-
Don Sant (दोन संत)
रामकृष्ण परमहंस आणि रमण महर्षी या दोन संतांना त्यांच्या आयुष्यात घेऊन आले. या संतांच्या आयुष्यातील वास्तविक चमत्कार म्हणजे त्यांचा चांगुलपणा, त्यांची कणव, तसेच त्यांची शिकवण आणि त्यांचे जीवन त्यांच्या शिकवणीशी एकरूप. ‘मी’ कोण आहे याचा शोध घेत-घेत कोणी परमपिता परमात्म्यापर्यंत पोहोचू शकतो. मी - देह, हाडे, मांस की मज्जारज्जू? मन की बुद्धी? याचं विश्लेषण करत गेलो की जाणीव होते की, यापैकी काहीही म्हणजे ‘मी’ नाही. या प्रक्रियेला ‘नेति नेति’ म्हणजेच ‘हे नाही’(न±इति) असे म्हणतात. कोणालाही आत्म्याचे आकलन होत नाही, की त्यास स्पर्शही करता येत नाही. तो सर्व गुण किंवा वैशिष्ट्यांविरहित असतो. खरेतर श्री रामकृष्ण यांनी आपल्या भक्तांना मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील ईश्वराची ओळख यातील फरक समजावताना जे शब्द उच्चारले आहेत, ते आपण श्री रमण यांच्या संदर्भात वापरतो. आपण श्री रामकृष्ण-श्री रमण यांच्यासारखे अगदी १०पैशांइतपत बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
-
Backstage (बॅकस्टेज)
"सिकंदराबादमधील साध्या सुरुवातीपासून नवी दिल्लीतील सत्ताकेंद्रांपर्यंत अहलुवालिया यांच्या आयुष्याचा विलक्षण प्रवास मांडणारे हे पुस्तक भारताच्या घडणाऱ्या कथेमागील आतल्या गोटातील नोंद आहे. राज्यनियंत्रित अर्थव्यवस्थेतून बाजारआधारित अर्थव्यवस्थेकडे भारताच्या परिवर्तनात अहलुवालिया यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि तब्बल तीन दशकांपर्यंत ते भारताच्या आर्थिक धोरणनिर्मितीच्या सर्वोच्च पातळीवर कायम प्रभावी राहिले. हे पुस्तक भारताच्या अलीकडच्या इतिहासातील राजकारण, व्यक्तिमत्त्वे, घटना आणि संकटांचा मागोवा घेते. आकड्यांच्या पलीकडे जाऊन ते सुधारणा प्रक्रियेतील राजकारण उलगडते आणि धोरणात्मक बदल कसे पुढे नेले गेले हे स्पष्ट करते—सुरुवातीला पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळात हळूहळू, आणि नंतर १९९१ मध्ये गंभीर देयक तुटीच्या (बॅलन्स ऑफ पेमेंट्स) संकटाचा लाभ घेत व्यापक सुधारणांसाठी धाडसी पावले उचलली गेली. या निर्णायक काळात वाणिज्य सचिव आणि वित्त सचिव म्हणून काम पाहणाऱ्या अहलुवालिया यांनी त्या वेळी करण्यात आलेल्या आरोपांना छेद देत ठामपणे मांडले आहे की १९९१ मधील आंतरराष्ट्रीय नाणेनिधी कार्यक्रमाच्या अटींमध्ये समाविष्ट असलेल्या सुधारणा या भारतावर लादलेल्या नव्हत्या, तर त्या देशांतर्गत विचारमंथनातून जन्मलेल्या होत्या. युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स (यूपीए) सरकारच्या काळात नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष (कॅबिनेट दर्जा) म्हणून कार्यरत असताना, त्यांनी त्या कालखंडातील यश-अपयशाचा सविस्तर आढावा घेतला आहे. यूपीएच्या पहिल्या कार्यकाळातील भारताच्या उल्लेखनीय आर्थिक वाढीची कहाणी तसेच दारिद्र्यनिर्मूलनातील ऐतिहासिक कामगिरी ते मांडतात. त्याचबरोबर यूपीए-२ च्या अखेरच्या काही वर्षांत दिसून आलेली धोरणात्मक अडचण (पॉलिसी पॅरॅलिसिस) आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबतही ते स्पष्ट व प्रांजळ चर्चा करतात. विनोदबुद्धी, हलका-फुलका शैली आणि विलक्षण बौद्धिक सामर्थ्य यांच्या संगमातून कथन केलेले ‘बॅकस्टेज’ हे पुस्तक भारताच्या आर्थिक आणि राजकीय इतिहासातील एक महत्त्वपूर्ण आणि अधिकृत योगदान मानले जाते—अशा व्यक्तीकडून, ज्यांना ही कथा सांगण्याची अनन्यसाधारण संधी आणि स्थान लाभले."
-
Anischit (अनिश्चित)
आयुष्याच्या या 'अनिश्चित' प्रवासात आपण अनेक वळणे अनुभवली. कधी प्रेमाची हळुवार साद, तर कधी गुन्हेगारीच्या छायेत लपलेले दाहक वास्तव. ही कथा केवळ एका रहस्याचा उलगडा नव्हती, तर ती होती मानवी स्वभावाच्या विविध पदरांची ओळख. कधीकधी आपण ज्यांना सर्वात जवळचे मानतो, त्यांच्याच मनात सत्याचे कोणते गडद थर दडलेले असतात, हे नियती योग्य वेळ आल्यावरच समोर आणते. भूतकाळातील सावल्या आणि वर्तमानातील संघर्ष यांच्या खेळात शेवटी विजय सत्याचा होतो की केवळ प्रश्न उरतात, हे ज्याचे त्याने आपल्या विवेकाने ठरवायचे असते. ही कथा संपली असली, तरी आयुष्यातील अनिश्चितता आपल्याला दररोज नवनवीन धडे देतच राहील. लेखिका परिचय चित्रा मुडबिद्री या कथेच्या माध्यमातून मानवी नात्यांमधील ओलावा आणि आयुष्यातील अनपेक्षित गुंतागुंत मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न लेखिकेने केला आहे. रहस्य, प्रेम आणि वास्तव यांच्या सीमारेषेवर चालणारी ही कथा वाचकांच्या मनाचा ठाव घेईल, अशी त्यांना खात्री आहे. आपल्या भावना, विचार आणि प्रतिक्रिया लेखिकेसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरतील.
-
Kahani Magachi Kahani (कहाणी मागची कहाणी)
सिद्धहस्त लेखक गो. नी. दांडेकर यांनी विपुल लेखन केले होते. त्यांची लेखनामागची प्रेरणा काय होती, पुस्तकातील नायिका त्यांना कुठे भेटल्या, भाषेचा विचार ते कसे करायचे ते समजून घेणे त्यांच्या चाहत्यांसाठी उत्सुकतेचा विषय आहे. या लेखसंग्रहातून वाचकांची ही अपेक्षा पूर्ण होते. मी लेखक कसा झालो?, पहिले नाटक, पहिले पुस्तक या संबंधातील माहिती गो. नि. दांडेकर यांनीच लिहिलेल्या लेखांमधून होते. 'शितू ' मधील कोकण यातून भेटते, पडघवली, पूर्णामायची लेकरं, जैत रे जैत, कुणा एकाची भ्रमणगाथा, मृण्मयी, बखर शिवकालाची या लेखांमधून त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या, निर्मिलेली पात्रे भेटतात. अखेरीस त्यांच्याशी मारलेल्या मनमोकळ्या गप्पाही वाचता येतात
-
Majha Bhau Annabhau (माझा भाऊ अण्णाभाऊ)
"माझा भाऊ अण्णाभाऊ" हे शंकर भाऊ साठे यांनी लिहिलेले पुस्तक आहे. पुस्तकाविषयी: या पुस्तकात अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा आणि व्यक्तिमत्त्वाचा गौरव करण्यात आला आहे. शंकर भाऊ साठे यांनी स्वतःच्या अनुभवांच्या आधारावर हे पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक व्यक्तिचित्रण या प्रकारात मोडते. पुस्तकाची भाषा मराठी आहे. शंकर भाऊ साठे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्याकडून लेखनप्रेरणा घेतली आणि फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचा वारसा पुढे चालू ठेवला.
-
Vidyatai Ani (विद्याताई आणि)
महाराष्ट्रात महात्मा फुले आणि महर्षी कर्वे यांनी स्त्री-शिक्षणाची पायाभरणी केली. नंतरची पायरी होती स्त्रीयांचं आत्मभान जागृत करण्याची, समाजास स्त्रीप्रश्नांप्रती संवेदनशील बनवण्याची. हे कार्य हाती घेतलेल्यांमध्ये विद्या बाळ यांचं नाव अग्रस्थानी आहे. प्रथम 'स्त्री' आणि नंतर 'मिळून साऱ्याजणी'चं माध्यम वापरून विद्याताईंनी स्त्रियांमध्ये स्वत्वाची भावना चेतवली. संवाद हे विद्याताईंचं बलस्थान. न पटलेल्या रूढी- रिवाजांशा संघर्ष करणं – तो मात्र पटेल अशा शब्दांत ही त्यांची खास शैली. दृढ कृतीचा आग्रह, पण भाषा मात्र अनाग्रही आणि ॠजू. पुरुषप्रधानतेस विरोध दर्शवतानासुद्धा त्या पुरुषांशी संवाद साधण्यास प्रयत्नशील असतात. म्हणून तर स्त्रीमुक्ती चळवळीतील नेमस्त पंथाचं नेतृत्व आपसूक त्यांच्याकडे जातं. पूर्णवेळ गृहिणी ते पूर्णवेळ कार्यकर्ती हा विद्याताईंचा प्रवास म्हणजेच विद्याताई आणि..
-
Vincent Wine Ani Moksha (विन्सेंट वाईन आणि मोक्ष)
थांका चित्रातल्या सोनेरी तळपत्या तेजोमय बुद्धाकडे आणि निळ्या रंगातल्या नॉर्बुकडे बघताना अमन-निशा एकमेकांतही हरवून गेले. निशाच्या प्रेमात विरघळून गेलेल्या अमनच्या चित्रातले रंगच काय… त्याचं पूर्ण कलर पॅलेटच बदलू लागलं आणि शब्दयात्री निशाची लेखणी एक वेगळा बहर घेत गेली… विन्सेंटच्या निळ्या-पिवळ्या स्ट्रोक्समधली स्टारी नाईट दोघांची चांदणवेळ होऊन गेली… नियती मात्र ही चांदणवेळ वेदनेच्या एका न संपणाऱ्या प्रदेशात घेऊन जाते आणि मग… आसक्तीचे डोह आणि मोक्षाच्या अलिप्त वाटांचा व्याकूळ प्रवास… विन्सेंट, वाइन आणि मोक्ष ही कादंबरी आहे अमन आणि निशा या प्रेमी जीवांची, त्यांच्या प्रेमाची, त्यांच्या वेदनेची ! दोन अस्सल कलाकार माणसांच्या अस्सल कलेचा आणि अस्सल प्रेमाचा हा ओहोळ आहे. मला कायम वाटत आलंय की, वेदनेने माणसाला कितीही छिन्नविच्छिन्न करून टाकलं तरी एका बिंदूला ती वेदना संपत जाते. मात्र त्या वेदनेतून जी कलानिर्मिती होते ती कायमसाठी टिकून राहते आणि अनेकांना इन्स्पायर करत राहते. माती, पाणी, उजेड, वारा, अंधार, अग्नी, आकाश… साऱ्यांचा मेळ उतरला की उत्तम चित्रपट हाती येतो. तसंच या कादंबरीचं झालंय…!
-
Jee Van Tyanna Kalale Ho (जी वन त्यांना कळले हो)
पुस्तकाविषयी जंगल, निसर्ग आणि जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी अनेक संशोधक, निसर्गशास्त्रज्ञ आणि संवर्धनकर्त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण केले. त्यांनी केवळ संशोधनच केले नाही, तर आपल्या जीवाची बाजी लावून जंगल आणि प्राण्यांचे रक्षण केले. अशा थोर व्यक्तिमत्त्वांचा सखोल अभ्यास करून त्यांची ग्रंथसंपदा, उत्क्रांतीमध्ये झालेले बदल, त्यांची सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबिक माहिती एकत्र करून, ती अगदी अर्थपूर्ण भाषाशैलीत लेखकाने या पुस्तकातून मांडली आहे. हे पुस्तक म्हणजे आपण आपले जीवन कसे जगावे, हे सांगणारे प्रेरणास्रोत आहे
-
Tata Pravas Mulyadhishthit Jaganyacha (टाटा प्रवास मूल्याधिष्ठित जगण्याचा)
जे. एन. टाटा स्कॉलर आणि सुवर्णपदक विजेते टी. आर. डुंगाजी, 'डॉन' या नावाने प्रसिद्ध आहेत. राज्यशास्त्रातील दोन मास्टर्स पदव्या मिळवणारे डॉन जबलपूर आणि बर्कल विद्यापीठांचे माजी विद्यार्थी असून, डिसेंबर १९६६ मध्ये ते टाटा स्टील कंपनीत रुजू झाले. तिथे त्यांनी व्यवस्थापकीय संचालक पदापर्यंत वाटचाल केली. टाटा स्टीलशी संबधित दोन कंपन्यांच्या कामकाजातील महत्त्वपूर्ण बदलाच्या काळात त्यांच्याकडे नेतृत्व होते. त्याशिवाय कॉनकॉर आणि फोर्ब्स अँड कंपनी लि. या कंपन्यांचे स्वतंत्र संचालक (Independent Director) म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. २०११ मध्ये, डॉन यांनी 'क्रेडिबिलिटी कन्सल्टिंग' ही स्वतःची सल्लागार कंपनी सुरू केली. तसेच दोन मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्स मध्ये त्यांनी 'बिझनेस एक्सलन्स डीन' म्हणूनही काम केले आहे. सोबतच मुंबईतील प्रसिद्ध छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयाचे (पूर्वीचे प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम) विश्वस्त म्हणूनही त्यांनी काही काळ काम पाहिले. सध्या ते फोर्ब्स चॅरिटेबल ट्रस्टवरही विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत. टाटा कुटुंबातील दिग्गजांच्या कार्यशैलीने प्रभावित झालेले डॉन, व्यवस्थापन हे मूलतः एक आध्यात्मिक कार्य (spiritual pursuit) आहे असे मानतात. त्यातूनच क्रेडिबिलिटी ( Credibility), कल्चर ( Culture) आणि कम्युनिकेशन (Communication) या तीन मूल्यांवर त्यांनी कायम भर दिला आहे. सन १९९२ मध्ये त्यांना युवा रत्न पुरस्कार मिळाला. ब्रसेल्स येथील 'इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्युमन व्हॅल्यूज' चा 'एथिक्स इन बिझनेस अवॉर्ड, २००६' हा सन्मान मिळवणारे पहिले मानकरी आहेत. "डॉन डुंगाजी यानी 'टाटा मूल्ये' म्हणजे काय याचा पुरेपूर अनुभव तब्बल चार दशकांच्या कार्यकाळात घेतला आहे. टाटांच्या या तत्त्वज्ञान आणि संस्कृतीने त्यांना कसे सामावून घेतले आणि त्याच 'टाटा मार्गा' ने परिवर्तन घडवून आणताना समाधान कसे लाभले, याविषयी त्यांनी या पुस्तकात सविस्तर लिहिले आहे. हे पुस्तक म्हणजे टाटा समूहाच्या सेवेत वाहून घेतलेल्या एका ध्येयवादी सहकाऱ्याने त्या समूहाला वाहिलेली आदरांजली आहे. " रतन टाटा (मानद अध्यक्ष, टाटा सन्स लि.) “पाच दशकांपूर्वी, टाटा समूहात मी आणि डॉन डुंगाजी एकाच वेळी, एकाच ठिकाणी टाटा स्टिलच्या कार्यालयात रुजू झालो. आमचे कार्यालय समूहाचे अध्यक्ष जेआरडी टाटा यांच्या कार्यालयालगत होते. आम्ही दोघांनीही आमच्या पहिल्या नोकरीत, 'टाटा मार्ग' आणि 'टाटा मूल्ये' शिकत कामाला सुरूवात केली. पंचवीस वर्षे मी त्यात आकंठ बुडालेलो होता. व्यवसायाच्या सगळ्या संकल्पना, नीतिमत्ता यांना तेथेच आकार मिळाला. त्यानंतर मी दुसरीकडे गेलो. डॉन मात्र शेवटपर्यंत समूहाबरोबच राहिला. तिथे तो जे शिकला आणि ज्या पद्धतीने त्याने ते सारे आत्मसात केले तो सगळा प्रवास हाच चांगुलपणा, मूल्याधारित, व्यवसाय व्यवस्थापनाचा 'टाटा मार्ग' आहे. ' अरुण मायरा (माजी सदस्य, नियोजित आयोग, भारत सरकार )
-
Sarkari Davakhana (सरकारी दवाखाना)
जेव्हा रुग्णासाठी पैसा संपतो, सोनं गहाण ठेवलं जातं, कधीकधी जमीन विकावी लागते तेव्हा सरकारी दवाखान्याची पायरी दिसू लागते आणि एक प्रवास सुरू होतो... मृत्यूची वाट बघण्याचा! अपघात विभागात घडणाऱ्या घटना, आयसीयूमधील आपल्या व्यक्तीचा मृत्यू, शेवटच्या क्षणी होणारी नातेवाईकांची घालमेल, पोस्टमार्टम करणाऱ्या व्यक्तीचं आयुष्य, डॉक्टर लोकांचं व्यवसायिक आणि खाजगी जीवन, डिलिव्हरी वार्ड! खूप वर्षांनंतर बाळाच्या जन्माचा आनंद... सगळंच वाईट नाही, काही चांगल्याही गोष्टी! सरकारी दवाखान्यातील लावारिस लोक, गर्दी, तिथला वास, कचराकुंडीत नाळेसहीत सापडलेलं बाळ, छातीवर 'मृत्यू' अशा नावाचा टॅटू काढणारा कर्मचारी, म्हाताऱ्यांची प्रेम कहानी, स्वतःच्या हाताने आपल्या मुलाचं व्हेंटिलेटर बंद करणारा बाप... काय नाही या कादंबरीत! हे सगळं सुरू असतानाच घडणारा वेगवान घटनाक्रम आणि दवाखान्याच्या चार भिंतींच्या नकळत घडणारे एक युद्ध! सस्पेन्स थ्रिलरने भरलेला एक फार मोठा गुन्हा... आणि त्याची उकल! एकीकडं माणूस वाचवा म्हणून प्रयत्न करणारी माणसं आणि दुसरीकडं मढ्यावरचं लोणी खाणारी माणसं! ही कादंबरी तुम्हाला जगण्याची आशा देईल, नात्यांचं महत्त्व देईल, माणसाची किंमत देईल... हसणं देईल, रडणं देईल! ही कादंबरी तुम्हाला सोडून गेलेल्या तुमच्या एकातरी माणसाची आठवण करून देईल.
-
Mi Alladiyakhan (मी अल्लादियाखां)
मरहूम उस्ताद अल्लादिया खांसाहेब जयपूर-अत्रौली घराण्याच्या विद्यमान गायकीचे उद्गाते जणू ‘गायनाचे गौरीशंकर' ! त्यांच्या गायकीच्या आजच्या घडीला कार्यरत वारसदारांपैकी डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे सांगत आहेत त्यांची चरितकहाणी. ख्यालगायनाच्या पद्धतीनुसार ‘रागबढत' किंवा ‘उपज' या अंगाने विस्तारत साकारलेली खांसाहेबांची ही जीवनकथा. त्यातून वाचकापुढे उलगडत जातं कधी सौंदर्यपूर्ण, प्रमाणबध्द स्थापत्यासारखं खांसाहेबांचं व्यक्तिमत्त्व, कधी त्यांच्या पारिवारिक आणि गुरुशिष्य नातेसंबंधांचं नाजूक, जरतारी विणकाम. विविध प्रसंगांतून उजागर होतात खांसाहेबांच्या व्यक्तिमत्त्वातल्या मनोहारी रंगछटा. एखाद्या कादंबरीसारख्या सुरस, रोचक घटनांनी भरलेलं हे खांसाहेबांचं ‘ललित चरित्र' म्हणजे रसिक वाचकांना तसेच अभिजात संगीताच्या साधकांना लाभलेली शब्दमैफिलीची पर्वणी.
-
Bibliophile (बिब्लिओफाइल)
एकोणिसाव्या शतकातले प्रख्यात विचारवंत लोकहितवादी यांनी लिहून ठेवलंय, की "सध्या समाजात नुसती पुस्तकं जमा करून संग्रही ठेवणाऱ्या माणसाला विद्वान समजलं जातं, पण विद्वत्ता येण्यासाठी ती वाचावीही लागतात ही गोष्ट ते विसरलेले दिसतात." "बिब्लिओफाइल' या पुस्तकाचा लेखक हा पुस्तकांचा संग्रह तर करतोच, पण ती वाचतोही, आणि त्यांच्याविषयी वाचकांशी संवादही साधतो. गणेश मतकरी हे समकालीन मराठी साहित्यातलं महत्त्वाचं नाव आहे. 'बिब्लिओफाइल' या पुस्तकात त्याचा एक वेगळा पैलू आपल्यासमोर येतो. हे लेखन म्हणजे वाचनसंस्कृतीबद्दल आपल्याला माहीत नसलेल्या गोष्टींचं एक अचंबित करणारं कोलाज आहे. आजवर आपण वाचलेल्या, अनुभवलेल्या गोष्टींची देवाणघेवाण गणेश या लेखांमधून करतो ती अगदी सहजपणे, गप्पा मारल्यासारख्या शैलीत, पण त्यामागे असणारी त्याची साहित्याकडे पाहण्याची अभ्यासू वृत्ती आपल्याला सतत जाणवत राहते. असंख्य वाचनीय पुस्तकांशी आपली ओळख करून देणाऱ्या पुस्तकाच्या निर्मितीचं मूळ या वृत्तीमध्येच आहे. 'बिब्लिओफाइल' ही एका प्रचंड ग्रंथसंग्रहातून फिरवून आणणारी राइड आहे, एकाच वेळी आनंद देणारी आणि विचारही करायला लावणारी.