-
Anvat Aksharvata (अनवट अक्षरवाटा)
अनवट अक्षरवाटा लेखक : मीना वैशंपायन स्त्री ही खालच्या पायरीवर असलेलीच बरी’ असा एक अघोरी कट जगातल्या तमाम नक्षरवाटा पुरुषमंडळीनी हजारो वर्ष नेटानं चालवला. विसाव्या शतकात स्त्री शिकली नि तिनं तो छान उधळून लावला. हे ‘अनवट अक्षरवाटा’चं मुख्य सूत्र आहे. खरं तर युद्ध, रोगराई, स्थलांतर, नैसर्गिक आपत्ती अशा नानाविध संकटांत भरडून निघाली ती स्त्रीच. आणि तिच्यामुळेच भाषा जगल्या नि भरभराटीस आल्या. मायबोली हे मानवी संस्कृतीतलं एक सुंदर, जिव्हाळ प्रकरण आहे. पुस्तकात मीनाताईंनी एकूण तीस बंडखोर लेखिकांची आणि त्यांच्या पुस्तकांची चर्चा केली आहे. जगभरातल्या या निवडक लेखिकांच्या प्रतिभा आणि प्रेरणांचा धांडोळा घेताना भिन्न भिन्न भाषा नि संस्कृती आणि रुचिवैचित्र्य या भेदांपलीकडे जाऊन मीनाताईंनी स्त्रीशक्तीच्या प्रवासाचं सुंदर आख्यान मांडलंय, मोजक्या शब्दांत आणि रसाळ शैलीत. मीनाताईंच्या लिखाणावर दुर्गाबाईंची (भागवत) स्निग्ध सावली रेंगाळते आहे. पुस्तकात मराठी साहित्य किंवा समाजाचे संदर्भठिकठिकाणी येतात. त्यामुळेही हे ‘अनवट अक्षरवाटा’ ‘आपलं’ वाटू लागतं. -अंबरीश मिश्र
-
Raktaranjit Chandra (रक्तरंजित चंद्र)
रक्तरंजित चंद्र लेखक : सोहम पी. शहा अनुवाद : अमिता नायडू रक्तरंजित स्टेशन चंद्र सुट्टीमध्ये पर्यटकांनी फुलून येणारं माथेरान हे हिल काही काळ एका वेगळ्याच कारणासाठी फेमस होऊ लागतं. तिथल्या स्थानिक लोकांना, घोडेवाल्यांना तिथे झपाटलेले घोडे, पछाडलेल्या वाटा यांचा अनुभव येऊ लागतो. त्याचबरोबर अचानक दिसणारी आणि अदृश्य होणारी स्त्रीची आकृती दिसू लागते… .. आणि मग सुरू होते मृत्यूची मालिका ! मुंबईचा एक तरुण व्यावसायिक आदित्य मल्होत्रा आपली पत्नी, छोटा मुलगा आणि दोन भाच्या यांच्यासह माथेरानला जातो. आदित्यने नुकतीच ‘सेसिल लॉज’ ही एक मोठी प्रॉपर्टी किरकोळ रकमेत विकत घेतलेली असते. कधीकाळी लोकप्रिय असलेल्या या लॉजमध्ये आता काही वर्षांपासून एका आत्म्याने आपलं बस्तान बसवलेलं असतं… …आणि तो आता या मल्होत्रा कुटुंबाला विळख्यात घेतो. आदित्य आणि कियारामधला रोमान्स… निरागस सीडला भुरळ घालणारे पिशाच… या भुलभुलैयातून मल्होत्रांना वाचवू पाहणारे सुरेश आणि मधू… माथेरानमधल्या भुताळीवर रील्स बनवून लाइक्स वाढवायला आलेली झोया आणि तिची दोस्त मंडळी… भूतकाळातल्या प्रेमाची, विरहाची हादरवून टाकणारी सूडकथा… रक्तरंजित चंद्र !
-
Only One Clue (ओन्ली वन क्लू)
सिद्धहस्त अनुभवी पोलीस अधिकारी राजेंद्र मुरलीधर भामरे, यांनी धडाडीने आणि कल्पकतेने केलेल्या तपासाच्या सत्यकथा म्हणजे हे पुस्तक. ते लिहितात, ‘अपराध्याला शोधून काढणं हे जसं तपास अधिकाऱ्याचं काम असतं, तसंच निरपराध्याचं रक्षण करणं हेही त्याचंच काम असतं’ यावरून त्यांचा पोलीस तपासाकडे पाहण्याचा मानवतावादी दृष्टिकोन दिसून येतो. विविध प्रकारच्या गुन्ह्यांच्या तपासाच्या ३३ सत्यकथा तपशिलात सांगता सांगता, भामरे गेल्या काही वर्षांमध्ये गुन्हेगारी जगतात चोरी, दरोडे ते सायबर गुन्हे असे लक्षणीय बदल कसे होत गेले याचा परामर्श या पुस्तकातून घेतात. तसंच खबरे, इलेक्ट्रॉनिक फूटप्रिंट्स, व्हिसेरा यांसारख्या गोष्टी पोलीस तपासात किती महत्त्वाच्या असतात हे ते विशद करतात. आजच्या माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात नागरिकांनी ‘सायबर साक्षर’ होणं का महत्त्वाचं आहे, हेही ते स्पष्ट करून सांगतात. परिस्थितीचा नेमका अभ्यास, लोकसंपर्क, विश्वास-संपादन, कल्पनाशक्ती, बहुश्रुतता यांच्या साहाय्याने पोलीस अधिकारी तपासाच्या निष्कर्षापर्यंत कसे पोचतात हे पुस्तकातून लक्षात येतं. पोलिसी पंचनाम्यातला कोरडेपणा किंवा रहस्यकथांमधली अतिरंजितता टाळून सांगितलेल्या वास्तववादी सत्यकथा… ओन्ली वन क्लू !
-
Spy Stories-Mi Pakistanatil Bhartacha Her (स्पाय स्टोरीज-मी पाकिस्तानातील भारताचा हेर)
मी पाकिस्तानातील भारताचा हेर | स्पाय स्टोरीज | सत्य घटनांवर आधारित गुप्तचर कथा लेखक : मोहनलाल भास्कर अनुवाद : ऋजुता कर्णिक गुप्ते मोहनलाल भास्कर हे भारतीय हेर… त्यांची ही जीवनकहाणी. ‘हेरगिरी’ या विषयावर विशेष प्रकाश टाकते. या पुस्तकात १९६५च्या भारत-पाक युद्धादरम्यान त्यांचा पाकिस्तानात झालेला प्रवेश, तिथे त्यांचं पकडलं जाणं आणि पर्यायाने त्यांनी भोगलेल्या दीर्घकालीन तुरुंगयातनांचं चित्रण त्यांनी केलं आहे. परंतु ही साहित्यकृती केवळ साहस व दुर्दम्य निग्रह यांचं वर्णन करत नसून ती पाकिस्तानच्या तत्कालीन परिस्थितीचंही विश्लेषण करते. पुस्तकात मोहनलाल पाकिस्तानातलं भुट्टोप्रणित तथाकथित लोकशाही सरकार, निरंतर मजबूत होत जाणारे हुकूमशहा यावर भाष्य करतात, तसेच धार्मिक कट्टरतावाद आणि त्याला विसंगत असणारे सामाजिक-आर्थिक पैलू उलगडून दाखवतात. भारतविरोधी षड्यंत्र रचणाऱ्या पाकिस्तानातल्या विविध आंतरराष्ट्रीय सूत्रांबद्दलही ते इथे विवेचन करतात. मोहनलाल एकीकडे पाकिस्तानी तुरुंगांची नरकप्राय स्थिती, तुरुंग अधिकाऱ्यांचं अमानुष वर्तन यांचं वर्णन करतात तर, दुसरीकडे ते पाकिस्तानी जनता आणि मेजर सिपरा यांच्यासारख्या व्यक्तींची माणुसकीची वागणूक रेखांकित करायलाही विसरत नाहीत. हेरगिरीचं अंतरंग दाखवणारं विश्वासार्ह पुस्तक…
-
Elonvarcha Sangharsh (इलोनवरचा संघर्ष)
सीनीचा मृत्यू झाला आणि सगळं काही बदलून गेलं. कित्येक वर्ष टिकून राहिलेल्या शांततेचा भंग झाला! काही शेकडो वर्ष इलोन या ग्रहावर स्त्री आणि पुरुष आपापल्या सीमारेषा आखून वेगवेगळे राहत होते. पृथ्वीवरचे एकेकाळचे एकमेकांचे साथीदार आता परस्परांचे विरोधक झाले होते. त्यांनी आपापल्या भागात शहरं वसवली होती, अमरत्व प्राप्त केलं होतं आणि मीलनाशिवाय संतती निर्मिती करायचं तंत्रज्ञानही अवगत केलं होतं स्वतंत्रपणे ! पण सीनीच्या मृत्यूनंतर, स्त्री आणि पुरुष पुन्हा युद्धाची – निर्णायक संघर्षाची भाषा बोलू लागले. इतकी वर्षं त्यांच्यात जी शांतता प्रस्थापित झाल्यासारखी वाटत होती, ती खोटी, आभासी तर नव्हती, की तो एक दीर्घ विराम होता? हा संघर्ष किती काळ चालणार होता? या संघर्षाचे परिणाम महाभयानक होते. दोन्ही बाजू संघर्षाच्या टोकावर पोचल्या होत्या. पण प्रत्यक्ष संघर्ष झाला का? विनाश टळला का? फँटसीच्या साहाय्याने विचारही करता येणार नाही अशी सामाजिक रचना उभारून स्त्री-पुरुष संबंधांवर, त्यांच्या सहजीवनावर भाष्य करणारी ‘कल्पित’ कादंबरी इलोनवरचा संघर्ष !
-
Spy Stories-The Silk Route Spy (स्पाय स्टोरीज-द सिल्क रूट स्पाय)
एका भारतीय डबल एजंट ची सत्य कथा लेखक : एनाक्षी सेनगुप्ता अनुवाद : प्रणव सखदेव १९२० सालचा भारत… ब्रिटिश राजवटीविरोधात स्वातंत्र्य चळवळीचं वारं देशभरात जोरात वाहत होतं. त्यामुळे चिंताग्रस्त ब्रिटिशांनी स्थानिक तरुणांना हेर म्हणून कामावर ठेवण्यास सुरुवात केली. त्यांच्यात होता नंदलाल कपूर. हेरगिरीचं प्रशिक्षण घेतल्यावर तो वेगवेगळ्या मोहिमांकरता देशभर फिरला. तेव्हा स्वातंत्र्य चळवळीतल्या क्रांतिकारक गटांशी त्याची भेट झाली. त्यांच्याशी बोलल्यावर, चर्चा केल्यावर त्याने ठरवलं की, आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी आपणही थोडा हातभार लावावा. आणि तो ‘डबल एजंट’ झाला! मग कलकत्त्यातल्या गल्लीबोळांपासून शांघायमधल्या भयंकर क्रूर ‘ग्रीन गँग’पर्यंत, बर्मातल्या सोनेरी पॅगोडांपासून जपानमधल्या टी-हाऊसपर्यंत, नंदलालच्या जीवन-प्रवासाने अनेक धोकादायक आणि अनिश्चित अशी वळणं घेतली.. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेल्या अनेक नायकांच्या कथा सांगितल्या जातात, पण काही नायक असेही असतात जे दुर्लक्षित राहतात, त्यांचा त्याग विस्मृतीत जातो. अशाच एका नायकाच्या आयुष्याची ही सत्यकथा… द सिल्क रूट स्पाय !
-
Sanvidhan Bhan (संविधान भान)
संविधानकर्त्यांचे शपथपत्र होते मानवी मूल्यांसाठी. नेहरूंनी सांगितलेल्या नियतीच्या काव्यात्म करारासाठी. गांधींच्या 'वैष्णव जन तो तेणे कहिए' म्हणणाऱ्या भारतासाठी. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या समताधिष्ठित समाजासाठी. ताठ मानेने जगता येईल, अशा टागोरांच्या भीतिशून्य समाजासाठी. साने गुरुजींच्या प्रेमाचा धर्म सांगणाऱ्या बलशाली भारतासाठी. दाक्षायणी वेलायुधनच्या गावकुसाबाहेरच्या आभाळासाठी. जयपालसिंग मुंडांच्या आदिवासी पाड्यातल्या 'उलगुलान' साठी. मौलाना आझादांच्या 'गंगा जमनी तहजीब' सांगत शिक्षणाची कास धरणाऱ्या इंद्रधनुषी भारतासाठी. सावित्रीबाईंच्या शाळेचा रस्ता अधिक प्रशस्त होण्यासाठी. बुद्धाच्या पिंपळासाठी. माणसातला ईश्वर जागवणाऱ्या गुरू नानकांसाठी. खुल्या दिलाने माफ करणाऱ्या येशूसाठी. बाजाराच्या मधोमध उभं राहून सर्वांच्या कल्याणाची प्रार्थना करणाऱ्या कबीरासाठी संत रवीदासांच्या बेगमपुऱ्यासाठी. तुकोबाची गाथा तारणाऱ्या इंद्रायणीसाठी आणि चेतना चिंतामणीच्या गावाचा रस्ता सांगणाऱ्या झानोबासाठी या शपथपत्राला जागण्यासाठीचा हा जेंटल रिमांइडर !
-
Mandir Vyavasthapan (मंदिर व्यवस्थापन)
भक्तजनांना उत्तम सेवा देण्यासाठी शास्त्रीय व व्यावसायिक दृष्टिकोनातून केलेलं मार्गदर्शन लेखक : सुरेश हावरे भारताला अत्यंत समृद्ध आणि वैविध्यपूर्ण संस्कृतीचा वारसा लाभलेला आहे. भारतभरात विखुरलेली ३० लाखांहून अधिक मंदिरं या विविधतेची साक्ष देतात, ‘भाविकांची सेवा’ या पारंपरिक मानसिकतेला व्यवस्थापन कौशल्यातील आधुनिक विज्ञानवादी भूमिकेची जोड देऊन जर मंदिरांकडे बघता आलं, तर भारतामध्ये सामाजिक-आर्थिकदृष्ट्या सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे. प्रस्तुत पुस्तक हे, मंदीर व्यवस्थापन यासारख्या अभिनव विषयावरील प्रयत्नांवर प्रकाश टाकण्याचा एक सक्रीय प्रयत्न आहे. डॉ. सुरेश हावरे हे एक वरिष्ठ अणुशास्वज्ञ आणि यशस्वी उद्योजक तर आहेतच परंतु यासोबतच त्यांनी भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे प्रतिष्ठित असे शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानाचे अध्यक्षपदही भूषवलेलं आहे. या पुस्तकात मंदिराच्या निमित्ताने रोजगार निर्मिती, सामाजिक-आर्थिक बदल, आध्यात्मिक संस्कृती, स्मारकांचं संवर्धन, गर्दीचं व्यवस्थापन इ. पासून अत्याधुनिक ‘एआय’च्या वापरापर्यंत अनेक विषयांवर समग्र आणि सखोल विचार मांडलेले आहेत. विविध विषयांतील तज्ज्ञ व्यावसायिक आणि शिक्षणसंस्था यांनी जर मंदिर व्यवस्थापनाचे विशिष्ट असे कोर्सेस आखून अमलात आणले तर मंदिरांचं प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी, सुयोग्य मनुष्यबळ निर्माण होईल. मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि वेलिंगकर व्यवस्थापन संशोधन संस्थेने हे कोर्सेस सुरुही केले आहेत. या पुस्तकाच्या निमित्ताने समाजातील विविध क्षेत्रांतील सर्जनशील जनांना, या एका वेगळ्या, नाविन्यपूर्ण विषयात रस निर्माण होईल ही अपेक्षा आहे. अभिनव मंदिर व्यवस्थापनासाठी एक मार्गदर्शक पुस्तक… मंदिर व्यवस्थापन !
-
French Maniac (फ्रेंच मेनिअक)
फ्रेंच मेनिॲक लेखक : पंकज भोसले स्थळकाळाचं भान येण्यासाठी महापुरुषांच्या कथा उपयोगी नाहीत. नगण्य जीवांच्या जगण्यातून, क्षुल्लक जिंकण्यातून, फालतू पराभवांतून समाज नावाची गोणपाटसदृश वस्तू विणली जाते. मुंबई महानगराच्या वेशीवर डोंबिवली-बदलापूरसारखी उपनगरं असतात. त्यात तितकेच सामान्य लोक राहतात. महानगराला हलवून टाकेल इतकं कर्तृत्व त्यांच्यात नसतं, ते अंतर्बाह्य ‘मिडिओकर’ असतात. त्यांच्या आयुष्यावर फ्रेंच पॉर्नस्टारपासून जागतिक सिनेमापर्यंत गोष्टी आदळतात. तेव्हा हे लोकही बदलतात. पण सामान्यांचे असामान्य होत नाहीत. एकटेपणा, समाजात राहून समाजापासून तुटल्याची त्यांची अवस्था तशीच राहते. पंकज भोसलेंनी आपल्या पत्रकारितेत टिपलेल्या व्यक्ती-घटनांवर या कादंबरीचे कथानक बेतलेले आहे. त्यातील दोन प्रमुख व्यक्तिरेखा शेवटी विशिष्ट ठिकाणी जाऊन पोहोचतात. ‘मिडिओकर’ असण्याचा त्यांच्या गंतव्यस्थळाशी संबंध आहे. पण वाचकाला त्यांच्याबद्दल राग येत नाही, कणव येत नाही, आपलेपणाही वाटत नाही. ते तिथे आहेत, आणि त्यांची गोष्ट प्रचंड ऐकण्यासारखी आहे, ही भावना दाटून येते. शिवाय आपलं स्थळकाळाचं भान वाढतं. -आदूबाळ
-
Railway : Bharatachi Jeevanrekha (रेल्वे : भारताची जीवनरेखा)
रेल्वे : भारताची जीवनरेखा भारतीय रेल्वेचे अंतरंग उलगडणारा सर्वांगीण पट डॉ.शिरीष यंदे हेमंत जोगदेव आशिष कुवेलकर रेल्वे प्रवास सर्व स्तरातील भारतीयांच्या सोयीचा आणि जिव्हाळ्याचा. सोयीचा का? तर, सर्वांत जलद, सर्वांत भरवशाचा आणि पर्यायांची मोठी उपलब्धी असलेला... आणि जिव्हाळ्याचा का? तर, तुलनेने स्वस्त प्रवासी भाडं आणि या प्रवासात अंतर्भूत असलेला एक प्रकारचा ओलावा! म्हणूनच या प्रवासाचं कधीकधी 'नॉस्टॅल्जिया'त रूपांतर होतं ! पण असे विविध कंगोरे असलेल्या रेल्वेचा कारभार चालतो कसा? तर त्यामागे असलेली अतिविशाल यंत्रणा आणि त्या यंत्रणेच्या मागे असलेलं भक्कम तंत्रज्ञान. पण या यंत्रणेविषयी काही जाणून घेण्याचं कुतूहल जागृत झालं तरी ती माहिती कुठे मिळणार? हे पुस्तक नेमकी तीच पोकळी भरून काढतं. या पुस्तकाच्या लेखकत्रयीसाठी 'रेल्वे' हा विषय छंदाचा, कुतूहलाचा, ध्यासाचा आणि आयुष्यभराच्या अभ्यासाचा. त्यातूनच त्यांनी रेल्वेशी निगडित जवळजवळ सर्वच विषय ज्ञात करून घेतले... म्हणजे इंजिन्स, कोचेस, ट्रॅक्स, स्लीपर्स, सिग्नल यंत्रणा, तंत्रज्ञान, विद्युत पुरवठा, परिभाषा, यार्ड्स, व्यवस्थापन, आधुनिकीकरण, रेल्वे कार्यान्वित ठेवणारं मनुष्यबळ आणि बरंच काही... हे पुस्तक म्हणजे याच सर्व अभ्यासपूर्ण माहितीचा ऐवज आहे... थोडक्यात सांगायचं तर, आपलं कुतूहल शमवणारा रेल्वे मिनी एन्सायक्लोपीडिया... रेल्वे : भारताची जीवनरेखा
-
Narsinha Mahaavatar - Part 1 (नरसिंह महावतार - भाग १)
नशिबाने वेगळे झालेले आणि दुःखाने एकत्र आलेले - विष्णूचा अवतार. असुरांचा राजा. एक विष्णूभक्त. एकेकाळचा शूर योद्धा नरसिंह युद्ध सोडून एका खेड्यात वैद्य म्हणून छुपेपणाने राहू लागतो. पण त्याच्या भूतकाळातील एक परिचित चेहरा त्याच्याकडे अंध राजपुत्र अंधकाच्या जुलमापासून मदतीची याचना करतो. जर नरसिंहाने नकार दिला तर, हे जगच उद्ध्वस्त होणार असतं. आता तो काय करेल? आणि मुळात त्याने युद्ध सोडण्यामागे काय कारण होतं? प्रल्हाद, काश्यपुरीचा अंतरिम राजा, त्याच्या वडिलांचे अन्याय्य विचार आणि विष्णूदेवांबद्दलचं त्याचं प्रेम यांच्या रस्सीखेचीत अडकलेला असतो. तो कोणाची निवड करेल? हिरण्यकश्यप, असुर साम्राज्याचा अधिपती, याला आपल्या पत्नीच्या मृत्यूचा सूड घ्यायचा असतो. त्यासाठी त्याला चाचण्या पार करणे आणि ब्रह्मशस्त्र मिळवणं गरजेचं असतं. पण या चाचण्यांमध्ये यापूर्वी अनेकजण मृत्यूमुखी पडलेले असतात. हिरण्यकश्यप त्यात तग धरून राहू शकेल? लेखक केविन मिसाल यांच्या विष्णूदेवांच्या चौथ्या अवताराच्या बाबतीतल्या पुनर्कल्पनेमध्ये तुमचं स्वागत आहे.
-
Punha Navyane (पुन्हा नव्याने)
पुन्हा नव्याने...' या संग्रहातून लेखिका वसुंधरा घाणेकर या स्त्रीजीवन विशेषतः स्त्री-पुरुष संबंधांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात. एखाद्या कॅलिडोस्कोपमधून पाहावे तसे त्या स्त्रीपुरुषसंबंधांचे सूक्ष्म आकलन करतात आणि आपल्या कथेच्या अवकाशात सामंजसपणे व्यक्त होतात.
-
Mi Kokancho Doctor (मी कोकणचो डॉक्टर)
कोल्हापूरहून गगनबावड्याच्या घाटाने खाली उतरलं की तळकोकण सुरू होतं. घाट उतरल्यावर लगेचच लागतं तळेरे हे छोटं गाव. तीस वर्षांपूर्वी कोल्हापुरातलं तरुण डॉक्टर जोडपं शिक्षण संपवून प्रॅक्टिससाठी गाव शोधत इथे येऊन पोहोचलं. हे निवांत गाव त्यांना आवडलं आणि त्यांनी तिथेच मुक्काम ठोकायचं ठरवलं. कसलाही हिशोब न मांडता, कोणतेही आडाखे न बांधता. घाटावर वाढलेल्या या दोघांना कोकणातली रोखठोक अन् इरसाल माणसं भेटू लागली आणि एका धमाल नात्याची सुरुवात झाली. कोकणी माणसांनी लवकरच त्यांना आपलंसं केलं. त्या माणसांच्या या खुमासदार गोष्टी- कोकणी भाषेच्या गोडव्यासह आपल्या मनात उतरणाऱ्या.
-
Rahee (राही)
कथासूत्र हा कथेचा आत्मा असतो. रोजच्या मानवी जगण्यातच असंख्य कथाबीजं असतात. ही कथाबीजं फुलवण्यासाठी सूक्ष्म निरीक्षणशक्ती आणि शब्दवैभवाची गरज असते. या दोन्हींचं लेणं लाभलेल्या प्रकाश नारायण दुधाणे यांच्या हातून 'राही' कथासंग्रह साकारलेला आहे. ‘अनसूया’,‘वासुदेव’,‘चाफ्याच्या पिवळ्या फुलांचा सुगंध', 'जोगण', 'विधुर', 'उमा', 'राजाजी' या सर्वच कथा जीवनाच्या विविध अंगांना स्पर्शन जाणाऱ्या आहेत.
-
Chandrashala - चंद्रशाळा
चंद्रशाळा- कथासंग्रह - अभय वळसंगकर कथालेखनाची प्रक्रिया लेखकाच्या मनात रोजच्या जगण्यात कणाकणानं आकार घेत असते. आजूबाजूला घडणाऱ्या घटना, त्यातली माणसं यांचा वेध घेता घेता कल्पनाविष्कारानं लेखक कथा फुलवतात. मराठी कथाविश्वात, १९९१ ला सुरू झालेल्या जागतिकीकरणानंतर आणि अफाट नागरीकरणानंतर माणसं एकतर एकाच छापाची दिसू लागली आणि जीवनातलं अनुभवविश्वसुद्धा सपाट भासू लागलं. मूल्यव्यवस्थाही अधिक कोरडी झाली आणि त्याचा अनुभव शहर अथवा गाव यांनुसार न बदलता सारखाच दिसू लागला. या पार्श्वभूमीवर जगण्याच्या वाढलेल्या वेगातही माणसांच्या मनोविश्वाचा आणि व्यवहारांचा वेध सफलपणे घेण्याचं अवघड काम डॉ. अभय वळसंगकर यांच्या लेखनानं लीलया पेललं आहे. ‘चंद्रशाळा’तल्या प्रत्येक कथेतल्या शब्दाशब्दांतून याचा अनुभव येत जातो. आपल्या दृष्टीसमोर घडणारं हे सारं आपल्या नजरेला कसं पडलं नाही, असा प्रश्न पडण्यातच या कथांची वाचनीयता दडलेली आहे.
-
Zapataleli Paval (झपाटलेली पावलं)
माणूस जात्याच 'एक्सप्लोरर' आहे. आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं तो शोधत राहिला, त्यातूनच त्याचं जगणं घडत गेलं. अशाच काही आधुनिक फिरस्त्यांच्या या गोष्टी. यातला प्रत्येकजण आपलं सुखासीन आयुष्य सोडून बाहेर पडला. कुणाला नवनव्या गोष्टींचा, ठिकाणांचा, पदार्थांचा शोध घ्यावासा वाटला... कुणी इतिहासाच्या शोधार्थ निघालं, कुणाला डोक्यातल्या नवनव्या कल्पना प्रत्यक्षात उतरवाव्याशा वोटल्या, कुणाला मनातल्या अस्वस्थतेला वाट करून द्यावीशी वाटली... तर कुणाला स्वतःचा शोध घ्यावासा वाटला. निसर्ग, पर्यावरण, विज्ञान, इतिहास, समाज, संस्कृती, परंपरा, चालीरीती यांतल्या अनाम, खडतर वाटा धुंडाळताना त्यांच्या साथीला होती... झपाटलेली पावलं!
-
Man Rutale Kshan (मन रुतले क्षण)
तीस वर्षांपूर्वी एक तरुण चाकोरीतलं आयुष्य जगणं नाकारून देशभर फिरतो. कधी एकटा, कधी सोबत बायको. कधी ईशान्येकडच्या अरुणाचल प्रदेश- नागालँड-असाम या राज्यांत, कधी मध्य प्रांतातल्या आदिवासी भागात, तर कधी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात. कधी शिक्षकाच्या भूमिकेत, कधी पत्रकाराच्या, तर कधी निव्वळ फिरस्त्याच्या. या उमेदीच्या काळात त्याला जे बघायला, अनुभवायला, शिकायला मिळतं ते अस्सल अन् अतरंगी आहे. त्या अतरंगी अनुभवांच्या गाठोड्यातले हे काही क्षण. जगण्याचं दर्शन घडवणारे. चांगले-वाईट, सुखद - दु:खद अशा द्वैताच्या पार, धुक्यातल्या स्तब्ध पिंपळासारखे अस्तित्वाचा हिस्सा बनून गेलेले.
-
Pimpalpan Part -14 (पिंपळपान भाग-१४)
Madhu Mangesh Karnik Jaywant Dalvi Malati Damale Shobhana Shiknis Madhavi Kunte Asha Ratanji Bha.La.Mahabalआशयसमृद्ध, भावस्पर्शी कथांच्या रूपानं आजवर अनेक सिद्धहस्त लेखकांच्या लेखणीचा स्पर्श 'मेनका'चं रंगरूप खुलवत राहिला आहे. मनाचा ठाव घेणाऱ्या विलक्षण प्रवाही कथा हे 'मेनका'चं बलस्थान. मराठी भावविश्वाला गेल्या साडेपाच दशकांहून अधिक काळ गुंतवून ठेवणाऱ्या दिग्गज लेखकांच्या विविधरंगी कथा एकत्रित स्वरूपात आणणारं हे पिंपळपान....
-
Janavanatli Rekhatane (जनावनातील रेखाटणे)
नागझिरा अभयारण्यातील एका तलावाच्या काठावरील लहानशा झोपडीत मी राहत असताना, हे भलेमोठे पिंपळ माझा अविभाज्य सोबती होते. राजस्थान हे एक वाळवंट आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पण आम्हाला सर्वत्र मानवी वस्तीपासून दूर पाण्याचे अनेक साठे आढळले. इथेच आम्हाला अनेक पक्षी पाहायला मिळाले. मी हिमाचल प्रदेशात फिरलो. मी बर्फाच्छादित हिमालय माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहिला. आणि सोलन रेल्वे स्टेशनवर असताना, मला आईच्या पाठीवर बांधलेली बाळंही दिसली, जी आश्चर्यचकित आणि गोंधळलेल्या नजरेने आपल्या सभोवतालच्या जगाकडे पाहत होती.