-
Tisara Stambha (तिसरा स्तंभ)
सरतेशेवटी, या पुस्तकातील इतिहासातला फेरफटका आशावाद सूचित करणारा आहे. आपली जीवनमूल्ये अपरिवर्तनीय नाहीत, ती बदलतात. डॉक्टर मार्टिन ल्यूथर किंग ज्युनिअर म्हणाले होते, 'वैश्विक नैतिकतेची कमान खूप उंच आहे; पण ती न्यायाकडे झुकणारी आहे.' छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये इतिहासाचे अवलोकन केले, तर द्वेषाचे बी पेरून कलहाचे पेव फोडण्यासाठी वंशवाद आणि लढाऊ राष्ट्रवाद जगात पुन्हा पुन्हा डोके वर काढत असतात असे वाटेल, त्यामुळे इतिहासाची पुनरावृत्ती होते, असे आपल्याला वाटते. असले संघर्ष ज्या समाजात घडतात, तो समाज तर बदलत असतो. त्या बदलाची दिशा सहिष्णुता, आदर आणि न्याय्यता यांच्याकडे जाणारी असते. त्या रेषेत प्रवास करताना चढ-उतार होतच राहतात. आज आपण उतरणीला लागलो असलो आणि अजूनही फार लांबचा पल्ला गाठायचा असला तरी आपण मजल-दरमजल करत इथवर आलो आहोत, त्यामुळे आपल्याला आशा वाटली पाहिजे. भविष्यात आकस्मिक आश्चर्याचे धक्के बसू नयेत म्हणून आपण भविष्याला आकार देत राहिले पाहिजे. अजून खूप काम करायचे आहे. चांगले आणि शांततापूर्ण एकात्म जीवन जगायचे असेल, तर मार्ग सुज्ञपणे निवडला पाहिजे. आपण तसे करू शकू, असा मला विश्वास आहे.
-
Mrutyukatha (मृत्यूकथा)
‘मृत्यू कथा’ हे वास्तववादी लेखन प्रकारातील एक उल्लेखनीय असेच पुस्तक आहे, असे म्हणावे लागेल. अत्यंत बारकाईने घेतलेली माहिती, चिकित्सकपणे शोधलेले मर्म यामुळे हे वाचन वाचकास समृद्ध करून जाते. या गतिमान, सहानुभूतिपूर्ण, धाडसी आणि कधी कधी तर रक्तच गोठवून टाकेल, अशा पुस्तकातून बस्तरचा प्रत्यक्ष परिसर, कथानकातील पात्रे, तेथील नागरी युद्धाचे सामाजिक परिणाम या सगळ्या गोष्टी डोळ्यांसमोर जिवंत होऊन उठतात. यातील निवेदकाचे पात्र उगाच घुसडलेले कधीच वाटत नाही. उलट त्याच्या सदसद्विवेकबुद्धीमुळे त्याची उपस्थिती वाचकाला विश्वासार्ह वाटते आणि त्याच्यातील साहित्यगुणांमुळे तर तो प्रशंसनीयच ठरतो.
-
How We Got to Now (हाऊ वी गॉट टू नाऊ)
हाऊ वी गॉट टू नाऊ या सचित्र पुस्तकात स्टीव्हन जॉन्सन यांनी आपल्या दैनंदीन जीवनाचा अगदी अविभाज्य भाग असलेल्या सहा अगदी साध्या गोष्टींचा (चष्मा, लंबकाचे घड्याळ, विजेचा दिवा, भूमिगत गटारे, टेलिफोन, विजेचा दिवा) शोध कसा लागला आणि त्यामुळे एकूण जीवनावर किती दूरगामी आणि खोल परिणाम झाले यांचा इतिहास अतिशय रंजक पद्धतीने सांगितला आहे. अनेक भिन्न क्षेत्रातील वरवर असंभाव्य वाटणाऱ्या गोष्टींमध्ये (सूक्ष्मदर्शक यंत्र, ग्लोबल पोझीशनींग, मायक्रोचीप, न्युक्लीय एकीकरण, मानवी स्थलांतर, स्त्रीभृणहत्या) कसा परस्पर संबंध असतो आणि त्यांचा एकमेकांवर होणारा परिणाम कसा अनपेक्षित असतो हे त्यांनी सांगितल्यावर आपल्याला कळते आणि त्याने वाचक अचंबित झाल्या वाचून रहात नाही. वाचकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवणाऱ्या त्यांच्या खास शैलीमुळे ते जगभर लोकप्रिय आहेत.
-
Oh My Godse (ओह माय गोडसे)
मोहनदास करमचंद गांधी हा माणूस समजून घ्यायचा असेल,तर तुम्हाला आधी स्वतः 'माणूस' होणं गरजेचं आहे. गांधी समजून घेण्याची प्रक्रिया ही माणूस होण्याच्या प्रक्रियेपेक्षा वेगळी नाही. या प्रक्रियेत तुम्हाला अंतबाह्य उघडं व्हावं लागत. आपल्या जगण्याचा तटस्थपणे विचार करावा लागतो. हे सोपं नसत. म्हणून गांधी सोपा वाटत नाहीं लोकांना, कारण लोकांना माणूस होण्यातही फारसा रस नसतो. त्यांना नथुराम आकर्षक वाटतो. तो सोपा आहे. कारण त्याला कशाचीच जबाबदारी घ्यायची नाही. गांधी अवघड आहे, कारण तो तुमच्या कृत्यांची जबाबदारी घ्यायला भाग पाडतो. गांधी हि भारताची खरी ओळख आहे. नथुराम हा भारतावरचा कलंक आहे. गांधी हा विचार आहे, तर नथुराम अविचार आहे. गांधी हि जबाबदारी आहे, तर नथुराम हि बेपर्वाई आहे. गांधी हा माणुसकीचा विश्वस्त आहे, तर नथुराम हा माणुसकीचा खुनी आहे. आपण कोणाची निवड करायची? गांधींची की नथुरामची? नथुराम म्हणेल की, माझी निवड करा; पण गांधी सांगेल की, तुम्ही स्वतःची निवड स्वतःच करा. पण तस करताना सत्याला साक्षी ठेवा. माणुसकीचं भान बाळगा. जो हे करेल. तो मग माणुसकीच्या प्रक्रियेत ओढला जाईल. निर्णय तुम्ही घ्यायचा आहे.
-
Baluchya Avasthantarachi Diary (बाळूच्या अवस्थांतर
भूतकाळाची काळी, काटेरी, टोकदार सावली वर्तमानावर पसरलेली असते- आपल्याला जरी भान असलं, नसलं, तरी! वर्तमानातल्या घटनांची, व्यक्तीच्या स्वभावाची, वर्तनाची मुळे खूप खोलवर आत आत भूतकाळात रुजलेली असतात. आपली आपल्यालाही त्याची जाणीव नसते. प्रोफेसर भांगरे, त्यांची आई, बायको आणि 3 मुली यांची गोष्ट म्हणजे ही कादंबरी. भांगरे यांच्या वर्तमान काळामध्ये काही गोष्टी घडत आहेत. त्यांना वाटत की भूतकाळा मध्ये पण अशा गोष्टी घडल्या आहेत आणि त्याची मुळे वर्तमान काळामध्ये रुजली गेलेली आहेत. मुली ,त्यांची प्रेम प्रकरण, लग्न आणि त्यांचा सामाजिक प्रभाव, जातिव्यवस्था, मध्यमवर्गीय माणूस आणि समाजाला घाबरून जाऊन तो करत असलेला विचार म्हणजे ही कादंबरी. रंगनाथ पठारे यांच्या पुस्तकांची खास बात म्हणजे त्याची शीर्षक आणि पूर्ण पान भरून असणार एकच वाक्य. तरीही ही वाक्यं कुठे कंटाळवाणी अजिबात होत नाहीत.
-
Akherche Shiledar (अखेरचे शिलेदार)
अखेरचे शिलेदार या पुस्तकात स्वातंत्र्यलढ्याचं पायदळ असलेले काही जण त्यांची गोष्ट आपल्याला सांगतात. आदिवासी, दलित, इतर मागासवर्गीय, मुस्लीम, हिंदू आणि शीख पंथाची माणसं आहेत ही. ते वेगवेगळ्या भाषा बोलतात. भारताच्या विविध प्रांतांतली, विभिन्न संस्कृती जपणारी आणि वेगवेगळ्या पाश्वभूमीची ही मंडळी आहेत. काही आस्तिक आहेत; तर काही नास्तिक. काही डावे, काही गांधीवादी; तर काही आंबेडकरवादी. या पुस्तकातले शिलेदार आपल्याला एक प्रश्न विचारतात : 'स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय?' त्यांच्यासाठी केवळ स्वराज्य म्हणजे स्वातंत्र् नव्हतं. १९४७ नंतरही त्यांचा संघर्ष सुरुच राहिला.
-
Ambedkar Jivan Ani Varsa (आंबेडकर जीवन आणि वारसा)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव आज सर्वांत आदरणीय भारतीयांच्या नामावलीत घेतलं जातं आणि देशभरातील त्यांच्या पुतळ्यांची संख्या महात्मा गांधींच्या पुतळ्यांखालोखाल असेल. किंबहुना, आधुनिक काळातील 'सर्वांत थोर भारतीय' ठरवण्यासाठी अलीकडे एक मतचाचणी घेण्यात आली, त्यात दोन कोटींहून अधिक मतं नोंदवली गेली आणि त्यात आंबेडकरांना गांधींपेक्षा जास्त मतं मिळाली होती. आज सर्व प्रमुख राजकीय पक्षांमध्ये आंबेडकरांवर हक्क सांगण्यासाठी चढाओढ सुरू असते. मुख्यत्वे आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळे अस्पृश्यतेवर कायद्याने बंदी आली आणि दलित समुदायाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला, त्यामुळे दलित समूहांमध्ये ते एक आदरणीय व्यक्तिमत्व आहेत. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून त्यांचा गौरव केला जातो. व्यक्तीच्या अधिकारांची पाठराखण करणाऱ्या व दडपलेल्यांची उन्नती साधू पाहणाऱ्या उदारमतवादी, धर्मनिरपेक्ष, अनेकत्ववादी मूल्यांसह भारत आजपर्यंत लोकशाही म्हणून टिकला, त्याचं मुख्य कारण संविधान हे आहे (पण सध्या ही सर्व मूल्यं संकटात अडकली आहेत). 'डॉ. आंबेडकरांची थोरवी केवळ एकाच उपलब्धींपुरती मर्यादित मानता येत नाही, कारण सर्वच बाबतीत त्यांनी सारखीच असामान्य कामगिरी केली,' असं शशी थरूर लिहितात. आंबेडकरांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतचा जीवनपट प्रस्तुत चरित्रात संक्षिप्तपणे, सुबोधपणे, मार्मिकपणे व आदरभावाने उलगडला आहे.
-
Mi Gita Aahe (मी गीता आहे)
भगवद्गीतेच्या सायकोलॉजीवर एक अभूतपूर्व व्याख्या युद्ध सुरू होण्याआधी अर्जुन कृष्णांना सांगतो, राज्य मिळवण्यासाठी ना मला भावांना मारायचे आहे, ना हिंसा करायची आहे. शिवाय, धर्मशास्त्रदेखील याची अनुमती देत नाही. तुम्ही अर्जुनाच्या विचारांशी सहमत आहात का? तर मग कृष्ण अर्जुनाच्या विचारांशी सहमत का झाले नाही? कृष्णांनी अर्जुनाला युद्ध करण्यास प्रवृत्त केले की त्याला योग्य मार्ग दाखवला? युद्ध आणि हिंसा करण्यामागेही सबळ कारणं असू शकतात का? कोण बरोबर आहे? कृष्ण की अर्जुन? कृष्णांना गीता अठराव्या अध्यायांपर्यंत का सांगावी लागली? जसं गीता एक, प्रश्न अनेक आहेत... तसंच जीवनही एक आहे, प्रश्न अनेक आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरं गीताच देऊ शकते. कारण कृष्ण हे मनुष्यजातीचे पहिले ‘सायकोलॉजिस्ट’ आहेत, तसेच ‘स्पिरिच्युअल सायकोलॉजी’च मन व जीवनातील सर्व प्रश्नांची अचूक उत्तरं देऊ शकते. पण गीतेच्या सायकोलॉजिकल बाजू नेहमीच दुर्लक्षित केल्या गेल्या. मी गीता आहे, भगवद्गीतेची पहिली अशी व्याख्या आहे जी समस्त 700 श्लोकांचे ना केवळ ‘स्पिरिच्युअल’ तर संपूर्ण ‘सायकोलॉजिकल’ सार समजावते. यातून आपण गीतेचं सार एका सुंदर गोष्टीच्या माध्यमातून कृष्ण आणि अर्जुन यांच्याकडून ‘लाइव्ह’ समजून घेत आहोत असं वाटतं. दीप त्रिवेदी हे “मैं कृष्ण हूं”, “मी मन आहे” तसंच “सर्वकाही सायकोलॉजी आहे” बेस्टसेलिंग पुस्तकांचे लेखक, गीतेवर 168 तास प्रदीर्घ वर्कशॉप्स घेणारे आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड होल्डर आहेत. भगवद्गीतेची सायकोलॉजीवर केलेल्या कार्यांसाठी ‘ऑनरेरी डॉक्टरेट’ पदवीने सन्मानित आहेत.
-
Sattechya Padchhayet (सत्तेच्या पडछायेतून)
यशवंतराव चव्हाण अन् नरसिंह राव अशा दिग्गज राजकीय नेत्यांचे निजी सचिव म्हणून चार तपांची शासकीय सेवेतील कारकीर्द व्यतीत केलेले राम खांडेकर. सत्तास्थानाच्या अगदी निकट राहताना खांडेकरांनी कितीतरी उलथापालथी जवळून पाहिल्या. राजकारणातले ताणेबाणे विणताना, उसवताना पाहिले. मात्र दिल्लीच्या सत्ताधुमाळीतही आपली ऋजुता खांडेकरांनी हरवू दिली नाही, ना आपला नि:स्वार्थीपणा हरपू दिला. यशवंतरावांचा, नरसिंह रावांचा विश्वास खांडेकरांनी जिंकला तो आपल्या सचोटीच्या बळावर. निजी सचिव असूनही ते ‘होयबा’ झाले नाहीत, प्रसंगी ठाम नकारही देऊ शकले ते प्रामाणिकतेच्या जोरावर. ऐतिहासिक घटनांनी भरलेला अन् भारलेला अर्धशतकाचा काळ जवळून निरखलेल्या सरळ अन् सात्त्विक राम खांडेकर यांनी रसाळ शैलीत रेखाटलेले त्या काळाचे शब्दचित्र.
-
Tikasvayamvara (टीकास्वयंवर)
डॉ. भालचंद्र नेमाडे यांना १९९१चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याचे समजले. टीकास्वयंवर हा समीक्षालेखांचा ग्रंथ १९९० साली प्रसिद्ध झाला. त्यातील लेखांवरून व मुलाखतीवरून डॉ. भालचंद्र नेमाडे यांची साहित्यविषयक भूमिका नेमकेपणाने समजण्यास मदत होते. त्यांची मते किती मूलगामी आणि प्रक्षोभक असू शकतात, याची आता मराठी वाचकांना चांगली कल्पना आलेली आहे... आज त्यांचे टीकालेखन महत्त्वाचे काम करीत आहे. एकूण डॉ. भालचंद्र नेमाडे साहित्य व्यवहाराकडे अत्यंत गांभीर्याने पाहणारे समीक्षक आहेत. त्यांचे विचार प्रक्षोभक, बंडखोर, प्रस्थापितांचे वेळोवेळी वस्त्रहरण करणारे असले तरी आजच्या वाङ्मयीन संस्कृतीचे कुंठितपण घालविण्यासाठी आणि तिला योम्य दिशा कोणती व का हे समजावून देण्यासाठी त्यांचा फार मोठा उपयोग होणार आहे, यात शंका नाही. त्यांना अभिप्रेत असलेली भाषिक कृती डॉ. नेमाडे आपल्या कादंबऱ्यांतूनच नव्हे तर आपल्या समीक्षाविचारांतून जबाबदारीने व चोखपणे करीत आहेत. - म. द. हातकणंगलेकर रविवार सकाळ, २२ डिसेंबर १९९१ रा. श्री. जोग स्मृति पुरस्कार १९९० ह. श्री. शेणोलीकर पुरस्कार १९९० साहित्य अकादमी पुरस्कार १९९१