-
The Naga Story (द नागा स्टोरी)
भगवान शिवाचे उपासक असलेल्या नागा साधूंच्या रहस्यमय आणि आध्यात्मिक जीवनावर ही कादंबरी प्रकाश टाकते. ‘कुंभमेळ्या’सारख्या मोठ्या धार्मिक उत्सवांमध्येच दिसणाऱ्या आणि नंतर अचानक अदृश्य होणाऱ्या या तपस्वी योद्ध्यांच्या जीवनशैली, त्यांचे नियम आणि श्रद्धा यांचे वास्तव या पुस्तकातून उलगडले जाते. ‘रूमी’ आणि ‘शेखर’ ही पात्रं या अनोख्या विश्वात वाचकांना घेऊन जातात. हे पुस्तक भारतीय अध्यात्मिक परंपरांविषयी आणि नागा साधूंच्या गूढ जीवनशैलीबद्दल जाणून घेण्यास इच्छुक असणाऱ्यांसाठी एक वाचनीय प्रवास ठरतो.
-
Epitaph (एपिटाफ)
महासत्तेतील संरक्षण खात्यातील भ्रष्टाचार उघडकीस आणताना सिमॉन व्हिटकोरने प्राण गमावलाय; पण जाता-जाता एक पुरावा ठेवलाय त्याने. त्याचा जिवलग मित्र कसा पोचतो त्या पुराव्यापर्यंत आणि भ्रष्टाचार्यांचं बिंग कसं फोडतो, याचं उत्कंठावर्धक चित्रण आहे ‘एपिटाफ’ या कथेत. ‘अपहरण’ कथेतील सुधीर हा निवृत्त पोलीस अधिकारी. त्याच्या सुंदर, तरुण मुलीचं, ज्योतीचं अपहरण होतं. सुधीर तपासाला निघतो. कोणी केलेलं असतं ज्योतीचं अपहरण? सापडते का ती? भारतातील वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी, मानवतेला काळिमा फासणारा ‘पॉप्स डिसीजन’ हा प्रोजेक्ट राबवताहेत स्मिथ आणि थापर. त्यांना शह देण्यासाठी हाय प्रोफाइल सेक्स वर्कर अवंती, एक मंत्री आणि अन्य आखतात एक योजना. सफल होते का त्यांची योजना? वाचा ‘पडद्यामागे’ या कथेत. ‘अपहृत’ कथेत दोन संघटनांच्या रक्तरंजित संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एका पत्रकाराचं अपहरण झालंय. काय होतं पुढे? वास्तवतेच्या जवळ जाणार्या उत्कंठावर्धक कथा.
-
French Rajyakranti Ani Badshah Napolieon (फ्रेंच राज्यक्रांती आणि बादशाह नेपोलियन)
फ्रेंच राज्यक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नेपोलियनचा झालेला उदय... फ्रान्सचा पहिला कॉन्सल ते फ्रान्सचा बादशहा असा झालेला त्याचा प्रवास...नेपोलियनने लढलेल्या लढाया, त्यात मिळालेले यश-अपयश यांचा तपशील...इंग्लंडची त्याने केलेली आर्थिक कोंडी त्याच्यावर कशी उलटली, स्पेनच्या युद्धात त्याच्या अतिआत्मविश्वासाला स्पॅनिश लोकांनी कसा सुरुंग लावला या बाबींचा उल्लेख...नेपोलियनचा अस्त कसा झाला आणि त्याची अखेर कशी झाली...आधुनिक फ्रान्सचा निर्माता म्हणून त्याने आर्थिक, धार्मिक, शिक्षण क्षेत्रात केलेल्या सुधारणा, त्याने तयार केलेली घटना, लोककल्याणाची केलेली कामं... नेपोलियनमधील थोर प्रशासक, महान सेनापती इ. विविध अंगांनी नेपालियनचा वेध घेऊन तो मुत्सद्दी म्हणून कसा कमी पडला याची चर्चा, त्याच्या अस्ताची कारणमीमांसा केली आहे. त्याच्या मृत्यूनंतरही फ्रान्समधील त्याच्या लोकप्रियतेचा उल्लेख केला आहे. फ्रेंच राज्यक्रांती आणि नेपोलियनचं चरित्र यावर अभ्यासपूर्ण प्रकाश टाकणारं वाचनीय पुस्तक.
-
Line (लाइन)
मरणाची टांगती तलवार डोक्यावर घेऊनही बेडरपणे जगणारा तरुण युवक - आई-वडिलांच्या छत्राविना वाढल्यामुळे आयुष्याची होणारी परवड - हॉटेलमध्ये कप-बश्या व खानावळीत ताटं धुणे - आइसकांडीचे जड डबे पोटावर लादून गारेगार विकणे, अशी कामे करूनही होणारा अपमान-अवहेलना - अखेर कंटाळून तो ट्रकलाइनकडे वळताच मरणाच्या दारातून एकदा तो परत कसा येतो - तरी पुन्हा तेच काम का करत राहतो - एका ड्रायव्हरच्या सैतानीवृत्तीने तो भलत्याच संकटात कसा अडकतो - ट्रकमधील सिटं भरताना पिसाटलेला ड्रायव्हर एका स्त्रीला खाली उतरू देत नाही आणि वाईट विचारांच्या अमलाखाली येऊन ड्रायव्हर ट्रक भरधाव पळवतो; परंतु हे सर्व बघणारा तरुण नुसता बघत राहतो? का, त्या स्त्रीला वाचवण्यासाठी काही ठोस पावलं उचलतो? तिच्या घरी ती सुरक्षित पोहचते का? तिची व तिच्या नवर्याची भेट होते का? आणि या सगळ्यात हा क्लीनर ड्रायव्हर होतो; पण कसा? या सर्वाची उकल ‘लाइन’ या कादंबरीतून होते.
-
Balanchya Navanchi Anokhi Diary (बाळांच्या नावांची अनोखी डायरी )
राजवाड्याच्या खास स्टेशनरीवर साकारलेली ही एका विचित्र, जुनाट राजाच्या गतकाळाची नोंदवही आहे. कदाचित हा भारतातील शेवटच्या राजांपैकी एक आहे. तो आपली प्रत्येक संतती या पुस्तकात निष्ठेने नोंदवतो. शेवटच्या श्वासांमध्ये कटूता अनुभवणाऱ्या या राजाच्या अंदाजे शंभर मुलांपैकी आठजण त्यांचं मूळ शोधताना पित्याच्या क्रूर खोटेपणाचा मागोवा घेतात आणि आपल्या वंशपरंपरेच्या ओझ्याशी सामना करतात. अनेक दृष्टिकोनांनी आणि लयबद्धतेने गुंफलेली ही कथा छोट्या, धारदार व मोहक किस्स्यांद्वारे उलगडते. हे पुस्तक भारतीय कुटुंबव्यवस्थेच्या विस्कटलेल्या केंद्रातली एक रंगीबेरंगी, गुंतागुंतीची सफर आहे. विनोदाची हलकाफुलकी शैली आणि शोकात्मतेची खोल गंभीरता यांचा समतोल साधत, कोड्यांसारख्या चपखल शैलीत आणि तत्त्वज्ञानाच्या विचारवंत वजनासह लिहिलेली,ही अनिस सलीम यांची सर्वाधिक महत्त्वाकांक्षी कादंबरी आहे.
-
The Ethical Doctor (द एथिकल डॉक्टर)
आरोग्यात काही बिघाड झाल्यास आपण थेट तज्ज्ञ डॉक्टरांकडे जातो. ज्यांचा विश्वास असतो ते व गरजू, पैशाची नड असलेलेही डोळे झाकून डॉक्टर सांगतील तसे वागतात. डॉक्टरांनी सांगितलेल्या सगळ्या टेस्ट करतात व लागल्यास ताबडतोब ऑपरेशन करण्यास तयार होतात; परंतु प्रत्यक्षात आपलं शरीर व पैसा यांचं गणित का बसत नाही? निदानाच्या बाबतीत नेमकं बिघडतंय कुठे याचा कधीच थांगपत्ता त्यांना लागत नाही आणि दुसरीकडे ज्यांचा विश्वास नसतो ते दोन – तीन डॉक्टर बदलत राहतात; नाहीतर परिस्थितीला शांतपणे सामोरे जातात. यात मात्र तोटा फक्त रुग्णाचा होतो आणि रुग्ण रुग्णालयाच्या फेर्या मारत बसतो. या पुस्तकाचे उद्दिष्ट असे की, वैद्यकीय क्षेत्रातील असे काही अनुभव सामान्यांसमोर मांडून ठेवणे- जेणेकरून कोणताही रुग्ण स्वत:च्या आजाराबाबत गाफील राहणार नाही.
-
Chitevarchya Kalya (चितेवरच्या कळ्या)
‘चितेवरच्या कळ्या..!’ एका ‘ती’ची जीवनकहाणी – दैनंदिन जीवनातलं प्रत्येक पान अमानुष कृत्यांनी-आक्रोशानं-वेदनेनं भरलेलं – नवर्याकडून रोज रात्री होणारा जबरदस्तीचा संभोग - तिला होणार्या असाहाय्य वेदना - तिच्या सख्ख्या भावोजींबरोबरच्या नसलेल्या; परंतु नणंदेने निर्माण केलेल्या संशयामुळे होणारी बेदम मारहाण – याला विरोध करूनही दुपटीनं सहन करावा लागणारा छळ -गरोदरपणाच्या काळात तिच्या पोटावर बसणारा मार – आतल्या गर्भाची काळजी – सासू, नवरा, दीर, नणंद यांकडून फक्त हुंड्यासाठी होणारा अमानुष छळ व सासर्यांची काहीही न करू शकणारी हतबलता – माहेरी मोठं कुटुंब असूनही शेवटच्या क्षणी भोगावा लागलेला एकांतवास - भीषण नि भयानक घटना कशा भोगल्या? कशा सहन केल्या? रानटी माणसांमध्ये जगता जगता जीवन ज्योत मालवल्यावर समाज म्हणे `हा तर ‘हुंडाबळी’’ , परंतु, याने हुंडा मिळाला? याच अनुत्तरीत प्रश्नांमध्ये राख झालेली `ती’ व तिच्यासारख्याच ‘चितेवरच्या कळ्या..!’
-
A Matter Of Honour (अ मॅटर ऑफ ऑनर)
अॅडम स्कॉट हा ब्रिटिश लष्करातून लवकर निवृत्ती घेतलेला तरुण. झारचं राजचिन्ह अॅडमच्या हातात येतं; पण त्याच राजचिन्हाच्या मागे असतो रोमानोव्ह नावाचा रशियन तरुण. अमेरिका आणि इंग्लंडलाही ते हवं असतं. रोमानोव्ह अॅडमच्या मैत्रिणीचा खून करतो; पण स्थानिक पोलीस अॅडमला तिचा खुनी समजतात आणि त्याच्यामागे पोलिसांचा ससेमिरा लागतो. मग पोलीस, रोमानोव्ह आणि अन्य शत्रूंपासून वाचण्यासाठी अॅडम राजचिन्हासह धावत सुटतो. कधी एखादी ऑर्केस्ट्रातील कलाकार त्याला मदत करते, तर कधी एखादी शेतकरी स्त्री, कधी एखादा सद्गृहस्थ त्याला लिफ्ट देतो, तर कधी एखादी वारांगना त्याच्या उपयोगी येते. या प्रवासात त्याच्यावर गोळ्याही चालवल्या जातात. तो जखमीही होतो; कधी गाड्या चोरून त्यातून पलायन करतो, कधी एखाद्या पडावावर चढतो; पण एका क्षणी तो रोमानोव्हच्या तावडीत सापडतो; पण त्यावेळी त्याच्याकडे राजचिन्ह नसतं. सुटतो का तो रोमानोव्हच्या तावडीतून? ते राजचिन्ह कुठे असतं?
-
1946 Swatantryach Antim Yuddha (१९४६ स्वातंत्र्याचं अंतिम युद्ध)
फेब्रुवारी १९४६ मध्ये रॉयल इंडियन नेव्हीचे सुमारे २०,००० नौसैनिक ब्रिटिश सत्तेविरुद्ध उठावाला उभे राहिले. खराब सेवा अटी, वांशिक भेदभाव आणि ब्रिटीशांच्या वागणुकीविरोधात त्यांनी उठाव केला. बंडाची सुरुवात मुंबईत झाली आणि नंतर कराची, कलकत्ता, मद्राससारख्या बंदरांमध्ये झपाट्याने पसरली. नौसैनिकांनी ब्रिटीश झेंड्याऐवजी काँग्रेस, मुस्लिम लीग आणि कम्युनिस्ट पक्षाचे झेंडे फडकावून राजकीय ऐक्य दाखवले. हे बंड केवळ आठवड्याभरात दडपण्यात आले, परंतु यामुळे ब्रिटीश साम्राज्याच्या पायाखालची जमीन हादरली आणि भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या प्रक्रियेला गती मिळाली. १९४६ : लास्ट वॉर ऑफ इंडिपेंडन्स हे प्रमोद कपूर लिखित पुस्तक या दुर्लक्षित पण अत्यंत महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनाक्रमावर प्रकाश टाकते. सखोल संशोधन व ओघवत्या लेखनशैलीतून लेखकाने या नौसैनिक उठावाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. हे पुस्तक त्या तरुण नौसैनिकांना मानवंदना आहे, ज्यांनी साम्राज्यशाहीविरुद्ध उठून उभं राहण्याचं धाडस केलं.
-
The Circle Of Life (द सर्कल ऑफ लाइफ)
"उत्तरा राव, जानकी परांजपे, अरविंद शाह, के. सुब्बा राव आणि सुमित्रा अय्यर यांची पहिली भेट १९९९ साली बेंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये होते. अत्यंत वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेले हे पाचजण लवकरच चांगले मित्र बनतात. नाती, करिअर आणि आयुष्याचा प्रवास करत असताना, ते एकमेकांना वचन देतात—पंचवीस वर्षांनंतर पुन्हा या कॅम्पसवर भेटायचं. संघर्ष, चिकाटी, यश आणि निराशा यांची ही गोष्ट, या पाच मित्रांच्या आयुष्याचा मागोवा घेत त्यांच्या आठवणींमधून आयुष्याने कोणते वळण घेतले, हे उलगडते. त्यांच्या दृष्टीने आयुष्य एक चक्र पूर्ण करून परत त्या सुरुवातीच्या बिंदूवर आलेले असते. प्रेरणादायी आणि हृदयस्पर्शी, द सर्कल ऑफ लाइफ ही आयुष्यातील मोठ्या अपेक्षांचा सामना करणाऱ्या पाच मित्रांची एक भावनिक आणि मन हेलावणारी कथा आहे."
-
First Among Equals (फर्स्ट अमंग इक्वल्स )
‘हाउस ऑफ कॉमन्स’ हे ‘युनायटेड किंग्डम’ च्या संसदेमधील ‘कनिष्ठ सभागृह’ आहे. हाउस ऑफ लॉर्ड्स हे संसदेचे वरिष्ठ सभागृह असून, हाउस ऑफ कॉमन्सचे कामकाज लंडनमधील वेस्टमिन्स्टर राजवाड्यामध्ये भरते. ६५० संसद संख्या असलेल्या हाउस ऑफ कॉमन्सचे सदस्य मतदारसंघांमधून निवडून येतात. भारताच्या लोकसभेची रचना संपूर्णपणे हाउस ऑफ कॉमन्सवर आधारित आहे. संसदेमधील प्रमुख दोन पक्षांच्या आणि त्यांच्यातील अंतर्गत व पक्षीय चढाओढीची एक उत्कंठावर्धक आणि कथेत गुंतवून ठेवणारी, ‘जेफ्री आर्चर’ यांच्या उत्कृष्ट लेखनशैलीतून शब्दातीत झालेली कादंबरी म्हणजे ‘फर्स्ट अमंग इक्वल्स!’
-
Hakunamtata (हाकुनामटाटा)
मेघन चौथीच्या वार्षिक परीक्षेत शाळेत पहिला येतो. हाच आनंदाचा क्षण साजरा करण्यासाठी मेघन, त्याची आई आणि बाबा त्याचा आवडता `द लायन किंग` चित्रपट बघायला जातात आणि तिथं मेघन `हकूनामटाटा` हा शब्द ऐकतो आणि मग मेघनच्या आयुष्यात `हकूनामटाटा` अविभाज्य भाग होऊन जातो. मेघनची आत्या त्याला बक्षीस म्हणून बंगळुरूच्या `बन्नेरघट्टा झू`ची जंगल सफर घडवून आणते आणि तेव्हाच मेघनचे आई-बाबा मंदारकाकांच्या मदतीने त्याला `मॅगी` भेट म्हणून देतात. मग काय, विचारायचीच सोय नाही. मेघन मॅगीला काय हवं-नको ते समजून घेतो, त्याच्याशी बोलू लागतो, त्याच्याशी मैत्री करतो आणि एक दिवस मॅगी `हकूनामटाटा` हा शब्दही उच्चारतो. ते ऐकून मेघनला आणि त्याच्या परिवाराला खूप आनंद होतो; पण पुढे मॅगीची आणि मेघनची काही वेळासाठी ताटातूट होते; तेव्हा मात्र मेघनचे प्रयत्न आणि मॅगीची साथ त्यांना पुन्हा एकत्र कसे आणतात ते बघू या... आणि हो हकूनामटाटा..! बरं का हकूनामटाटा..!
-
Saran (सरण)
जोपर्यंत तुम्ही गर्दीत राहल, तोपर्यंत लोक तुमचा आदर करतील. तुम्ही वेगळा मार्ग चोखाळलात, तर मात्र तुमची धडगत नाही`,... सरोजा आणि कुमरेशनच्या प्रेमाची ही कथा अखेरीस ह्याच वळणावर येते. सामाजिक जातवास्तव नाकारण्याचा प्रयत्न करणारे हे तरुण जोडपे - विवाहबंधनात अडकते खरे! पण एकमेकांसोबत आनंदाने आयुष्य व्यतीत करण्याचे त्यांचे स्वप्न अखेर स्वप्नंच राहते. रंग-रूप-अंगकाठी- बोली यांवरून माणसाची जात ओळखणा-या समूहाच्या द्वेषाला ते बळी ठरतात. स्वप्न की सत्य हे कळेपर्यंत सरोजाला त्या द्वेषाच्या आगीने वेढलेले असते. खोट्या प्रतिष्ठेपायी अल्लड सरोजाचा घेतलेला बळी या कादंबरीने चित्रमय पद्धतीने मांडला आहे.
-
Motiharicha Manus (मोतिहारीचा माणूस)
भूतकाळाच्या जखमांमधून सावरत असलेला, लेखक होण्याच्या वाटेवरचा देखणा असलम आणि लॉस एंजेलिसहून आलेली जेसिका — सामाजिक कार्यकर्ती आणि प्रौढ चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री — एका अनपेक्षित भेटीत एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडतात. ही कादंबरी आहे त्यांच्या विसंगत वाटणार्या पण खोलवर जोडलेल्या आयुष्यांची, त्यांच्या संघर्षांची, आणि एका अशांत काळात फुलणार्या प्रेमाची. पार्श्वभूमी आहे भारतात उजव्या विचारसरणीच्या राजकीय लाटेची. आणि ही कथा घेऊन जाते वाचकाला भारताच्या हृदयभूमीकडे — बिहारमधील मोतिहारी या छोट्याशा गावात, जिथून गांधीजींनी पहिल्यांदा सत्याग्रहाची वाट चालायला सुरुवात केली आणि जिथे जॉर्ज ऑरवेलचा जन्म, त्याच्या लेखनविश्वाला आकार देणार्या आठवणींसह, इतिहासात कोरला गेला. ही एक प्रेमकहाणी आहे — केवळ दोन व्यक्तींमधली नव्हे, तर विचार, स्मृती आणि देशाच्या अंतर्मनाशी गुंफलेली.
-
Khol Khol Pani (खोल खोल पाणी)
बुटक्या एका जमीनमालकाकडे कामाला असलेला अस्पृश्य मुलगा. दिवसभर बकर्या चारणारा, शेतात काम करणारा लहान मुलगा... खडतर आयुष्याचे चटके खाताना (सोसताना) मित्रांच्या सोबतीत आणि निसर्गात विरंगुळा शोधणारा. चिमूटभर आनंदसुद्धा धरून ठेवण्यासाठी धडपडणारा... पण, अपार कष्ट आणि पोटाची आग यांत त्याचं चैतन्यमय निरागस बालपण हरवून गेलेला.... या कादंबरीतलं चित्रदर्शी वर्णन, घटना, प्रसंग, पात्रे, संवाद आणि त्यातून उलगडत जाणारं भीषण वास्तव वाचकाला अस्वस्थ करतं, खिळवून ठेवतं आणि अंतर्मुख करतं. ‘कुलामाठारी` या पेरुमाल मुरुगन लिखित अत्यंत वाचनीय तमिळ भाषेतील कादंबरीचा तितकाच प्रवाही, परिणामकारक अनुवाद केला आहे सुप्रिया वकील यांनी."
-
Vaghache Katade Pangharnara Shur Sardar (वाघाचे कातडे पांघरणारा शूर सरदार)
अरब राजा रोस्तेवांचा पराक्रमी, निष्ठावान सेनापती अवथांदिल आणि राजाची रूपवती कन्या थीनाथीन, परस्परांच्या प्रेमात आहेत. एकदा त्यांच्या राज्यात एक शूर वीर येतो आणि त्याच्या चौकशीसाठी गेलेल्या राजाच्या सैनिकांना ठार मारून नाहीसा होतो. त्या शूर वीराच्या शोधात अवथांदिल निघतो. खडतर प्रवासानंतर महत्प्रयासाने त्याला तो शूर वीर भेटतो, त्याचं नाव असतं तारियल. तो अखिल हिंदुस्थानचा राजा असतो. त्याची प्रेयसी राजकन्या नेस्तां-दारेजां हिचं ज्या राजकुमाराशी लग्न होणार असतं, त्याला तो ठार मारतो आणि परागंदा होतो. त्याचं राज्य आणि प्रेयसी दोन्हीपासून दुरावतो. त्याची प्रेयसी शत्रूच्या हाती लागते. विरहाने वेडापिसा झालेला तारियल तिचा ठावठिकाणा माहीत करून घेण्यासाठी जंग जंग पछाडत असतो. तिला शोधून आणण्याचं आव्हान अवथांदिल स्वीकारतो. तारियल आणि नेस्तां-दारेजांची भेट घडवण्यात तो यशस्वी होतो का? उत्कट प्रेमाची, मैत्रीची, निष्ठेची उत्कंठावर्धक वळणांनी पुढे सरकणारी महाकाव्यरूपी गाथा.
-
Razor Sharp (रेझर शार्प)
एक अमानुष सीरियल किलर मुंबईच्या रस्त्यांवरून मोकाट हिंडत आहे… त्याने आपल्या बळींची अत्यंत निर्घृण तऱ्हेने हत्या केलेली आहे. नायलॉनच्या दोरीने हात बांधून मृताच्या तोंडात धान्य कोंबणार्या या सीरियल किलरमुळे संपूर्ण शहर भीतीच्या छायेत जगत आहे.. पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना एकाच प्रश्नाने पछाडलं आहे : एकामेकांशी काडीचाही संबंध नसणाऱ्या या सर्व मृतांना जोडणारा दुवा नेमका कोणता आहे? एका चित्तथरारक मालिकेतील पहिल्या ‘रेझर शार्प’ या कादंबरीच्या पानांमधून आश्विन सांघी यांनी पुन्हा एकदा अत्यंत गुंतागुंतीचं, मती गुंग करणारं थरारनाट्य गुंफण्याचं आपलं अप्रतीम कौशल्य उलगडून दाखवलं आहे. ही कादंबरी एकदा हातात घेतल्यावर वाचकांना ती संपवल्याशिवाय खाली ठेवणं शक्यच होणार नाही.
-
Dayari Of A Home Minister (डायरी ऑफ ए होम मिनिस्टर)
"समाजकारणाची आस धरून राजकारणात उतरलेलं एक बहुआयामी व्यक्तिमत्त्वं म्हणजे श्री. अनिल देशमुख. छोट्या छोट्या पदांपासून सुरू असलेला हा प्रवास थेट गृहमंत्री पदापर्यंत पोहोचला. गृहमंत्री म्हणून ज्या यंत्रणेवर नियंत्रण मिळवलं, त्याच यंत्रणेतल्या एका सडलेल्या मनोवृत्तीने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यापुढे संकटांची रास उभी केली. आणि एका गृहमंत्र्यांनाच खोट्या आरोपांखाली तुरुंगवास अनुभवावा लागला. ... पण तुरुंगातल्या दिवसांनाही त्यांनी सकारात्मकतेत परिवर्तित केलं. त्यांचा हा विलक्षण, अंतर्मुख करणारा प्रवास... स्फोटक, परखड, तरीही तितकंच काळजाला हात घालणारं विलक्षण आत्मकथन...
-
Davinchich Kod (दाविन्चीचं कोडं)
डॉ. कौशिक – सायन्टिस्ट आणि अमृतराव मोहिते – कमिशनर या दोन मित्रांच्या कर्तृत्वाची ही गोष्ट. कायद्यातील अडचणी या विज्ञानाच्या माध्यमातून कशा सोडवता येतात ते हे दोन मित्र दाखवून देतात. जगात लागणारे नवनवीन शोध आपल्या भारतातही कुठे-कुठे उपलब्ध आहेत, हे माहिती असणारे डॉ. कौशिक त्यांच्याकडच्या माहितीचा योग्य जागी कसा उपयोग करतात ते वाचण्यासारखे आहे. अगदी कम्प्यूटरबरोबर एका काही अंशी कोमात गेलेल्या मुलीने केलेला संवाद असू देत अथवा एका बलात्कारी मुलीला न्याय देण्यासाठी तयार केलेला रेकॉर्डर ड्रेस, ए.आय.च्या मदतीने शोध घेतलेलं मृत्युपत्र असू देत अथवा वैज्ञानिक तपासण्यांतून पकडलेली एका चित्राची चोरी असू देत... सगळंच अद्भुत. मुलांबरोबर मोठेही रमतील; कारण वैज्ञानिक कथा असूनही ते तंत्र आपल्या भारतात कुठे वापरले जाते हे समजल्यावर अंगावर अभिमानाचे रोमांच उभे राहतात. हा अनुभव जगण्यासाठी वाचा ‘दा विन्चीचं कोडं!’
-
Chirantan Yashache 10 Niyam (चिरंतन यशाचे १० नियम)
आयुष्यात यशाचा एक अर्थपूर्ण मार्ग शोधताना - यशाच्या मार्गावर जाण्यासाठी आवश्यक असलेली प्राथमिक पात्रता— तारुण्य, उत्साह, बुद्धिमता, आशावाद आणि याचबरोबर असंख्य परिस्थितींतून गेलेल्या अनुभवी लोकांच्या अनुभवातून मिळणार्या आधाराची भासणारी आवश्यकता - अनेक महान स्त्री–पुरुषांंचं आयुष्य आणि त्यांचे योग्य – अयोग्य निर्णय व त्यांचे जीवनावर उमटलेले पडसाद - महान व्यक्तींच्या आयुष्यातलं यश आणि आनंद - काळानुसार बदलत जाणारं यशाचं चित्र - जगात होणार्या कोणत्याही उलथापालथेत कायम टिकणारी मूलभूत वैशिष्ट्यं – ती आचरणात कशी आणायची? - यशाच्या जवळ असावं असं वाटणं; पण यश म्हणजे काय, ते कसं मिळतं आणि ते कसं टिकवून ठेवता येतं, याची उत्तरं स्व-ज्ञान, दृष्टी, पुढाकार, धाडस, प्रामाणिकपणा, संयोगक्षमता, विनयशीलता, सहनशक्ती, हेतू, लवचीकपणा अशा दहा महत्त्वाच्या वैशिष्ट्यांमधून मिळतात - यशाचा अर्थ नव्याने तपासून सांगतायत `मारिया बार्टिरोमो!’
-
Harkamya (हरकाम्या)
लतिफ हा किशोरवयीन मुलगा पॅराडाईज लॉजमध्ये कामाला लागतो आणि त्याचं भावविश्वच बदलून जातं. लॉजमधला हा हरकाम्या. सतराव्या वर्षी वडिलांना गमावलेल्या लतिफची गोष्ट त्याचं बेट आणि शहरातल्या लॉजच्या आवारातच घडते. दोन छोट्या बहिणी आणि आईची जबाबदारी पेलायला लतिफला नोकरी करावी लागते. लॉजवर काम करत असताना तिथं राहायला येणाऱ्या प्रवाशांविषयी त्याच्या मनात कुतूहल असतं. कधी तो दरवाज्यातून डोकावल्याबद्दल मारही खातो. तर कधी एका आत्महत्त्या केलेल्या अभिनेत्याचा शर्टही स्वतःकडे ठेवून घेतो. लॉजच्या कामादरम्यान तिथंच झाडूपोछा करणाऱ्या स्टेलाशी त्याची गट्टी जमते. एकत्र जेवतेवेळी तो तिला एका कल्पित मित्राची गोष्ट सांगत असतो. पण एके दिवशी त्याच्या या वरकरणी सुरळीत सुरू असलेल्या जगण्याला सुरूंग लागतो. आणि गोष्ट अस्वस्थ करणाऱ्या वळणावर पोहचते.
-
Masala And Murder (मसाला अॅन्ड मर्डर)
मेलबर्नस्थित अँग्लो-इंडियन प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेटर सॅमसन रायडरसाठी आव्हानात्मक वेळ आहे. बहिणीच्या मृत्यूबद्दल गुप्त अपराधाने तो वेढलेला आहे. कुटुंबीयांसोबतच्या नात्यात दुरावा आलेला आहे. अशात एका श्रीमंत उद्योगपतीच्या बॉलीवूड स्टार असलेल्या मुलीच्या मृत्यूचा तपास त्याच्याकडे येतो. सॅमसन हे काम पैशासाठी घेतो, पण ती त्याच्या बहिणीच्या मृत्यूच्या अपराधभावनेतून बाहेर येण्याची चाबी ठरते. सत्य शोधण्यासाठी सॅमसन त्याच्या जन्मगावी मुंबईला परततो. त्याची दुभाषी आणि गॉडमदर यांच्यासोबत संधान साधतो. आणि बॉलीवूडचा खरा चेहरा उघड करण्याचे प्रयत्न करतो. क्षणोक्षण उत्कंठा वाढणारी रहस्यमयी कादंबरी.
-
Dahi Disha (दाही दिशा)
रवींद्र ठाकूर लिखित ‘दाही दिशा' ही कादंबरी अरविंद नावाच्या एका वंचित युवकाची प्रतिकूल परिस्थितीशी झगडत स्वत:च्या पायावर उभारण्याच्या संघर्षाची कथा आहे. महाराष्ट्रातील खानदेश आणि मराठवाडा ही या कादंबरीची भौगोलिक पार्श्वभूमी आहे. प्राथमिक शिक्षकाचा पोर अरविंद. वडिलांची नोकरी व कुटुंब म्हणजे विंचवाचं बिर्हाड. अरविंद परिस्थितीने अकाली प्रौढ होतो नि काही बनण्याच्या ध्यासाने पडेल ते काम करत राहतो. अरविंद नाही नाही त्या गाढवांचे पाय धरत स्वत:चं जग निर्माण करत प्राध्यापक होतो. एका क्षणी लेखकाचीच आत्मकथात्मक कादंबरी वाटावी अशी अनेक साम्यस्थळे इथे आढळतात. अहिराणी भाषा खानदेश जिवंत करते तर नामांतर चळवळ मराठवाडा. वाचनीय तरी अंतर्मुख करणारी ही कादंबरी प्रत्येक वंचित तरुण-तरुणींना त्यांचीच वाटेल!
-
Use Of Force (यूज ऑफ फोर्स)
जगातील सर्वांत निष्ठुर आतंकवाद्यांकडून अमेरिकेला एक भयंकर संदेश पाठवला जातो - तुम्ही कुठेही सुरक्षित नाही आणि आतंकवादविरोधी कारवाईत सामील झालेला माजी सील ऑपरेिटव्ह स्कॉट हार्वथकडून त्यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर मिळतं. भूमध्य समुद्रावर वादळ घोंघावत असताना इटालियन तटरक्षक दलाला एक बोट संकटात सापडल्याचा संदेश येतो. काही दिवसांनी एका बुडून मेलेल्या माणसाचा मृतदेह किनार्यावर वाहून येतो. तो मृतदेह सर्व देश गेल्या तीन वर्षांपासून शोधत असलेल्या एका संशयित दहशतवाद्याचा असतो. त्या माणसाच्या नावाने सीआयएमध्ये धावाधाव सुरू होते. तो कुठे चालला होता? त्याची काय योजना होती? जगातल्या गुप्तहेर संस्थांचा त्या उन्हाळ्यात युरोप-अमेरिकेत एक जबरदस्त आतंकवादी हल्ला होणार आहे असा अंदाज होता. त्याच्याशी त्या मृतदेहाचा संबंध असेल काय? हृदयाचे ठोके वाढवणारी साहसे, मोहिनी घालणार्या व्यक्तिरेखा आणि चक्रावून टाकणार्या कलाटण्या.