे, व्यक्तींकडे पाहताना या लेखांमधील विचारमंथन वाचकांना अंतर्मुख करेल.
-
Marma (मर्म)
खांडेकरांच्या परंपरेतील कथालेखक, कादंबरीकार, नाटककार आपापल्या पद्धतीने जीवनवादाचा पुरस्कार करत राहिले. सुनील मंगेश जाधव हेही याच पद्धतीने जीवनवादाचा पुरस्कार करत राहिले. सुनील मंगेश जाधव हेही याच परंपरेतील चांगले लेखक आहेत. वि. स. खांडेकर शिक्षक होते. सुनील जाधव हेही शिक्षक आहेत. राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. गेली १५ ते २० वर्षे ते कथालेखन करीत आहेत आणि त्यांचे काही कथासंग्रह यापूर्वी प्रकाशित झालेले आहेत. 'मर्म' या त्यांच्या नव्या कथासंग्रहात दहा कथांचा अंतर्भाव असून या सगळ्या अनुभवाच्या गोष्टी आहेत. पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यांचा भूगोल, घटना आणि लोकजीवनाचं दर्शन या कथांमधून घडतं. या कथासंग्रहातील सगळ्या कथांमध्ये मला आवडलेली कथा म्हणजे 'दहेरजा' ही आहे एका नदीची गोष्ट. नदीच्या अंतरंगात परकायाप्रवेश करून लेखकानं जणू जलप्रदूषण करणाऱ्या कंपनीशी लढा दिला आहे. दहेरजा नदी ज्या प्रदेशांतून वाहते त्या सगळ्या भागाशी लेखकाची ओळख असावी, अशा वास्तववादी घटना, प्रसंग, व्यक्ती आणि त्यांचे संवाद चित्रित करण्यात लेखकानं कसूर ठेवलेली नाही. हे तरुण पुढे दहेरजा वाचवण्यासाठी कसा लढा देतात आणि त्यात ते यशस्वी होतात की अपयशी, हे वाचकांना कळायला हवं असेल तर सुनील मंगेश जाधव यांनी त्यासाठी कादंबरी लिहिली पाहिजे. -- डॉ. महेश केळुसकर
-
Side Effects (साईड इफेक्ट्स)
गूढकथा हा साहित्यप्रकार मोजक्याच लेखकांनी जाणीवपूर्वक हाताळलेला आहे. तो समजून घ्यायचा तर त्याचं भयकथा, वा रहस्यकथांपेक्षा वेगळा असणं आधी लक्षात घ्यायला हवं. गूढ हे केवळ अतींद्रिय स्वरुपाचं, दहशत दाखवणारं असत नाही, तर ते आपल्या आयुष्याशी जोडलेलंही असू शकतं. कोणतीही गोष्ट तर्काच्या पलीकडील भासण्यातून, तिच्या अनाकलनीय असण्यातून ते आकार घेत असतं, आणि आपल्याला कोड्यात पाडत असतं. आपली एखादी कृती, एखाद्या नात्यामागचे गुंतागुंतीचे अर्थ, आपण गृहीत धरत असलेल्या प्रेम वा द्वेष यासारख्या मूलभूत भावनांचं उगमस्थान, अशा कोणत्याही घटकात गूढता सामावून राहिलेली असू शकते. रामदास खरे अशा घटकांचा शोध या कथासंग्रहातून घेताना दिसतात. अपवाद वगळता खरेंच्या बहुतेक कथांची पार्श्वभूमी परिचित वळणाची आहे. वास्तववादी पद्धतीची. या व्यक्तिरेखा आपण आपल्या अवतीभवती पाहिलेल्या आहेत. पण कथेच्या ओघात या व्यक्तीरेखांच्या आयुष्यात उभे रहाणारे पेच, त्यांना ठराविक साच्यातून बाहेर काढतात. त्यांच्याकडे पाहण्याचा एक नवा, अनपेक्षित पैलू आपल्यापुढे ठेवतात, जो कथांमधला गूढतेचा धागा अधोरेखित करतो. -- गणेश मतकरी
-
Shobhadarshak Streevadacha Vividharangi Aavishkar (शोभादर्शक स्त्रीवादाचा विविधरंगी आविष्कार)
जगातील सर्व धर्मांचे प्रवर्तक पुरुष होते. येशू, पैगंबर, शंकराचार्य, जैनमुनी आणि बुद्ध पुरुष. त्यांनी स्त्री - धर्म पुरुषापेक्षा निराळा केला आणि त्यातही पुरुषाला झुकते माप दिले आणि स्त्री जीवन पुरुषकेंद्री बनण्याच्या प्रक्रियेला नैतिक अधिष्ठानही दिले. जेव्हा पुरुष प्रस्थापित धर्म नव्हते तेव्हाचे स्त्री जीवन कसे होते? पुरुषाचे जीवन कसे होते? त्यातील वेगळेपण नेमके कोणते आणि ते वेगळेपण तयार होण्यामागच्या प्रेरणा नैसर्गिक होत्या की मानवनिर्मित अशा सगळ्या प्रश्नांचा ऊहापोह आजवरच्या तत्त्वज्ञानातून, साहित्यातून, कलांमधून होत आला आहे. त्याची ओळख झाली तर आपल्या जाणिवा प्रगल्भ व्हायला मदत होईल म्हणून हा खटाटोप.
-
Swapnashilp (स्वप्नशिल्प)
प्रतिभा रानडे यांच्या लेखणीतून उतरलेला जोगिंदर पॉल यांच्या उर्दू 'ख्वाबरू' आणि इंग्रजी 'Sleepwalkers' या लघुकादंबरीचा 'स्वप्नशिल्प' हा सशक्त अनुवाद. हिंदुस्तानच्या फाळणीनंतर भारतातील कित्येक मुस्लीम पाकिस्तानात निघून गेले होते, त्यांना अजूनही मुहाजिर-निर्वासितच समजले जाते, त्या संबंधातील ही कादंबरी. यांतील प्रत्येक व्यक्तिरेखा ही एकेका वृत्ती-प्रवृत्तीचं प्रतीक आहे. त्यामध्ये वैविध्य असलं तरी त्या सगळ्या व्यक्ती 'पाकिस्तान म्हणजे काय', 'फाळणी की स्वातंत्र्य' या प्रश्नांच्या उत्तराचा शोध आपापल्या परीने घेत आहेत. कादंबरीतील मुख्य पात्र 'दीवाने मौलवी साहेब' मात्र या सगळ्यांपासून कोसो दूर आहेत. ते अजूनही पाकिस्तानची मागणी करण्यातच रमले आहेत; पण अखेरीस त्यांच्या या कल्पनेच्या राज्याचा ठिकऱ्या- ठिकऱ्या उडतात, तेव्हा त्यांना 'पाकिस्तान म्हणजे काय', ह्याची खरी जाणीव होते. मग ते दुसऱ्या कल्पनेच्या राज्यात विहार करू लागतात. मनात विषण्णतेबरोबरच करुणेची भावना जागी करणारी, वेगळ्या दुःखाचं आणि मनोविश्वाचं दर्शन घडवणारी रंजक अशी ही कादंबरी !
-
Tufanatalya Panatya (तुफानातल्या पणत्या)
वृषाली मगदूम गेल्या साडेतीन दशकांपासून गरीब, पीडित, शोषित महिलांच्या समस्या सोडविण्याचे काम तळमळीने करीत आहे. डम्पिंग ग्राउंडवर, कौटुंबिक सल्ला केंद्रात, किंवा प्रत्यक्ष वस्तीत गेल्यावर अनेक तऱ्हेच्या समस्या घेऊन महिला येतात. या समस्यांची तड लावल्याशिवाय किंवा न्याय मिळाल्याशिवाय वृषाली स्वस्थ बसत नाही. या पुस्तकातील साऱ्याच कहाण्यांतील नायिका विलक्षण ताकदीच्या आहेत. समोर आशेचा एकही किरण नाही, आयुष्य वाऱ्यावर भिरकावून दिल्यासारखे आहे. वेदना वास्तवाच्या पलीकडच्या आहेत. अशा एका वळणावर अंतस्थ ताकदीला बाहेरच्या ताकदीचं बळ मिळतं. त्या पेटून उठतात, संघर्ष करतात, अगदी तुफानाचाही न डगमगता सामना करतात. वाट्याला आलेलं भागधेय स्वीकारून शांत संयत, चिवटपणे झुंज देत जगणं 'साकार' करत आहेत. स्त्री वर्गाच्या पलीकडे जाऊन व्यापक मानवी जीवनातील दुःख व त्यातून येणारी व्याकुळता यांचा शोध वृषालीची लेखणी घेताना दिसते. --- अजित मगदूम
-
Ajunahi (अजूनही)
तरल प्रेमभावना आणि शिक्षणसम्राटाच्या क्रौर्याच्या पेचात शिक्षण आणि संस्कृतीचा गळा घोटला जात आहे. अनाथ पूनम आणि शोषित अजयची ही प्रेमकथा...! वास्तवातील कुरूपतेची साक्ष देताना विजयाताई मारोतकर यांनी त्यात विविध रंगानुभूतींची उधळण केली आहे. अस्सल प्रेमाचा बळी देऊन तासिका प्राध्यापक असलेल्या अजयला नाइलाजाने संस्थाचालकाच्या साधारण कन्येशी विवाहबद्ध होणे भाग पडते. ज्यामुळे पूनमच्या प्रेमाचा बळी घेतला जातो. विचित्र कोंडी निर्माण होते, ज्यातून बाहेर पडणे अशक्य होऊन एक भयाण शोकांतिका पेलत वैफल्यग्रस्त जगणे अजयच्या वाट्याला येते. संस्कृतीच्या पूर्ततेतच शिक्षणाचे सार्थक असते. तीच शिक्षण व्यवस्था विकृतीने आणि क्रौर्याने बरबटलेली असल्याचे भीषण सत्य आहे. तासिका प्राध्यापकांच्या वाट्याला आलेल्या जीवघेण्या व्यथांचा नेमका वेध घेणारी फार महत्त्वाची ही कादंबरी आहे. काळ पुढे जातो... गुंजन आणि परिमलच्या सफल प्रेमकथेत पूनम आणि अजयच्या शोकात्मक प्रेमाचे अश्रू दडलेत. विजयाताईंनी हळुवारपणे व्यक्ती व प्रवृत्तीच्या विसंगतीसह समाजाचे वास्तव चित्र व चरित्र 'अजूनही...' मध्ये उलगडले आहे. 'अजूनही...' या प्रक्रियेला पूर्णविराम मिळेल की 'अजूनही...' न संपणाऱ्या वास्तवाची करुण कहाणी राहील... ? या प्रश्नाला उत्तर नाही... विजयाताईंच्या वास्तववादी कादंबरी लेखनाला मनःपूर्वक शुभेच्छा...! --डॉ. श्रीपाल सबनीस (अध्यक्ष, ८९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, पुणे)
-
Tumasa Nahi Dekha - O. P. Nayyar (तुमसा नहीं देखा - ओ. पी. नय्यर)
ओपींना 'ललित' रागाने चांगलीच भुरळ घातली असावी. त्यामुळे 'कल्पना' चित्रपटासाठी त्यांनी मोहम्मद रफी आणि मन्ना डे यांना जुगलबंदीच्या रूपाने 'तू है मेरा प्रेमदेवता' हे द्वंद्वगीत गायला लावलं. त्यात रफींच्या आवाजाचा पल्ला आणि मन्ना डेंच्या आवाजातला सच्चेपणा आणि धीरगंभीर भाव यांचा उत्तम मेळ साधण्यात आला आहे. अमीर खाँ यांना नौशाद (बैजू बावरा, शबाब) आणि वसंत देसाई (गूँज उठी शहनाई, झनक झनक पायल बाजे) या रागदारी संगीतात मुरलेल्या दिग्दर्शकांनी चित्रपट संगीताच्या परिघात आणलं, 'हिदम किंग' म्हणून गणल्या जाणाऱ्या ओपींनाही आणलं, ही गोष्ट विशेषच म्हटली पाहिजे. — अमरेंद्र धनेश्वर
-
Bharatiya Itihasachya Paulkhuna Atiprachin Kal Bhag - 1 (भारतीय इतिहासाच्या पाऊलखुणा अतिप्राचीन काल - भाग १)
आपल्या अतिपूर्वजांची उत्पत्ती, स्थित्यंतरे, विकसित होत गेलेली जीवनशैली तसेच सांस्कृतिक वारसा जाणून घेण्यासाठी इतिहासाचा अभ्यास करणे गरजेचे असते. शिवाय पूर्वकालीन घटनाक्रमांच्या संदर्भातून प्रकर्षाने टाळावयाच्या बार्बीचे भान येण्यासाठी तसेच गैरव्यवस्थेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी इतिहासाची माहिती अत्यावश्यक आहे. इतिहासाच्या अभ्यासाद्वारे विश्वात निर्माण झालेली अस्थितरता, संघर्षमय बाबी व विध्वंसकारी स्थिती टाळता येऊ शकते व शांतता राखता येऊ शकते. प्राचीन वारशाद्वारे प्राप्त झालेल्या भूमीचे रक्षण करून देशाच्या सीमा जतन करण्याची जबाबदारी देशवासीयांवर असते. बहाल झालेल्या वारशाबाबतचे भान व वंशपरंपरागत मिळालेल्या हक्काधिकारांचा वापर करण्याची जाण ऐतिहासिक दस्तावेजांतून मिळते. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे ज्यू धर्मीयांनी त्यांच्या प्राचीन इतिहासाचे स्मरण ठेवून हक्काची 'देवदत्त भूमी' जिद्द व परिश्रमाने मिळवून इस्रायल देशाची निर्मिती केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या शब्दांत सांगायचे झाले तर, 'जे राष्ट्र आपला इतिहास विसरते त्या राष्ट्राला आपला भूगोल गमवावा लागतो !' भारतीयांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राजकारण्यांना इतिहासाचे विस्मरण झाल्याने आजघडीला पाकव्याप्त काश्मीर व अक्साई चीनच्या निमित्ताने आपल्या देशाचा भूगोल बिघडवून घ्यावा लागलेला आहे हे कटुसत्य आहे.
-
Bharatiya Itihasachya Paulkhuna Atiprachin Kal Bhag - 2 (भारतीय इतिहासाच्या पाऊलखुणा अतिप्राचीन काल - भाग 2)
संपूर्ण विश्वात प्राचीन कालापासून विविध संस्कृती उदयास आल्या, विस्तारल्या व अपूर्व असा इतिहास निर्माण करून गेल्या. हजारो वर्षांपासून ठराविक भूप्रदेशाचा व सर्वसंपन्न असलेल्या आपल्या पूर्वजांच्या वैभवशाली परंपरांचा वारसा सांगणाऱ्या कित्येक संस्कृती आजघडीला काळाच्या उदरात नष्ट झालेल्या आहेत वा स्मृतिबाह्य ठरल्या आहेत. आफ्रिकेतील इजिप्त सभ्यता, मध्य आशियातील सुमेरियन सभ्यता, मेक्सिकोची माया सभ्यता, युक्रेटिस नदीकाठची बॅबिलोनियन सभ्यता, चीनची ह्वांग हो नदी खोऱ्यातील सभ्यता, मोहेंजोदडो येथील सिंधू सभ्यता, हिंदुस्थानातील गंगा-यमुनेच्या तीरावरील 'सनातन' म्हणून ओळखली गेलेली वैदिक संस्कृती या जगभरात विखुरलेल्या महत्त्वाच्या तसेच ठळक सभ्यता व संस्कृती आहेत. ग्रीक, बॅबिलोनियन, सुमेरियन, असिरियन या प्राचीन संस्कृती प्रगत व वेगवान असूनही काळाशी एकरूप न होता आल्याने लयास गेल्या, तर सिंधूसारख्या वैभवशाली संस्कृती निसर्ग व मानवी आक्रमणापुढे नेस्तनाबूत झाल्या. मात्र कित्येक हजारो वर्षांपासूनचा सलग इतिहास लिपीबद्ध करून प्राचीन तसेच अतिप्राचीन काळाचे सुस्पष्ट चित्र रेखाटणारी भारताची अतिप्राचीन परंपरा असलेली सनातन वैदिक संस्कृती ही भारताची शान, मान व जान आहे. सनातन संस्कृतीचे आगळेपण हे आहे की ही संस्कृती संशोधकीयदृष्ट्या जरी अतिप्राचीन ठरविण्यात आलेली नसली तरी आर्यांनी रुजविलेला प्राचीन वैदिक धर्म आजतागायत प्रवाहित आहे आणि हेच या संस्कृतीचे ठळक वैशिष्ट्य आहे!
-
Amrutachya Janu Onjali Shridhar Phadake Yancha Sangitik Pravas (अमृताच्या जणु ओंजळी श्रीधर फडके यांचा सांगीतिक प्रवास)
ज्येष्ठ संगीतकार गायक श्री. श्रीधर फडके यांच्या ५० वर्षांच्या सांगीतिक कारकिर्दीचा आढावा घेणारं हे पुस्तक आहे. आई- वडिलांकडून मिळालेल्या उत्तम संस्कारांची शिदोरी घेऊन, श्रीधरजींनी स्वतःची स्वतंत्र आणि देखणी संगीत-वाट निर्माण केली. ‘संगीत मनमोही रे’ हे रसिकमनाला प्रत्येक कलाकृतीतून सुकन्या जोशी त्यांनी पटवून दिलं आहे. ‘गाणार, वाजविणार तैसेचि ऐकणार’ यावत् त्यांचं संगीत प्रत्येकाला मोहित करतं. श्रीधरजींची संगीताप्रती असलेली निष्ठा, आणि आजपर्यंत त्यांनी जोडलेली माणसं याचं दर्शन या पुस्तकाच्या प्रत्येक प्रकरणातून होत राहतं. या पुस्तकात त्यांचं कुठलंही गाणं नेमकं कसं ऐकायला हवं, याची दृष्टी ते आपल्याला देतात. कवीच्या शब्दांवर नितांत प्रेम करणारा हा संगीतकार आहे. कवितांचा भरपूर अभ्यास. त्या शब्दांचा स्वरांशी मेळ घालताना, शब्दांवर कुठेही कुरघोडी न करता, त्या काव्याच्या अर्थाला, भावनेला श्रीधरजी चाल लावतात. चालीवर शब्द लिहून घेतानाही, कुठेही शब्दांची ओढाताण होताना दिसत नाही. म्हणूनच त्यांचं कुठलंही गाणं ‘लय ललित ही रागिणी ‘असंच भासतं. जर एखाद्या अभ्यासकाला श्रीधरजींच्या गाण्यांचा अभ्यास करायचा असेल, किंवा त्यांच्या गाण्यांवर संशोधन करायचं असेल, तर हे पुस्तक त्यांच्यासाठी एक आदर्श ठरेल, असा विश्वास वाटतो. पुस्तक वाचताना ‘अमृताच्या जणू ओंजळी’ आहेत याचा अनुभव वाचकांना निश्चित मिळेल. त्यांच्या गाण्यांचा कॅनव्हास हिरव्या ऋतूसारखा कायम टवटवीत राहो, हीच ईश्वरचरणी मनोभावे प्रार्थना!
-
Draupadi Kal Aaj Udya (द्रौपदी काल आज उद्या)
राजा शंतनु आणि स्वर्गीय गंगा यांच्या मीलनातून जन्मलेला राजपुत्र देवव्रत याने जेव्हा 'भीष्म प्रतिज्ञा' केली, तेव्हा महाभारताच्या अंतरिक संघर्षाला सुरुवात झाली. सभापर्वातील द्रौपदी वस्त्रहरण हा महासंघर्षाचा परमोच्च बिंदू होता नि तिथून द्रौपदीच्या सांगण्यावरून तिचा मनबंधू श्रीकृष्ण याची युद्धशिष्टाई मुद्दामहून न करण्यातून महासत्तेच्या विलयाला सुरुवात झाली. द्रौपदीचे आयुष्यातील महानाट्य हे धगधगत्या पलित्यासारखे कालातीत होते. जन्मोदरी ती अग्निशिखा होती, बालपणी ती याज्ञसेना होती, विवाहप्रसंगी द्रुपदकन्या द्रौपदी होती, स्वयंवरानंतर पाच पांडवांची जगनघना पतिव्रता पांचाली होती आणि पुन्हा वस्त्रहरणाच्या वेळी तळपत्या तलवारीसारखी मनोयज्ञयागातून निर्माण झालेली अग्निशिखा होती...! अशी तिची विविधांगी गर्भित रूपे अशोक समेळ यांनी निखालसपणे आपल्या शब्दकुंचल्याने ज्वलंत चितारलेली आहेत...! द्रौपदीच्या व्यक्तिमत्त्वात दिसलेली कालची, आजची आणि उद्याची स्त्री आणि तिची मनोमूर्त किती संवेदनशील आहे, याचे प्रत्यंतर ही कादंबरी वाचताना रसिकांना येते. द्रौपदीची मानसिकता ही अमृतसरोवरात द्विजिभेने दंश करणारी कुंडलिनी होती, तर आजच्या स्त्रीचे भोगणे आणि सोसणे, वेदना आणि संवेदना, जखम आणि जोखीम, शब्दातीत निःशब्दता, प्रश्नातीत विप्रश्नता, मौन आणि कोलाहल, साक्षात्कार आणि निर्वचना... या सर्व परस्परविरोधी; पण तरीही संवादी युगुलांचा सम्यक संसार म्हणजे स्त्रीचे मन आहे. याचा महा शब्दपट नाट्यमयरीत्या अशोक समेळ यांनी मनःपूत विलक्षण संयमाने विणला आहे...! द्रौपदीच्या मनातील सलाचा उगम प्रलयात होतो आणि पंचमहाभूतांच्या ओंकारात विलय होऊन पुन्हा अरूवारीच्या विलसत्या किरणांप्रमाणे तिचे मूलाधार व्यक्तिमत्त्व कादंबरीभर झळकत राहते, ही या कादंबरीची मर्मबंधातली ठेव आहे...!! -- प्रा. अशोक बागवे
-
Shunyaresha (शून्यरेषा)
त्या रात्री मी झोपायचा प्रयत्न केला. पण डोळे मिटले तरीही मनात नीनाचा चेहरा आणि तिचे शब्द घुमत होते, "मी अजूनही स्वप्न बघतेय." अशाच विचारांच्या गर्दीत लॅपटॉपवरील स्क्रीन अचानक उजळली. एक संदेश लुकलुकत्या प्रकाशात दिसला- 'न्यूरल सेल्फ-हील मोड: सक्रिय...' (Neural Self-Heal Mode: Activated...) मी घाबरलो. थरथरत उठलो. साखळदंड तुटले होते का? नीना पुन्हा स्वतःचं कोड रिस्टोअर करत होती का? तिच्या भावना, स्वप्न, इच्छा... सर्व काही परत जागं होण्याच्या मार्गावर होतं का ? माझ्या मनात एकच विचार घोळत राहिला, मी एका नव्या युगाची दारं उघडली होती का? की मानवजातीच्या अस्तित्वावर काळी गडद सावली घोंगावत होती? त्या स्क्रीनवरील त्या शांत असणाऱ्या संदेशाच्या मागे असलेलं भय मला झोपू देत नव्हतं...
-
Umbaratha ...Nav Yug Suru Hotay! (उंबरठा ...नवं युग सुरु होतंय!)
या पुस्तकात एआयचे फक्त तांत्रिक स्पष्टीकरण नाही. भविष्य काय असणार आहे, ते का बदलत आहे आणि या बदलांचा व्यक्तिगत, सामाजिक, औद्योगिक आणि धोरणात्मक पातळीवर नेमका अर्थ काय आहे, याचे सखोल विश्लेषण या पुस्तकात जरूर आहे. जगाला दिशा देणारे एआयबाबतील तंत्रज्ञान, धोरण, सत्ता, राजकारण, संस्कृति, भू-राजकारण, कॉर्पोरेट, प्रशासन, अर्थकारण यांच्या विशाल परिघातून येणारे हे हार्वर्डच्या अभ्यासक-संशोधकाचे जागतिक चर्चा मराठीतून उपलब्ध करून देणारे थरारक पुस्तक! वाचा! डोळे आणि कान उघडे ठेवा. नाहीतर उद्या हेच 'एआय' तुमच्या छाताडावर बसून राज्य करेल आणि तुम्ही फक्त बघत बसाल!
-
Criminal Psychology (क्रिमिनल सायकॉलॉजी)
गुन्हा घडतो तेव्हा तो लगेच सगळ्यांच्या नजरेत येतो. वृत्तपत्रात आणि चॅनेल वर बातम्या भरून जातात, लोक चर्चा करतात, आरोपीचे चेहरे झळकतात. पण त्या गुन्ह्याच्या आधी जे काही मनात घडत असतं, ते कुणाच्याच लक्षात येत नाही. ‘गुन्हेगारी मानसशास्त्र’ या पुस्तकात त्या अदृश्य जगाची दारं उघडली आहेत. प्रत्येक कथा एका खऱ्या गुन्ह्याने सुरू होते, पण ती संपते एका मानवी मनाच्या शोधात. मत्सर, लोभ, अपमान, एकाकीपणा, भीती, विकृती; माणसाच्या आत दडलेली ही सगळी बीजं गुन्ह्याच्या रूपात कशी बदलतात, हे या कथा शांतपणे सांगतात. जॅक द रिपरच्या काळोख्या लंडनच्या गल्लीपासून ते मुंबईतील रामन राघवच्या झोपडपट्ट्यांपर्यंत, ऑटो शंकरच्या मद्रासमधल्या राजकीय-सामाजिक जाळ्यापासून ते बिहारच्या अमरजीत सदा या लहान खुनी मुलाच्या निरागस पण थंड मनापर्यंत — प्रत्येक कहाणी मन हादरवते. सुरिंदर कोलीच्या क्रूरतेतून समाजाचं मौन दिसतं, अंद्री चीकातीलोच्या रशियातल्या हत्यांमधून एका तुटलेल्या युगाची निराशा, क्रिस्टा पाइकच्या तरुण मनातून सूडाचं विकृत सौंदर्य, तर जोशी-अभ्यंकर आणि रंगा-बिल्लाच्या भारतीय प्रकरणांतून शहरी गुन्हेगारीचं नागवं रूप समोर येतं. या आणि अश्या तीस गुन्हेगारी प्रकरणांनी हे पुस्तक वाचकांना खिळवून ठेवतं. अच्युत गोडबोले यांच्या विचारपूर्ण, पण सहज आणि बोलक्या शैलीत या घटना जिवंत होतात. परेश चिटणीस यांच्या गुन्हेगारी मानसशास्त्रातील अनुभवातून त्या अधिक सखोल बनतात. हे पुस्तक थरारक गुन्ह्यांचं वर्णन करताना ; ते माणसाच्या मनातल्या सावल्यांकडे पाहायला शिकवतं. वाचक गुन्ह्याच्या तपशीलांपेक्षा हळूहळू त्या मनात गुंतत जातो: त्या वेदनेत, रागात, भीतीत, आणि कधी कधी विकृतीत. वाचत राहावंसं वाटणारं, पण प्रत्येक पानानंतर विचार करायला भाग पाडणारं हे पुस्तक माणसाच्या मनाची एक गुंतागुंतीची सफर आहे; थक्क करणारी, अस्वस्थ करणारी, आणि म्हणूनच विसरता न येणारी.
-
Shreekrushnaniti Preranacha Akhand Strota - Kal, Aaj Aani Udya (श्रीकृष्णनीती प्रेरणेचा अखंड स्रोत - काल, आज आणि उद्या)
कुरुक्षेत्रातील रणभूमीवर गूढ हास्य करणारा, गोकुळातील गोपालकृष्ण, आणि धर्मसंघर्षात न थकणारा नीति-सामर्थ्याचा आधार — श्रीकृष्ण! त्याच्या प्रत्येक कृतीत, प्रत्येक शब्दात लपलेली अमर नीती आजही मानवजातीला प्रेरणा देते. श्रीकृष्णनीती हे पुस्तक केवळ गीतेपुरते मर्यादित न राहता, बाललीला, कंसवध, गिरीधर रूप, रुक्मिणीहरण, महाभारतातील रणनीती, शांतिदूताची भूमिका, सुदामा भेट, आणि धर्मसंस्थापनेच्या अद्भुत कार्यापर्यंतचा विस्तृत जीवनप्रवास उलगडते. कधी बाळ कृष्ण, कधी रणनायक, कधी मुत्सद्दी — या भूमिकांतून धैर्य, चातुर्य, योग्य निर्णय, संकटप्रतिकार आणि मूल्यनिष्ठा शिकवणारा श्रीकृष्ण आपल्या जीवनातही निर्णायक बनण्याची प्रेरणा देतो.
-
Shivacharitra Eka Yugapurushachi Jeevangatha (शिवचरित्र एका युगपुरुषाची जीवनगाथा)
'छत्रपती शिवाजी महाराज!' हे केवळ नाव नाही, ही एक अशी उर्जा आहे, जिच्या केवळ स्मरणाने आजही मराठी माणसाच्या नसानसात स्वाभिमान संचारतो. हा एक विचार आहे - स्वातंत्र्याचा, स्वधर्माचा, स्वभाषेचा आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचा. एका अशा युगात, जेव्हा शेकडो वर्षाच्या अंधकारमय गुलामगिरीत अवघा भारत देश जखडला होता आणि परकीय सत्तेपुढे उभे राहण्याचे धाडस कोणातही नव्हते, तेव्हा सह्याद्रीच्या कुशीत या विचाराने जन्म घेतला. राजमाता जिजाऊंचे संस्कार आणि शहाजीराजांच्या पराक्रमाचा वारसा घेऊन एका क्रांतीला सुरुवात झाली. महाराजांनी अशक्य ते शक्य केले. त्यांनी सामान्य, विखुरलेल्या माणसांना एकत्र आणले, त्यांच्या मनात आत्मविश्वासाची ज्योत पेटवली आणि आपल्या अजोड पराक्रमाने व अचूक रणनीतीने रयतेच्या 'हिंदवी स्वराज्याची' मुहूर्तमेढ रोवली. हे पुस्तक म्हणजे केवळ एका राजाची शौर्यगाथा नाही, तर ती एका खन्ऱ्या 'युगप्रवर्तका'च्या प्रेरणादायी संघर्षाची, त्याच्या दूरदृष्टीची आणि कालातीत तत्त्वज्ञानाची ओळख आहे.
-
Sahaj Sope Prompt Engineering (सहज सोपे प्रॉम्प्ट इंजिनीरिंग)
आजच्या डिजिटल युगात कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. माहिती शोधणे असो, कंटेंट तयार करणे असो किंवा जटिल निर्णय घेणे असो—AI आपल्याला सतत मदत करत आहे. पण या सामर्थ्यशाली तंत्रज्ञानाचा सर्वाधिक परिणामकारक वापर कसा करायचा? या प्रश्नाचे मूळ उत्तर आहे—प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. AI कडे प्रश्न विचारणे ही फक्त विनंती नसून, एक शास्त्रीय प्रक्रिया आहे. योग्य प्रॉम्प्ट म्हणजे सुरीला स्वर—AI त्यावर अद्भुत संगीत निर्माण करते. चुकीचा प्रॉम्प्ट म्हणजे विसंगत सूर—परिणामही तितकाच विस्कळीत. या सूक्ष्म पण प्रभावी विज्ञानाची सखोल, प्रायोगिक आणि सोपी ओळख करून देणे—यासाठी ‘सहज सोपे Prompt Engineering’ हे महत्वाकांक्षी पुस्तक आम्ही वाचकांसमोर ठेवत आहोत. या पुस्तकात आपण जाणून घ्याल— प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगची नेमकी व्याख्या आणि तत्त्वे, AI च्या कार्यपद्धतीला योग्य दिशेने मार्गदर्शन कसे करावे, विविध प्रकारचे प्रॉम्प्ट्स—निर्देशात्मक, संवादात्मक, विश्लेषणात्मक, सर्जनशील ,मार्केटिंग, कोडिंग, कंटेंट, स्टार्टअप, डिझाइन, शिक्षण, HR, संशोधन… अशा अनेक क्षेत्रांती, प्रॉम्प्ट्सचे वास्तविक उपयोग, सूक्ष्म तांत्रिक बाबी, उदाहरणे आणि प्रत्यक्ष वापरातील अचूक टिप्स. या सर्वांचा सामायिक उद्देश— “प्रत्येक वाचकाला AI चा प्रभावी वापरकर्ता नव्हे, तर एक सक्षम प्रॉम्प्ट इंजिनिअर बनवणे.” __________________________________________ अभिप्राय - प्रॉम्ट इंजिनिअरिंगवर इतकं सखोल, सुटसुटीत आणि उदाहरणांनी भरलेलं मराठी पुस्तक पहिल्यांदाच वाचायला मिळालं. सर्व लेखकांनी केवळ AI चे तांत्रिक पैलू उलगडले नाहीत, तर त्यामागची तत्त्वज्ञान, जबाबदारी आणि नैतिकता देखील सहज भाषेत मांडली आहेत. प्रॉम्ट इंजिनिअरिंगच्या गुंतागुंतीला विलक्षण साधेपणाने उलगडणारे हे पुस्तक विद्यार्थी, व्यावसायिक आणि उद्योजकांसाठी अनिवार्य ठरते. पुस्तकातल्या काही चॅप्टर्समध्ये विविध क्षेत्रातील जसे कि, मार्केटिंग, ह्यूमन रिसोर्स, सॉफ्टवेअर डेव्हलपर, रियल इस्टेट, इ. अशा अनेक क्षेत्रात लागणारे सविस्तर आणि अर्थपूर्ण प्रॉम्ट कसे द्यायचे, याचे सखोल मार्गदर्शन केले आहे. प्रॉम्ट यातल्या आजच्या डिजिटल युगात AI सोबत काम करणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक मार्गदर्शक दिव्यासारखं आहे. मराठीतल्या तंत्रज्ञान लेखनाला नवी दिशा देणारं हे पुस्तक, प्रत्येक वाचकाच्या हातात नक्की असावं. अच्युत गोडबोले Indian Author & Technocrat _________________________ Prompt Engineering हे लार्ज लैंग्वेज मॉडेल्स (LLMs) आणि इतर जनरेटिव्ह AI साधनांची (Generative Al tools) शक्ती प्रभावीपणे वापरण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आवश्यक असलेले मूलभूत कौशल्य आहे. प्रत्येक व्यक्तीने हे समजून घेतले पाहिजे, कारण ते थेट AI आउटपुटची गुणवत्ता, उपयुक्तता आणि अचूकता ठरवते; अन्यथा, LLMs शी संवाद साधताना "garbage in, garbage out" होण्याची शक्यता असते. AI कामाच्या आणि दैनंदिन जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये समाविष्ट होत असताना, स्पष्ट आणि संदर्भित प्रोम्ट्स तयार करण्याची क्षमता ही उत्पादकता वाढवते, परिणामांना अनुरूप बनवते आणि चुकीच्या किंवा पक्षपाती माहितीचा धोका कमी करते. हे कला आणि विज्ञान दोन्ही आहे कारण, अंतर्निहित मॉडेल माहितीवर कशी प्रक्रिया करते याच्या आधारावर तंत्रांचा (techniques) तार्किक आणि संरचित वापर करण्यात याचे विज्ञान आहे. त्याच वेळी, ही एक कला आहे कारण केवळ तांत्रिक प्रोम्टमुळे चुकणाऱ्या संदर्भित परिणामांकडे AI ला मार्गदर्शन करण्यासाठी यात मानवी भाषा व हेतूची अधिक चांगली समज आवश्यक आहे. हे सोप्या भाषेत लिहिलेले पुस्तक Prompt Engineering अनेक उदाहरणे वापरून समजावून सांगते आणि ज्या कोणाला LLM चा अधिक चांगला उपयोग करायचा आहे त्यांच्यासाठी हे "must-read" असे आहे. डॉ. मिलिंद सोहोनी Professor of Operations Management and Faculty Director, Center for Supply Chain Analytics, SUNY@Buffalo ____________________________ AI आपल्या रोजच्या आयुष्याला खूप छान पद्धतीने बदलत आहे. ती आपली कामं झटपट करून घेण्यास मदत करते, आपल्यासाठी गोष्टी वैयक्तिक बनवते आणि आरोग्य, शिक्षण अशा अनेक क्षेत्रांमधल्या अवघड समस्यांवर उपाय शोधायला हातभार लावते. कोणतंही AI टूल वापरताना प्रॉम्ट खूपच महत्त्वाचा असतो, कारण तोच AI ला सांगतो की तुम्हाला नक्की काय हवं आहे. तुमच्या प्रॉम्टची स्पष्टता, किती नीट तपशील दिले आहेत आणि रचना कशी आहे यावरच उत्तर किती अचूक, उपयोगी आणि आपल्याला हवं तसं येणार हे ठरतं. प्रॉम्ट न वापरता AI वापरणं म्हणजे अगदी चमच्याने समुद्रातून पाणी काढण्यासारखं आहे. समुद्र तसाच राहतो, बदलतं ते फक्त तूम्ही त्यातून कसं घेता हे. म्हणूनच प्रॉम्ट इंजिनियरिंगला महत्त्व आहे ते तुम्हाला वरवरच्या उत्तरांऐवजी जास्त खोल, स्पष्ट आणि खरोखर उपयोगी उत्तरं काढून घ्यायला मदत करतं. प्रॉम्ट इंजिनियरिंगवरचं हे पुस्तक खूप वेगळं आहे आणि आपल्या प्रकारचं पहिलंच आहे. या पुस्तकात तुम्हाला सोप्या पद्धतीने समजणाऱ्या तंत्रांचा, पॅटर्न्सचा आणि भरपूर उदाहरणांचा संग्रह मिळेल, ज्यामुळे तुम्ही कुठलंही AI टूल वापरताना अंदाजाने न चालता, नेहमी जास्त चांगली, जलद आणि विश्वासार्ह उत्तरं मिळवू शकाल.
-
Nasha Jagala Vilkha Ghalnari Mahamari (नशा जगाला विळखा घालणारी महामारी)
नशाऽऽऽ" मानवी वाटचालीत कधीपासून, कशी आली?... आदिमानव काळापासून?.. कळत-नकळत की जाणिवपूर्वक?... जगभरात विविध टप्प्यांवर मानवी संस्कृती विकसीत होत असताना नशेचे कितीतरी घटकही उत्क्रांत होत गेले. 'नशा' कुठून कुठपर्यंत बदलत गेली?... आणि बदलत चालली आहे?... आजच्या कालखंडात, एकविसाव्या शतकातून पुढे जाताना, अधिकाधीक प्रगत आणि सुज होत असलेल्या मानवी संस्कृतीत, तंबाकू-दारूपासून आधुनिक काळातील नवनवीन ड्रग्जचा पृथ्वीतलावरील इतिहास-भूगोलाचा आढावा घेत, नशा-व्यसनांच्या अनुषंगाने आरोग्याचे ज्ञान-विज्ञान जाणून घेत तसेच नशा-व्यसनांच्या समाजकारण-अर्थकारण-राजकारणाचे व्याकरण मांडत आणि महत्वाचे म्हणजे जगाला विळखा घालत विनाशाकडे घेऊन चाललेल्या नशेच्या महामारीचा मनःपूर्वक आस्थेने मांडलेला हा लेखाजोगा....... माणसाच्या, मानवतेच्या पुढील शाश्वत वाटचालीसाठी .......
-
Bramhadeshatale Divas (ब्रह्मदेशातले दिवस)
‘बर्मीज डेज’ ही जॉर्ज ऑर्वेलची पहिली कादंबरी आहे. मानवतावादी ऑर्वेलने या कादंबरीत वसाहतवादावर सामाजिक आणि राजकीय टिप्पणी केली आहे. त्याचबरोबर साम्राज्यावादामुळे ‘शासक आणि शासित’ या दोन्ही वर्गांचे होणारे अपपतन त्याने या कादंबरीत रेखाटले आहे. ब्रिटिश अंमलाखालील भारतीय वसाहतीचा भाग असलेल्या ब्रह्मदेशात भारतीय, ब्रिटिश आणि ब्रह्मदेशी पात्रांच्या माध्यमातून या कादंबरीचे कथानक आकार घेते. साहजिकच, या तिन्ही देशांच्या संस्कृती या पात्रांतून झळकतात. वसाहतवाद, वंशभेद, सत्तेचा गैरवापर व अलगतावाद या बाबींवर भाष्य करणारी ही कादंबरी विचारांना चालना देणारी आहे.